नगर-पुणे महामार्गावरील एका परमिट रूमचे उद्घाटन गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि कोकणातील शिवसेनेचे आमदार, अर्थ व ग्रामविकास मंत्री दीपक केसरकर यांनी केल्यामुळे राज्य सरकारवर नामुष्कीची वेळ आली आहे.
मुंबई- नगर-पुणे महामार्गावरील एका परमिट रूमचे उद्घाटन गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि कोकणातील शिवसेनेचे आमदार, अर्थ व ग्रामविकास मंत्री दीपक केसरकर यांनी केल्यामुळे राज्य सरकारवर नामुष्कीची वेळ आली आहे.
चंद्रपुरात दारूबंदी जाहीर करून मिरवणा-या राज्य सरकारचे नाक या मंत्र्याच्या कारभारामुळे कापले गेले असून राज्यात दारूबंदी व्हावी यासाठी झगडणा-या हजारो महिलांचाही अपमान झाला आहे. विशेष म्हणजे ज्या नगरमध्ये या मंत्रीमहोदयांनी हा पराक्रम दाखवला त्याच जिल्ह्यातील सहाशे ग्रामपंचायतींदेखील या आंदोलनात सहभागी आहेत.
शनिवारी नगर-पुणे रोडवर कीर्ती बार आणि रेस्टॉरेंटचे या दोघांनी थाटमाटात उद्घाटन केले. यावेळी फीत कापणारे भाजपाचे राम शिंदे यांच्या हाताला हात लावून शिवसेनेचे दीपक केसरकर फोटोसाठी उभे होते. याच केसरकरांनी नंतर या बारच्या उंबरठय़ावर श्रीफळही वाढवून ‘हम भी कुछ कम नही’ या उक्तीचे प्रत्यंतर दिले.
प्रसारमाध्यमांच्या साक्षीने सरकारची कीर्ती वाढवणा-या या दोन्ही मंत्र्यांच्या बेभान वागण्याचा सर्व स्तरातून तीव्र निषेध सुरू आहे. युती सरकार दारूबंदीसाठी प्रयत्नशील असल्याचे दाखवत असताना असे विपरीत वागणा-या या मंत्र्यांवर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कोणती कारवाई करतात याकडे महिलाशक्तीचे तसेच स्वयंसेवी संस्थांचे लक्ष लागले आहे.
या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटल्यावर मात्र दोन्ही मंत्र्यांनी सारवासारव सुरू केली. हा बिअर बार नव्हताच, फॅमिली रेस्टॉरंट होते. अशा रेस्टॉरंटचे उद्घाटन करण्यात काय चुकले, असे राम शिंदे यांनी म्हटले असून केसरकर यांनीही, ते काही परमिटरूमचे उद्घाटन नव्हते.
पर्यटन विकासासाठी सुविधा द्यायलाच हव्यात, असा अजब खुलासा केला आहे.
वर्धा, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये यापूर्वीच दारूबंदी झाली आहे. आता लवकरच अहमदनगरमध्ये दारूबंदी जाहीर होण्याची शक्यता आहे. संपूर्ण नगर जिल्ह्यात आणि राज्यातही दारूबंदीसाठी चळवळ सुरू असताना या मंत्र्यांनी केलेल्या बेताल वर्तनाबद्दल सोशल मीडियावर देखील या दोघांचा निषेध सुरू आहे.
भाजपा-सेना सरकारचा खरा चेहरा यानिमित्ताने जनतेसमोर आल्याचे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे. तसेच अशा बिअर बारचे उद्घाटन करून युती सरकारने दारूची चक्क जाहिरातच केली असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
मग बारला परवानगीच का देता?