विधानसभा निवडणुकीच्या वेळी म्हणजे २०१४ साली भारतीय जनता पक्ष एक जाहिरात करत होती.. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असा काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला फडणवीस-खडसे कंपूचा तिरका प्रश्न होता. आज दोन वर्षानंतर महाराष्ट्रातील संतप्त जनता शिव्या-शाप घालून विचारत आहे की, ‘कुठे नेऊन ठेवलात तुम्ही महाराष्ट्र.’ नुसताच महाराष्ट्र कुठे तरी नेऊन ठेवण्याचा विषय नाही तर या राज्यातील आया-बहिणी सुरक्षित नाहीत.
ज्या राज्यात १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो, सांगितले जाते की, आरोपी एकच आहे. सीआयडीने चौकशी करावी. किमान तीन ते पाच आरोपी यामध्ये आहेत. एकाच नराधमाने बलात्कार करून हातपाय तोडले. अशी ही कर्जतची घटना नाही. किमान तीन ते पाच आरोपी असले पाहिजेत. घटना १४ जुलै रोजी घडली. १५ जुलै रोजी मुख्यमंत्री पंढरपूरला होते. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर तिथेच होत्या. त्यांनाही कर्जतला जावेसे वाटले नाही. आज १९ जुलै आहे. पाच दिवस होऊन गेले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इतक्या भीषण आणि लाज वाटणा-या घटनेनंतर घटनास्थळी जाऊन बलात्कार करून ठार मारलेल्या मुलीच्या आई-वडिलांना भेटावेसेसुद्धा वाटले नाही. हा मुख्यमंत्री आहे की सैतान? राज्याचा प्रमुख म्हणून मिरवताना हा राज्याचा नेता इतका निगरगट्ट आणि भावनाशून्य असू शकतो, हे कल्पनेच्या पलीकडचे आहे. पंढरपूरहून अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत जिल्ह्यात जायला मुख्यमंत्र्यांना अर्धा ताससुद्धा लागला नसता. राज्यात काही खुट्ट झाले तर ‘एस.बी.वन’ या पोलीस यंत्रणेमार्फत सर्व माहिती लिखित स्वरूपात मुख्यमंत्र्यांना सांगितली जाते. मुख्यमंत्री मुंबई बाहेर असतील तरी ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते. असे असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाच दिवस झाले तरी त्या घटनेनंतर लाज-लज्जा नाही. गृहखात्याचे धिंडवडे निघाले. कर्जतच्या पोलिसांनी इतक्या भीषण गुन्ह्याची दखल घेतली नाही. पंढरपूरहून मुख्यमंत्री दिल्लीला जातात, तिथून परत आले की, ‘मातोश्री’वर रात्री मेजवानीला जातात. इकडे राज्यातील जनतेचा बलात्काराच्या घटनेने संताप होत असताना मुख्यमंत्री म्हणत आहेत, पाहिजे तेवढी आर्थिक मदत करू. अहो फडणवीस, तुम्ही कोणत्या जागेवर बसला आहात, याची जरा तरी तुम्हाला जाणीव आहे का? या मुख्यमंत्री पदावर महाराष्ट्रात कोण कोण बसले होते हे माहिती आहे का? घटना काय घडली.. आणि हवी तेवढी आर्थिक मदत देण्याचे तुम्ही हे काय बोलता आहात? पोलीस खाते तुमच्याकडे आहे. त्यामुळे कदाचित सर्व ठिकाणी पैशाच्या पाकिटाने कामे होतात आणि गुन्हे दाबले जातात, त्याची सवय तुम्हाला निवेदन करताना लागली आहे. ज्या मुलीवर बलात्कार करून तिचे तुकडे तुकडे झाले त्या भीषण घटनेचे दु:ख तुम्ही कोणत्या पैशांत मोजता आहात? अशा मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राला लाज वाटत आहे. आज आचार्य अत्रे यांची आठवण येते. आज रिंकू पाटील प्रकरणाची आठवण येते. इतक्या भीषण घटनेनंतर तुम्ही सांत्वनाचे कोरडे शब्द व्यक्त करताना तुमची देहबोलीसुद्धा एवढी दृष्ट वाटते आहे की, तुमच्या त्या घटनेचे कसलेही सोयरसुतक नाही. इतके निगरगट्ट होऊ नका. गंगाधरपंतांच्या पुण्याईने आणि मोदींच्या मेहरबानीने तुम्हाला जी जागा मिळाली आहे त्या जागेला शोभेल, अशी निवेदने करा. घटना घडल्यानंतर २४ तासांच्या आत तुम्ही तिथे गेला असतात, आरोपीच्या मुसक्या दोन तासांत आवळल्या असत्या आणि तुमच्या डोळय़ांतून दोन अश्रू ओघळले असते तर तुम्ही निदान निगरगट्ट नाही, एवढे तरी म्हणता आले असते. तुम्हाला तुमचे सरकार वाचवायचे आहे.. सत्ता उपभोगायची आहे. म्हणून विधानमंडळ अधिवेशनाच्या आदल्या रात्री तुम्ही ‘मातोश्री’वर मेजवानी झोडायला जाता. त्याची जाहिरात करता आणि उद्धव ठाकरे तरी असे की, किती डय़ुप्लिकेट माणूस आहे हा? काळोख पडल्यावर मुख्यमंत्र्यांबरोबर हा भोजन घेतो आणि आदल्या दिवशीच्या जाहीर भाषणात