आज मला एका अशा नात्याबद्दल सांगावंस वाटतंय जे माझ्यासाठी खूप मोलाचं आहे. अर्थात सगळ्यांच्याच आयुष्यात ही व्यक्ती असते आणि तिच्याशी आपले सगळ्यात जवळचे संबंध असतात. ती व्यक्ती म्हणजे अर्थातच आई. सगळ्यांच्याच आयुष्यात तिचं अस्तित्व, आणि महत्त्वं खूप आहे. अशा या आई आणि मुलीच्या म्हणजेच माझ्या आणि आईच्या नात्याबद्दल ..
आई म्हणजे माया
आई माझी कल्पतरू,
आई माझी गुरू,
आई माझी सच्ची सोबतीण,
आई या नावातच किती काही सामावलं आहे. आईबद्दल आजवर आईविषयी कित्येकांनी लिहिलं असलं तरी ते कमीच पडतं. अगदी लहानपणापासून ते मोठं होईपर्यंत ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. तिच्या अस्तित्वाची आपल्याला कधीच जाणीव नसते, पण ती न बोलता आपल्यासाठी बरंच काही करत असते. माझ्या आईने म्हणजेच शुभांगी कदम हीने माझ्यासाठीसुद्धा बरंच काही केलं आहे. पण त्याची जाणीव मला कधीच झाली नाही. माझे सगळे लाड, हट्ट ती पुरवायची. मला जे हवंय ते ती मला आणून द्यायची. मी तिच्यावर रागावायचे तेव्हा ती लहानपणी माझ्यासाठी खेळणी आणि मोठी झाल्यावर ड्रेस किंवा टॉप्स घेऊन यायची. खरं तर हे सगळं फक्त मला मनवण्यासाठी असायचं. मी माझ्या आईसमोर जितकी जिद्दीने वागली आहे तेवढी जिद्द मी आजपर्यंत कोणासमोरच दाखवली नाही. एकदा लहानपणी आईने माझ्या दादाला खूप मारलं होतं. आईने रागाने आम्हा दोघांशीसुद्धा बोलणं बंद केलं. आम्ही आमच्या पिगी बँकमधले थोडे पैसे काढले आणि तिला खाऊ घेऊन आलो. आम्ही असं केलंय हे बघून, आईच्या डोळ्यात पाणी आलं. तिने लगेच आम्हा दोघांना तिच्या कुशीत घेतलं. आईची माया ही अशीच असते.
आजही मला तो दिवस आठवतोय. मी कॉलेजमध्ये असताना मला मलेरिया झाला होता. मी महिन्यातून एकदा आजारी पडतेच, पण या मलेरियाने मला चांगलचं झोडपलं होतं. तेव्हा माझं डोकं प्रचंड दुखायचं. त्यात अंगात बेफाम ताप होता. या तापामुळे आणि डोकेदुखीमुळे मी अर्धमेली झाले होते. डॉक्टरांचे औषधोपचार सुरू असतानासुद्धा माझी डोकेदुखी आणि ताप कमी होत नव्हता. मी आईला सतत डोक दाबायला सांगायचे. आईसुद्धा जमेल तेव्हा डोकं दाबायची. एक तर माझं पथ्यं, घरातली इतर कामं, इतरांचं जेवण या सगळ्यात ती थकून जायची त्यात माझी नाटकं सुरू असायची. जवळपास एक महिना मी आजारी होते. त्यात मला अॅडमिटसुद्धा केलं होतं. त्यामुळे तिची अक्षरश: तारेवरची कसरत व्हायची. आईच्या व्यथा, तिची अवस्था तेव्हा मला कधीच कळली नाही. एक महिन्याच्या सुट्टीचा परिणाम माझ्या अभ्यासावर झाला. त्यात कॉलेजच्या एका मॅडमनेसुद्धा समजून घेतलं नाही. मी बीएमएमची विद्यार्थी असल्यामुळे प्रेझेंन्टेशन करणं आम्हाला गरजेचं होतं, पण मला साधं उभं राहण्याची ताकद नव्हती तर प्रेझेन्टेशन कुठून करणार? मी प्रेझंटेशन केलं नाही. आईने कॉलेजमध्ये कळवलं होतं तसंच माझे मित्रमैत्रीणीसुद्धा माझी खबरबात शिक्षकांपर्यंत पोहोचवत होते. प्रेझेंन्टेशन करता येणार नाही, म्हणून शिक्षकांनी मला लेखी प्रोजेक्टस द्यायला सांगितलं. मी लेखी प्रोजेक्टस दिला असतानासुद्धा मला सगळ्यात कमी गुण दिले गेले. त्यात दुस-याच महिन्यात आमच्या परीक्षा सुरू झाल्या. आजारातून नुकतीच उठले होते त्यामुळे मी परीक्षेतसुद्धा काही जास्त लक्ष देऊ शकले नाही. त्यामुळे माझ्या प्रॅक्टिकल्स आणि इंटरनल परीक्षेच्या एकूण गुणात एक मार्क कमी पडत होता. आईने माझ्या शिक्षकांना बरं नसल्याचं लेखी पत्र दिलं असतानासुद्धा मला नापास करण्यात आलं होतं. मी आजवर कधीच नापास झाले नव्हते. कधी केटीसुद्धा लागली नव्हती. आईने माझ्या शिक्षकांना मार्क वाढवण्यासंबंधीत विनंती केली. पण ते शक्य नव्हतं कारण ही परीक्षा युनिव्र्हसिटीची होती. त्या एका मार्कामुळे माझं एक वर्ष वाया गेलं. त्यावेळी मला माझ्या आईने खूप आधार दिला.
