‘स्वाभिमान’ संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष नितेश राणे यांनी आता ‘नोकरी एक्स्प्रेस मोबाइल व्हॅन’ अर्थात ‘नोकरी आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात मंगळवारी येथे केली.
मुंबई – इतरांसारख्या आश्वासनांच्या भुलथापा न देता प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवणारे ‘स्वाभिमान’ संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष नितेश राणे यांनी आता ‘नोकरी एक्स्प्रेस मोबाइल व्हॅन’ अर्थात ‘नोकरी आपल्या दारी’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात मंगळवारी येथे केली. राज्यातील बेरोजगारांपर्यंत ही व्हॅन नोकरी घेऊन जाणार असून, ‘तुमचे रक्त नको घाम पाहिजे’ असा नारा देत सुरू केलेल्या या उपक्रमाअंतर्गत केवळ दीड तासात तब्बल ३१ जणांना नोकरीच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
नितेश यांच्याच संकल्पनेतून २०११ मध्ये साकारलेल्या विश्वविक्रमी रोजगार महामेळाव्यात एकाच दिवसात तब्बल २५ हजार ३०० जणांना रोजगार दिला गेल्याची दखल गिनीस बुकनेही घेतली होती. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या प्रांगणात या विशेष प्रकल्पाचा मंगळवारी प्रारंभ झाला. नोकरी एक्स्प्रेसच्या या व्हॅनची पाहणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. जनार्दन चांदुरकर यांनी केली आणि नितेश राणे यांचे या उपक्रमासाठी विशेष कौतुक केले.
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे भारतातील अशा प्रकारचे हे पहिलेच फिरते केंद्र ठरले आहे. नितेश यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘नोकरी एक्स्प्रेस’ या उपक्रमाचे उद्घाटन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते रविवारी कणकवली येथे झाले. त्यानंतर या उपक्रमाचा आरंभ मंगळवारी मुंबईत करण्यात आला.
ही विशेष व्हॅन वर्षाचे ३६५ दिवस फिरून ३५ जिल्ह्यांतील बेरोजगार तरुण-तरुणींना नोकरी उपलब्ध करून देईल आणि त्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनवेल, असे या उपक्रमाची माहिती देताना नितेश राणे यांनी सांगितले.
दर महिन्याला हजार, दोन हजार किंवा तीन हजार जेवढय़ा नोक-या उपलब्ध होतील तेवढय़ा दिल्या जातील. या उपक्रमात थेट जागेवरच उमेदवाराला नियुक्तीचे पत्र दिले जाईल. परंतु या नोक-या तात्पुरत्या किंवा चतुर्थ श्रेणीतील नसतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘स्वाभिमान’ संघटनेच्या वतीने मुंबईत पहिला रोजगार मेळावा भरवण्यात आला होता. त्यानंतर कोकण, मुंबई, सातारा यांसह अनेक भागांमध्ये रोजगार मेळावे भरवण्यात आले. या मेळाव्यांनंतर अनेक कंपन्यांकडून त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची विचारणा होऊ लागली. त्यामुळे नोकरी आहे, पण उमेदवार नाही हे लक्षात आल्यामुळे नोकरी देणारे ३६५ दिवस सुरू राहणारे केंद्र सुरू करावे, अशी कल्पना आपल्याला सुचली आणि त्यामुळेच ‘नोकरी एक्स्प्रेस’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
‘नोकरी एक्स्प्रेस’मुळे नोकरी आली दारी
नोकरीसाठी बेरोजगारांना कंपन्यांचे झिजवावे लागणारे उंबरठे, अर्ज दाखल करूनही पदरी येणारी निराशा ही फरफट आता संपणार आहे. नोकरीसाठी आता कंपनीकडे जाण्याची गरज उरणार नाही. कारण आता कंपनीच आपल्यापर्यंत येणार आहे. ‘नोकरी एक्स्प्रेस’ या फिरत्या वाहनातील सुसज्ज युनिट जिल्हा, तालुका आणि गावांपर्यंत जाऊन बेरोजगारांच्या मुलाखती घेणार आहे. त्यांच्या पात्रतेनुसार निवड झाल्यानंतर निवड केलेल्या कंपनीचे नियुक्तीपत्र त्याच ठिकाणी उमेदवारांच्या हाती दिले जाणार आहे. सध्या मुंबईत काही दिवस ही ‘नोकरी एक्स्प्रेस’ विविध भागांमध्ये फिरून बेरोजगारांना नोकरी उपलब्ध करून दिल्यावर पुढील दौ-यासाठी इतर जिल्ह्यांकडे रवाना होईल.
गावागावांत जाण्यापूर्वी नोकरी एक्स्प्रेसजवळ किती कंपन्यांमध्ये भरती आहे, किती जागा भरल्या जाणार आहेत, याबाबतचा फलक स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लावला जाईल. त्यामुळे उमेदवारांना याची कल्पना आधीच येईल. नोकरी एक्स्प्रेस दाखल झाल्यावर तिच्यावरील एलईडी फलकावर किती कंपन्या आणि त्यामधील कामगार भरतीची संख्या दर्शवली जाईल.
