‘मी लहान मुलांच्या शाळेत राहिलो तर सा-या सृष्टीत त्यांना नेईन. त्यांच्याबरोबर खेळेन, त्यांना स्वच्छता शिकवीन. त्यांचे फाटके कपडे शिवीन. त्यांना गाणी शिकवीन. मौज करीन. त्यांना मानवधर्म शिकवीन. आपण सारे एक हा मंत्र मी त्यांना देईन. मुलांचा कधी अपमान करू नये. मुले म्हणजे नवजगाची आशा. उद्याचे जग बनविणारी थोर व्यक्ती म्हणजे मुले.’ हा विचार केवळ न सांगता तो अंमलात आणणा-या या चालत्या बोलत्या मुक्त विद्यापीठाची म्हणजे साने गुरुजींची आज २४ डिसेंबर रोजी ११५वी जयंती! साने गुरुजी नवसमाजरचनेसाठी धडपडणारे लोकशिक्षक होते. साने गुरुजी एक थोर साहित्यिकही होते. विद्यार्थीदशा ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत गुरुजी लिहीतच होते. गुरुजींच्या मनातील लेखक, कवी, शिक्षक, लोकशिक्षण, शिक्षणतज्ज्ञ व क्रोंतिकारक अत्यंत तेज:पुंज असेच होते.. श्यामची आई तर अजरामर आहे. पायाला धूळ लागू नये म्हणून जपणा-या श्यामवर आईने केलेल्या संस्कारांचे साक्षीदार असलेले आवळ्याचे झाड पालगडला आजही पाहायला मिळते.
दापोली- आई हाच गुरू, आई हेच आपल्या ज्ञानाचे विद्यापीठ असते, अशी शिकवण ज्यांनी आपल्याला दिली; खरा तो एकची धर्म..जगाला प्रेम अर्पावे! असा संदेश देणारे लोकशिक्षक!! मानवधर्म, समतेची शिकवण देणारे परमपूज्य साने गुरुजी मूळचे कोकणातील दापोली तालुक्यातील पालगडचे. पांडुरंग सदाशिव साने अर्थात आपले सर्वाचे साने गुरुजी.
मूळचे देवरूख येथील असलेले दापदेव साने यांचे कुटुंब पालगड येथे वास्तव्यास आले. त्यांच्या तिसरी पिढीतील आपले परमपूज्य साने गुरुजी. साने गुरुजींचे आजोळही पालगड येथील नारायण बल्लाळ परचुरे यांच्याकडे. गुरुजींच्या आईचे माहेरचे नाव बयो तर सासरचे नाव यशोदा.
२४ डिसेंबर १८९९ रोजी या महान युगपुरुषाचा जन्म झाला. राष्ट्रभक्ती, एकता, शिक्षण, लोकचळवळ याचे धडे ज्यांनी अवघ्या समाजाला शिकविले, एकसंघ असलेल्या भारतीय संस्कृतीची समता, समानतेची भावना ज्यांनी लोकांमध्ये वाढीस लावली, रुजवली ते साने गुरुजी. पालगडमध्ये साने गुरुजींचे घर आजही स्मारकरूपाने उभे आहे. शासनाने त्यासाठी पुढाकार घेऊन ते उभे केले. साने गुरुजींचे भव्य राष्ट्रीय स्मारक रायगड जिल्हय़ात माणगाव तालुक्यात वडघर येथे उभे आहे.
