तुमच्या लक्षात आलं असेलच..उग्र चेह-याने, करवदून महाराष्ट्राबद्दल विचारणा-या त्या जाहिराती बंद झाल्यात गेले दोन-तीन दिवस. सोशल मीडिया हे अस्र् चांगलंच धारदार आहे आणि दुधारी आहे, ते वापरणा-यालाही प्रसंगी रक्तबंबाळ करू शकतं, बोचकारू शकतं, नामोहरम करू शकतं. भाजपच्या हे चांगलंच लक्षात आलं असेल आता.
तुमच्या लक्षात आलं असेलच..उग्र चेह-याने, करवदून महाराष्ट्राबद्दल विचारणा-या त्या जाहिराती बंद झाल्यात गेले दोन-तीन दिवस. सोशल मीडिया हे अस्र् चांगलंच धारदार आहे आणि दुधारी आहे, ते वापरणा-यालाही प्रसंगी रक्तबंबाळ करू शकतं, बोचकारू शकतं, नामोहरम करू शकतं. भाजपच्या हे चांगलंच लक्षात आलं असेल आता.
भाजपच नव्हे तर या निवडणुकीत मोठमोठाले ढोल पिटून या अस्रचा उपयोग करणा-या विविध राजकीय पक्षांना आणि नेत्यांना हे आतापर्यंत चांगलंच समजलंय. महाराष्ट्रातच राहून महाराष्ट्राचीच बदनामी करणा-या खोटय़ानाटय़ा जाहिरातींचा भडीमार करणा-या, ‘अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा..’ म्हणत गळे काढणा-या पक्षाने इंटरनेटच्या कट्टय़ांवर, फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्स अॅप आदी सोशल मीडियावरही याच प्रकारची ख-याखोटय़ांची बेमालूम मिसळ केलेल्या मजकुराची, तपशिलाचे मेसेज निवडणुका जाहीर झाल्यापासून पसरवायला सुरुवात केली होती. या जाहिरातींमधून महाराष्ट्राची यथेच्छ बदनामी आणि त्याचवेळी अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून गुजरातची भलामण असे तंत्र अवलंबण्यात आले होते. पण गेल्या काही दिवसांत हेच अस्र् स्वत:लाच सोशल मीडिया प्रवीण समजणा-या भाजपवर उलटल्याचे दिसू लागले आहे. याला कारण महाराष्ट्राबद्दल अभिमान बाळगणारी राज्याच्या कानाकोप-यातील तरुण पिढीच आहे. प्रखर राजकीय मते बाळगणा-या तरुणाईची या माध्यमांवर मास्टरी आहे. त्यांची राजकीय मते भले वेगवेगळी असतील पण याच पिढीला महाराष्ट्राची ही बदनामी सहन झाली नाही आणि याच कट्टय़ांवर या जाहिरातींचा प्रतिवाद सुरू झाला आणि महाराष्ट्राची बदनामी करून भलभलती आश्वासने देऊ पाहणा-या धुरंधरांची दातखीळ बसल्यागत झाली.
या जाहिरातीतून महाराष्ट्राचा अपमानच होतो आहे अशी भावना राजकीय नेत्यांनी व्यक्त करण्याआधीच जनमानस आक्रमक झाला होता. यामुळेच या जाहिराती अंगाशी आल्याचे बहुधा थिंक टँकच्या लक्षात आले असावे. शिवछत्रपतींचा आशीर्वाद मागायचा आणि ‘खोटे बोल पण रेटून बोल’ अशा आवेशाने महाराष्ट्रात येऊन राज्याच्या विकासाचा खोटा कळवळा दाखवायचा या तंत्राने अनेक नेत्यांनी सभा गाजवल्या. त्याला या जाहिरातींची जोड दिली गेली होती.
एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते. युती तुटली आणि लगेचच दुस-याच दिवशी या जाहिराती सुरू झाल्या. एखादी जाहिरात मोहीम प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरावायची असेल तर त्यासाठी निदान काही दिवस तरी खलबते करावी लागतात, काही कल्पनांवर काथ्याकूट होतो, कुठली घोषणा कशी करायची हेही ठरवावे लागते. या सगळ्या प्रक्रियेला काही दिवस तरी नक्की लागतातच. या जाहिराती मात्र लगेच सुरू झाल्या. आश्चर्याचा धक्का बसावा अशीच सिच्युएशन. म्हणजे युती तोडायचीच आहे हे आधीच ठरवून सगळा घोळ घालत राहताना जाहिरातींची मोहीम पक्की करण्यात आली होती. इतर पक्षांच्या जाहिराती सुरू होण्याआधीच या जाहिरातींमधील व्यक्ती मतदारांच्या अंगावर धावून यायला सुरुवात झाली होती.
अर्थात संपूर्ण बहुमत मागणा-या पक्षाच्या भुलथापांना तरुणाई बळी पडलेली नाही. सोशल मीडियावरील मेसेज हेच दाखवून देतात. एक मेसेज सांगतो – ‘सरकारी पैशावर परदेश पर्यटन झाले असेल तर जरा देशाकडेही लक्ष द्या. पेट्रोलचे आठ आणे, बारा आणे कमी करून महागाई कमी केल्याचा आव आणू नका. डाळी, तांदूळ, धान्य, कडधान्य, शेंगदाणे या गरिबांच्या रोजच्या वापरातल्या वस्तूंच्या साठेबाजांवर कारवाई करायची हिम्मत दाखवा. ते नफेखोर तुमचेच खंदे समर्थक आहेत. त्यांना आवरण्याची हिम्मत दाखवा. लयी मागणं न्हायी आमचं..
एकदा तर याच धुरंधर नेत्यांनी छत्तीसगडसारखे राज्य महाराष्ट्राच्या पुढे आहे असे सभेत सांगत खोटारडेपणाची कमाल केली. या सगळ्याला बिनतोड उत्तर दिले महाराष्ट्रातील वाहन कंपन्या, आयटी कंपन्या, इतर उद्योग अशा नामांकितांची यादी देणा-या मेसेजने. निव्वळ राजकीय आकसापोटी महाराष्ट्राची बदनामी करू नका. महाराष्ट्राची अवहेलना करू नका. तुमच्या राज्यात यापैकी किती कंपन्या आहेत, आयटी क्षेत्रातील एक तरी कंपनी आहे का राव ते सांगा, मग महाराष्ट्राबद्दल बोला, असे आव्हान देऊन बदनामी करणाऱ्यांची तोंडेच बंद करण्यात आली. उद्योग, गुंतवणूक, शिक्षण, रोजगार, उत्पन्न अशा विविध निकषांवर महाराष्ट्र आघाडीवर की तुमचे राज्य ते तपासून पाहा, असा खुल्ला आवाज देण्यात आला.
महाराष्ट्राचं भलं करायचंय म्हणता मग इथल्या बंदरावरची वाहतूक गुजरातकडे का वळवली? रिझव्र्ह बँकेचे विभाग दिल्लीला का हलवले? सागरी गस्त प्रशिक्षण केंद्र का पळवलं? याची उत्तरेही तरुणाईला हवी आहेत. अच्छे दिन आणणार सांगणा-या केंद्र सरकारने महत्त्वाची औषधं नियंत्रणमुक्त करून गोरगरीब रुग्णांचं काय भलं साधलं, त्यांच्या आयुष्यात कुठले अच्छे दिन आणले याचाही हिशोब याच सोशल मीडियावर मागितला गेला.
