मुंबईचं धकाधकीचं जीवन आपल्या चांगलंच परिचयाचं आहे. पण याही पलीकडे मुंबापुरीचं वेगळं रूप आहे, शांत उत्तररात्रीच्या मुंबईचं! इथे भरपूर काही चालतं. पण त्यात काबाडकष्ट करणा-यांचा वाटा मोठा आहे. अशा उत्तररात्रीतल्या कष्टक-यांची ही थोडीशी ओळख.
मुंबई म्हटली की आपल्या डोळ्यासमोर येतात ती मस्टर गाठण्यासाठी धावणारी माणसं, कोणी ट्रेन पकडणारी तर कोणी बस, कोणी मुलांना शाळेत सोडणारी तर कोणी डबे पोहोचवणारी.. कोणी चालत जाणारी तर कोणी घरातलं आवरण्यात व्यस्त असलेली अशी ही मुंबई!
आपल्यापैकी कित्येकांचा दिवस हा पहाटे चारलाच सुरू होतो. दिवसभर कामाचा रगाडा उपसताना रात्र कधी होते आणि अंथरूणावर कधी पहुडतो असं होऊन जातं. पण या पलीकडेही मुंबईचं काही वेगळं चित्र आहे.
रात्रीच्या अंधारातलं, शांत असं चित्र आहे. कदाचित तुमच्यापैकी कित्येकांनी ते पहिलेलंही नसेल. अशाच शांत, पण रात्रभर कष्टणा-या मुंबईची ओळख करून घेऊया.
आपण जेव्हा निद्रिस्त अवस्थेत असतो तेव्हा एक कष्टकरी वर्ग आपल्यासाठी कार्यरत असतो. दैनंदिन जीवन जगत असताना आपण नकळत दुस-यावर अवलंबून असतो. सकळी दूध, पेपर, फुलं किंवा ट्रेन मिळाली नाही की आपली किती चिडचिड होते. या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे आपल्याला आयत्या मिळत असतात. पण त्यामागे भरपूर लोकांचे हात कार्यरत असतात, असा आपण कधी विचार तरी केला आहे का?
आजकाल आपण सगळेच जण टीव्हीवर दररोज लाइव्ह बातम्या पाहत असतो. पण तरीही आपण दुस-या दिवशीच्या वर्तमानपत्राची वाट पाहतोच की. वर्तमानपत्र वाचल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. मात्र ते वर्तमानपत्र आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याला किती गोष्टीतून जावं लागतं.
मुळात वर्तमानपत्राच्या छपाईलाच वेळ लागतो.
छापून झाल्यावर त्याचे गठ्ठे तयार करणे, ते वितरकांकडे पोहोचवणे, नंतर ते संबंधित स्टॉल्सना पाठवून मग ते आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. कधीकधी पेपर टाकणा-या मुलांची अडचण असते म्हणूनही पेपर आपल्यापर्यंत पोहोचायला उशीर होतो. त्यात पुरवण्या असतील तर त्या पेपरमध्ये भराव्या लागतात. पावसाळ्यात तर पेपर ओला होऊ नये म्हणून किती काळजी घेतली जाते. असा हा पेपर आपल्यापर्यंत सकाळी पोहोचावा म्हणून एक वर्ग कष्ट करीत असतो.
आपल्याकडे काही पूजा, सण, समारंभ असेल तर आपल्याला भरपूर फुलं लागतात. मग दादरच्या फुल मार्केटमधून ही फुलं आणली जातात. पण या मार्केटची लगबग रात्री बारा-एकपासून म्हणजे, मुंबईकर निद्रावस्थेत असतानाच सुरू असते. ती अगदी पार सकाळी दहा-अकरा वाजेपर्यंत.
या ठिकाणी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बारामती, बंगळुरू, बेळगाव आदी ठिकाणांहून या ठिकाणी फुलं येतात. गाडयांमधून त्या फुलांचे ट्रे रिते करणे, ते आपापल्या गाळ्यांमधे भरून ठेवणे, इतकंच नाही तर फुलं खराब होऊ नयेत म्हणून त्यांची काळजी घेणं अशा कितीतरी गोष्टी सुरू असतात.
तेव्हा तर ती चांगली, ताजी आणि भरपूर फुलं आपल्याला मिळतात. अगदी भाजीचंही तसंच आहे. दादर आणि भायखळा स्थानकाच्या बाहेर भाज्यांच्या कित्येक गाडया उतरवल्या जातात. या भाज्यांच्या गाडयादेखील अडीच तीनच्या सुमारास पुणे, सातारा, नाशिकहून मुंबईला येतात.
