मध्य रेल्वेच्या इंजिन चालकाने मुंबई-रत्नागिरी सुटीकालीन विशेष गाडी चक्क अर्ध्यावरच सोडल्याचा प्रकार मंगळवारी घडला.
मुंबई – मध्य रेल्वेच्या इंजिन चालकाने मुंबई-रत्नागिरी सुटीकालीन विशेष गाडी चक्क अर्ध्यावरच सोडल्याचा प्रकार मंगळवारी घडला. ‘कामाची वेळ संपली’ असे सांगून रत्नागिरी स्थानकापासून अवघ्या २० मिनिटे अंतरावर असणा-या उक्षी स्थानकात त्याने गाडी चालवण्यास नकार दिला. त्यामुळे प्रवासाने कंटाळलेल्या हजारो प्रवाशांचे हाल झाले. यामुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले. कोकण रेल्वेने या इंजिन चालकाच्या विरोधात मध्य रेल्वेकडे तक्रार करण्याचे ठरवले आहे.
मुंबईहून रात्री बारा वाजता सुटलेली सुटीकालीन पॅसेंजर सकाळी आठला रत्नागिरीला पोहोचणार होती. ही गाडी दीड तास उशीराने धावत होती. सकाळी नऊ वाजता इंजिन चालक जे. व्ही दळवी याने कामाची वेळ संपल्याचे सांगून गाडी चालवण्यास नकार देऊन पर्यायी चालकाची व्यवस्था करण्यास सांगितले. उक्षीपासून रत्नागिरी केवळ २० मिनिटांवर असतानाही लोकांना वेठीस धरले. या इंजिन चालकासोबत सहाय्यक चालकही होता. त्याने ही गाडी चालवायला हवी होती, असे कोकण रेल्वेने सांगितले. रेल्वे ही अत्यावश्यक सेवेत येत असून जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. दरम्यान, रत्नागिरीहून एक तासानंतर नवीन चालक आल्यानंतर गाडी रत्नागिरीपर्यंत नेली. विशेष म्हणजे त्याच गाडीतून गाडी चालवण्यास नकार देणारे जे. व्ही दळवी हे इंजिन चालक रवाना झाले.
pravashana nehmich vethila dharle jate