जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून चित्रकलेचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन विद्या पटवर्धन बालमोहन शाळेत चित्रकलेच्या शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. चित्रकलेच्या शिक्षिका असूनही नाटकाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. दूरदर्शन आणि भारतीय विद्या भवन या ठिकाणी होणा-या स्पर्धेसाठी त्यांनी शाळेतर्फे मुलांचं नाटक बसवायला सुरुवात केली. यानिमित्ताने मुलांच्या भावविश्वात इतक्या रममाण झाल्या की, त्यांची चित्रकला कधी मागे पडली ते त्यांना कळलंच नाही. कधी मोठमोठया लेखकांची तर कधी पाठयपुस्तकांवर आधारित नाटकंही त्यांनी मुलांसाठी बसवली. पाठयपुस्तकावर नाटक बसवून हसतखेळत अभ्यासक्रम मुलांना शिकवला जाऊ शकतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. मुलांवर न रागावता, गोड बोलून, मजा-मस्ती-धमाल करत, त्यांच्यातच मिसळत अगदी अलगदपणे त्यांनी मुलांना अभिनयाचं बाळकडू पाजलं. असे त्यांनी कित्येक कलावंत घडवले. केवळ नाटकच नाही तर ‘दे धमाल’सारख्या मालिकेतून त्यांनी मुलांचं भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न केला. नाटक करता करता त्यांनी स्वत:देखील कित्येक मालिकांमधून अभिनय केला. आज निवृत्तीनंतरही त्या मुलांसाठी धडपडतायत. बालकलाकारांच्या निवडीसाठी प्रथम त्यांच्या कार्यशाळेला आवर्जून भेट दिली जाते. विद्यार्थ्यांना बालनाटकाची विद्या देणा-या विद्या पटवर्धन यांच्याशी मारलेल्या गप्पा
चाइल्ड आर्टिस्ट हवा तो विद्याताईंच्या शाळेतला, असा तुमचा लौकिक आहे. कित्येक कलावंतांना घडवलेल्या तुम्हाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती का?
» मुळात मला स्वत:ला नाटकाच्या क्षेत्रात येता येईल, याची मुळात कल्पनाच नव्हती. शाळेत असताना मी अतिशय लाजाळू होते. त्यात मी बुटकी आणि अंगाने जाडही होते. शाळेत विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत असलं तरी लाजून ते देण्याची हिंमत दाखवणार नाही, अशी काहीशी होते. अशा या लाज-याबुज-या व्यक्तिमत्त्वातून मला बाहेर पडायला माझ्या वर्गशिक्षिका सुलभा देशपांडे यांनी मदत केली. मी पाचवीत होते, त्यावेळी त्या एक नाटक बसवत होत्या. त्याचं नाव होतं, ‘पाटलाच्या पोरीचं लगीन’. मला त्यांनी त्या नाटकात घेतलं. संवाद म्हणायला सांगितला तेव्हाही खरं तर लाजलेच. मग केवळ या विंगेतून त्या विंगेत जाण्याचं काम सांगितलं. बघायला गेलं तर तो लीड रोल होता, पण काम काहीच नव्हतं. ते काम मी चांगलं केलं असावं, कारण त्यावेळी टाळ्या वाजवल्या गेल्या. त्यातूनच त्या जिथे नाटक शिकवत असत तिथे जायची आवड निर्माण झाली. शालेय जीवनात मी खूप नाटकं पाहिली. त्यातून नाटक बघायची आवड निर्माण झाली. कुमार कला केंद्राच्या स्पर्धेला खूप नाटकं जायची. तिकडे मी प्रेक्षक म्हणून गेले तरी मला नाटकाचा आनंद मिळायचा. नंतर मी ड्रॉइंग आणि पेंटिंग शिकण्यासाठी जे. जे. स्कूल ऑफ आर्टला अॅडमिशन घेतलं. तिथे सीनिअर स्टुडंट म्हणून आम्हाला अमोल पालेकर शिकवायला होते. तिकडे आम्ही तेंडुलकरांचं नाटक बसवलं. ‘समोरचा नाडकर्णी’ नावाचं नाटक होतं. त्यात मला पुरुषाची भूमिका प्रथमच साकारायला मिळाली. तोपर्यंत मी नाटक हळूहळू शिकायला लागले होते.