पालगड येथे गुरुजींचे बंधू गजाननराव साने हे राहत असत. मात्र कालांतराने गजाननराव ठाणे जिल्हय़ात बोर्डी येथे वास्तव्यास गेले. त्यानंतर साने गुरुजी जेव्हा जेव्हा पालगड येथे येत त्या प्रत्येक वेळी ते रावजी केळकर यांच्या घरीच वास्तव्यास असत. त्या घरात साने गुरुजींच्या आठवणी आजही ताज्या आहेत. गुरुजींच्या स्मृती जपणारे ते घर आज कृषितज्ज्ञ शरदराव केळकर यांनी जुन्या स्वरूपात जसे आहे तसे जपले आहे. गुरुजी आले की, ते ज्या ठिकाणी ओटीवरील खांबाला टेकून बसत असत तो खांब शरदराव आपल्याकडे आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आनंदाने दाखवतात. शरदराव केळकर यांचे आजोबा जेव्हा प्लेगने आजारी पडले होते त्यावेळी गुरुजींनी तब्बल २१ दिवस आपल्या या मित्राच्या घरी वास्तव्य करून त्यांची सेवा केल्याची माहिती या वेळी शरदराव केळकर यांनी दिली.
देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी केवळ काही महिन्यांचा अवकाश होता त्या वेळी गुरुजी पालगड येथे आले होते. त्या वेळी शंकर ओक यांच्या अंगणात गुरुजींची एक मोठी सभा झाल्याची एक महत्त्वपूर्ण आठवण शरदराव केळकर यांनी सांगितली. गुरुजींना लहानपणी श्याम म्हणत असत. या श्यामला ज्या दगडी द्रोणीतून आई आंघोळ घालत असे ती द्रोण, गुरुजींच्या घरामागील परसदारात असलेले आवळीचे झाड आजही श्यामला आईने दिलेल्या संस्काराचे धडे बोलत असल्याचा भास होतो.
पालगड मराठी शाळेत गुरुजींनी प्राथमिक धडे गिरविल्यानंतर ते अल्फ्रेड गॅडने या स्कॉटिश मिशनरीने सुरू केलेल्या दापोली एज्युकेशन सोसायटीत माध्यमिक शिक्षणासाठी दाखल झाले. हे विद्यालय म्हणजे आताचे दापोलीतील ए. जी. हायस्कूल! त्यानंतर पुढील शिक्षण ओंध येथील श्री यमाई श्रीनिवास विद्यालय, महाविद्यालयीन शिक्षण न्यू पूना कॉलेज (सर परशुरामभाऊ कॉलेज, पुणे) येथे झाले. याच काळात स्वातंत्र्याच्या विचारांनी प्रेरित होऊन गुरुजींनी असहकार चळवळीत सहभाग घेतला आणि त्यांची स्वातंत्र्य चळवळ सुरू झाली.
१९३०च्या सत्याग्रहाच्या चळवळीत आल्यापासून गुरुजींनी देश जागृतीचे काम मोठय़ा आस्थेने केले. या चळवळीचे काम करत असतानाच त्यांना १९३२मध्ये अटक करण्यात आली. त्यांना धुळय़ाच्या तुरुंगात ठेवले. या तुरुंगात देशभक्तांचा मेळावाच भरला. तुरुंगातील गाठीभेटींच्या यात्रा या देशप्रेमाच्या तीर्थयात्रा झाल्या. येथेच गुरुजींना प्रथमच विनोबाजी भेटले. तेथेच विनोबांची गीताप्रवचने जन्म पावली. या गीताप्रवचनातील नवनीत घेऊन गुरुजींनी गीतेवर छोटेखानी पुस्तक लिहिले. विनोंबाच्या तप:पूर्ती जीवनाची विचारगंगा आणि गुरुजींच्या भावपूर्ण शैलीचा सुरेख संगम याच तुरुंगात झाला. येथेच गुरुजींनी ‘ग्रेटर इंडिया’ या रवींद्रनाथांच्या ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यामुळे धुळय़ाच्या तुरुंगाला तीर्थस्थानाचे महत्त्व प्राप्त झाले. येथेच पुढे गुरुजींनी ‘संध्या’, ‘चित्रकार रंगा’ या ध्येय-धुंद कादंब-या लिहिल्या. ‘संध्या’ कादंबरीतील ‘पहिला तुरुंगवास’ हे प्रकरण गुरुजींच्या मनातील तत्कालीन विचारप्रवाहांचे द्योतक ठरेल.
