स्वयंपाकघरात तयार झालेल्या कच-याचं करायचं काय, हा पावसात प्रत्येकाला पडणारा प्रश्न. घंटागाडी वेळेवर येत नाही. पाऊस जास्त पडल्यावर घरोघरी कचरा उचलायला येणारी मंडळी दांडी मारतात. मग हा कचरा तसाच साठून राहिल्यावर त्याला दरुगधी येते. कच-याला किडे-मुंग्याही लागतात. मात्र ठाण्यात राहणा-या कौस्तुभ ताम्हनकरांकडे ओल्या कच-यापासून घरच्या घरी खतनिर्मिती करण्याचा उत्तम पर्याय आहे. त्यांनी आपल्या धर्य सोसायटीमध्ये कच-यापासून घरगुती खतनिर्मितीचा उपक्रमच राबवला आहे.
मागे कधीतरी काही कामानिमित्ताने ठाण्याच्या नौपाडा परिसरात, स्वामी विवेकानंद मार्गावर असणा-या धर्य सोसायटीत जाणं झालं. सोसायटीचे जिने चढत असताना पहिल्या मजल्यावर असणा-या एका घराच्या दरवाजावर एक पाटी वाचनात आली. ‘शून्य कचरा – येथे कचरा तयार होत नाही’, असं त्या पाटीवर मोठय़ा अक्षरात लिहिलं होतं. कुणाचंही कुतूहल जागृत करणारी ती पाटी होती. सोसायटीच्या दुस-या मजल्यावर मुलाखतीचं काम आटोपल्यावर कुतूहलापोटी त्या ‘पाटी’ लावलेल्या घराच्या दरवाजाची बेल वाजवली. त्या ‘पाटी’ लावलेल्या घरात प्रवेश केल्यावर ‘शून्य कचरा’ या उपक्रमाविषयी समजलं. तो उपक्रम राबवत होते, व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनीअर असणारे कौस्तुभ ताम्हनकर.
‘‘कचरा निर्मूलनाचा विषय निघाला की, प्रत्येक जण दुस-याने काय करावं हेच कायम सांगत असतो. पण ‘मी शून्य कचरा प्रकल्प घरात राबवतो आहे. तुम्हीपण राबवा,’ असं म्हणणा-यांची संख्या वाढली पाहिजे,’’ असं मत व्यक्त करत त्यांनी आपल्या अनोख्या उपक्रमाविषयी माहिती द्यायला सुरुवात केली.
ताम्हनकरांच्या सौभाग्यवती शरयू ताम्हनकर यांना स्वच्छतेची आणि घर टापटीप ठेवण्याची आवड. ते बायकोला मदत करायचे. त्या वेळी त्यांनी एकदिवस घरी होणा-या कच-याचं बारकाईने निरीक्षण केलं. ‘‘कोणत्याही रोगाच्या मुळाशी जाऊन औषधोपचार करावा, असं म्हणतात. म्हणून मी आमच्या घरात रोज भरणा-या कच-याच्या तीन बादल्यांचा अभ्यास कुतूहलाने करू लागलो. त्या बादल्यांमध्ये डोकावू लागलो. मुळात कचरा तयार कसा होतो, याचा शोध घेऊ लागलो. घरात असणा-या तीन बादल्यांपैकी एकीत माझ्याकडूनच सर्वात जास्त कचरा जमा होत होता. त्यामुळे कागदांची फाडाफाडी आणि चोळामोळा करून बोळे करायचं थांबवलं. या उपायाने कमीतकमी एका कचराकुंडीमधील कचरानिर्मिती तरी थांबली. त्यानंतर मोर्चा वळवला दुस-या कच-याच्या बादलीकडे. त्या बादलीत हात घालता येत नव्हता. कारण बादली उघडताच हाताचा उपयोग नाक दाबायला करावा लागत होता. तसंच या कच-याला दरुगधी आणि चिलटे यांपासून बचाव करणारं झाकण मला पाहिजे होतं.
जैविक कच-यात माती टाकल्यास तिच्यापासून दर्जेदार खतनिर्मिती होते, हे मी कुठेतरी वाचलं होतं. तो प्रयोग मी माझ्या घरी करण्याचं ठरवलं. माझ्या घरच्या जैविक कच-याला तात्पुरतं का होईना; पण मी मातीचं झाकण लावलं. गंमत म्हणजे दीड एक महिन्यांनी त्यातून चांगली खतनिर्मिती झाली. त्या खतांवर माझ्या घरच्या बगीच्यातील झाडं जोमानं वाढवली. त्यामुळे यापुढे होणा-या घरच्या जैविक कच-यावर कायमस्वरूपी मातीचं झाकणं बसवू लागलो. घरात पत्रे, काच, प्लॅस्टिक यांसारखा अविघटनशील कचराही निर्माण व्हायचा. तो वेगळा करून भंगारवाल्याला द्यायचो. कचरा निर्मूलनाला मी माझ्या घरापासून सुरुवात केल्यामुळे समाधानी होतो.’’