आपला भाजीचा वाटा उचलणारे एक आजोबा सांगतात की, ‘गाडया आल्या की प्रत्येक जण आपापला वाटा काढून घेतात. नंतर ज्याला जमेल तसं डोक्यावर अथवा हातगाडीवरून आपला माल घेऊन जातात. त्यातही चांगली भाजी निवडावी लागते.
ढिगा-यातून नको असलेली भाजी बाजूला सरून आणि आपल्याला हवी असलेली भाजी घेऊन जाणं या सगळ्या कामाला नाही म्हटलं तरी सात वाजतात. मग लगेच दिवसभराच्या विक्रीची धावपळ सुरू होते. रात्री उशिरापर्यंत ही विक्री सुरू असते.’ वसईवरूनही कित्येक भाजी विक्रेते पहाटेच्या सुमारास तिथली भाजी घेऊन येतात. दुधाच्या गाडयाही संगमनेर, कोल्हापूर आदी ठिकाणांहून भरून येतात.
साधारण रात्री एकच्या सुमारात त्या मुंबईत पोहोचतात. तिथून मग प्रत्येक दुकानदारांकडे त्या पोहोचवल्या जातात. हे दुकानदारांपर्यंत दुधाच्या पिशव्या पोहोचवण्याचं काम रात्रभर सुरू असतं. आपल्याकडे मासे खाणा-यांची संख्याही पुष्कळ आहे.
सकाळी सकाळी कित्येक जण ताजे मासे मिळतील म्हणून बाजारात जातात. भाऊचा धक्का, ससून डॉक, आणि व्हीटीच्या मच्छीमार्केटमध्ये सकाळी सकाळी भरपूर मासेविक्री सुरू असते. तिथे मिळणारे ताजे मासे घ्यायला स्थानिक विक्रेत्यांचीही झुंबड उडालेली दिसते.
दिवसभरात आपल्याला भूक लागली की आपली पोटपूजा करायला कित्येक पदार्थाचे स्टॉल्स आपल्या दिमतीला उभे असतात. आपल्यापैकी कित्येक जण रात्रपाळी करतात. अशा वेळी रात्री त्यांनाही भूक लागतेच. मग त्यांच्या पोटपूजेसाठी कित्येक स्थानकांच्या बाहेर भुर्जी-पाव, ऑम्लेटपाव, भजीपाव, वडापाव अगदी पावभाजी यांचेही स्टॉल्स अविरत सुरू असतात. म्हणतात ना या मुंबापुरीत कधीही कोणीही उपाशी राहणार नाही, ते रात्रीच्या वेळी फिरलं की अगदी पटतं. दादर, वांद्रा, व्हीटी, मुंबई सेंट्रल आदी ठिकाणचे स्टॉल्स हे रात्रभर सुरू असतात.
लांब पल्ल्याच्या गाडया या ठिकाणी येऊन थांबत असल्याने रात्री-अपरात्री उशिरा मुंबईत येणा-यांची संख्याही खूप आहे. त्यांच्यासाठी हे स्टॉल्स रात्रभर सुरू असतात. रात्री जेवण जास्त जात नाही. त्यामुळे इतकंच नाही तर कामाच्या निमित्ताने लवकर घर सोडणा-यांसाठीदेखील ठिकठिकाणी रस्त्यांवर चहा, कॉफी, पोहे, उपमा, शिरा, इडली आदी पदार्थाचे स्टॉल्सही असतात. हे देखील अगदी पहाटे चार वाजल्यापासून असतात, म्हणजे त्यासाठी केली जाणारी तयारी ही रात्रीचीच सुरू होते.
काही ठिकाणी तर चहाची किटली घेऊन सायकलवर फिरणारेही दिसतील. तर कित्येक ठिकाणी चहा आणि बन मस्काची दुकानंही पहाटे चार वाजल्यापासून सुरू असतात. ठिकठिकाणच्या दुकानांत सकाळी ताजा ब्रेड मिळावा म्हणून ब्रेडच्या गाडयाही पहाटे चारच्या सुमारात फिरत असतात.
मुंबईचं खास आकर्षण म्हणजे चौपाटी. संध्याकाळच्या वेळी ही चौपाटी माणसांनी आणि खाद्यपदार्थाच्या स्टॉल्सने फुलून गेलेली असते.
