आपण जन्माला येतो ते निव्वळ एक बाळ म्हणून, आपलं नाव आपल्याला ओळख मिळवून देतं. कुठल्याही मुलीच्या अस्तित्वाचा अविभाज्य घटक असलेलं, प्राणपणाने जपलेलं, कुणी प्रेमाने ठेवलेल्या टोपणनावाचं मूळ असलेलं नाव एका झटक्यात केवळ लग्न झालं म्हणून तिची मर्जीही न जाणून घेता बदलून टाकणं, अशा विचित्र प्रथा आपल्याकडच्या लग्नांमध्ये का असतात, याचं उत्तर कदाचित कुणाकडेही नसावं..
माझ्या या सदरातल्या पहिल्या म्हणजेच गेल्या गुरुवारच्या लेखाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम वाचकांचे खूप खूप आभार! माझा तो लेख वाचून माझी आई खूपच भावूक झाली होती. मी माझ्या नावात दोन्हीकडची आडनावं लावली या गोष्टीचं तिला सगळ्यात जास्त कौतुक वाटलं. त्यावर मी तिला म्हटलं की, हे तर स्वाभाविकच आहे कारण जर तुम्ही मला लिहायला-वाचायला शिकवलंच नसतं तर मी कधी हा लेख लिहूच शकले नसते. तिला आणि बाबांना मात्र माझ्याकडून अगदी सहज घडलेल्या या कृतीचा खूप अभिमान वाटला. तिच्याशी झालेल्या त्या संभाषणानंतर एका गोष्टीची मला प्रकर्षाने जाणीव झाली,आपण कितीही म्हटलं की ‘नावात काय आहे’ तरी आपलं नाव हा आपल्या अस्तित्वाचा सर्वात मोठा घटक असतोच. आपल्याकडे लग्नातही नाव या विषयाशी निगडित अनेक गमतीजमती असतात. म्हणजे नाव घेणं, बायकोचं नाव बदलणं, नव-याला नावाने हाक मारणं ते अगदी ‘नावं ठेवणं’, सगळ्यातच नावाची भूमिका मोठी! नावात काय आहे हे खरं तर या वेळी उमगतं.
जेव्हा माझं नाव लग्नानंतर बदलण्याचा विषय समोर आला तेव्हा मी त्याला सपशेल नकार दिला होता. सुदैवाने त्यासाठी मला कुणाची मनधरणी करावी लागली नाही की जीवाचा आटापिटा करावा लागला नाही. माझ्या विचारांचा माझ्या नव-याने आणि सासरच्यांनी आदर केला आणि माझ्या आई-वडिलांनी माझ्या जन्मानंतर कौतुकाने सोहळा करून ठेवलेलं माझं नाव कायम राहिलं. एकदा माझ्या नव-याने मला ‘काय हरकत आहे नाव बदलायला’ असं गमतीने विचारलं. त्यावर मी त्याला इतकंच म्हटलं की ‘मुलीचं लग्नात नाव बदलण्यामागचं एक तर्कशुद्ध कारण तू मला दे आणि खुशाल माझं नाव बदल.’ त्यानंतर पुन्हा जेव्हा हा विषय निघाला तेव्हा मी त्याला विचारलं की ‘आता, तुझ्या वयाच्या २८व्या वर्षानंतर मी अचानक एक दिवस तुझं नाव बदललं तर तुला कसं वाटेल?’ मला आठवतं, त्या दिवसानंतर आमच्या बोलण्यात हा विषय कधीच आला नाही. एवढंच काय, तर लग्नाच्या वेळी जेव्हा ‘काय नाव ठेवणार रे!’ अशी त्याच्या नातवाईकांकडून विचारणा झाली तेव्हा तो परस्परच कशाला बदलायचं नाव, हे नाव चांगलंच आहे असं म्हणू लागला. याचाच अर्थ माझं म्हणणं त्याला पटवून देण्यात मी शंभर टक्के यशस्वी झाले होते.
लग्नात मुलीचं नाव बदलण्यामागचं तर्कशुद्ध कारण आपल्यापैकी कुणालाच माहीत नसावं. पूर्वापार एखादी पद्धत चालत आली आहे म्हणून एखादी गोष्ट करायची, याला खरं तर काहीच अर्थ नाही. ज्या नावाने मुलीच्या अस्तित्वाला पहिल्यांदा ओळख मिळाली ते नाव बदलणं म्हणजे तिचं लग्नाआधीचं अस्तित्वच नाकारण्यासारखं नाही का? कदाचित ही पद्धत सुरू होण्यामागचं कारणही हेच असेल. कारण आपल्या समाजव्यवस्थेत मुलीने नवीन आयुष्याची सुरुवात करताना सहसा तिच्या संपूर्ण भूतकाळाची लग्नाच्या होमकुंडात आहुती द्यायची अशी पद्धत आहे, त्यात नावही आलंच.