१९३२मध्ये धुळय़ाच्या तुरुंगात ते जेव्हा राजकीय कै देत होते तेव्हा येवल्याच्या राष्ट्रीय शाळेतील शिक्षकास गुरुजी म्हणून संबोधण्याची सवय होती. १९२४मध्ये जूनपासून अमळनेर येथील खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये ते शिक्षक म्हणून रुजू झाले त्या वेळपासून साने मास्तरांना ‘साने गुरुजी’ या नावाने विद्यार्थी हाक मारू लागले. जन्मभर मी शाळेतच नोकरी करीत राहणार नाही. माझ्या भावाचे शिक्षण संपले म्हणजे एक तर मी फक्त निर्वाहापुरते २५ रुपये घेऊन शाळेत राहीन. नाही तर खेडोपाडी जाईन. येथे मोलमजुरी करावी, रस्ते झाडावे, रात्री मुलांना-थोरांना जमवून लिहा-वाचायला शिकवावे, असे करीन. त्यांना देशभक्तांच्या कथा सांगेन. प्राचीन इतिहास सांगेन. एका खेडेगावात अशी पाच-सहा महिने चळवळ केल्यावर दुस-या खेडय़ात जाईन, असे ते आपल्या मित्रांना नेहमी सांगत असत. त्यांची ही भूमिका साहित्यातही प्रकट झाली आहे.
साने गुरुजींनी केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर अवघ्या समाजाला दिशा देण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. देशसेवा करण्याची त्यांची तळमळ त्यांना अस्वस्थ करीत होती. साने गुरुजींवर विनोबा भावे, राष्ट्रपिता महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, रामकृष्ण यांच्या विचारांचा प्रभाव होता.
विनोबा भावे यांच्याबरोबर धुळय़ाच्या तुरुंगात असताना विनोबांनी सांगितेल्या भगवद्गीतेचे अठरा अध्याय याचे टिपण करून त्यांनी ‘गीता प्रवचन’ हे पुस्तक लिहिले. साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ लिहून मातृप्रेमाची एक गीताच समाजापुढे ठेवली आहे. श्यामची आई या पुस्तकावरील मराठी चित्रपटही आपल्या सर्वाना ज्ञात आहेच. साने गुरुजींनी ११ फे ब्रुवारी १९४८पासून ‘कर्तव्य’ नावाचे सायंदैनिकही सुरू केले होते.
साने गुरुजी नवसमाजरचनेसाठी धडपडणारे लोकशिक्षक होते. साने गुरुजी एक थोर साहित्यिकही होते. विद्यार्थीदशा ते स्वातंत्र्य चळवळीपर्यंत गुरुजी लिहीतच होते. गुरुजींच्या मनातील लेखक, कवी, शिक्षक, लोकशिक्षक, शिक्षणतज्ज्ञ व क्रांतिकारक अत्यंत तेज:पुंज असेच होते. त्यांनी कधीही स्वत:ला साहित्यिक म्हणवून घेतले नाही व मोठय़ा साहित्य संमेलनापासून ते काहीसे दूरच राहिले. बालदोस्तांवरील प्रेमामुळे त्यांनी कुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद स्वीकारले. मुले म्हणजे देवाघरची फुले, मुले म्हणजे निरागस हास्य, प्रेमाचे आगर, आशाआकांक्षांचे आभाळ म्हणजे मुले हा आनंदाचा ठेवा, अशी गुरुजींची मुलांप्रती दृढ श्रद्धा होती. ते म्हणत, ‘मी लहान मुलांच्या शाळेत राहिलो तर सा-या सृष्टीत त्यांना नेईन. त्यांच्याबरोबर खेळेन, त्यांना स्वच्छता शिकवीन. त्याचे फाटके कपडे शिवीन. त्यांना गाणी शिकवीन. मौज करीन. त्यांना मानवधर्म शिकवीन. ‘आपण सारे एक’ हा मंत्र मी त्यांना देईन. मुलांचा कधी अपमान करू नये. मुले म्हणजे नवजगाची आशा. उद्याचे जग बनविणारी थोर व्यक्ती म्हणजे मुले.’