खाताना, मजा करताना आपल्याला आपण कचरा करत असल्याचं भानच नसतं. चौपाटीवर कित्येक ठिकाणी माझा खाऊ मला द्या असं मोठया अक्षरात लिहिलेल्या पाटया असतानाही कित्येक जण चौपाटीवरच कचरा करतात. पण हा कचरा उचलण्याचं काम रात्रभर एक विशिष्ट वर्ग करत असतो. म्हणूनच सकाळी जेव्हा मॉर्निग वॉकला जातो तेव्हा ती चौपाटी स्वच्छ आणि सुंदर दिसते. पुन्हा कचरा करण्यासाठी.
ठिकठिकाणचा कचरा उचलण्याचं कामही रात्रभर सुरू असतं. कचरा वाहून डम्पिंग ग्राऊंडवर नेणा-या मोठमोठया गाडया रात्रीच्या वेळी फिरताना दिसतात. आपल्यापैकी कित्येक जण रात्री उशिराच्या लोकल ट्रेनने जात असतील. रात्री एक ते सकाळी चार वाजेपर्यंत या ट्रेन बंद असतात. पण रात्री उशिरापर्यंत किंवा सकाळी लवकर ट्रेनला जाण्यासाठी त्यांची तारांबळच उडते. बसचंही असंच आहे.
डेपोत रात्री उशिरा बस नेली की मग चालकांना त्यांच्या घरी पोहोचवणा-या बेस्टच्या खासगी बसेसही दिसतात. काही बसेस तर केवळ एकच तास बंद असतात.
रात्री-अपरात्री कधी कोणाला काय होईल याचा काही नेम नाही. रुग्णांना त्वरित औषधं मिळावीत म्हणून कित्येक रात्रंदिवस चालणारी औषधाची दुकानं आपल्याला दिसतात. केवळ आपल्याला बरं वाटावं म्हणून.
आपण डोळसपणे वावरत असू तर आपल्या लक्षात येईल की आपण ज्या बस स्टॉपवर उभे असतो त्या स्टॉपवरची किंवा कोणत्या तरी इमारतीवरची मोठी जाहिरात किंवा चित्रपटाची जाहिरात सकाळी पाहिलं तर बदललेली दिसते. दिवसभर माणसांची वर्दळ असते. त्यामुळे दिवसा ही कामं करणं शक्य होत नाही. म्हणून ही सगळी कामं रात्रीच्या वेळीच होताना दिसतात.
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे रात्रीची ही दुसरी बाजू आहे. याचा आपण विचारच करत नाही। कारण हल्ली नाईट लाईफ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती पबसंस्कृती, देहविक्री वगैरे वगैरे.. सध्या तर हे मुंबईचं नाईट लाईफ चांगलंच चर्चेत आहे. मात्र या दुस-या बाजूकडे, काबाडकष्ट करणा-या वर्गाकडे दुर्लक्षच होतं. जरा डोळसपणे रात्रीचा फेरफटका मारलात तर तुम्हालाही उत्तररात्रीच्या मुंबईचं दर्शन होईल.
“मुंबई एक ऐसा शहर जो जागते हुए भी सपने देखता है”. वरील लेखातून वाचकांना कळते कि कितीही त्रास झाला तरी मेहनतीने पैसा कमाविणारा माणूस भले ४,५ तास का होईना शांत झोप घेतो आणि त्याच्या सोबतीला कोणी नसले तरी तो एवढ्या त्रासातून अंगमेहनतीची सर्व कामे करतो. पण हि मुंबई कधी शांत होईल, याचा मुंबईतील स्थानिक व्यक्ती वाट पाहत आहे.पण हि मुंबई कधीच शांत होऊ शकत नाही. सकाळी जशी समुद्रास भरती येते त्या प्रमाणे मेहनतीने पैसा कमावणाऱ्या व्यक्तींची धावपळ होते. पण एका ठिकाणी अशाचप्रकारची माणसे त्याच्या सोबत राहतात जी त्याला जितका जास्त त्रास होईल तितका देण्याचा प्रयत्न करतात कारण ती माणसे म्हणजे “असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी.” इ स १९८०च्या सुमारास रात्रीच्या वेळेस मुंबई पोलिसातील कर्मचारी संवेदनशील विभागात साध्यावेशात तडी घालून बसायचे, पण रात्रीच्या वेळेस हि गजबजाट असल्या कारणाने बाहेरील राज्यातील व्यक्ती कधी येउन मुंबईत वसली याचा नाही सुरक्षा मंत्र्यांना पत्ता लागला कि नाही मुंबई पोलिसांना. जोगेश्वरी येथील कित्येक संवेदनशील विभागात कितीतरी समाजकंटक वावर करीत आहेत, परंतु तेथील पूर्वेकडील मेघवाडीसारखे पोलिसस्टेशन जर “प्रहार”च्या संपादकाने रात्रीच्या वेळेस सर्वेक्षण करून पहिले तर रात्री ११ च्या आसपास मेघवाडी पोलिस स्टेशन नेमके आहे कोठे?