देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही. आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा देश जोडूया, अशी भावनिक साद काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना घातली.
नवी दिल्ली- केंद्रातील मोदी सरकार देशाला तोडण्याचे काम करत आहे. पण काँग्रेसच्या ‘हाता’त या देशाला पुन्हा जोडण्याची शक्ती आहे. देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही. आपण सगळ्यांनी मिळून पुन्हा देश जोडूया, अशी भावनिक साद काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना घातली.
राजकीयदृष्टय़ा सर्वाधिक वाईट काळाला तोंड देणा-या काँग्रेसची रणनीती ठरविण्यासाठी पक्षाचे ८४ वे महाधिवेशन शनिवारी सुरू झाले. दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडिअममध्ये सुरू असलेल्या महाधिवेशनात देशभरातून प्रतिनिधी उपस्थित आहेत. ‘काँग्रेसची विचारसरणी आणि कार्यकर्ता’ हा अधिवेशनाचा केंद्रबिंदू आहे. काँग्रेसच्या कार्यकारिणीचीही निवड यात होणार आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधींच्या बीजभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ झाला.
देशातील तरुण आज हतबल दिसताहेत. ते मोदींकडे पाहतात, तेव्हा त्यांना कुठलाच मार्ग दिसत नाही. रोजगार कुठून मिळेल, शेतक-यांच्या पिकाला भाव कसा मिळेल, हे गंभीर प्रश्न आहेत. त्यातून काँग्रेस पक्षच दिशा दाखवू शकतो, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राहुल यांनी पहिल्यांदाच पक्षाच्या महाअधिवेशनात भाषण केले. ते काय बोलतात, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. परंतु, आपली सगळ्यांची मते ऐकून समारोपाचे भाषण मी मोठे करेन, त्यात पक्षाची पुढची दिशा ठरवली जाईल, असे सांगून राहुल यांनी उद्घाटनाचे छोटेखानी भाषण केले.
मोदींमुळे ३६ हजार कोटींचे नुकसान
एकीकडे भारतीय लष्कराला अत्याधुनिक शस्त्रांसाठी निधी नाही, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे राफेल विमानांच्या खरेदी करारात ३६ हजार कोटींचे नुकसान झाले असून हा सगळा पैसा केंद्र सरकारच्या खिशात गेला असा खळबळजनक आरोप राहुल गांधी यांनी केला. एका ट्विटमध्ये त्यांनी हा आरोप केला. डसॉल्ट अॅव्हिएशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार राफेल विमानांच्या खरेदी करारात घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. कतारला एक राफेल विमान १३१० कोटी मध्ये विकण्यात येत आहेत. अशात भारताला एका राफेल विमानासाठी १६७० कोटी रुपये चुकवावे लागत आहेत. एवढेच नाही तर युपीएची सत्ता असताना या एका राफेल विमानाची किंमत ५७० कोटी होती असेही ट्विट राहुल गांधी यांनी केले.
Good Joke ……….