भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाहीविरोधात देशभरातील विरोधकांची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा सक्रिय झाले आहेत.
मुंबई- भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाहीविरोधात देशभरातील विरोधकांची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा सक्रिय झाले आहेत. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा आणि मी २०१९ मध्ये सर्व विरोधकांना एकत्र आणू शकतो, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
देशाच्या राजकारणात जेव्हा-जेव्हा तिस-या आघाडीची चर्चा होते, तेव्हा पंतप्रधानपदासाठी शरद पवारांचे नाव पुढे येते. २०१९ च्या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात महाआघाडी करण्याच्या हालचालींना वेग आला असताना आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे पवारांनी स्वत:च स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केला जाईल, अशी सावध खेळी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची माळ त्यांनी घातलेली नाही. निकालांनंतर पक्षीय बलाबल आणि जागांचे समीकरण मांडून पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केला जाणार आहे. स्वाभाविकच, या पदाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे आणि त्यात शरद पवार यांचे नावही आहेच. राष्ट्रीय राजकारणाचा दांडगा अनुभव आणि सर्वच पक्षांशी सलोख्याचे संबंध असल्याने पवार हे पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जातात. मात्र, पवारांनी केलेले वक्तव्य म्हणजे गुगली आहे का असा सवाल केला जात आहे.
माझा पक्ष देशभरात ३० ते ३५ जागा लढवतो. त्यातील निम्म्या जागा जिंकू शकतो. तेवढय़ा खासदारांवर कुणी देशाचा पंतप्रधान व्हायचे स्वप्न पाहत असेल तर त्याला वास्तवाचे भान आहे असे म्हणता येणार नाही, अशी सूचक प्रतिक्रिया पवारांनी दिली.
मी, सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा मिळून विरोधकांची मोट बांधू शकतो, कारण आम्हाला तिघांनाही पंतप्रधानपदाची इच्छा नाही, ते आमचे ध्येय नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. आम्ही तिघांनी मिळून विरोधकांना एकत्र आणायला हवे. देशभरात फिरून जनतेमध्ये विश्वास निर्माण करायला हवा, म्हणजे २०१९च्या निवडणुकीत भाजपाला एक तगडा पर्याय उभा राहू शकेल, असे पवारांनी नमूद केले.
लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर न करण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेचे त्यांनी स्वागत केले. तसेच, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुधारणा होत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.
देशाचे वाटोळे होणार