हे सापडणारच नाही. कारण पोलिस चौकीची लाईट पूर्णपणे बंद करून ड्युटी ऑफिसर वरच्या मजल्यावरील बिछान्यावर झोपी गेलेला असतो, तर उर्वरित कर्मचारी मस्तपैकी केबल टीवि वरील चित्रपट आणि गाण्याच्या तालावर शिटी मारत बसतात. प्रतापनगर सारख्या विभागात तर कोणी व्यक्ती कामधंदे करणारी असतील तर मुद्दामून त्या व्यक्तीस त्रास देण्याकरिता कित्येक रिकामटेकडी पुरुष मंडळी, स्त्रिया रात्रीच्यावेळेस किंचाळ्या,आरडाओरड करताना भेटतील.पण हल्ली पोलिसांचा राउंडअप बंद असल्याकारणाने अशा विभागात येणार तरी कोण? उद्या जरी काही झाले तरी पोलिस चौकीपर्यंत जाऊन तरी काय उपयोग? कारण पोलिस तक्रार म्हणजे आंधळा व्यवहार असेच तेथील पोलिस अधिकारी तक्रारदारास बोलतात. उलट “एकदा झाले दोनदा झाले परत इथे यायचे नाही”असे धमकीच्या स्वरात उत्तर देतात, स्त्रीवर्ग त्याही रात्रीच्या वेळेस कोणाच्याहि दरवाजात आरडाओरड करत असतील, शेजारील व्यक्ती मुद्दामून भिंतीवर हातोडे ठोकत बसतील अशावेळेस पोलिस सुद्धा मदत करत नसतील, म्हणजे खरोखरच कामधंदे करणाऱ्या व्यक्तीने हि असेच धंदे करत बसायचे. तो झोपला कि तू त्याला उठवत बस आणि मी उठलो कि तुला उठवत बसतो. हे सर्व मंडळी रात्रभर हे धंदे करतात म्हणजे या व्यक्ती उदरनिर्वाहाकरीता नेमके करतात तरी काय?याची चौकशी तेथील पोलिसचौकी न करता कामाधंद्यास जाणाऱ्या व्यक्तीकडून तू कुठे कामाला जातो? काहिही गैरप्रकार न करणाऱ्या व्यक्तीस उगीच कामावरहि पोलीसां मार्फत त्रास देण्याकरिता हि खोट्या तक्रार नोंदविण्याचे प्रकार तेथील विभागात चालतात. खरे सांगणाऱ्या व्यक्तीस मारहाण,शिवीगाळ करतात व उलट चार्जेस मारून रात्रभर थांबवून ठेवतात. फोन कोणी व का केला? हे विचारायचे सोडून त्या व्यक्तीस धमकावून मारहाण करतात. रात्रीच्या वेळेस नाक्यावर, चावडीवर बसणाऱ्या व्यक्तीस बायकांस विचारपूस करण्याचे हक्कसुद्धा मुंबई पोलिसांनी तेथील स्थानिक गुंडास दिले आहेत का, म्हणजे हे पोलिस म्हणजे “नामर्द” पोलिस अशी उपमा दिली गेली पाहिजे. रात्र पाळीतील अधिकारी म्हणजे किती सतर्क अधिकारी असला पाहिजे. समाज कंटक कोणतेही कृत्य करेल ते रात्रीच्या अंधारातच मग पहारा लावायचा सोडून पोलीस अधिकारी पोलीस चौकीतील केबल टी वी लावून शिट्या कसल्या मारत बसतात. उद्या कोठेही अनुचित प्रकार घडला तर नागरिकांनी सतर्क राहा असा इशारा मुंबई पोलिसांमार्फत देण्यात येतो.
लेख अतिशय चागला आहे…..पण लेखक साहेबाना विनंती आहे कि लेखात वारंवार व्ही. टी.. असा उल्लेख केला आहे.
तर ते व्ही. टी नसून…छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे….कृपया लक्षात ठेवा