नाटकाची संहिता वाचताना पालेकरांनी मला पुरुष पात्र द्यावं, असा निर्णय घेतला. माझं हे काम खूप गाजलं. ‘भारतीय विद्या भवन’मध्ये त्या काळी खूप स्पर्धा होत असत. त्यात मी भाग घ्यायचे. तशाच एका स्पर्धेतलं नाटक बघायला सतीश दुभाषी आले होते. त्यांनी मला ‘फुलराणी’मध्ये काम करायला येतेस का, अशी ऑफर दिली, पण तेव्हा मी व्यावसायिक नाटकात काम करावं अशी काही परिस्थिती नव्हतं. माझ्या वडिलांचे क्लासेस होते. मग मी हळूहळू प्रायोगिक नाटकात काम करायला लागले. ती नाटकं गाजायलाही लागली, तोपर्यंत मी शाळेत शिकवायला लागले होते. ही साधारण १९७६ सालची गोष्ट. शारदाश्रम शाळेनंतर मी चित्रकलेची शिक्षिका म्हणून बालमोहन विद्यामंदिरमध्ये रुजू झाले होते. तिथल्या मुलांमध्ये मी रमायला लागले. अतुल परचुरे, अतुल पेठे, ऋतुजा काटदरे असे तिथे विद्यार्थी होते. सुधाताईदेखील मी बसवलेल्या नाटकाचं कौतुक करायच्या. पहिल्या वर्षी मला नाटक बसवायला मिळालं. ‘बालमोहन’चे दादासाहेब रेगे टॅक्सीतून जात होते. त्यांनी माझ्यासमोर टॅक्सी थांबवली. मी अगदी गांगरून गेले. त्यांनी तू नाटकं बसवतेस ना, आपल्या शाळेची नाटकं बसवण्याची चांगली परंपरा आहे. पण तुला त्यासाठी हवं ते घे, असं आवर्जून सांगितलं. मग मी पहिलं ‘हा नाद सोड तू’ नाटक केलं आणि लिटिल थिएटरच्या स्पर्धेत सादर केलं. त्याला पहिलं बक्षीस मिळालं. हे नाटक शाळेतल्या एका मुलाच्या आईने, कल्पना आगाशे यांनी लिहिलं होतं. नाटकामुळे मी मुलांमध्ये रमू लागले. आमचा छान रॅपो जमला. त्यानंतर कधी नाटकासाठी मुलं निवडण्याचा प्रश्नच आला नाही. सुरुवातीला नाटक करायचं असं ठरवलं, तेव्हा चारशे मुलं सभागृहात जमली होती. दादासाहेब रेगे यांनी या सगळ्यांना घेऊन नाटक कर, असं सांगितलं. पण त्यातून निवडत निवडत मग शंभर मुलांचं पहिलं नाटक केलं. असा प्रवास सुरू झाला. मग सई परांजपे, अमोल पालेकर, त्यांच्या ओळखी-पाळखीचे अशी सगळी मंडळी त्यांच्या प्रोजेक्टसाठी मुलं निवडायला शाळेत यायची.
तुम्ही स्वत: नाटकं लिहायला कधी लागलात?
» ती एक मोठी गंमत आहे. जे कुठलं स्क्रिप्ट यायचं त्यात मी खूप बदल करायचे. नाटकाचे मूळ लेखक मला ‘तुम्ही असं का केलं’, असं म्हणायचे, पण त्यांची लिहिलेली भाषा मुलांना बोलायला खूप जड असायची. मग मी लहान मुलांना समजतील अशी सोपी, छोटी वाक्य वाक्यरचना करायचे. असं सुधारत सुधारत आम्ही गोष्ट बांधायचो. पुढे ती पद्धत बनली. ख-या अर्थाने मी अजूनही नाटक लिहिलेलं नाही, पण घडवलंय.
मुलांना अभ्यास सोपा जावा, म्हणून तुम्ही पाठयपुस्तकावर नाटक बसवलीत. त्यासाठी
काही विशेष तयारी करावी लागली का?