पुढे ताम्हनकरांनी ‘शून्य कचरा’ या उपक्रमाचा प्रसार करायचं ठरवलं. त्यातूनही त्यांनी जैविक कच-यापासून खतनिर्मिती या उपक्रमाचा प्रसार मोठय़ा प्रमाणावर केला. त्याची सुरुवात त्यांनी आपल्या राहत्या सोसायटीपासून केली. यातून जास्त गाजला तो घरगुती खतनिर्मितीचा उपाय. त्याविषयी ताम्हनकर सांगतात, ‘‘ओल्या कच-याचं खतात रूपांतर करताना, ओला कचरा जर बारीक करून जाळीच्या टोपलीत टाकला, तर त्याचं खतात लवकर रूपांतर होतं, हेही माझ्या वाचनात आलं. तोही प्रयोग करून पाहिला. बारीक केलेल्या ओल्या कच-यापासून अवघ्या एकवीस दिवसांत खतनिर्मिती झाली. त्याप्रमाणे ते घरी सुरी, कात्रीच्या साहाय्याने भाज्यांची सालं, देठं, टरफलं सुरी तसंच कात्रीने कापून बारीक करून शेण-मातीत टाकण्यास सुरुवात केली. त्याच्यापासूनही उत्तम खताची निर्मिती झाली. या खतयुक्त मातीची आद्र्ता, पीएच, एनकेपी (नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस हे घटक) उत्तम आहेत.’’ जैविक कच-यापासून खतनिर्मिती या उपक्रमाला लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता ताम्हनकरांनी ‘अविरतपात्र’ नावाचं उपकरण तयार केलं. अविरतपात्राच्या निर्मितीविषयी ताम्हनकर सांगतात, ‘‘कच-याची विल्हेवाट कशी लावायची? नागरिकांनीच निर्माण केलेल्या आणि एका न सुटणा-या प्रश्नाशी नगरपालिकेला झुंजावं लागत आहे. कच-याची विल्हेवाट कशी लावायची यासाठी मोठमोठय़ा योजना आखल्या जातात. त्यावर बरेच पैसे खर्च होतात; पण रस्त्याच्या कोप-यावर असलेल्या कच-याच्या कुंडय़ा मात्र ओसंडून वाहतच असतात. कोणत्याही रोगाच्या मुळाशी जाऊन औषधोपचार केला पाहिजे. यासाठी ‘अविरतपात्र’ या उपकरणाची निर्मिती केली. मुख्य म्हणजे या अविरतपात्राचा उपयोग पावसाळय़ात कच-याचं विघटन करून खतनिर्मिती करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. पळतपळत गाडीच्या मागे जाण्यापेक्षा ‘अविरतपात्र’ या भांडय़ात कच-याची निर्मिती करणं खूपच सोप्पं आहे. दुर्लक्ष केल्याने कच-यापासून खत तयार करण्याचे अनेक प्रकल्प बंद पडले आहेत. मात्र हा घरगुती खतप्रकल्प फक्त पावसाळय़ातच नाही, तर बारमाही उपयोगी पडेल,’’ असं मत ठामपणे ताम्हनकरांनी मांडलं.
‘‘मी माझ्या घरावर ‘शून्य कचरा – येथे कचरा तयार होत नाही’, अशी पाटी लावली आहे. स्वत:ची टिमकी वाजवण्याचा माझा अजिबात उद्देश नाही; पण अपेक्षा आहे की, जाता-येता एकतरी व्यक्ती मी राबवत असलेल्या प्रकल्पाची माहिती कुतूहलापोटी विचारेल. पण छे! आजपर्यंत फारच थोडय़ा व्यक्तींचं कुतूहल जागृत झालेलं आहे. पुढे भविष्यात जास्तीत जास्त लोक घरात कचरा होऊ देणार नाहीत, याकडे लक्ष देतील.’’, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
आजूबाजूची माणसं निद्रावस्थेत वावरत आहेत, असं आपल्याला वाटतं. पण ती जिवंत माणसं आहेत. म्हणून त्यांचं अंतर्मन मात्र जागृतावस्थेत असेल. त्यामुळे आज ना उद्या त्यांच्यावर ‘शून्य कच-याचा’ नक्कीच परिणाम होईल.