हाच माणूस सांगतो की, ‘उद्या महाराष्ट्रात निवडणूक घेतली तर शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल’. बाळासाहेबांवर प्रेम केलेली शिवसेनेची ही वडा- पाव खाऊन काम करणारी तरुण मुले त्यांना उद्धव ठाकरे यांचे नाटक खरेच वाटते. तिथे मग ‘रोखठोक’वाले भाजपाला निजामाचे बाप म्हणणार.. इकडे उद्धव ठाकरे सरकार रस्त्यावर आणण्याच्या बाता करणार.. तिकडे १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिचे हात-पाय तोडले जातात आणि इकडे हे मातोश्रीवर मेजवानी झोडायला जाणार.. महाराष्ट्राला किती फसवाल? किती नाटकं कराल? तुमचा एक चेहरा तरी खरा आहे का? नौटंकी किती करायची..? शिवसेनेच्या मागे धावणा-या तरुण पोरांना वाटते आहे की, लंबा चौडा हात करून भाषण करणारे उद्धव ठाकरे खरेच भाजपाबरोबरचे नाते तोडणार.. मंत्रिमंडळातून बाहेर पडणार, सरकार पाडणार आणि भाजपावाल्यांनाही असे वाटते की, मुख्यमंत्री वाघाच्या जबडय़ात हात घालणार म्हणून बिचारे माधव भंडारी मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून उद्धवना असरानी म्हणणार.. ही सगळी नौटंकी झाल्यानंतर काळोख पडल्यावर रात्री मुख्यमंत्री मातोश्रीवर पोहोचणार आणि रश्मीवहिनींनी खोब-याचे वाटण घालून केलेली चिकन करी ताव मारून खाणार.. जिताडा किंवा पापलेटचे तुकडे बरोबर आहेत. बाहेर शिवसैनिकांना वाटते आहे, आता आपला मुख्यमंत्री येणार.. किती किती फसवाल महाराष्ट्राला? तुमचे ‘सामना’तील अग्रलेख, तुमची भाषणे, राऊतांचे ‘रोखठोक’, तुमची निवेदने सगळे कसे झूट झूट आणि झूट.. नीलमताई गो-हे मंत्रीपद मिळाले नाही म्हणून नाराज आहेत. जर काँग्रेसच्या सरकारात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचे तुकडे केले असते तर विधान परिषद त्यांनी डोक्यावर घेतली असती. सोमवारी विधानसभेतील त्यांचे भाषण ढक्कू भातासारखे आणि भेंडय़ाच्या भाजीसारखे होते. खरा उमाळा आणि उबळ याच्यामधील फरक समजायला वेळ लागत नाही. एरवी कडाडून बोलणा-या भाषणात तो उमाळा नव्हता. सरकारला कसे दुखवावे, असे कुठेतरी त्यांच्या मनात होते. देहबोली लपून राहत नाही. चीड, संताप कधीही लटुपुटुच्या शब्दांनी व्यक्त होत नाही. कर्जतमधील अत्याचाराचा विषय राजकीय पक्षाचा नव्हता. हा महाराष्ट्राला कलंक लावण्याचा विषय होता. निदान या विषयात तरी लटुपुटुची भाषा असता कामा नये. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सांगणे आहे, तुमच्या नागपूरमध्येही ६ महिन्यांत ४६ खून आणि ८० बलात्कार झालेत. त्याची यादी तुम्हाला हवी असेल तर ‘प्रहार’ देईल. मेहरबानी करा आणि महाराष्ट्राची माफी मागून गृहखाते सोडा. डुलत डुलत चालून महाराष्ट्र चालत नाही. तुमच्या सुदैवाने महाराष्ट्रात लोकचळवळ नाही. नाही तर संतापलेली जनता जेव्हा रस्त्यावर येईल तेव्हा पळता भुई थोडी होईल. मेजवान्या झोडायच्या असतील तर त्या खुशाल झोडा. पण बोलायचे एक आणि लोकांना फसवायचे हे धंदे बंद करा. उद्धव ठाकरे यांनाही तेच सांगणे आहे. कुठे बाळासाहेब आणि कुठे तुम्ही? ‘कमळाबाई’ म्हणायचे बाळासाहेब.. त्यांच्यासमोर गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन नमस्कार करत होते. बाहेर शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल सांगता आणि काळोख पडल्यावर मुख्यमंत्र्यांना चिकन आणि पापलेट खाऊ घालता. किती ढोंग करता. कर्जत तालुक्यात अत्याचार होऊन ठार मारल्या गेलेल्या मुलीचे आणि तिच्या आई-बापांचे शिव्या-शाप तुम्हा दोघांना लागल्याशिवाय राहणार नाहीत. इथून पुढे महाराष्ट्राच्या अस्मितेचे नाव काढू नका..!
विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय केले बसा उपोषनाला
लाचार लोक आहेत कारण मुंबई खड्ड्यात घातली आहे यांनी आणि त्यातून पैसे कमावतात. आदित्य ठाकरे बोलतात कालगुडे यांचा कार्यकर्ता नाही आणि राजन विचारे हे त्याचे सेलेब्रेशन करतात. सेक्स रॅकेट मध्ये महिला शिवसेना पदाधिकारी आणि त्याबरोबर एकनाथ शिंदेचा फोटो. भाजप कार्यकर्त्याने व्हिडीओ वायरल केला तर त्याला मारहाण.. वारे वाह शिवसेना.. असलॆ रूप तुमचे लोकांना लवकर माहीत पडणार….