त्यानंतर बेरोजगार उमेदवारांचे एका खिडकीवर अर्ज स्वीकारले जातील आणि पात्रतेनुसार त्याच व्हॅनमध्ये मुलाखती घेतल्या जातील. निवड झाल्यानंतर त्याच ठिकाणी कंपनीचे मूळ नियुक्तीपत्र त्या उमेदवाराला दिले जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे या मुलाखतींसाठी विविध कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
‘स्वाभिमान’ संघटनेच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त १२ ऑक्टोबर २०११ रोजी आयोजित केलेल्या नोकरीच्या महामेळाव्यात २५,३०० बेरोजगारांना नोक-या मिळाल्या होत्या. या विश्वविक्रमाची नोंद गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स यांनीही घेतली होती. या रोजगार महामेळाव्याचे संकल्पक आणि ‘स्वाभिमान’चे संस्थापक-अध्यक्ष नितेश राणे यांच्याच संकल्पनेतून ‘नोकरी एक्स्प्रेस’ या मोबाइल व्हॅनचा उपक्रम प्रत्यक्षात आला आहे. याच उपक्रमाची माहिती नितेश राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
‘नोकरी एक्स्प्रेस’ने दिला रोजगार
नोकरी जशी पाहिजे, तशी मिळणे हे स्वप्न असते. परंतु मला हवी तशीच नोकरी आणि चांगल्या वेतनाची नोकरी ही ‘नोकरी एक्स्प्रेस’मुळे मिळाली. अनेक कंपन्यांकडून नोकरीसाठी ऑफर आणि त्यासाठी ब-याचदा हेलपाटे मारावे लागतात. मात्र इथे काही क्षणार्धात सर्व काही मिळाल्याने खूप आनंद झाला. एमएसडब्ल्यू आणि एमएस्सी आयटीचे शिक्षण घेऊनही पात्रतेप्रमाणे नोकरी मिळत नव्हती. मात्र नोकरी एक्स्प्रेसच्या पहिल्याच रांगेत नियुक्तीचे पहिले पत्र मला मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते.
– सुषमा लोखंडे, मुंबई
बायोडाटा दिल्याबरोबर हातात नोकरीचे ऑफर लेटर पडते, यावर विश्वासच नव्हता. परंतु नोकरी एक्स्प्रेसच्या पहिल्याच भेटीत हा विश्वास दृढ झाला. माझ्या एका मित्राने या नोकरी एक्स्प्रेसबद्दल माहिती दिली होती. यामुळे मला बॅक रजिस्ट्रेशनच्या पदाची आणि अपेक्षित असलेल्या वेतनाची ऑफर मिळाली असून, सगळे काही क्षणार्धात हाती आल्याने खूप आनंद झाला.
-सुप्रिया हेडकर, शीव, कोळीवाडा
नोकरीसाठी सगळीकडे धावाधाव करावी लागते. त्याशिवाय ती मिळत नाही. असा माझा आजपर्यंतचा अनुभव होता. परंतु एकीकडे बायोडाटा दिला आणि दुसरीकडे लगेचच कॉल लेटर हाती मिळाले. ही गोष्ट माझ्यासाठी सुखद आणि आनंदाचा धक्का देणारी होती. माझे बारावीपर्यंतचे शिक्षण झाले असून, पुढील शिक्षण सुरू आहे. मात्र मला नोकरीची गरज होती. ती नोकरी एक्स्प्रेसने हातात कॉल लेटर देऊन पूर्ण केली.
– अक्षय तळे, शीव
मी ‘आयसीआयसीआय’ बँकेत अधिकारी पदावर होते. मात्र बँक घरापासून खूप दूर अंतरावर स्थलांतर झाल्यानंतर मी घरीच होते. दुसरी नोकरीही मिळत नव्हती. माझ्या जवळच्या नातेवाइकांनी मला माहिती दिली आणि मी स्वाभिमान संघटनेच्या नोकरी एक्स्प्रेसमध्ये अर्ज केल्याबरोबर मला पुन्हा दादर येथील आयसीआयसीआयच्याच आणि हव्या त्याच पदासाठी नोकरीचे कॉल लेटर मिळाले. इतक्या लवकर हवी तीच नोकरी मिळाल्याने मी खूप भारावून गेली आहे.
– रोहिणी विनेरकर, घाटकोपर
नोकरीसाठी खूप अडचणी असतात म्हणून आम्ही उरणहून आलो होतो. परंतु स्वाभिमान संघटनेच्या नोकरी एक्स्प्रेसमुळे अडचणींवर मात केल्यास सर्व काही सहज मिळू शकते, याचा एक अनोखा अनुभव आला. चांगल्या वेतनाची आणि पाहिजे ती नोकरी मिळेल, असे वाटले नव्हते. मात्र तुभ्रे येथील डिजिकॉल कंपनीत कस्टमर केअरच्या अधिकारी पदासाठी नोकरीची संधी मिळाली आहे.
– शुभांगी विशाल डाके, उरण
नोकरी शोधणे हे माझ्यासमोर एक मोठे आव्हान होते. मी कायम नोकरीच्या मागे धावत होतो. अनेकदा यासाठी खूप कष्टही सोसावे लागले. परंतु स्वाभिमानच्या नोकरी एक्स्प्रेसमुळे नोकरीच माझ्याकडे चालून आली. यामुळे मी खूप भारावून गेलो आहे. त्यातही मला हवी ती नोकरी मिळाली. खूप समाधान वाटले.
– अभिजित हळदवणे, गिरगाव
‘स्वाभिमान’चे आतापर्यंतचे रोजगार मेळावे
१२ ऑक्टोबर २०११ रोजी पहिला रोजगार मेळावा, २५,३०० उमेदवारांना नोकरी, गिनेस बुकमध्ये विश्वविक्रमाची नोंद कोकणातील १० हजार उमेदवारांना नोकरी
सोलापूर येथे ६ हजार उमेदवारांना नोकरी
१२ऑक्टोबर २०१३ रोजी बेरोजगार महिलांसाठी रोजगार मेळावा
२३ फेब्रुवारी २०१४ अमरावतीमध्ये रोजगार मेळावा
NICE JOB KEEP IT UP.