आग व इतर दुर्घटना व आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास १०१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर नियंत्रण कक्षाकडून होणारी फोनची पडताळणी व वाहतूक कोंडीमुळे घटनास्थळी पोहोचण्यास होणा-या विलंबातील अंतर आता अग्निशमन दल कमी करणार आहे.
मुंबई- आग व इतर दुर्घटना व आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास १०१ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर नियंत्रण कक्षाकडून होणारी फोनची पडताळणी व वाहतूक कोंडीमुळे घटनास्थळी पोहोचण्यास होणा-या विलंबातील अंतर आता अग्निशमन दल कमी करणार आहे.
प्रत्येक वाहनात मोबाईल डेटा टर्मिनल बसवून जीआयएस व जीपीएस यंत्रणेद्वारे वाहतूक कोडींची माहिती घेऊन पर्यायी मार्गाचा वापर करणे व वर्दीची तीव्रता वाढल्यास लघु संदेशाद्वारे संबंधित केंद्रातील वरिष्ठांना व इतर संस्थांना माहिती दिली जाईल.
त्यामुळे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षातूनच वर्दीच्या ठिकाणी गेलेल्या प्रत्येक वाहनावर बारीक लक्ष ठेवत कमीत कमी वेळेत व अचूक मार्गाने वर्दीच्या ठिकाणी वाहने रवाना करत दुर्घटनेतील बचावकार्य वेगात केले जाणार आहे.
मुंबईत आग लागणे, घर कोसळणे, अपघात, प्राणी किंवा पक्षी फसणे, समुद्रात किंवा तलावात व्यक्ती बुडणे, झाड कोसळणे, रस्त्यावर तेलगळती आदी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अग्निशमन दलाच्या १०१ या हेल्पलाईनवर नियंत्रण कक्षात वर्दी देण्यात येते.
या वर्दीनंतर ज्या भागात दुर्घटना घडली आहे त्या भागातील अग्निशमन केंद्रातील वाहने रवाना केली जातात. परंतु अनेकदा दुर्घटनेच्या ठिकाणी पर्यायी रस्ते उपलब्ध असताना अधिका-यांना याची कल्पना नसल्यामुळे लांबचा प्रवास करत ते घटनास्थळी पोहोचतात. त्यामुळे बरेचदा वाहतूक कोंडीमध्ये ही वाहने आणि जवान अडकतात.
परिणामी दुर्घटनेच्या ठिकाणी पोहोचण्यास विलंब होतो. यावर मात करण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या वापरासाठी ‘इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सिस्टम कम्प्राईजिंग ऑफ जीपीआर अँड जीआयएसवर आधारित ऑटोमॅटिक व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम अँड डिस्ट्रेस कॉल रिस्पॉन्स मॅनेजमेंट सिस्टीम १०१ ही प्रणाली खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रणालीअंतर्गत संपूर्ण नियंत्रण कक्षाचे कामकाज संगणकीय प्रणालीद्वारे होणार आहे.
सध्याच्या वर्दी हाताळण्याच्या पद्धतीत होणारा विलंब व त्यातील त्रुटी या टाळता येणार असल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी स्पष्ट केले. ही प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर अग्निशमन दलाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीतील कामात पारदर्शकता येऊन जनतेला देण्यात येणा-या सेवेत सुधारणा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यासाठी तब्बल ६० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
प्रणालीची वैशिष्टय़े
» या प्रणालीत एखादी व्यक्तीने दूरध्वनीवर वर्दी दिल्यानंतर पत्ता, भ्रमणध्वनीचा क्रमांक हा संगणकावर नमूद करून त्याद्वारे जीआयएस लोकेशन मॅप व वर्दीचे ठिकाण त्वरित प्राप्त होईल. त्यामुळे वर्दीचा पत्ता लिहिण्यामध्ये व कॉल पडताळणीतील वेळही वाचेल.
» नियंत्रण कक्षाला वर्दी प्राप्त झाल्याबरोबर त्याच वेळेस त्या भागातील अग्निशमन केंद्रासोबतच आजूबाजूच्या अग्निशमन केंद्रालाही याची माहिती व जीआयएस लोकेशन प्राप्त होईल. त्यामुळे नियंत्रण कक्षातून संबंधित अग्निशमन दलाला वर्दी देऊन जवान व वाहने पाठवण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल.
» संबंधित अग्निशमन केंद्रावरून वाहन वर्दीवर गेले की नाही किंवा ते कुठे आहे, याबाबत त्या वाहनाचे जीपीएस ट्रॅकिंग प्रणालीद्वारे सर्व माहिती नियंत्रण कक्षाला तसेच त्या अग्निशमन केंद्राला मिळणार आहे. त्यामुळे घटनास्थळी वाहन पोहोचले की नाही आणि किती वाजता पोहोचले याची माहिती उपलब्ध होईल.
» रस्त्यावर वाहतूक कोंडी असल्यास अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात जीपीएसद्वारे उपलब्ध असल्याने वाहतूक नियंत्रण केंद्राद्वारे ती सुरळीत करण्याचे काम केले जाईल. तसेच वर्दीवर लवकरात लवकर पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गाने जाण्याचे आदेश दिले जाणार आहेत.
» प्रत्येक वाहनावर मोबाईल डेटा टर्मिनस उपलब्ध असेल. त्यामुळे वाहनावर कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना वर्दीची संपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे. त्याप्रमाणे जीआयएस नकाशाद्वारे नजीकचे रस्ते व त्यावरील वाहतूक कोंडी आदींची माहिती मिळणार आहे.
» वर्दीची तीव्रता वाढल्यास ती सर्व माहिती ऑटोमॅटिक संबंधित वरिष्ठांना लघु संदेशाद्वारे आपोआप कळवण्यात येईल. तसेच इतर संस्थांनाही याची कल्पना दिली जाणार आहे.
अरे बापरे ! आता तर गुटका तंबाखू खायला सुद्धा वेळ मिळणार नाही ,झाली कि पंचायत आमची,