नाटक सदासर्वकाळ व्यावसायिकच राहील. थोडंफार हौशी झालं ते केवळ राज्य नाटयस्पर्धामुळे. मात्र एकांकिकांचं व्यावसायिकीकरण कधी होऊ शकलं नाही. शिवाजी मंदिराला अमूक एका लेखकाच्या, दिग्दर्शकाच्या वा संस्थेच्या एकांकिकेचे प्रयोग आहेत.. त्याचं अॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. दररोजच्या पेपरला ठळकपणे जाहिराती छापून येतायत. प्रयोगावर प्रयोग लागताहेत. बाहेरगावचे काँट्रॅक्टर मॅनेजरच्या मागेपुढे खेटे घालताहेत.. गोंडा घोळताहेत.. असं चित्र म्हणजे तद्दन कल्पनाविलासच..!
गेल्या कित्येक महिन्यांत एकांकिकेच्या प्रयोगाची साधी जाहिरातही एखाद्या पेपरात पाहिल्याचं आठवत नाही. मात्र काही कॉलेजेस विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक ‘आयता’ कार्यक्रम हाती लागल्यामुळे ‘प्रयोग’ करताना दिसताहेत. साधारण ८०च्या दशकात काही नाटय़निर्माते ‘आय.एन.टी.’ आणि ‘उन्मेष’ला नंबरात येणा-या एकांकिकांचे प्रयोग करताना आढळतात. आताच्या निर्मात्यांना मात्र ती रिस्क वाटते. या त्यांच्या वाटण्यात खरं तर काहीच तार्किकता नाही, पण हौशी कलाकार म्हणजे ‘लंगडा घोडा’ हा समज कोरला गेलाय. याला छेद दिला ‘बॉम्ब ए मेरी जान’ या एकांकिकेने.
एकांकिकेचं रसायन एवढं घट्ट होतं की, त्यात पाणी घालून पूर्ण लांबीचं नाटक बनवून केदार शिंदे नामक व्यावसायिक नाटय़दिग्दर्शक जन्माला आला. पुढे त्याचं अनुकरण महेश मांजरेकर, मोहन वाघ, मोहन तोंडवळकरसारख्या मंडळींनी केलं. ‘ऑल दी बेस्ट’चा रेकॉर्ड तर सांगायला नकोच. अगदी कालपरवापर्यंत ‘एक तिकीट सिनेमाचं’, ‘डेथ ऑफ अ काँकरर’, ‘अस्वस्थ अपूर्णाकाचे पडघम’, ‘पोएटिक जस्टिस’, ‘तुम्ही म्हणाल तसं’, ‘माकडाच्या हाती श्ॉम्पेन’, ‘ग म भ न’, ‘गिरगाव व्हाया दादर’सारख्या गाजून गेलेल्या नाटकांच्या मूळ संहिता एकांकिकाच होत्या.
मग एकांकिका आणि नाटक या दोघांत एवढा दुरावा का? तर मला सापडलेली व्यावसायिक कारणं हीच की, ‘एक अंकिका’ असल्यामुळे तुम्हाला प्रेक्षक म्हणून अनेक गोष्टी यात गृहीत धरायला लागतात. म्हणजे जर एखादं कथासूत्र हे दोन-चार-पाच अगदी छत्तीस घटनास्थळांवरसुद्धा आधारलेलं असू शकतं. आणि ते स्थळ नेपथ्यातूनच निर्माण व्हावं, असा कुणाचाच अट्टहास नसतो. सर्वसामान्य प्रेक्षकाच्या हे (सादरीकरण) कल्पनाशक्तीबाहेरचं असतं. त्यांना घर म्हटलं की, घर लागतं. ऑफिस म्हटलं की ऑफिस लागतं, एवढंच काय तर रेल्वे स्टेशन म्हटलं की ट्रेनसकट रेल्वेचा कंपार्टमेंट लागतो. दोन-तीन वर्षापूर्वी अशीच एक साधी सोप्पी ‘एक-दोन अडीच’ नावाची एकांकिका मुंबई विद्यापीठाद्वारे अनेक स्पर्धामधून सादर करण्यात आली होती.
