एलफिन्स्टन-परळ रेल्वे पुलावर दुर्घटना मृतांमध्ये १४ पुरुष, ८ महिलांचा समावेश
मुंबई- मध्य रेल्वेचे परळ स्टेशन आणि पश्चिम रेल्वेचे एलफिन्स्टन स्टेशन यांना जोडणा-या पुलावर शुक्रवारी सकाळी चेंगराचेंगरी होऊन २२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यात १४ पुरुष आणि ८ महिलांचा समावेश आहे. या दुर्घटनेत ३९ जण जखमी झाले असून त्यात ३० पुरुष आणि ९ महिलांचा समावेश आहे. जखमींवर जवळच असणा-या केईएम रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. दुर्घटनेचे राजकारण करण्यासाठी केईएम रुग्णालयांत राजकीय लोकांची जत्रा भरली. रेल्वे मंत्री पीयूष गोयल केईएम रुग्णालयात गेले तेव्हा संतप्त प्रवाशांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिले आहेत. मृतांच्या नातेवाइकांना राज्य सरकारकडून ५ लाख आणि केंद्र सरकारकडून पाच लाख देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.
सकाळी साडेनऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास मध्य मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे अनेक प्रवासी पुलावरच थांबले होते. अशातच, परळ आणि एलफिन्स्टन दोन्ही स्टेशनांवर एकापाठोपाठ एक लोकल ट्रेन येत होत्या आणि पुलावरची गर्दी वाढतच होती. सकाळी घरातून निघताना पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने ब-याच प्रवाशांनी छत्री किंवा रेनकोट आणलेले नसल्यामुळे जिथे पूल संपतो तिथे ते पाऊस थांबवण्याची वाट पाहत थांबले होते. त्यामुळे पुलावर मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली. अशातच, पुलाचा पत्रा तुटल्याचा मोठा आवाज झाला आणि एकच गोंधळ उडाला. पुलाचा एक भाग कोसळत असल्याची अफवा पसरली. त्यात शॉर्टसर्किट झाल्याचीही अफवास पसरली. त्यामुळे गोंधळ वाढला. जो-तो बाहेर पडण्यासाठी धावत सुटला. त्यामुळेच ही चेंगराचेंगरी झाली, असे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. पावसामुळे निसरडय़ा झालेल्या पुलावर धावता धावता काही जण खाली पडले. त्यांच्या अंगावर काही प्रवासी पडले, तर अनेक जण त्यांच्या अंगावर पाय देऊन स्वत:ला वाचवण्यासाठी धावत सुटले.
काहींनी पुलावरून उडय़ाही मारल्या. त्यात अनेक प्रवासी जखमी झाले. काही मिनिटे झालेल्या या चेंगराचेंगरीने अक्षरश: मृत्यूने तांडव घातले. लोक वाट मिळेल तिकडे पळत सुटले. त्यातच पाऊस सुरू असल्याने गोंधळ वाढतच गेला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, होमगार्ड घटनास्थळी धावले. जखमींना तातडीने जवळच असलेल्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. या चेंगराचेंगरीत २२ जणांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. अद्यापी ३९ जणांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील काहीजणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
उद्घाटनाऐवजी रेल्वेमंत्री पोहोचले केईम रुग्णालयात
उपनगरीय रेल्वेच्या १०० फे-यांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी रेल्वे मंत्री पीयूष गोयल मुंबई दौ-यावर आले आहेत. रेल्वे मंत्र्यांचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार होते. त्यांच्या स्वागताला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार गेले होते. रेल्वेमंत्र्यांच्या आगमनापूर्वीच ही घटना झाली. त्यामुळे उद्घाटनस्थळी न जात रेल्वेमंत्र्यांनी जखमींची चौकशी करण्यासाठी थेट केईम रुग्णालय गाठले. तेथे त्यांच्याविरोधात काही मृतांच्या नातेवाइकांनी घोषणा दिल्या. एकंदर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची रेल्वे प्रशानाच्या वतीने करण्यात आली.दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी, मृतांच्या नातेवाइकांना केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत
जखमींसाठी ‘स्वाभिमान’चे मदतकार्य!
