आपल्याकडे लोकसेवासारख्या परीक्षांच्या बाबतीत तितकीशी जागरूकता नसते, त्याची कारणंही आपण पाहिली आहेत. आता लोकसेवा आयोगाअंतर्गत येणा-या विविध पदांसाठी भरती सुरू होईल. त्यामुळे साधारणत: या परीक्षेचं स्वरूप कसं असतं, याची माहिती करून घेऊया.
तुम्हाला वाटतं का की आपल्या नोकरीत प्रतिष्ठा असावी? आपण जाऊ तिथे लोकांनी आपल्याला ‘साहेब’ म्हणावं? लोकांनी आपल्याला ओळखावं? त्यांच्या समस्या घेऊन आपल्याकडे विश्वासाने यावं आणि आपण त्या पूर्ण कराव्यात? लोकांच्या उपयोगी पडताना कर्तव्य निभावण्याचंही समाधान असावं आणि तो आपल्या नोकरीचाच भाग असावा? किंवा असं वाटतं का की आपल्याला लाल गाडीतून फिरता यावं?
शासकीय अधिका-यांचा मान मरातब, तोरा आणि त्याहून अधिक हाती असणारे अधिकार; ज्यायोगे तुम्ही लोकांच्या भल्यासाठी राबू शकता, आपल्या हाताखालील लोकांना काम करण्यास लावू शकता, लोकांचा विश्वास जिंकू शकता, त्यांना आनंद देऊ शकता?
तुम्हाला असं वाटत असेल तर अर्थात तुम्ही राजपत्रित अधिकारी होण्याची स्वप्नं बाळगत आहात. यासाठीच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा हा धांडोळा.
लोकसेवा या शब्दातच या सेवांचे मर्म आहे. ही नोकरी म्हणजे लोकांची सेवा आहे. कुठलीही शासकीय नोकरी ही लोकांची सेवा असते. तुम्ही तुमची बुद्धी कामात ओतता, दिवस-रात्र मेहनत करता, विचार करता, कृती करता ही सर्व लोकांच्या भल्यासाठी असते. तुमची नोकरीतील दैनंदिन कामंही लोकांचं काही न काही भलंच करून जातात. तुमच्याकडे निर्णयक्षमता येते, अधिकार येतात आणि तुमच्या निर्णयांचा, फाइल्सवर केलेल्या नोंदींचा लोकांच्या भल्यावर परिणाम होत असतो. विश्वास ठेवा, इतके अधिकार, कामातील हा आनंद (जॉब सॅटिसफॅक्शन) इतर कुठल्याही खासगी नोकरीत मिळत नाही आणि तुमची अशी धारणा असेल की राजपत्रित अधिकारी म्हणजे मंत्र्यांच्या ताटाखालील मांजर होऊन राहणे, हांजी हांजी करणे तर कृपया हा समाज काढून टाका. कारण शासकीय नोकरीत प्रत्येक वेळा तुमचा मंत्र्यांशी संबंध येतोच असं नाही, किंवा प्रत्येक मंत्री तुमच्याशी वाईट वागेलच असं नाही. त्यामुळे हिंदी चित्रपटांतील मंत्र्याची इमेज तुमच्या मनात असेल तर ती काढून टाका.
२०१५ सालासाठीच्या आयोगाच्या विविध परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यापैकी राज्य सेवा परीक्षेचं विश्लेषण आपण येथे पाहू.
राजपत्रित अधिकारी दर्जाच्या परीक्षा
आयोगाच्या परीक्षांमध्ये खालील परीक्षांना आणि त्या उत्तीर्ण झालेल्यांना ‘राजपत्री अधिकारी’ हा दर्जा मिळतो.
राज्यसेवा परीक्षेअंतर्गत तीन प्रमुख परीक्षा घेतल्या जातात.
विक्रीकर निरीक्षक परीक्षा
पोलिस सब इन्स्पेक्टर
राज्यसेवा (खाली नमूद पदांकरिता) परीक्षा
ही परीक्षा महाराष्ट्रातील महत्त्वाची प्रशासकीय पदं जसं – तहसीलदार, नायब तहसीलदार, उपनिबंधक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी- नगरपालिका/परिषद, वित्त व लेख अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, कक्ष अधिकारी, गटविकास अधिकारी, साहाय्यक निबंधक-सहकारी संस्था या पदांसाठी ही परीक्षा घेण्यात येते.
