मालाड येथील मार्वेच्या समुद्रकिनारी असलेल्या‘आयएनएस हमला’ या ठिकाणी नौदलाच्या भरती प्रक्रियेपूर्वी परीक्षा देण्याकरता आलेल्या तरुणांना नौदलाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे.
मुंबई- मालाड येथील मार्वेच्या समुद्रकिनारी असलेल्या‘आयएनएस हमला’ या ठिकाणी नौदलाच्या भरती प्रक्रियेपूर्वी परीक्षा देण्याकरता आलेल्या तरुणांना नौदलाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे.
या परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येने विद्यार्थी ‘आयएनएस हमला’ बाहेर जमा झाले होते. मात्र, प्रवेशद्वारे समोर प्रचंड गर्दी झाल्यामुळे या वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणत्याही प्रकारची विशिष्ट व्यवस्था नसल्याने परीक्षेदरम्यान चेंगराचेंगरी होऊन अनेक जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
काही दिवसांपूर्वी नौदलाने नव्याने भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत फक्त १२ वी उत्तीर्ण(विज्ञान शाखा) अशी पात्रता दिली होती. शिवाय ६० टक्क्य़ांच्या वर असेही नमूद केले होते.
त्यानुसार नौदलाच्या भरती प्रक्रियेसाठी मालाडमधील ‘आयएनएस हमला’ या नौदलाच्या एकमेव परीक्षा केंद्रात शुक्रवारी सकाळपासूनच महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या सहा हजार इच्छुक उमेदवारांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. काही जण तर आदल्या दिवशी मुंबईत दाखल होऊन गुरुवारी रात्रीपासूनच परीक्षा केंद्राच्या ठिकाणी तळ ठोकून होते.
परीक्षेसाठी आलेल्या या तरुणांसाठी राहण्याची किंवा खाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे परीक्षार्थीत नाराजी होती. ज्यावेळी ६० टक्क्य़ांच्या खाली असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला गेला. त्यावेळी नाराज झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वारेसमोर संताप व्यक्त करत गदारोळ केला.
यादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर सौम्य लाठीमारही केला असल्याचे परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र, कोणताही लाठीचार्ज करण्यात आला नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर मालाड येथेही नौदलाचे तट आहे. येथे नौदलात प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जाते.
यंदाच्या या प्रवेश परीक्षेसाठी महाराष्ट्रातून साधारणत: चार हजार युवक सहभागी होतील, अशी नौदलाला वाटले होते. पण या उलट सहा हजार युवक नौदलाची परीक्षे देण्यासाठी येथे आल्याने प्रचंड गर्दी पाहायला मिळाली.
स्थानिक पोलीस व नौदलाचे अधिकारी मिळून या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होते. पण विद्यार्थी आक्रमक झाल्याने चेंगराचेंगराचा प्रकार घडल्याची प्रतिक्रिया नौदलाच्या एका अधिका-याने दिली.
भगवान गायकवाडSeptember 10, 2016 at 9:33 pm
मराठी मुलांवर अन्याय केला. जाहिरातीत किमान टक्केवारीची अट नव्हती. ऐनवेळ असा बदल का केला गेला तो फक्त महाराष्ट्रातील मुलांच्या वेळी हा अन्याय आहे . मी पंतप्रधान, संरक्षण मंत्री यांना पत्र लिहिले आहे बघूया ते काय कारवाई करतात . ६० टक्केच्या आतील कुणालाही प्रवेश दिला नाही. मी स्वत तेथे होतो, मुलांना तेथून हाकलून दिले जर १०.३० नंतर कुणाला प्रवेश दिला असेल तर हा मोठा अन्याय आहे. मारहाणीच्या भीतीने अनेक तरुण तेथुल पळाले. तरी सदर भरती रद्द करावी. याप्रकरणी चौकशी व्हावी, दोषी अधिका-यांवर कारवाई व्हावी, तेथे सुरु असलेल्या चर्चेनुसार इतर राज्यातील मुलांची जेव्हा भरती झाली तेव्हा टक्केवारीची अट नव्हती.. तरी या प्रकाराची सखोल चौकशी करत मराठी मुलांना न्याय द्यावा.