» सुरुवातीला नाटकासाठी मला प्रत्येक वर्गातली चार मुलं द्या, अशी मागणी केली. पण ती मुलं निवडताना केवळ अभ्यासातली किंवा कलेतली हुशार मुलंच घ्यायची असं काहीच ठरवलं नव्हतं. चाळीस मुलं आमच्याकडे यायची. त्यातल्या चार विषयांचा मी एक अभ्यासक्रम तयार केला. एक धडा शिकवायला किमान दोन ते तीन दिवस लागतात. मग आम्ही त्यावर नाटक तयार करायचो. त्यावर आधारित प्रश्न मुलांना तिथल्या तिथे विचारायचे. तसंच गणित आणि इंग्रजीचं केलं. त्याचा अख्खा करमणुकीसारखा कार्यक्रम केला. कवितेला चाली लावल्या. त्यावर नृत्यं बसवली. थोडक्यात मुलांना आवडतील अशा पद्धतीने त्याला आधुनिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. ते बघितल्यानंतर पाठयपुस्तकांच्या लोकांना किंवा रेडिओवर वाचलं तेव्हादेखील उत्तम प्रतिसाद मिळाला. पण पुढे हे काम नेऊ शकेन अशी कोणतीही स्कीम मला मिळाली नाही. एक धडा केला की, पाचशे मुलं पाहू शकतील आणि तो त्या पाचशे विद्यार्थ्यांना आपोआप शिकवला जाईल, अशी त्यामागची कल्पना होती. हे अधिक चांगल्या पद्धतीने केलं तर मुलं कार्टून मालिका बघण्यापेक्षा निश्चितच या गोष्टी पाहतील आणि त्यातूनच अभ्यासही शिकतील. म्हणून पहिल्यांदा पहिल्या इयत्तेचं पुस्तक निवडण्याचं ठरवलं. मात्र अजूनपर्यंत कुणीही उचलून धरलेली नाही. ही पद्धत सगळ्यांना आवडली असली तरी बालभारती किंवा सांस्कृतिक खात्याने यात रस दाखवला नाही.
मुलांना नाटक शिकवण्याच्या दृष्टीने आताची पाठयपुस्तकं आणि तेव्हाची पाठयपुस्तकं यात काही फरक जाणवतो का?
» नाही. तसा फारसा फरक पडत नाही. आताची पाठयपुस्तकं चांगलीच आहेत, मात्र त्यात चुका भरपूर आहेत. नाटक बसवायचं झालं तर मुलांचं भरपूर मनोरंजन होईल असा त्यात भरपूर वाव आहे. खरं म्हणजे वर्गात शिकलं म्हणजेच शिक्षण होतं, असं काही नाही.
दूरदर्शनवरदेखील तुम्ही भरपूर नाटकं केली आहेत, त्याबद्दल सांगा..
» खूप नाटकं केली. तिथेही आम्ही इंग्रजीचे धडे नाटयरूपात केले होते, तेही इंग्रजीतूनच. त्यात मी गंगाधर गाडगीळांची ‘शहाणी मुलं’ नावाचं नाटक केलं होतं. ते मालिकेसारखं लिहिलं होतं. आम्ही रीतसर प्रयोग करायचो, त्यात विजय केंकरे, मंगेश कुलकर्णी हे असायचे.
या नाटकातला एखादा लक्षात राहिलेला अनुभव कोणता?
» लाइव्ह नाटकाची एक मजा होती. मंगेश कुलकर्णीच्या नाटकात समर्थ जोशी नावाचा एक मुलगा काम करायचा. लाइव्ह नाटकात मंगेश एक ओळ विसरला. समर्थ त्याला खुणा करत आठवण करून देत होता. पण त्याला काही कळलंच नाही, तेव्हा समर्थ ‘तुम्हाला टोपी घालयची आहे ना मग घाला ना’ असं सांगून मोकळा झाला. मुलं इतकी बोल्ड आणि हुशार असतात की कशालाही घाबरत नाहीत, हे तेव्हा मला कळलं. असंच एकदा त्याने हेमा मालिनीला सांगितलं होतं. तो विकास देसाई यांची हिंदी मालिका करायला गेला. ‘तेरा पन्ने’ या मालिकेची तालिम सुरू होती. त्या तालमीदरम्यान तो एकदम गप्प बसला. कोणाला काही कळेचना. मग हेमा मालिनीने विचारलं, ‘हा गप्प का बसलाय. काय झालंय?’ तर तो म्हणाला ‘आपकी लाइन है।’ अशी मुलं मजा करतात आणि ते मला आवडतं.
