मान गेला, सन्मान गेला, राज्यसभेची उमेदवारीही गेली. अपमानाचे अनेक घोट गिळूनही खासदारकीची मनीषा मातीला मिळाली, अशी अवस्था शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची झाली आहे.
मुंबई- मान गेला, सन्मान गेला, राज्यसभेची उमेदवारीही गेली. अपमानाचे अनेक घोट गिळूनही खासदारकीची मनीषा मातीला मिळाली, अशी अवस्था शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची झाली आहे. अपमान गिळून उमेदवारी मिळवण्याचा काळ आता संपल्याचा अंतिम इशाराच या निमित्ताने जोशीसरांना शिवसेना नेतृत्वाने दिला आहे.
‘अपमान गिळा आणि पदे मिळवा’ या एकाच सूत्राच्या आधारे अनेक पदे उपभोगलेल्या मनोहर जोशी यांची राज्यसभेवर जाण्याची अखेरची धडपडही फोल ठरली. लोकसभेवर जाण्याचा मार्ग तर यापूर्वी महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी बंद केला. त्यानंतर कितीही अपमान सहन केले तरी आता कोणतेही पद मिळणार नाही, यावर जणू शिवसेना नेतृत्वाने शिक्कामोर्तब केले.
दादर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून संसदेत जाण्याची तयारी जोशींनी केली होती. मात्र ‘मातोश्री’च्या सर्व इच्छा सध्या पूर्ण करणारे राहुल शेवाळे यांनी त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात यश मिळवले. आपण या भागातले उमेदवार असल्याचे संकेत गणेशोत्सवात त्यांनी दिले. दादर मतदारसंघात शेवाळे यांनी बॅनरबाजी करताना त्यावर मनोहर जोशींचे छायाचित्र काय, साधे नावही दिसणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली होती. त्या वेळी जोशी यांनी मातोश्रीवर गाऱ्हाणे मांडून पाहिले. मात्र तसे होर्डिग आपल्या परवानगीनेच लावले असल्याचे सांगून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोशी यांना वेगळे संकेत दिले.
लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही, अशी खात्री झाल्यानंतर जोशी यांनी राज्यसभेच्या सात जागांसाठी होणा-या निवडणुकीत किमान ८वा उमेदवार म्हणून तरी आपला विचार व्हावा, अशी व्यूहरचना केली. शिवसेनेच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराला आवश्यक असणारी ३७ मते मिळाल्यानंतर दुस-या उमेदवारासाठी ९ मते शिल्लक राहत होती. भाजपची ११ मते मिळवताना मनसेला सहज गुंडाळून त्यांची १२ मते मिळवू, असा जोशींचा विचार होता. उर्वरित सहा अपक्ष मिळवून देण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही दिल्लीत भेट घेतली होती. मात्र या भेट उद्धव ठाकरेंना खटकली आणि त्यांनी जोशी यांची कानउघाडणी केली. मग जोशी यांनी एका मुलाखतीत उद्धव ठाकरेंवर टीका केली. परिणामी, दसरा मेळाव्यात त्यांना अपमानित व्हावे लागले. राज्यसभेची ८वी उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी पक्ष नेतृत्वाची माफी मागितली, ‘मातोश्री’च्या वा-या केल्या. मात्र बांधकाम व्यावसायिक संजय काकडे यांनी ‘मातोश्री’चा आशीर्वाद मिळवला आणि जोशीसरांवर हात चोळीत बसण्याची वेळ आली.
संजय काकडेंची व्यूहरचना
राज्यसभा निवडणुकीत अतिरिक्त मतांच्या भरवशावर आवश्यकतेपेक्षा जास्त उमेदवार उभे राहतात, तेव्हा अपक्ष आमदारांना कमालीची किंमत येते. खूप मोठा घोडाबाजार होतो. मात्र व्यावसायिक संजय काकडे यांनी मोठय़ा खुबीने हा घोडेबाजार टाळला. त्यांनी अपक्ष आमदारांच्या मागे लागण्यापेक्षा शिवसेना-भाजपकडून आठवा उमेदवारच येणार नाही यासाठी व्यूहरचना केली. गेल्या शनिवारी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांची ‘मातोश्री’वर भेट घेतली. प्रत्येक आमदारांच्या भेटी-गाठी घेण्यापेक्षा संबंधित पक्षांच्या नेतृत्वाला भेटणे त्यांना अधिकच सोयीचे गेले आणि आठवा उमेदवार रिंगणातच आला नाही.
uddhav yedzavat aahe. Manohar joshi hyana apamaanaspad vagvun tyane swatachi layaki dakhvun dileli aahe. balasaheb aaj asate tar ase zale nasate.