मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अभिनेता संजय दत्त पहिल्यांदाच मिडिया समोर आला.
मुंबई– मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी आढळलेल्या अभिनेता संजय दत्त याने गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन शरणागती पत्करणार असल्याचे सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर तो आज पहिल्यांदाच मिडियासमोर आला. मी आत्तापर्यंत माफी मागितलेली नाही. योग्यवेळ आल्यावर न्यायालयापुढे शरण जाईन, असे त्याने सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मी आदर करतो. माझे माझ्या देशावर आणि देशबांधवांवर खूप प्रेम आहे. मी कायदे मानणारा नागरिक आहे. माफीसाठी मी कोणताही अर्ज केलेला नाही. न्यायालयाने मला दिलेली शिक्षा मी भोगणार आहे. हा माझ्यासाठी तसेच माझ्या कुटुंबीयांसाठी सगळ्यात कठीण काळ असल्याचे सांगत संजयला अश्रू अनावर झाले. काँग्रेसच्या खासदार आणि त्याची बहिण प्रिया दत्त यासुद्धा संजय दत्तसोबत होत्या. त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून तो रडला.
न्यायालयाच्या निर्णयानंतर संजय दत्तच्या प्रतिक्रियेसाठी त्याच्या पाठी लागणा-या मिडियाच्या लोकांनाही संजयने माझ्या पाठी लागू नका. माझ्याजवळ असलेल्या वेळात मला राहिलेली सर्व कामे पूर्ण करायची आहेत तसेच कुटुंबालाही वेळ द्यायचा आहे, असे सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने संजय दत्तला २१ मार्चला बेकायदा शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यापैकी अठरा महिन्याची शिक्षा आधीच भोगलेल्या संजयला आता साडेतीन वर्षे तुरुंगात रहावे लागणार आहे. न्यायालयाने आत्मसमर्पणासाठी संजयला एक महिन्याची मुदत देण्यात आली असून त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलिसांच्या हवाली व्हावे लागणार आहे.
दरम्यान, संजय दत्तला शिक्षेतून माफी मिळावी यासाठी प्रेस कौन्सिलचे प्रमुख मार्कंडेय काटजू यांच्यासह राजकीय तसेच बॉलीवूडमधील अनेक बड्या नेत्यांनी राज्यपालांना विनंती केली आहे.
Don lokanbarobar sambandh thevatana kaa naahi radu aale ? evadhe nirapradh mele tenvha kaa naahi radu aale ?