तुम्हाला आवडलेलं, तुम्ही बसवलेलं नाटक कोणतं?
» गंगाधर गाडगीळांचंच ‘शहाणी मुलं’ हे नाटक आवडलं होतं. जी. ए. कुलकर्णी यांचं ‘बखर बेनूची’ नावाचं एक नाटक होतं. त्यात रीमा लागू, अजय वढावकर यांनी काम केलं होतं. त्याचे आम्ही पृथ्वी थिएटरला हिंदीतही प्रयोग केले होते. चाळीस-पन्नास प्रयोग झाले. ते नाटक मुलांच्या इतर नाटकांपेक्षा अगदी वेगळं होतं.
तेव्हाची आणि आताची बालनाटयं यात काही फरक जाणवतो का?
» मी लहान असतानाची ही गोष्ट आहे. तेव्हा बालनाटयाची चळवळ होती. छबिलदाससारख्या शाळेत सुलभाताईंनी ही चळवळ रुजवली होती. त्याच्यानंतर सई परांजपे, सुधा करमरकर यांची नाटकं होती. तेव्हा बालनाटय खूपच छान असायची. आता तशी नाटकं होतच नाहीत. आताच्या नाटकाचं नावदेखील ‘गोरिला’ वगैरे असं खूप विचित्र असतं. म्हणजे मुलांना गोरिला आवडतो हे सगळं मान्य आहे. पण असं नाव कसं चालेल? मुळात विषय जरी लहान मुलांचा असला तरीदेखील ते लहान मुलांचं नाटक वाटतच नाही.
मुलांचं नाटक बसवायचं म्हणजे खरी कसोटी असते. तुम्हाला बरीच मेहनत करावी लागत असेल ना?
» मुलांकडून नाटक करून घ्यायचं म्हणजे तसं कठीण काम असतं. ते त्यांच्या विश्वात असतात. कोड लँग्वेजप्रमाणे मुलांचं बोलणं असतं किंवा कधी कधी एखादाच शब्द उच्चारतात किंवा कधी बोलतच नाही. बालमोहन शाळेत वेगवेगळ्या थरातली मुलं आहेत. कोणत्याही थरातल्या मुलाशी मी अतिशय मैत्रीपूर्ण वागते. मी शिक्षिका आहे, तो माझा विद्यार्थी आहे, असं ते नातं नसतं. मित्र-मैत्रिणीसारखं त्यांच्याबरोबर वागायला लागले की, तेदेखील मोकळेपणाने बोलतात, वागायला लागतात आणि ते वागणं नाटकासाठी जरुरीचं आहे. मी कधीच मुलांना ओरडत नाही किंवा मारत नाही. शाळेतली किंवा घरच्यासारखी शिस्त तुम्ही राबवायला गेलात तर नाटक कधीही चांगलं होणार नाही. लहान मुलांचं तर नक्कीच नाही. त्यांनी मोकळं होणं गरजेचं आहे. ते होण्याची नेमकी क्रिया सांगता येणार नाही, पण नाटक बघणा-याला गंमत वाटते. मुलांकडून नेहमीच काही ना काही शिकायला मिळालं आहे. एक गंमत सांगते, आम्ही विज्ञानावर आधारित काल्पनिक नाटक केलं होतं. ते पाहायला नारळीकर आले होते. ‘सर्कसवाला’ केलं तेव्हा विंदा करंदीकर आले होते. विज्ञानाच्या नाटकात मंदार बर्वे नावाचा दादरचाच एक विद्यार्थी होता. मी मुलांना विषय दाखवण्यासाठी पुस्तक घेऊन गेले होते. मी त्यांना ते दाखवायला गेले होते. त्या मुलाने ते पुस्तक पाहून मी आधीच वाचलं असल्याचं सांगितलं. इतकंच नव्हे तर या पुस्तकातलं जे विज्ञान आहे ते मला सगळं समजलेलं असून मी ते तुम्हाला समजावून देतो, असंही तो पुढे म्हणाला. त्याच्या बोलण्याने मी अवाक् झाले. पण त्या मुलाने खरंच मदत केली होती.
