गणपतीसाठी कोकणात गावी जाणा-या लोकांसाठी राज्य परिवहन महामंडळाने यंदा तब्बल १६७० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई – गणपतीसाठी कोकणात गावी जाणा-या लोकांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एस.टी.) यंदा तब्बल १६७० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘स्वाभिमान’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नितेश राणे यांनी एसटीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांची नुकतीच भेट घेऊन गणेशोत्सवासाठी कोकणात जादा गाड्या सोडण्याची मागणी केली होती. त्यानंतर महामंडळाने हे सकारात्मक पाऊल उचलल्यामुळे सुखावलेल्या कोकणवासीयांमध्ये ‘बाप्पा पावला’ अशी भावना व्यक्त होत आहे.
एसटी आणि कोकणवासीय यांच्यात भावनिक नाते असून त्यामुळे प्रत्यक्ष सुटणा-या गाड्यांची संख्या यापेक्षाही अधिक असेल. येत्या ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात या गाड्यांची निश्चित संख्या आणि त्याचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे दीपक कपूर यांनी स्पष्ट केले आहे.
नोकरी-व्यवसायासाठी सर्वदूर पसरलेल्या कोकणवासीयांना गणपती जवळ आले की गावचे वेध लागतात. मुंबईसह अन्य शहरांमध्ये असलेले कोकणवासीय गणपतीसाठी हमखास गाव गाठतात. मात्र रेल्वे, एसटी, खासगी बस अशा सर्वच मार्गासाठी एकच झुंबड उडत असल्यामुळे प्रचंड तारांबळ आणि दगदगीला या प्रवाशांना सामोरे जावे लागते. रेल्वे फुल्ल आणि खासगी बसेसचे वाट्टेल ते तिकीट दर यामुळे एस.टी बसेसला सर्वसामान्यांची सर्वाधिक पसंती असते. त्यात यंदा रेल्वेनेही प्रतीक्षा यादीवरील (वेटींग लिस्ट) प्रवाशांना प्रवास करण्यास बंदी घातल्यामुळे एस.टी.वरच या प्रवाशांची भिस्त आहे. हे लक्षात घेऊनच नितेश राणे यांनी मंगळवार, २३ जुलै रोजी दीपक कपूर यांची भेट घेऊन कोकणांत गणेशोत्सवासाठी जास्त गाडय़ा सोडण्याची मागणी केली होती.
या मागणीनुसार, येत्या चार ते नऊ सप्टेंबर या कालवधीत सोडण्यात येणा-या विशेष जादा गाड्यांपैकी १०७० गाडय़ा या फक्त मुंबई विभागातून सोडण्यात येतील तर उर्वरित ६०० गाडय़ा या इतर विभागातून सोडण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी कोकणासाठी १५२५ गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी फक्त मुंबईतून ९१३ गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत फक्त मुंबईतूनच १५७ अधिक गाड्या सोडण्यात येणार असल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे. एस.टी.ने मागील वर्षी उपलब्ध गाडय़ांमुळे महामंडळाला ११ कोटी ७० लाख रुपयांचा महसूल मिळाला होता. त्यामुळे यावर्षी भाडेवाढ आणि गाडय़ांच्या संख्येमुळे महसुलात चांगलीच भर पडेल असे अधिका-यांचे म्हणणे आहे.
कोकणवासीयांची गैरसोय होणार नाही
एस. टी. आणि कोकणवासीयांचे भावनिक नाते आहे. याची आम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. आतापर्यंत १६७० गाडय़ा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापेक्षाही अधिक गाडय़ा सोडल्या जाणार आहेत. मात्र अधिकृत आकडेवारी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दिली जाईल. रेल्वेच्या नव्या नियमांचा फायदा एसटी घेणार आहे. प्रवाशांच्या मागणीप्रमाणे गाड्यांची संख्या वाढवताना आपल्याच कर्मचारीवर्गासह त्या गाड्या चालविल्या जातील.- दीपक कपूर, व्यवस्थापकीय संचालक,एसटी महामंडळकोकणवासीयांना अशाच सुखसोयी मिळाव्यात हीच अपेक्षा
कोकणवासीयांसाठी जादा गाडय़ा सोडण्याच्या एसटीने घेतलेल्या निर्णयाचे स्वागतच आहे. कोकणवासीयांसाठी सुखसोयी देण्यासाठी जो विचार एसटीने केला आहे, त्याबद्दल एसटी महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांना मी धन्यवाद देतो. अशाच प्रकारे कोकणवासीयांना सुखसोयी मिळाव्यात हीच अपेक्षा आहे.- नितेश राणे, संस्थापकीय अध्यक्ष, स्वाभिमान संघटना
dhnayad manniya nitesh rane saheb,
apan ganpati madhe koknat janrya loknsathi jast st bus chi vevastha karun dilyabadal khup khup dhnayad ganpati bappa aplya hatun ashich lokseva
karun gheun aplyala khup khup pudhe vatchal karnyasathi ashirvad detil
aple shatasha abhar
sandeep gurav
kharepatan (mosam)