मराठी चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. पण या चित्रपटांचीसुद्धा विभागणी आहे. मनोरंजन आणि केवळ मनोरंजन करणारे विनोदी, ग्रामीण विषयांवरील सर्वापर्यंत पोचणारे चित्रपट हा एक विभाग तर दुसरा विभाग पटकन न समजणारे पण खूप काही बोलून जाणारे आणि जाणकारांची दाद मिळवणारे चित्रपट असा आहे.
‘अस्तु’ चित्रपट दुस-या विभागात मोडतो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवणारा हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी निर्मात्यांना लोकांना आव्हान करून निधी जमवावा लागलाय. क्राऊड फंडिंग करून दोन वर्षापूर्वी बनवलेला हा चित्रपट आता प्रदर्शित होतो आहे. यातून एकूणच आजच्या समाजाची चित्रपट विषयात जाण विकसित झालेली नाही, हेच सिद्ध होतं.
चित्रपट प्रामुख्याने अल्झायमर या विस्मरणाच्या आजारावर आहे. या आजारात हळूहळू तुमची स्मृती कमी होत जाते. त्यामुळे अगदी सुरुवातीला याचं गांभीर्य लक्षात येत नाही. वयोमानामुळे स्मृती कमी होणं आणि अल्झायमर या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. अल्झायमर हा मानसिक आजार आहे.
संस्कृतचे प्रकांड पंडित आणि कॉलेजचे प्रिन्सिपल डॉ. चक्रपाणी शास्त्री ऊर्फ आप्पा (मोहन आगाशे) हे आता निवृत्तीनंतरचं जीवन जगत आहेत. त्यांची पत्नी (शुभांगी दामले) हिचा मृत्यू होतो. तेव्हाही तिच्या मनात आप्पा आणि त्यांच्या कॉलेजमधील प्राध्यापिका मिसेस गुप्ते (इला भाटे) यांच्यात काहीतरी खास नातं होतं हाच विचार असतो.
आप्पा स्वत:च्या घरात एकटे आपल्या एका विद्यार्थ्यांसोबत राहतात. तो त्यांची देखभाल करतो. आप्पांची मोठी मुलगी इरा (इरा हर्बे) पुण्यातच राहून आप्पांची देखभाल करते. तिचा पती डॉ. माधव पाठक (मिलिंद सोमण) याची तिला यात उत्तम साथ असते. इराला परदेशात शिकून आता मुंबईत स्थायिक झालेली प्राध्यापक बहीण राही (देविका दफतरदार) आहे.
आप्पांचा अल्झायमर आजार आता जास्तच बळावतो. एक दिवस इरा आणि ते गाडीतून इराच्या घरी जाताना इरा काही कामासाठी वाटेत पाच मिनिटांसाठी उतरते. तेवढया अवधीत आप्पा गाडीतून उतरून एका हत्तीच्या आणि माहुताच्या पाठी जातात. त्यांचं हरवलेपण लक्षात आल्यावर माहूत त्यांना त्यांचं नाव, पत्ता, ठिकाण विचारतो, पण आप्पांना काहीच आठवत नाही.
वडिलांच्या काळजीने व्यथित होऊन आपण त्यांना एकटय़ांना सोडून गेलो म्हणूनच ते हरवले अशी अपराधी भावना मनात घेऊन इरा त्यांचा पोलिसांच्या मदतीने शोध सुरू करते. एका बाजूला इराने वडिलांचा चालू ठेवलेला शोध तर दुसरीकडे आप्पांचं माहुतांच्या पाठी पाठी त्याच्यासोबतच उघडयावरचं जगणं अशा दोन स्तरांवर चित्रपट सुरू राहतो.
माहुताची पत्नी चनम्माला आप्पांमधील स्वत:चं अस्तित्व विसरलेल्या वृद्धातील एक लहान निरागस मूल दिसतं. ज्याला देहधर्माचीही शुद्ध नाही. त्याचवेळी अधून मधून त्यांचं संस्कृतमधील बोलण्यावरून ही कोणीतरी बुद्धिमान, चांगल्या घरातील व्यक्ती आहे. हेही तिला समजतं.
कोणीही काहीही न सांगता उपजतच शहाणपण असलेली अशिक्षित चनम्मा आपल्या लहान मुलीला ज्या मायेने वागवते, त्याच मायेने आप्पांशी वागते. तिला त्यांच्यात देवही दिसतो. श्रद्धेने ती त्यांच्या पायाही पडते.