केवळ दीड फुटी लेव्हल्स, सिग्नलची प्रकाशयोजना आणि ध्वनिसंयोजनाच्या माध्यमातून केलेलं सादरीकरण कुठल्याही ‘प्रपोजल’ला छेद देणारं होतं. अमोघ फडकेची प्रकाशयोजना प्रेक्षकांना फ्लॅटफॉर्मवर नेऊन ठेवायची. सात-आठ वर्षापूर्वी एस.एन.डी.टी.ने सादर केलेली ‘पाण्यात पाहताना’ नावाची एकांकिका २६ जुलै २००५च्या महापुरावर आधारित होती. एका बसच्या टपावर जीव वाचवण्यासाठी चाललेली तीन बायकांच्या धडपडीची कथावस्तू तर अनेक गोष्टी गृहित धरायला लावण्याचा कळस होता. विनायक दिवेकरने केवळ काही लेव्हल्सचा वापर करून पाण्यात बुडालेल्या बसचा टप आणि केवळ ध्वनिप्रकाशाचा खेळ टाळ्या मिळवून जायचा. अशी अनेक उदाहरणं आहेत, पण यात म्हणे व्यावसायिकता ‘बसत’ नाही. मग कीव करावीशी वाटते ती नाटक हा व्यवसाय म्हणून अंगीकारलेल्या आणि नको त्या संकल्पनांना बळी पडलेल्या व्यावसायिक निर्मात्यांची..!
मध्यंतरी कोलकात्याला जाण्याचा योग आला. संध्याकाळी विशेष काही काम नसल्यामुळे जवळच्याच एका नाटयगृहात नाटक बघायला जायचा कार्यक्रम आखला. बघितलं तर नाटक नसून तीन एकांकिकांचा प्रयोग लावण्यात आला होता. बाहेरच्या बोर्डावर प्रयोग क्रमांक झळकत होता. शो क्रमांक ७८..! बरं तिकिटं काहीच शिल्लक. म्हणून आधी तिकिटं काढली. प्रेक्षकांच्या कुजबुजीकडे बारकाईने कान देऊन एकांकिका बघत राहिलो. समोर सादर होणारा आविष्कार फार काही भारावून वगैरे टाकणारा नव्हता. कदाचित बांगला भाषा न कळल्यामुळे तितकासा भिडलाही नसेल, पण एकाही प्रेक्षकाच्या चेह-यावर ‘गृहित’ धरायला लावण्याची खंत नव्हती.
सारं काही अभिनयात दडलेलं असतं, याची जाणीव असणारा तो खरा प्रेक्षकवर्ग कुठे आणि मराठी नाटकांना समृद्ध करायला निघालेला ‘बेगडी’ प्रेक्षकवर्ग कुठे? निर्मात्यांची व्यावसायिक गणितं म्हणे याच प्रेक्षकांच्या आधारभूत समीकरणांवर बेतलेली असतात, असा शोध एकांकिकांच्याच बाबतीत का लावला गेलाय? बरं अभिनयाच्या बाबतीत म्हणाल तर कुठल्याही आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत ‘एखाद्या नवख्या विद्यार्थ्यांने केलेला अभिनय हा व्यावसायिक अभिनयाच्या कधीही तोडीस तोड असतो’, हे केवळ विधान नसून वस्तुस्थिती आहे.
सध्या ज्या एकांकिका विविध स्पर्धामधून गाजताहेत, पैकी ‘सायलेंट स्क्रीम’मधली ऋतुजा बागवे, ‘एकजूट समूह’मधली तेजश्री सावंत, ‘आशील’ किंवा ‘दृष्टी’मधली भाग्यश्री पाणे, ‘वेडिंग अॅनिव्हर्सरी’मधली नेहा अष्टपुत्रे आणि ‘रिश्ता वही, सोच नई’मधली भक्ती देसाई यांनी अभिनित केलेल्या व्यक्तिरेखा दम असेल तर एका तरी व्यावसायिक नटीने साकार करून दाखवाव्यात.