परीक्षेचं स्वरूप
१. पूर्व परीक्षा
४०० गुणांची असून प्रत्येकी २०० मार्काचे दोन पेपर्स असतात.
पेपर १
१०० प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. प्रत्येक प्रश्नाला २ गुण आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा होतात.
हा पेपर सामान्य ज्ञान तपासण्यासाठी असतो. यात सहा विषय समाविष्ट असतात –
चालू घडामोडी
इतिहास : भारत व विशेषत: महाराष्ट्र
भूगोल : विश्व, भारत आणि विशेषत: महाराष्ट्र
भारताची राज्यघटना आणि महाराष्ट्राचे राजकारण व प्रशासन
आर्थिक व सामाजिक विकास व पर्यावरण
सामान्य विज्ञान
पेपर २
हा बुद्धिमत्ता चाचणी आणि व्यक्तिमत्व चाचणी (परिस्थितीजन्य प्रश्न) पाहण्यासाठी असतो. यामध्ये इंग्रजी/ मराठी कॉम्प्रिहेन्शन, तर्कशास्त्र(लॉजिक), दहावीचे गणित, बुद्धिमत्ता चाचणी आणि निर्णयक्षमता यांचा समावेश असतो.
८० प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. प्रत्येक प्रश्नाला २ गुण आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा होतात. निर्णयक्षमतेच्या प्रश्नांसाठी गुण वजा होत नाहीत.
उपलब्ध जागांच्या १०-१२ पट विद्यार्थी मुख्य परीक्षेसाठी निवडले जातात.
मुख्य परीक्षा ही परीक्षा ८०० गुणांची असते.
यात मराठी आणि इंग्रजी हे भाषा पेपर प्रत्येकी १०० मार्काचे आणि सामान्यज्ञानाचे ४ प्रत्येकी १५० मार्काचे असे ६ पेपर्स असतात.
मराठी व इंग्रजीची पातळी बारावी तर सामान्य ज्ञानाची पातळी पदवी परीक्षेची असते.
सामान्य अध्ययनाचे पेपर्स वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात. प्रत्येकी १५० गुण आणि २ तासांचा अवधी असतो.
सामान्य अध्ययन १ : हा इतिहास व भूगोलावर आधारित असतो. यात महाराष्ट्राचा आणि भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास, समाजसुधारक, स्वातंत्रोत्तर इतिहास, पृथ्वी, भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल. विशेषत: आíथक भूगोल आणि कृषी या घटकांचा समावेश होतो.
सामान्य अध्ययन २ : हा पेपर भारतीय संविधान, महाराष्ट्राचे राजकारण आणि प्रशासन यावर अवलंबून असतो. यामध्ये कायद्यांचाही समावेश होतो.
सामान्य अध्ययन ३ : हा पेपर मानवी हक्क आणि मानव संसाधन विकास यावर आधारित असतो.
सामान्य अध्ययन ४ : हा पेपर अर्थव्यवस्था, विकासाचे अर्थशास्त्र, विज्ञान व तंत्रज्ञान यावर आधारित असतो.
यानंतर १०० गुणांची मुलाखत असते.
अंतिम गुणांसाठी मुख्य परीक्षेचे व मुलाखातीचेच गुण ग्राहय़ धरले जातात. राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर फार छान करिअर आपली वाट पाहत असतं. या परीक्षेची काठीण्य पातळी केंद्र लोकसेवेच्या परीक्षेपेक्षा कमी असली तरी अभ्यास हा प्रचंड आहे. त्यामुळे चिकाटी, उत्साह आणि लक्ष्य समोर ठेवून मेहनत घेणं गरजेचं आहे.
राज्यसेवा परीक्षा या वर्षी एप्रिल २०१५ रोजी घेण्यात येईल. त्यासाठीचे फोरम्स आता डिसेंबरमध्ये निघतील. पोलीस उपनिरीक्षक जुलै २०१५ तर विक्रीकर निरीक्षक नोव्हेंबर २०१५ रोजी घेण्यात येईल.
तेव्हा कंबर कसा आणि घ्या वसा राजपत्रित अधिकारी होण्याचा!
ह्या परीक्संमध्ये वयाची अट काय आहे उदाहरणार्थ ओपेन ,ओबीशी ,येस्शी इतर.हे मला येथे कळवावे हि विनंती.मी वाट बघत आहे.