मुंबईतून गणेश चतुर्थीसाठी गावी जाणा-या कोकणवासीयांना सोमवारी रेल्वे आरक्षणाच्या नव्या तंत्रज्ञानाचा म्हटले तर फायदा झाला आणि म्हटले तर फटकाही बसला.
मुंबईतून गणेश चतुर्थीसाठी गावी जाणा-या कोकणवासीयांना सोमवारी रेल्वे आरक्षणाच्या नव्या तंत्रज्ञानाचा म्हटले तर फायदा झाला आणि म्हटले तर फटकाही बसला. २८ ऑगस्टला या लोकांना आपल्या गावी जावे लागणार आहे. रेल्वेचे आरक्षण आता प्रवासाच्या दोन महिने आधी उपलब्ध होते. म्हणजे २८ ऑगस्टच्या प्रवासासाठी २८ जूनला बुकिंग सुरू होणार होते. गाडया कमी आणि प्रवास करू इच्छिणारे प्रवासी जास्त. त्यामुळे रांगेत पहिला क्रमांक असावा म्हणजे तिकीट हमखास मिळेल, अशा हिशेबाने कोकणवासी मंडळी रात्रीपासूनच रांगेत उभी होती.
मुंबईच्या विविध ठिकाणच्या रेल्वे स्थानकांतील आरक्षण कक्षासमोर ही कोकणातील गणेशभक्त मंडळी पहाटेपासून रांगा लावून बसले असतानाही अगदी पहिल्याच क्रमांकाच्या प्रवाशाला प्रतीक्षा यादीवर जावे लागले. म्हणजे त्याचे तिकीट निघण्याच्या आधीच बुकिंग संपले. या प्रकाराने या लोकांत प्रचंड असंतोष निर्माण झाला. आरक्षणात काही तरी काळा बाजार झाला आहे, अशी शंका व्यक्त केली गेली.
रेल्वेच्या आरक्षणात एरवी बराच भ्रष्टाचार होत असतो; परंतु, हे आरक्षण संगणकीकृत झाल्यामुळे त्यातील भ्रष्टाचाराला फारसा वाव नसतो. एक तर बुकिंगच्या नोंदी संगणकावर असतात आणि बुकिंगची तारीख, वेळ सर्व काही नोंदल्यामुळे त्यात कसलाही भ्रष्टाचार करण्याची संधी मिळत नाही. परंतु कोकणवासीयांच्या या बुकिंगमध्ये काही तरी गडबड झाली आहे, अशी शंका उपस्थित करण्यात आली.
रेल्वेच्या आरक्षणाचा काळा बाजार करणा-या दलालांनी मोठया प्रमाणावर ग्रुप बुकिंग करून ही तिकिटे एकदम संपवून टाकली असावीत, असा आरोप करण्यात आला; परंतु, अशी शक्यता फार कमी आहे. यासाठी उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानामध्ये असे करता येत नाही. मात्र फरक कुठे पडला आहे, हे समजून घेता येते. रेल्वेच्या संगणकीकृत आरक्षणासाठी रेल्वेने जे सॉफ्टवेअर घेतलेले आहे त्या सॉफ्टवेअरवर एकाच वेळी पाच हजार लोक रेल्वेचे आरक्षण करू शकतात आणि त्या सर्वाना आरक्षण उपलब्ध होते.
२८ ऑगस्टचे बुकिंग ज्यांना हवे होते अशा अनेक लोकांनी आपल्या घरीच बसून बरोबर आठ वाजता बुकिंग करून टाकले. रेल्वेच्या आरक्षण कक्षातील आरक्षण करणारा लिपिक आठ वाजता कामावर येतो आणि थोडी साफसफाई करून संगणक सुरू करतो; त्यात एखादा मिनिट जातो आणि तेवढया मिनिटात जागोजाग आपल्या घरी बसून आरक्षण करणा-या लोकांना आरक्षण मिळालेले असते. हा एखाद्या मिनिटाचा किंवा काही सेकंदांचा फटका रांगेत उभ्या राहणा-या लोकांना बसतो; परंतु दुस-या बाजूला अनेक लोकांना घरात बसून आरक्षण मिळालेले असते. त्यांना तंत्रज्ञानाचा फायदा होतो. हा अनुभव सोमवारी कोकणवासीयांना आला; पण चार-दोन मिनिटांच्या फरकामुळे असाच फटका दररोज हजारो रेल्वे प्रवाशांना बसत असतो, हे लक्षात घेतले पाहिजे.
मा.लेखक मी आपणास सांगू इशितो कि कोकणी माणूस बाकी लोकांपेक्षा दहा पावले कायम फुडे असतो ! त्याला गरज असते ती हात देण्याची ! त्याची कुवत मोजू नका ,खरे मंजे यात वरच्या अधिकायांकडून झालेला भ्रष्टाचार आहे आणि त्या विरुद्ध राणे साहेब ,तटकरे साहेब ,भास्कर जाधव साहेब या मंत्र्यांनी सरकारवर दबाव टाकायला हवा होता ! कारण 8०% लोकांना फिरायला नाही तर जीवावर उधार होऊन गणपती साठी गावी जाने भाग असते !येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत याचा फटका बसला तर परत तुमीच दोष देणार ? सावधान !!!!