प्रक्रिया कच-यापासून खतनिर्मितीची
कच-यापासून खतनिर्मिती करण्यासाठी कौस्तुभ ताम्हनकरांनी ‘अविरतपात्र’ नावाचं उपकरण तयार केलं आहे. कसं असतं ते अविरतपात्रं
साहित्य : चाकू, चार पाय असलेलं प्लॅस्टिकचं जाळीदार बास्केट (१५ इंच लांब, ७११ इच रुंद, ७९ इंच उंच), फोटो रोल ज्या डबीतून मिळतो, त्या वाया गेलेल्या प्लॅस्टिकच्या चार डब्या, प्लस्टिकचा ट्रे (१९ इंच लांब, ७१२ इच रुंद, ७४ इंच उंच), चाकू, कातर.
कृती : प्लॅस्टिकच्या जाळीदार बास्केटला खालच्या बाजूला भोकं नसल्यास ती पाडून घ्यावीत. त्यानंतर त्या प्लॅस्टिक बास्केटला खालच्या बाजूने चार टोकांना चार फोटो रोलच्या डब्या जोडून घ्याव्यात. चार पाय असलेलं ते बास्केट प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये ठेवावं. अशा पद्धतीने अविरतपात्र तयार केलं जातं.
प्लॅस्टिकच्या अविरतपात्रामध्ये चारपाच गांडूळ सोडावेत. पात्रात जैविक कचरा वरून थोडा थोडा टाकावा. भाज्यांचे देठ, भाज्या-फळभाज्यांची आवरणं तसंच साली, बारीक करून त्या अविरत पात्रात टाकवेत. साधारण आठ ते पंधरा दिवसांनी त्या बास्केटमध्ये गांडूळ खत किंवा शेणखत आणि मातीचं मिश्रण यांचा पातळसा थर द्यावा. मग पात्रावर अधूनमधून पाण्याचा हबकारा मारावा. पात्रातील कच-याचं विघटन होण्यास साधारणपणे पंचेचाळीस दिवस लागतात. म्हणजे महिना-दीड महिना तरी सहजच लागतो. साधारण पंचेचाळीस दिवसांनंतर अविरतपात्राच्या जाळीतून खताच्या रूपात बाहेर पडणारी माती ट्रेमध्ये अगदी सहजच पडताना दिसेल.
हे अविरतपात्र नावाप्रमाणेच अविरतपणे चालू राहतं. त्याची कार्यक्षमता उत्तम राखण्यासाठी त्यात जैविक कचरा जास्तीत जास्त बारीक करून टाकायचा आहे. रोज एक ते दोन पेले पाणी वरून शिंपडायचं.
अविरतपात्र चांगल्यारितीने कार्यरत राहण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात
या अविरतपात्रात कार्यरत असलेल्या जंतू आणि जीवाणूंना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्यावा.
पात्रास हवा लागणं आवश्यक आहे. त्यासाठी छोटासा पंखा पात्राच्या वरच्या बाजूला लावावा. या पंख्याचा उपयोग अविरतपात्रात तयार होणा-या चिलटांना हाकलण्यासाठीही होतो.
दुपारचं कडक ऊन या पात्रावर पडू देऊ नका. ऊन टाळणं अशक्य असल्यास अविरत पात्रावर गोणपाट टाकून त्यावर पाणी टाकावं.
खतरूपी माती नियमितपणे बाहेर येऊ लागल्यावर, बाहेर आलेली माती आठवडय़ातून एकदा पाण्याच्या झोताने वेगळी करावी.
बाहेर पडणारी खतरूपी माती स्टँडला बांधलेल्या उतरत्या भागातून खालील भांडय़ात जमा होईल. हे खत झाडांसाठी वापरण्यास काहीच हरकत नाही.
रोज वरून थोडं थोडं पाणी अविरत पात्रावर शिंपडल्यामुळे काही थेंब ओघळून ते खालच्या भांडय़ात जमा होतात. हे पाणी म्हणजे द्रवरूप खतच आहे. झांडांना पाणी घालताना त्यात या द्रवरूप खताचा उपयोग करता येईल.
अविरतपात्र मंद गतीने चालत आहे, असं वाटल्यास त्यात वरून नारळाच्या शेंडय़ा, उसाची चिपाडं आणि शेणखत मातीचा एक थर लावावा.
पात्रात चिकन किंवा मटणाची हाडं, अंडय़ांचे कवच यांचंही विघटन होतं. मात्र त्या पदार्थापासून खतनिर्मिती व्हायला वेळ भरपूर लागतो. अंडय़ाच्या कवचांचं विघटनही होतं. मात्र माशांच्या काटय़ांचं विघटन लवकर होतं.
Dear सर,
Pls Confirm address / contact no of a person with whom availability of Avirat Patra in Pune . What is price?
with kind regards
A.S.Kher.
खूप छान उपाय आहे . मला अविरत पात्र वापरण्यामध्ये रस आहे. कृपया आपल्याशी संपर्क कसा करायचा ते कळवावे .