१९५० सालची गोष्ट. सांगलीला सेवा दलाचे शिबिर भरले होते. सेवा दल सैनिकांनी गजबजले होते. गुरुजी सांगलीला गेले. सर्व सेवा दल सैनिकांनी उद्देशून म्हणाले, ‘‘ज्या देशाला लोकशाही मार्गाने जावयाचे आहे. त्याला सद्गुणाची जोपासना करण्यावाचून गत्यंतर नाही. जेथे संयमी, विवेकी, प्रामाणिक, सत्यनिष्ठ लोक असतील, तेथे व्यक्तिस्वातंत्र्यही वाढू शकते. व्यवहार भ्रष्ट असेल, सार्वजनिक जीवन जर पै किमती इतके असेल तर या राष्ट्राला कोणती आशा? आज राष्ट्राला ‘आपण सारे एक’ ही शिकवण देणारी संघटना हवी आहे. ही संघटना सेवा दल हीच एक आहे. तुम्ही सारे हिंदू-मुसलमान, ब्राह्मण-ब्राह्मणेतर एकत्र या. नको स्पृश्य, नको अस्पृश्य, एकत्र बसा, उठा, खा, प्या, खेळा, शिका, काम करा. आपण भारतमातेची सारी लेकरे आहोत..!’’ साने गुरुजी एक चालते-फिरते-बोलते मुक्त विद्यापीठ होते. गुरुजींचे विचार काळाच्या कसोटीवर आजही दीपस्तंभाप्रमाणे आहेत. चिरंतर टिकणारे आहेत. ते मनापासून मनाला थेट साद घालणारे आहेत. ते म्हणत, ‘मी जीवनाचा एक नम्र उपासक आहे’ सभोवतालचा सारा संसार सुखी नि समृद्ध व्हावा, ज्ञान विज्ञानसंपन्न नि कलामय व्हावा हीच एक मला तळमळ आहे. माझे लिहिणे वा बोलणे, माझे विचार वा माझी प्रार्थना या एकाच ध्येयासाठी असतात.
पंढरपूरच्या श्रीपांडुरंगाचे म्हणजेच विठोबारायाचे मंदिर हरिजनांसाठी खुले व्हावे याकरिता सत्याग्रह केला. ते कामगार वर्ग तसेच उपेक्षित समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सतत लढत राहिले. महात्मा गांधी यांच्या खुनानंतर तब्बल २१ दिवस गुरुजींनी उपोषण केले. गुरुजींना अनेकदा तुरुंगवासही भोगावा लागला. समाजाला सुसंस्कृत करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत होते. माझ्या आयुष्याचे हेच ध्येय आहे हे ते स्पष्टपणे सांगतही. या ज्ञानामृताच्या विद्यापीठाने ११ जून १९५० रोजी मुंबईत आपले येथील कार्य संपविले. १९९९मध्ये परमपूज्य साने गुरुजींचे जन्म शताब्दी वर्ष साजरे करण्यात आले. त्याच वेळी गुरुजींच्या पालगड येथील मूळ घरात त्यांच्या स्मृती जपणा-या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. पालगड येथे गुरुजींच्या निधनानंतर दरवर्षी साने गुरुजी जयंतीनिमित्त राष्ट्र सेवा दलातील कार्यकर्त्यांना निमंत्रित क रून साने गुरुजींवर व्याख्याने आयोजित करण्याची परंपरा अखंडितपणे आजही सुरू आहे. जगाला प्रेम देणा-या या मानवतेच्या पुजा-याला विनम्र अभिवादन!
जगाला प्रेम अर्पावे !! खुपच छान लेख आहे.