रेल्वे पुलावरील दुर्घटनेत जखमी झालेल्यांना स्वाभिमान संघटनेच्या वतीने तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात आली. अनेक जखमींना रक्ताची गरज होती. स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ रक्तदात्यांना आव्हान केले आणि ज्या जखमीला ज्या गटाचे रक्त हवे असेल त्याची उपलब्धता करून दिली. स्वाभिमानच्या अनेक कार्यकर्त्यांनी स्वत:ही रक्तदान केले. अपघाताची माहिती मिळताच नायगाव-वडाळाचे आमदार कालिदास कोळंबकर, माजी नगरसेवक सुनील मोरे, राजेश हाटले, सत्पाल वाबळे, विकास पवार, संकेत बावकर, हर्षद पाटील, रुपेश गांगण आदी कार्यकर्ते रुग्णालय परिसरात हजर होते. माजी खासदार निलेश राणे यांनीही केईएम हॉस्पिटलमध्ये येऊन जखमींची विचारपूस केली. मुंबईबाहेर असलेले माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे आणि आमदार नितेश राणे यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुंबईकरांना ‘स्वाभिमान’ संघटनेकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अफवा पसरविणाऱ्यांची चौकशी करा!
परळ आणि एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर गर्दी झाली. परंतु केवळ या गर्दीमुळे ही दुर्घटना झालेली नाही, तर यावेळी शॉर्टसर्किट झाल्याच्या आणि पूल कोसळत असल्याच्या अफवा पसरल्यामुळे गोंधळ उडाला आणि त्यातून ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेत बळी पडलेले २२ जण त्या अफवांचे बळी आहेत. त्यामुळे ज्यांनी ही अफवा पसरविली त्यांची चौकशी करावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
[EPSB]
[/EPSB]
प्रिय मुख्यमंत्री यांस,
जेव्हा कधी दुर्घटना होते त्याच वेळी तुम्ही का जागं होता आजची परेल ची दुर्घटना ही त्यातलाच एक भाग आहे आज तुमच्या सरकारच्या आणि रेल्वे मंत्रालयाच्या नाकर्तेपणामुळे अनेक लोकांचे निष्पाप जीव तुम्ही घेतली आहेत .बरं तुम्हाला या संदर्भात तुम्हाला काहीच कल्पना नाही ,बाकी सगळ्या गोष्टींबद्दल तुमी फोल्लोउप ठेवतात मग या परेल ब्रिज संदर्भात अतिशय जुना प्रश्नअसतानादेखील तुम्ही त्या ठिकाणी दुर्लक्ष का करताहात ? का नाही विचारात जाब
तुमच्या अधिकारांना ?.आज तुम्ही बुलेट ट्रेन आणण्याचे स्वप्न दाखवलाय पण त्याआधी बेसिक लागणाऱ्या गोष्टीच जर तुमचे सरकार लोका देऊ शकत नसे तर ती बुलेट ट्रेन काय कामाचे ?.इकडे निष्पाप लोकांचे बळी घ्यायचे आणि बुलेट ट्रेन ची स्वप्न पहायची . आजपर्यंत परेल ब्रिज हा ओव्हरलोड होतो आहे याची काय आपल्याला काही कल्पनाच नाही आणि जर असेल तर त्यावर तुम्ही काय अकॅशन घेतले नाही तुम्ही एखादा नवीन bridge propose करू शकला असतात जर तुम्हाला एक्सिस्टिंग पुलाला रुंद करण्यास अडचणी येत असतील तर .
या देशाचा नागरिक आणि तुमचा चालवलेल्या सरकारची जबाबदारी बनते की त्यांनी नागरिकांच्या जिवाशी न खेळता आणि अशा दुर्घटनेची वाट न पाहता काहीतरी ठोस कार्यवाही करणे गरजेच आहे .आता तरी जागे व्हा.
आणि असे सारख सारख जाग करायला लावू नका नाहीतर तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत कायमच झोपवून टाकू.
जबाबदार नागरिक.
रस साटम.