मी लहान असताना माझ्या आईलासुद्धा मलेरियाच झाला होता. तेव्हा मला आईला मदत करावी, तिची काळजी घ्यावी वगैरे या गोष्टी तितक्याशा कळायच्या नाहीत. तिला बेफाम ताप असतानासुद्धा ती आमच्यासाठी जेवण करून नंतर घरातली इतर अगदी गरजेची काम करून झोपायची. त्यावेळीसुद्धा आईने काही कामं सांगितलं तर मला खूप राग यायचा. पण आज माझं लग्न झालं, आज मला माझ्या आईची खरी किंमत कळते. तिने माझ्यासाठी किती काही केलं ते आता जाणवतं. तिने दिवाळीत स्वत:ला साडी न घेता मला ड्रेस घेतला. मी खूश व्हायचे. माझ्या आईने मला कधीच कमी प्रतीच्या वस्तू घेतल्या नाही. माझ्या कुटुंबातल्या कोणाच्याच वस्तू इतक्या महागड्या नसायच्या जेवढय़ा माझ्या असायच्या. माझ्या आईची मी सेवा करण्याऐवजी तिनेच माझी नेहमी सेवा केलीय, असं म्हणायला हरकत नाही. मी कधीच तिला तिच्या कामात विशेष मदत केली नाही. अगदी किरकोळ मदत केली तर करायचे. पण आईने तशी कधीच तक्रार केली नाही. मी अगदी लाडात वाढले, त्यात मी शेंडेफळ असल्यामुळे माझेच जास्त लाड झाले. तिने स्वत:चं आयुष्य आम्हा दोन मुलांसाठी वेचलं होतं. मला जेव्हापासून समजतंय तेव्हापासूनचा काळ बघितला तर मला हे कधीच आठवत नाही की तिने पहिला स्वत:चा विचार केला असेल. प्रत्येक वेळी तिने माझा, माझ्या भावाचा आणि बाबांचा पहिला विचार केलाय.
आज लग्न झाल्यानंतर कळतंय की ती आमचं सगळ्यांचं करत असताना किती थकायची. स्वत:चं आयुष्य ती कधीच जगली नाही. आम्ही आताच्या मुली स्वत:च्या करिअरला किती प्राधान्य देतो. करिअरच्या बाबतीत आम्ही कधीच तडजोड करत नाही. पण आईने आमच्यासाठी त्याचीही तडजोड केली. बरं असंही नाही की माझी आई शिक्षित नाही, ती चांगली बारावी झालेली आहे आणि तिला पुढे शिकायचंसुद्धा होतं. बाबांच्या नकारामुळे, तिने घरसंसारात आपलं मन रमवलं. खरं तर तिलाही एक उंच शिखर गाठायचं होतं. पण तिने तिच्या इच्छा माझ्यावर कधीच लादल्या नाहीत, मला नेहमीच प्रोत्साहन दिलं. अगदी माझ्या बाबांच्या विरूद्ध जाऊनसुद्धा. खरंच आज मला कळतं तिने माझ्यासाठी काय केलं ते.. तिने स्वत:चं आयुष्य न जगता मला जगवलं.. आज मला कळतयं तिचं प्रेम आणि तिचं महत्त्वं..
One of the best article I have come across