नाटकासाठी मुलांची निवड करताना ती कशी करतात?
» कोणताही मुलगा एखाद्या भूमिकेत उभा राहतो, तेव्हा चाचपणी करावी लागते. त्याच्यात काय कमतरता आहे, तो कसा बोलतो, त्याला कशाची गरज आहे, याचं निरीक्षण केलं जातं. आणि त्या गरजेप्रमाणे त्याला त्या त्या साच्यात घातलं की मुलं चांगलं काम करायला लागतात. प्रत्येकालाच सगळं येतंच असं नाही, पण बरीचशी मुलं ते करण्याचा प्रयत्न करतात. दुस-यातले चांगले गुण सांगितले तरीही ते त्यांना आवडतात. आताची मुलं तर खूपच हुशार आहेत, काहीशी आगाऊ आहेत. त्यांना बरीच माहिती आहे. त्यांना काय आवडतं हे मी हेरते. त्याप्रमाणे त्यांच्याशी बोलताना ते करून दाखवलं की, त्यांना ते खूप आवडतं. त्यांना मी आपल्यातलीच वाटते.
सध्या नाटय शिबिरांचं पेव फुटलं आहे. जिकडेतिकडे शिबिरं घेतली जात आहेत. तुमच्या शिबिरांचं स्वरूप कसं असतं?
» मी आता निवृत्त झाले आहे. तरीही मी शिबिरं घेते. मी जेव्हा नाटक करते तेव्हा ते नाटक चांगलं करण्याचाच उद्देश असतो. मुलं माझ्या शिबिरांमध्ये येतात, तेव्हा त्यांना ते मनापासून शिकायचं असतं म्हणून येतात. शाळेनेही कधी भरमसाठ फी घ्या, असं म्हटलं नाही. त्यामुळे माझ्या शिबिराचं शुल्क कमीच असतं. माझ्या शिबिराचं स्वरूपदेखील वेगळं आहे. माझ्याकडची मुलं कविता करायला लागतात, लिहायला लागतात. त्याला चाल लावतात. नाटकासाठी जे जे लागतं ते सगळं ते करून बघायचा प्रयत्न करतात. अमेय साळवी नावाचा मुलगा होता. त्याने बुटाच्या खोक्याला रंगीत कागद लावून नेपथ्याला लागणारे दिवे तयार केले होते. थोडक्यात काय तर मी शिबिरात नवनव्या गोष्टींची ओळख करून देते. मेकअपमन काय करतो, इस्त्रीवाल्याचं काय चाललेलं असतं. असं सगळं सांगते. मुळात माझ्या शिबिरात प्रथम मी मुलांना नाटक दाखवते. त्यानंतर त्या नाटकात काम करणारा अभिनेता किंवा दिग्दर्शक, जो कोणी असेल तो त्यांच्याशी बोलायला येतो. त्याला मुलं प्रश्न विचारतात. त्यातून मुलांचं कुतूहल वाढतं. समजा या शिबिरात मी दहा ते बारा मिनिटांची चार नाटकं बसवणार असेन तर एखादा मुलगा असा असतो की, तो पोस्टर बनवतो, कोणी तिकीट तयार करेल, कोणी लाइट करेल.. असं कोणी काही ना काही करत राहतात. एका मुलाने तर फुगे लावून राजाचं अतिशय सुंदर सिंहासन केलं होतं. थोडक्यात, मुलांना काहीतरी दर्जेदार शिकायला मिळावं यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. त्यातून मुलांचा सर्वागीण विकास होईल.
नाटक करताना आर्थिक गणितं कशी जमायची?