फेसबुकवर ‘अहिराणी भाषिक’ या मित्राने तर तुफानच पोस्ट टाकली. महाराष्ट्राच्या जीवावर गुजरातचेच कसे भले झालेय ते सांगणारी. तो म्हणतो – ‘‘आमचा अहिराणी पट्टा म्हणजे गुजरातच्या सिमेलगतचा भाग. आमच्या सातपुडय़ात उगम पावणारी ‘तापी’ नदी, आमच्या गिरणा मोसम बोरी अनेरी गोमाई अशा अनेक उपनद्यांचे पाणी घेऊन गुजरातला जाते. सीमा ओलांडताच तिच्यावर ‘उकाई’ सोनगढ धरण. त्या धरणातून वीजनिर्मिती आणि पाणी मुबलक. त्या बळावर दक्षिण गुजरात (सुरत, बलसाड, नावासरी भरूच) समृद्ध झालेला. पूर्ण गुजरातमधील जास्तीत जास्त साखर कारखाने इथेच. बारडोली, व्यारा, पंडवई, मढी, चलथान, महुवा, मरोली, बलसाड, किम, राजपिपला, सेलवास, कर्झन असे सारे कारखाने महाराष्ट्रीय कामगारांच्या कष्टावर उभे आहेत. सगळी कामे आमचा मराठी स्किल्ड अन्स्कील्ड वर्करच सांभाळतोय.
अनेक खानदेशी लोक सुरत अहमदाबादमध्ये स्थलांतरित झाले. स्थिरावले. तिथला साडी, हिरा उद्योग आमच्याच माणसांच्या जीवावर उभा राहिलाय. तिथे बनणा-या साडय़ांसाठी लागणारे सूत आमच्या मालेगाव आणि धुळ्याच्या लूममध्ये तयार होऊन जाते. नर्मदा धरणासाठी (ज्याचा फायदा फक्त गुजरातला) विस्थापित झालाय आमच्याच महाराष्ट्रातला आदिवासी बांधव. गुजरातमध्ये शिक्षणाची बोंब आहे. आमच्या सतरा हजार लोकसंख्या असलेल्या गावात इंजिनीअरिंग, फार्मसी, बीएचएमएस वगरे कॉलेजेस आहेत. किमान दोनशे मुले-मुली गुजरातहून इथे येऊन शिकत आहेत. महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्यातल्या एका ग्रामपंचायत असलेल्या गावात जर गुजरातहून दोनशे मुले येतात तर विचार करा, मुंबई पुणे, नाशिक इत्यादी शहरांमध्ये किती शिकत असतील.
चाळीसगाव परिसर आणि नगर जिल्ह्यातून दूध गुजरातला जाते, गुजरातला कांदा आम्ही पुरवतो, गुजरातला टोमाटो आम्ही पुरवतो, गुजरातला द्राक्षे आम्ही पुरवतो, गुजरातला डािळब आम्ही पुरवतो, गुजरातला मिरची आम्ही पुरवतो, गुजरातला कापूस आम्ही पुरवतो, गुजरातला हिरव्या भाज्या आम्ही पुरवतो, साधा मुळाही आमचा अंतापूर साक्री पिंपळनेर हा परिसर म्हणजे आम्हीच पुरवतो. आणि गुजरातला एकेकाळी ‘राजा’ही आम्हीच पुरवलाय. तोही मूळ अहिराणी भाषिक.(मूळ गाव ‘कौळाणे’ ता. मालेगाव जि. नाशिक) त्यांचे नाव महाराजा सयाजीराव गायकवाड ..’’ हे सगळे बिनतोड सवाल-जबाब एकच सांगतात.. महाराष्ट्राची सटकली की भल्याभल्यांना आवरते घ्यावे लागते!
एकदम बरोबर. आमच्या दंतशैल्य विज्ञालयात सुद्धा 50% लोक गुजरात आणि इतर उत्तर भारतीय राज्यांतले होते. महाराष्ट्रात शिक्षणासाठी दाही दिशा फिरावे नाही लागत. केवळ मोठी marketing केली म्हणजे गुजरात सर्वांत पुढे नाही.