रविवारी रात्री मुंबईच्या आकाशात इतिहाद एअरवेज आणि एमिरेट्स या जगातील बलाढय़ विमान कंपन्यांच्या विमानांची टक्कर होणार होती.
मुंबई – रविवारी रात्री मुंबईच्या आकाशात इतिहाद एअरवेज आणि एमिरेट्स या जगातील बलाढय़ विमान कंपन्यांच्या विमानांची टक्कर होणार होती. अवघ्या एक क्षणात होत्याचे नव्हते झाले असते. पण, मुंबईच्या हवाई नियंत्रण कक्षाने दाखवलेल्या सावधनतेमुळे भीषण अपघात टळला आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश नागरी विमान वाहतूक महासंचालयाने दिले आहे.
दुबईहून सेशेल्सला निघालेले एमिरेटस्चे विमान (ईके-७०६) आणि अबूधाबीहून सेशेल्सला निघालेले इतिहाद एअरवेजचे विमान (ईयू-६२२) २९ मार्चच्या रात्री एकमेकांना टक्कर देणार होते. अवघ्या २५ सेकंदात होत्याचे नव्हते होणार होते. मात्र, मुंबईच्या हवाई नियंत्रण कक्षाने एका विमानाच्या कमांडरला तातडीने महत्वाचा संदेश (रिझोल्यूशन अॅडव्हायझरी, आर. ए.) पाठवला. दोन्ही विमानांमध्ये अत्यंत कमी अंतर राहिल्यास हा संदेश पाठवला जातो. हा संदेश मिळाल्यावर अवघ्या सहा सेकंदात एका वैमानिकाने त्याचे विमान निर्धारित उंचीपेक्षा अधिक वर नेले. यामुळे मोठी दुर्घटना टळली.
एमिरेट्स कंपनीने हा अपघात टळल्याचे मान्य केले आहे. मुंबईच्या हवाई हद्दीत ही घटना घडली, असे एमिरेट्सच्या प्रवक्त्याने सांगितले. या विमानातील कर्मचा-यांनी या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर हवाई सुरक्षा अहवाल तयार केला असून तो मुंबई हवाई नियंत्रण कक्षाकडे पाठवला आहे. या घटनेची चौकशी केली जाईल, असे कंपनीने जाहीर केले. येमेनच्या हवाई हद्दीत सध्या युद्ध सुरू असल्याने एमिरेट्स व इतिहाद या सेशेल्सला जाण्यासाठी भारत व मस्कतच्या हवाई हद्दीचा वापर करत आहेत.
हे हवाई नियंत्रण कक्षाने केले नसून विमानातल्या TCAS (Traffic Collision Avoiding System) ACAS (aircraft collision advisory system) ने केले आहे…. समुद्रावर जिथे रडारची रेंज पोहचू शकत नाही तिथे pilots HF (high frequency ) वर बोलतात…. हि घटना घडली तिथे रडार ची रेंज जात नाही….