» खरं म्हणजे नाटकासाठी भाडयाचे कपडे आणायचे म्हणजे खूपच महाग पडतं. बजेट वाढतं. कमर्शिअल नाटकं करायची म्हणजे खूप खर्च वाढतो. सगळं कठीण होऊन बसलं आहे. मोठय़ांच्या नाटकाप्रमाणे खर्च वाढला आहे. तिकिटं महाग झाली आहेत. नाटकापुरता विचार करायचा झाला तर ते बरोबरच आहे. पण एखाद्या मुलाला नाटक बघायचं झालं तर किमान हजार रुपये खर्च होतो. ही गोष्ट कुठेतरी खटकते. मी एक प्रयत्न केला होता, तो तितकासा सफल झाला नाही. पृथ्वी थिएटरला मराठी नाटकं फारशी होत नाही, पण त्यांच्या व्यवस्थापनाला मराठी नाटकं आवडतात, पण मराठी नाटकं तिथे आणायची तर त्यांची इकॉनॉमी तितकीशी जुळत नाही. बालनाटयाचं तसंच आहे. सकाळच्या वेळेत ते थिएटर रिकामं असतं. सुट्टीत त्यांनी मुलांसाठी नियोजन करून तारखा दिल्या तर शाळेतली मुलं आधीच ती तिकिटं घेऊन मोकळी होतील. यामुळे थिएटरमध्ये मुलांचं नाटकही होईल आणि त्यांना ‘पृथ्वी’सारखं नवं थिएटरही बघायला मिळेल. अशा दुहेरी उद्देशाने मी त्यांना सांगितलं होतं की, तुम्हाला तिकीटविक्री करायलाच नको.
आजकालची मुलं रिअॅलिटी शोकडे वळतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
» टीव्हीची गणितंच सगळी वेगळी असतात. ती मुलांना मिळणा-या पैशापासून ते मुलं तिकडे वेळ किती घालवतात, ते किती वेळ घेतात, पालक कसे त्यांच्या बाबतीत पझेसिव्ह होतात, यापर्यंत अनेक गोष्टींवर अवलंबून आहेत. या सगळ्याचा मुलांच्या मनावर परिणाम होतो. या स्पर्धेमधून बाद झाली की त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. मी पाहिलंय की, मुलांचे पालक या रिअॅलिटी शोपायी लांबून लांबून मुलांना घेऊन येतात, मग त्या मुलांची इच्छा असो वा नसो. लहान मुलांसाठी हे अति वाटतं. त्यात कित्येकदा मुलं आणि शाळांमध्ये समन्वयदेखील दिसत नाही. आपल्या मुलांमध्ये काय कमतरता आहे ती गोष्ट त्यांना येऊ दे, असं त्यांना वाटत नाही. उलट त्यांनी अमकं केलं पाहिजे, त्यात त्यांचा वरचा क्रमांक आला पाहिजे, असं त्यांना अधिक वाटतं. म्हणून मुलांच्या बरोबरीने पालकांचाही वर्ग घ्यावा लागेल.
स्वत: अभिनेत्री असण्याचा शिबिरं घेताना फायदा होतो का?
» नक्कीच होतो. मजा-मस्ती करत करत त्यांना कधीतरी काहीतरी अभिनय करून दाखवता येतो. नुकताच मी एक मराठी चित्रपट केला. ‘देवयानी’, ‘लक्ष्य’ यासारख्या मालिका केल्या. तसंच मला आणि ‘ओह माय गॉड’ नावाचा एक चांगल्या भूमिकेचा चित्रपट मिळाला.
सध्याच्या मुलांवर अभ्यासाचा ताण वाढला आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं.
» मुलांवर अभ्यासाचा ताण निश्चितच वाढला आहे, पण मुलं जो ग्रुप स्टडी करतात तो कोणत्या एका मुलाच्या घरी जाऊन करतात. त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. त्यापेक्षा मुलांचा अभ्यास शाळेतच कसा पूर्ण होईल. याकडे लक्ष दिलं पाहिजे. चौथीपर्यंत कोणतीही वह्या-पुस्तकं आणू नयेत असं वाटतं. ती पुस्तकंही शाळेतच ठेवावीत. संदर्भासाठी केवळ पुस्तकं द्यावी. बाकी केवळ त्यांना करमणुकीतून अभ्यास शिकवावा. कारण तो अभ्यास सोपा असतो. तो तसा शिकवता येतो, मग का नाही शिकवायचा? अभ्यास उगाचच कठीण केला आहे. मला आठवतंय, नाटकासाठी येणा-या एका मुलाला त्याला शाळेत दिलेल्या फळाभर अभ्यासाचं टेन्शन असायचं. अभ्यासाचं एवढंदेखील ओझं मुलांवर नको.
नाटक शिबिराव्यतिरिक्त आणखी काय उपक्रम करता?