काही जणींना ही काही फार मोठी गोष्टच नाही, असं वाटतं, पण मैत्रिणींनो, आपला जन्म झाल्यानंतर आपल्या आई-वडिलांनी किती कौतुकाने अनेक नावांचे अर्थ शोधत, काही नावांवरून एकमेकांशी वाद घालून मग कुठे एक नाव आपल्यासाठी ठरवलं असेल. अत्यंत प्रेमाने, धुमधडाक्यात बारसं करून आपल्याला हे नाव दिलं असेल. आपण आजवर कमावलेली सगळी प्रशस्तीपत्रकं, बक्षिसं एवढंच काय तर मोबाइल, इंटरनेटचं बिल आणि अगदी बँकेतलं खातंदेखील ज्या नावावर आहे, ते नाव अचानक कुणीतरी केवळ आपल्यावर स्वत:चा हक्क प्रस्थापित करण्यासाठी म्हणून बदलत असेल तर ते योग्य नाही. मुळात आपली ओळख परस्पर बदलण्याचा अधिकार कुणालाच नाही.
आता हा लेख वाचणा-या अनेक काकूंना हे आगाऊपणाचं वाटत असेल खरं, पण निदान माझं नाव बदलण्याचा विषय झाला होता तेव्हा माझ्या डोक्यात हे सारे विचार आले होते. अगदी असंच प्रत्येकाला वाटावं हे काही गरजेचं नाही. कुणी सांगावं, काही जणींना कदाचित त्यांचं नाव आवडतही नसेल आणि निदान लग्नाच्या निमित्ताने ते बदलतंय म्हणून त्या खूशही होत असतील. आडनावाचंही थोडय़ाफार प्रमाणात तसंच आहे, पण आपण एका नवीन कुटुंबाचा भाग होत असताना त्यांची ओळख आत्मसात करण्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीला ती आपल्याकडून मिळण्यासाठी सासरकडचं आडनाव स्वीकारायलाच हवं. परंतु माझ्या मते, त्यासाठी माहेरच्या आडनावाचा त्याग करण्याची काहीच आवश्यकता नाही. लग्न म्हणजे आपल्याला विधी, कपडे, आमंत्रणं, दागिने, नवं घर असं सगळं वरवरचंच वाटत असतं, पण खरं तर लग्न या सगळ्याहून खूप वेगळा, असा छोटय़ा-छोटय़ा गोष्टींचा, अनुभवांचा, नव्या-जुन्या विचारांचा आणि प्रथांचा एकत्रित सोहळा असतो.
मुलीला एकीकडे आईबाबांचं घर सोडून जायचं म्हणून वाईट वाटत असतं आणि दुसरीकडे नव्या घरात सासू-सासऱ्यांना, नव-याला हाक काय मारायची, इथपासून सगळे प्रश्न पडलेले असतात. मी तर सासू-सासऱ्यांना लग्न ठरल्यापासूनच आई-बाबा बनवलं आणि नव-यालाही सुरुवातीपासून नावाने हाक मारत होते त्यामुळे पुढे तेच कायम राहिलं. माझ्या सासरी खरं तर या गोष्टीवर कुणाचाही आक्षेप नाही पण माहेरी मावशी, आजी वगरे मला अनेकदा म्हणतात ‘अगं, नावाने काय हाक मारतेस, ‘अहो’ म्हणावं’ आणि त्यावर माझं उत्तर असतं की, तोसुद्धा मला ‘अगं’ऐवजी ‘अहो’, तृप्ती, ऐकलंत का? असं म्हणणार असेल तर मला ‘अहो’ म्हणायला काहीच हरकत नाही.’ माझ्या या उत्तरामुळे मी त्यांना अनेकदा अगोचर वगरे वाटते, पण चालायचंच! मला वाटतं, प्रश्न जर मान देण्याचाच असेल तर तो दोघांनीही एकमेकांना द्यायला हवा. नाहीतर समोर असताना ‘अहो’ म्हणायचं आणि इतर वेळी ऑफिसमध्ये, माहेरी, ट्रेनमधल्या मैत्रिणींसमोर ‘तो माझा नवरा’ असं म्हणायचं. त्यापेक्षा मी चारचौघांमध्ये बिनदिक्कत ‘माझा सागर’ असा प्रामाणिकपणे माझ्या नव-याचा उल्लेख करते. त्यात मानही आला आणि प्रेमही!
माझ्या निरीक्षणाप्रमाणे एकमेकांना नावाने हाक मारणा-या जोडप्यांच्या नात्यामध्ये एक वेगळीच सहजता आणि पारदर्शकता दिसते. याउलट नव-याला ‘अहो’ आणि बायकोला ‘अगं’ म्हणणा-या जोडप्यांमध्ये कायम एक असमानता राहते. आपल्याकडे बाईला ती पुरुषापेक्षा सर्वार्थाने कमी आहे, कायम त्याच्यावर अवलंबून आहे, असं बजावण्यासाठी म्हणूनच अशा पद्धती रूढ करण्यात आल्या असाव्यात, असं माझं ठाम मत आहे. आपल्या रूढी-परंपरांचा मीही प्रचंड आदर करते पण जे निर्थक आणि असमानता निर्माण करणारं आहे ते सोडून देणंच योग्य! नव-याबद्दलचा आदर ही दाखवण्याची नाही तर बाळगण्याची गोष्ट आहे. नवरा-बायकोचं नातं हक्काचं, मैत्रीचं आणि पारदर्शक असलं तर पुढची वाट सुकर होते. त्याची सुरुवात नावापासून होते असं म्हणायला हरकत नाही कारण कुठलंही स्थळ आलं की आपण आधी नाव विचारतो आणि म्हणूनच एकमेकांच्या नावांचा आदर करून एकमेकांना नावाने संबोधणं ही खरं तर एका सुंदर नात्याची सुरुवात होऊ शकते.
Agree with you. Mast….