गावा-खेडय़ातल्या लोकांना पाण्याची खरी किंमत असते. आपण शहरात राहतो, शहरात पाण्याचे नळही हजारो रुपयांच्या किमतीला मिळतात. त्या नळातून सतत पाणी येत असल्याने त्या पाण्याची आपल्याला किंमत नसते. एखाद दिवस पाणी आलं नाही की मात्र आपल्या तोंडचं पाणी पळतं.
काही दिवसांपूर्वी एका ट्रेकला गेलो होतो. डोंगरदऱ्यांतून फिरण्याची मजा जितकी वेगळी असते, तितकीच वेगळी असते ती म्हणजे अशा भटकंतीतून होत जाणारी स्वत:ची आणि जगाची ओळख. आपल्या ‘कंफर्ट झोन’मधून बाहेर गेल्यावर, गावातून खेडय़ांतून प्रवास केल्यावर तिथलं जीवन समोर येतं, तेव्हा कळतं की प्रत्येक गोष्टीला किती किंमत आहे आणि महत्त्व आहे.
ट्रेक करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे कुठली असावी, तर ती म्हणजे ‘पाणी’. दम लागल्यावर, क्षणभर विसाव्यासाठी थांबल्यावर दोन घोट जरी घशात गेले तरी स्वर्गसुख आणि विलक्षण तजेला देतात. त्याची सर कुठल्याही एनर्जी ड्रिंकला नाही. असाच एक सुंदर, रोमांचक ट्रेक करून आम्ही पायथ्याच्या गावात परतलो होतो. तहान लागलेली होती, पाणी संपलं होतं. तेव्हा कुठे पाण्याची सोय होते का असं बघत चालत होतो आणि गावातल्या मुख्य रस्त्यालगतच एका झाडाच्या सावलीत एक हातपंप दिसला. जमिनीतून आलेल्या त्या थंडगार पाण्याची चव बाकी कशालाच नाही म्हणत आम्ही पुढे सरसावलो.
तिथे आगोदरच एक मुलगी पाणी भरत होती. शाळेत जाणारी, शाळेच्या गणवेशात असलेली ती मुलगी दप्तरात घेऊन जाण्यासाठी पाणी भरत होती. आम्ही तिथे उभे होतो. पंपाला चार-पाच हिसके दिल्यावर त्यातून पाणी येऊ लागलं. त्या मुलीने तिच्याकडच्या रिकाम्या बाटलीत पाणी भरलं, बाटली पूर्ण भरताच लगेच बाटलीच्या झाकणातही पाणी भरून घेतलं आणि ते झाकण अलगद बाटलीला लावलं आणि हातपंपातून शेवटचा थेंब पडेपर्यंत त्याखाली ओंजळ धरून ती पडणारं पाणी प्यायली. आणि मग ओले हात चेह-याला पुसून तिच्या वाटेने चालू लागली.
सुरुवातीला ते बघून फार गंमत वाटली. पण नंतर विचार केला तेव्हा त्या लहानग्या मुलीच्या या कृतीमागे किती मोठा विचार होता ते कळलं. ती शाळेत चालत जाणार असेल, उन्हात चालताना तिला तहान लागेल, शाळेत कदाचित पाण्याची सोय नसेल, शाळा सुटल्यावर पुन्हा चालत यायचं असेल, इतकं सगळं लक्षात घेऊन तिने त्या झाकणातलीही जागा न सोडता शब्दश: काठोकाठ बाटली भरून घेतली. शिवाय तिने शेवटच्या थेंबापर्यंत पडणारं पाणी वाया जाऊ दिलं नाही. इतकंच नव्हे तर हातांचा ओलावाही तिने हात, चेह-याला लावून सत्कारणी लावला.
गावा-खेडय़ातल्या लोकांना पाण्याची खरी किंमत असते. आपण शहरात राहतो, शहरात पाण्याचे नळही हजारो रुपयांच्या किमतीला मिळतात. त्या नळातून सतत पाणी येत असल्याने त्या पाण्याची आपल्याला किंमत नसते. एखाद दिवस पाणी आलं नाही की मात्र आपल्या तोंडचं पाणी पळतं. आपण त्यावरही उपाय काढतो. आपल्याकडे पैसे असतात, आपण टँकर मागवतो. आहे काय नाही काय! पण ‘पाणी जपून वापरावं, वाया घालवू नये’ हा त्या लहान मुलीकडे असलेला मोठा विचार मात्र आपण आपल्या आचरणात कधीच आणत नाही. कारण ते आपल्याला सहज मिळतंय, त्यासाठी वणवण करावी लागत नाहीये.
पाणी काय, वीज काय, किंवा इतर कुठली गोष्ट असेल. मिळत जाते तोपर्यंत आपण उपभोगत जातो; वाचवायचं, पुरवून वापरायचं बघत नाही आणि जेव्हा मिळत नाही तेव्हा थयथयाट करतो; जणू ती गोष्ट म्हणजे आपला हक्क आहे आणि तो आपल्याला मिळत नाही. त्या मुलीचं मनोमन कौतुक वाटत होतं, तिच्या विचारांचं कौतुक वाटत होतं. तेव्हा जाणवलं की, ही गावातली मंडळी त्या पाण्याच्या थेंबासारखी निर्मळ, नितळ असतात, शहरातले आपण त्या नळासारखे; सूट मिळाली की सांडणारे.
खूप मोठी गोष्ट सध्या समर्पक शब्दात उत्तम रीतीने सांगितली आहेस.
धन्यवाद chitraa