आपला चॅलेंज आहे, सो कॉल्ड सिरिअल्सच्या जोरावर आपलं स्थान रुजवू पाहणा-या या ‘कलावंतीणी’ना हाच प्रेक्षकवर्ग जोडय़ाने मारेल. प्रेक्षकांना केवळ करमणूक द्यायचीच आहे तर ती विनोदीच असायला पाहिजे, असा अट्टहास कुठल्याच प्रेक्षकवर्गाने केलेला नाही. मोहन वाघांनी, मोहन तोंडवळकरांनी, पणशीकरांनी, अगदी अलीकडे लता नार्वेकर किंवा अलगेरी भटांनी अशी किती विनोदी नाटकं मराठी रंगभूमीच्या किंबहुना प्रेक्षकांच्या माथी मारली? गल्लाभरू नाटकाचं समीकरण एका कुठल्या तरी ‘गृहितकाच्या’ अट्टहासवर अवलंबून नसतं.. अट्टहास करतायत ते केवळ गल्ल्याला चिकटलेले निर्माते.. गृहीत धरले जातायत ते प्रेक्षक.. आणि जीव जातोय एकांकिकेचा..!
आज रिपिट प्रेक्षकवर्ग कुठल्याच नाटकाला (एक -दोन अपवाद वगळता) शिल्लक राहिलेला नाही. जसा मी ‘शोले’ १०५ वेळा बघितलाय, तसंच अलीकडचं ‘सही रे सही’ वीस-बावीस वेळा तरी नक्कीच पाहिलंय. ते केवळ विनोदी आहे म्हणून नाही तर एकूणच जमून आलेल्या भट्टीला माझ्यामधल्या प्रेक्षकाने दिलेली ती एक दादवजा पावती आहे. म्हणून..! ‘पडोसन’, ‘तिसरी मंझिल’, ‘लगान’सारखे सिनेमे कुठूनही बघा, गुंतवून ठेवण्याची किमया त्या रसायनांमध्ये होती व आहे. तीच गोष्ट ‘सही’ची, पण मध्यंतरी एका एकांकिका स्पर्धेला प्रेक्षक म्हणून गेलो आणि चाट पडलो.
एकांकिका बघायला आलेला १० ते १५ जणांचा प्रेक्षकवर्ग चक्क रिपिट होता. त्या दिवशी सादर केल्या जाणा-या एकांकिकांमध्ये ‘कीर्ती महाविद्यालय’ची ‘एकूट समूह’, ‘श्री थिएटर्स’ची ‘सायलेंट स्क्रीम’ आणि ‘प्रवेश’ची ‘दृष्टी’ या सादर होणार होत्या. स्पर्धेशी संबंध असलेल्या ब-याच जणांना या एकांकिका माहीत आहेत, पण ज्यांना कलाकारांची नावंदेखील माहीत नाहीत, असा प्रेक्षकवर्ग बघून चक्रावलोच होतो. एक एकांकिका संपली की ‘आता बघू या.. ती ‘सायलेंट स्क्रीम’ची ती पोरगी कसं करतेय..’ अशा कमेंट्स येत होत्या. म्हणजे मिळणा-या बक्षिसाशी या प्रेक्षकांचा काहीच संबंध नव्हता, परंतु अभिनयाशी केलेली तुलना त्यांच्यामधल्या असली प्रेक्षकत्वाची जाणीव करून देत होत्या. असं गृहित धरू या की, स्पर्धा होतात त्या प्रेक्षागृहाची क्षमता असते ५०० ते ७५०.