» रेडिओवर आम्ही नाटक वाचायला जातो. तिथे खूप महागडे माइक असतात. त्याची किंमत मुलांना कळत नाही. तो माइक ते कसाही हाताळतात. तिकडे गेल्यावर कसं वागावं हे त्यांना कळत नाही. एसीत थंडी वाजते. मग कामावरचं लक्ष उडतं. कुठच्याही रेकॉर्डिगला ती मुलं असंच वागायची, मग त्यांना याचं ज्ञान मिळावं, याचा विचार करून मी संगीत कार्यशाळा घेतली होती. त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती व्हावी, असा मूळ उद्देश होता. दुसरं असं की, संगीत आणि नाटक याव्यतिरिक्त इतरही ज्या काही कला आहेत, त्याची मुलांना माहिती देणारी कार्यशाळा दर आठवडयाला घेण्याचा विचार आहे. जेणेकरून त्यातून मुलं नकळत शिकतील.
मुलांबरोबरचे गमतीशीर काही प्रसंग सांगा.
» बापूसरांच्या काळात घडलेला प्रसंग आहे. आम्हाला बक्षीस मिळालं होतं. त्यानंतर प्रिन्सिपॉलना ते बक्षीस किंवा ढाल दाखवायला सांगायचं असतं. त्या नाटकात मिथिल माटे नावाचा एक मुलगा होता. त्याला इतका आनंद झाला होता की, तो केबिनमध्ये जाऊन पाहुण्यांच्या खुर्चीत बसला. मला काही कळेचना. आम्ही त्यांना सांगत होतो. थोडया वेळाने तो बापूसरांच्या टेबलावर जाऊन बसला. त्यांच्या कोप-यातल्या ड्रॉवरमध्ये मुलांना द्यायचा खाऊ असायचा. तो ड्रॉवर त्याने उघडला, तिथे चॉकलेटं पाहून त्याच्या चेह-यावरचे जे काही भाव होते ते अविस्मरणीय होते. अजूनही ते माझ्या लक्षात आहेत. त्याने ती सगळी चॉकलेटं उचलली आणि म्हणाला, ‘मला एवढी चॉकलेटं हवी आहेत कारण मला बक्षीस मिळालं आहे.’ त्याला सर काही म्हणाले नाहीत, उलट त्यांनी ही तुला कमी पडली तर आम्ही आणखी देऊ, असं सांगितलं. त्यांच्या केबिनला पार्टिशियनचं दार होतं. तेव्हापासून तो मुलगा सर केबिनमध्ये आहेत की नाही, हे वाकूनच बघायचा. असं मजेदार काही ना काही चालू असायचं.
तुमची चित्रकला मागे पडली असं वाटतं का?
» हो नक्कीच वाटतं. मध्यंतरी एका विद्यार्थ्यांचं प्रदर्शन पाहिलं होतं. त्यावेळी आपणही असं काही करावं, असं मनापासून वाटलं होतं. पण ते तेवढयापुरताच मर्यादित राहिलं. कारण आता नाटकात मी खूपच रमले आहे.
मुलांसाठी तुम्ही एक टीव्ही मालिकाही केली होती?
» ‘दे धमाल’ नावाची ‘झी’वर मी मालिका केली होती. ही माझी पहिली मालिका होती. त्यानंतर मुलांच्या मालिका यायला सुरुवात झाली. इतकंच नाही तर श्रावणी देवधर यांनादेखील सांगून मी प्रयत्न केला. त्या खरं तर असे प्रयोग करणा-या आहेत. पण त्याला टीआरपी मिळत नाही असं एकच पालूपद होतं. मला त्याचं खूप आश्चर्य वाटायचं.
लहानग्यांना काय सल्ला द्याल?
» तुम्हाला तुमच्या वयात जे जे काही शिकायला मिळेल ते ते शिकून घ्या. शिकणं म्हणण्यापेक्षा मजा वाटेल, असे अनुभव घेत चला. कारण तुमचं टॅलेंट कुठेही रुजू शकतं. मला असं वाटतं की, मुलं क्रिएटिव्ह काम करायला लागली की, त्यांना कशाचंच भान राहत नाही. त्या शिकण्यातूनच त्यांचा खरा विकास होत असतो.
विधाताई तुम्ही ग्रेट आहेत .
सलाम तुम्हाला
तुमचा एक चाहता
गोकुळ