आप्पा हरवल्याची बातमी कळल्यावर राही देखील बहिणीकडे येते. पण ती इराइतकी हललेली नाही. ती इराला सांगते, ज्यांची स्मृतीच नष्ट झाली आहे तो माणूस मृत असल्यातच जमा आहे. तिचं एवढं प्रॅक्टिकल असणं हळव्या, भावनाप्रधान इराला पटत नाही. तिच्यासाठी आप्पा तिचे वडील आहेत आणि ते तिला जसे असतील तसे हवे आहेत.
शेवटी पोलिसांच्या मदतीने चोवीस तासांच्या आत आप्पा माहुतासोबत सुखरूप सापडतात. इराच्या आठवणीतून भूतकाळातील आप्पा, तिची आई व्यक्तिमत्त्व उलगडत जाते. चित्रपटाचं शीर्षक अस्तु याचा संस्कृत अर्थ जे जसं असावंसं वाटतं त्या क्षणाला तसं असणं असा होतो.
इंग्रजीत संस्कृतचे प्राध्यापक विद्वान आप्पा खरे की स्वत:चं नाव-गाव विसरून लहान मुलाच्या निरागस कुतूहलाने हत्तीच्या पाठी जात, चनम्माच्या छोटया मुलीशी खेळणारे, उघडयावर जेवणारे, राहणारे आप्पा खरे. दोघेही त्या क्षणापुरते खरेच हेच हा चित्रपट सांगतो.
अनादी अनंतकाळापासून मी कोण? हा प्रश्न सर्वच ज्ञानी व्यक्तींना पडला आहे. आपलं नाव, गाव, अस्तित्व आठवणीत ठेवणारी स्मृती हीच आपली ओळख हा विचार ‘अस्तु’ करायला लावतो. तसंच अल्झायमरविषयी खूप काही न सांगताही अशा रुग्णांशी कसं वागावं, त्यांची मानसिक स्थिती कशी असते. त्यांच्याजवळच्या व्यक्तींची परिस्थिती काय होते हे या चित्रपटातून खूप चांगल्या पद्धतीने दाखवलं आहे.
सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या दिग्दर्शनात खूप सहजगता आणि सोपेपणा आहे. अस्तुमध्ये हत्तीचा वापर कदाचित तो सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून केला असावा. कारण हा चित्रपट पाहिल्यावर प्रश्न पडतो तो हाच की, माणसाची विद्वता, बुद्धी, स्मृती हीच त्याची ओळख की हे सारं नष्ट झालेलं शरीर त्यांच्या नातेवाइकांच्या आणि त्यांना ओळखणा-यांच्या दृष्टीने त्यांची ओळख? विचार करायला लावणारा असा हा चित्रपट आहे.
डॉ. मोहन आगाशे यांनी केलेली आप्पांची भूमिका स्मरणीय आहे. स्मृती-विस्मृतीच्या हिंदोळ्यावरचे आप्पा, लहानपणी मातृछत्र हरपल्याने चनम्माच्या मायेने तिच्यात आई पाहणारे आप्पा अशा आप्पांच्या विविध भावावस्था त्यांनी अप्रतिमपणे साकारल्या आहेत. वडिलांची सतत काळजी करणारी मोठी मुलगी इराची घालमेल इरावती हर्षे यांनी अवघ्या देहबोलीतून प्रकट केली.
चनम्माची अवघी काही क्षणांची भूमिका अमृता सुभाष जंगली आहे. तिने म्हटलेला कानडी अंगाई शब्द आणि अर्थ न समजूनही खूप भावते. मिलिंद सोमण, देविका दफतरदार, नचिकेत पूर्णपात्रे, शुभांगी दामले, इला भाटे, तेजस राव, अदिती कुलकर्णी, संघर्षा संकट, डॉ. शेखर कुलकर्णी या सर्व कलावंतांच्या भूमिका चांगल्या आहेत.
सुमित्रा भावे यांनी मोजक्याच शब्दांतून आणि संवादातून विस्तृत आशय उलगडला आहे. मिलिंद जोग यांचं प्रसन्न छायांकन, संकेत कानिटकरांचं पार्श्वसंगीत योग्य आहे. गौरिका फिल्म्स निर्मित, निर्माते शीला राव, डॉ. मोहन आगाशे यांनी एक उत्तम चित्रपट प्रेक्षकांना दिला आहे.
एक उत्कृष्ट चित्रपट.