साधारणपणे दर एकांकिकेला मिळणारा प्रतिसाद, हा जर प्रतिदिन किमान १०० ते २०० प्रेक्षकांचा असेल. जर दिवसाला सादर होणा-या एकांकिका ६ धरल्या तर स्पर्धेच्या उपस्थित प्रेक्षकांचा सर्वेक्षणात्मक विचार करता बाराशेचा होतो. म्हणजे हाच आकडा नाटकाच्या तुलनेने ८० टक्क्यांच्या घरात जातो. याचा अर्थ, आज एकाही नाटकाला एवढा प्रेक्षक नाही आणि तो एकांकिकेला आहे. म्हणजेच टक्केवारीचा हिशेब करता एकांकिका हीच नाटकापेक्षा तार्किकतेच्या आधारे अधिक प्रेक्षकप्रिय आहे, हे सिद्ध होऊ शकते.
उमेदवारीच्या काळात ब-याच एकांकिका माझ्याकडून पाहिल्या गेल्या. डॉ. अनिल बांदिवडेकरांच्या एकांकिकांचा मी प्रचंड चाहता. सर्व जण त्यांना ‘बांद्या’ म्हणत. म्हणून मीदेखील बांद्याच म्हणायचो आणि अजूनही म्हणतो. मला आठवतंय ‘इस्कस’ नावाची ‘इंडो सोव्हिएत कल्चर’ची एकांकिका स्पर्धा पेडर रोडच्या त्यांच्याच ऑडिटोरियममध्ये होत असे. मी राहायला विक्रोळीला.. धावतपळत ट्रेनमधून.. बसमधून पेडर रोड गाठलं. बांद्या चक्क त्यात रोल करत होता. त्याच्या साथीला होता रवि कुरसुंगे.. आणि एकांकिकेचं नाव होतं ‘स्पेसिमेन’.
हादरवून टाकणा-या स्त्रीभ्रूणहत्येचा विषय. एकांकिका जेवढी कळली तेवढी कळली, मात्र आशय आजही डोक्यात पक्का बसलाय. पंचेचाळीस मिनिटांनी बाहेर आलो. डोकं सुन्न झालं होतं.. मकरंद देशपांडे बॅकस्टेज करत होता. टॅक्सी आणण्यासाठी त्याची धावपळ चालली होती. सहज कुणाला तरी विचारलं तेव्हा कळलं की, बांद्या आज रात्री पृथ्वीला ‘कैलासवासी पार्ले’ नावाची एकांकिका करतोय.
त्या वर्षीची ती सुपरहिट एकांकिका होती. मी साधारणपणे सात ते आठ वेळा पाहिलेली, पण ‘कै. पा.’चं नाव ऐकलं आणि अंगात एक चैतन्य उसळलं. धावतपळत तडक ग्रँट रोड स्टेशन गाठलं. तिकिटासाठी खिशात फक्त पाच रुपये. विदाऊट तिकीट ट्रेन पकडली. सांताक्रूझला उतरलो. दीड रुपये तिकिटात पृथ्वी गाठलं. एकांकिका पाहायला आत गेलो आणि कळलं सगळा ‘ऑडियन्स’ रिपिट होता.. अगदी शशी कपूरची मुलगी संजना कपूरसकट..!
Lekha Chan Lihila ahe. Kharatar hich shokatika ahe .. Ekankika Ya aplyakade fakt spardhan madhyech disat. Mumbait Far kwachit thikani Amukh ek spardhet Jinklyalya ekankikanche Prayog ahet ase vachyala milate.. Khartar majyasarkha Prekshak ha vaat baghat asto ki kadhi kuthe mala ekankika baghayala milatil , Ti 45.00 minite khup mahtvachi vatatat ani Natkapeksha Ekankika ya guntavun thevnyat jast mahtvachi Bhumika bajavatta. Hope so ha lekh vachun kuni Ekankika veda nirmata pudhe yevun ekankikanche prayog natyagruhat lavayache dhadas karel.