आजच्या इस्टंट लाइफस्टाइलमुळे जगण्याच्या परिभाषाच बदलल्या आहेत. त्याचा परिणाम होतो शरीरावर. आजच्या घडीला स्थूलता ही बहुतेकांची झपाट्याने वाढणारी शरीरसमस्या बनत आहे. शस्त्रक्रियेशिवायही जाडेपणा घालवता येतो. त्याविषयी मार्गदर्शन केलं आहे स्थूलता आणि सौंदर्यतज्ज्ञ डॉ. मंजिरी पाटणकर यांनी.
‘ही जीन्स टाइट होतेय, म्हणजे.. तो ब्लॅक टॉपपण घट्ट होणार. अरे देवा, आता काय करू! तो तर माझा फेव्हरिट टॉप आहे. तो टॉप माझ्या सगळ्याच मैत्रिणींना आवडतो. मी घातल्यावर त्या थोडंसं जेलस फिल करतात. आता मला तो होत नाही, असं कळल्यावर त्यांना आनंद होईल. आता जिममध्ये जावं लागेल. मग सुरू होतील डाएटिंगचे पाठ’, लठ्ठपणाची समस्या ही एकट्या मीराची नाही. तर अनेकांची, अनेकींची आहे. पण लठ्ठपणा का येतो, ते येण्यामागची कारणं काय आहेत ते कोणीच जाणून घेताना दिसत नाही. तर जे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
=ओबेसिटी म्हणजे काय?
मूळ ओबेसिटा या लॅटिन शब्दावरून ‘ओबेसिटी’ या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे. ‘ओबेसिटी’ म्हणजे शरीरातील चरबीचा अतिरिक्त संचय. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात चरबीचा संचय इतक्या जास्त प्रमाणात झालेला असतो की, त्याचा त्या व्यक्तीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. उंचीनुसार कोणत्याही व्यक्तीचं स्वास्थ्यपूर्ण वजन निश्चित केलेलं आहे. त्यापेक्षा २० किंवा त्याहून जास्त टक्क्यांनी वजन वाढलेलं असेल तर व्यक्ती स्थूल (ओबेस) आहे, असं समजलं जातं.
=बीएमआय म्हणजे काय?
म्हणजे बॉडी मास इंडेक्स. उंची आणि वजन यांचं गुणोत्तर म्हणजे बॉडी मास इंडेक्स. बीएमआय हा २५ ते २९.९ पर्यंत असणं योग्य समजलं जातं. ३० पेक्षा जास्त असलेला बीएमआय हा व्यक्ती स्थूल असल्याचं सांगतो. बीएमआयमध्ये चरबीचं प्रमाण कळून येत नाही. म्हणजे जसं की, एखाद्या पेहेलवानाच्या शरीरात स्नायूंचं वजन चरबीपेक्षा जास्त असतं, तर एखाद्या सामान्य व्यक्तीच्या शरीराचा बीएमआय हा पहिलवानापेक्षा कमी असला तरी त्याच्या शरीरातील चरबीचं प्रमाण हे जास्त असू शकतं. तरीही व्यक्तीच्या स्वास्थ्याची सामान्य कल्पना येण्यासाठी बीएमआय हा चांगला पर्याय समजला जातो.
=स्थूलपणामुळे कोणत्या अडचणी येतात?
– सौंदर्याच्या दृष्टीने स्थूलपणा हा केव्हाही घातकच. हाडं आणि कार्टिलेजेस त्यांची झीज, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या समस्या, कोरेनरी हार्ट डिसीज, कोलेस्ट्रॉलचं रक्तातील प्रमाण वाढणं, श्वसनमार्गाच्या समस्या, अनेक प्रकारचे कॅन्सर, निद्रानाश, स्ट्रोक्स, टाइप टू डायबिटिस इत्यादी अनेक प्रकारच्या व्याधी स्थूलपणामुळे व्यक्तीला कायमस्वरूपी चिकटतात.
=स्थूलपणावर उपचार कोणते?
व्यक्ती स्थूल होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. आनुवंशिकता, वय, डाएट, लाइफस्टाइल, मानसिकता आणि वर्तणूक ही त्यापैकी काही महत्त्वाची कारणं आहेत. फारच कमी लोक आपलं वजन नियंत्रणात ठेवू शकतात. पण यासाठी आंतरिक इच्छाशक्ती महत्त्वाची असते. डाएट, व्यायाम या वजन कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी असल्या तरी आयुष्यभर सातत्याने करणं फार थोड्या लोकांना जमतं. अनेक लोकांना शरीरावर चढत जाणारं मास नियंत्रणात ठेवणं जमत नाही. स्त्रियांमध्ये नितंब, ओटीपोट आणि मांडय़ा यांच्यावर चरबी साठवण्याची प्रवृत्ती असते तर पुरुषांमध्ये ही चरबी कमरेच्या वर, पोटावर साठते. ही चरबी काढून घेण्यासाठी लोक विविध प्रकारचे उपाय करतात.
=चरबीच्या वितळण्यावर पूर्वी सौनाबाथ दिला जायचा. ती पद्धती आता कालबाह्य झाली आहे का? चरबी वितळण्यासाठी नवीन उपाय कोणते?
पूर्वी सोनाबाथ ही उपचारपद्धती चरबीच्या वितळण्यावर दिली जायची. या उपचारपद्धतीत चरबीतील पाण्याचं प्रमाण कमी होतं. पण चरबी मात्र तशीच राहते. पण आम्ही एण्डर्मोलॉजी, मिझोथेरपी हे उपचार करतो. सध्या आम्ही इंस्टास्कल्पट नावाची उपचारपद्धती करू लागलो आहोत.
=चरबी वितळण्यासाठी स्टीम बाथचाही उपयोग होतो का?
नाही. यामुळे शरीरातील फक्त पाणी कमी होतं. चरबी तशीच राहते.
=इंस्टास्कल्प्ट या उपचार पद्धतीचं वैशिष्ट्य काय?
या उपचारपद्धतीत अल्ट्रासोनिक लिपोलिसिस, एंडर्मोलॉजी, रेडिओ फ्रिक्वेन्सी विथ डिओड लेसर, मिझोथेरपी या चार उपचार पद्धती एकत्रित आणल्या आहेत. या उपचार पद्धतीचं वैशिष्टय़ म्हणजे, या उपचारपद्धतीत कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया करावी लागत नाही. त्यामुळे ही सुरक्षित, विश्वासार्ह, कायमस्वरूपी आणि तत्काळ परिणाम दर्शवणारी उपचार पद्धती आहे. यात डाएटिंग आणि व्यायाम चिकाटीने करण्याची आवश्यकता नसते. इंजेक्शन, औषधं, शस्त्रक्रिया यापैकी कोणत्याही गोष्टींची आवश्यकता नसते. त्यामुळे शरीरातील अनावश्यक चरबी नष्ट करण्यासाठी ही अतिशय उपयुक्त उपचार पद्धती समजली जाते.
अल्ट्रोसोनिकमध्ये शरीराच्या विविध ठिकाणी साठवलेली चरबी एक ते तीन इंचापर्यंत कमी होऊ शकते. एंडर्मोलॉजीमध्ये फॅट फ्लशिंगची प्रक्रिया जलद होते. स्टबर्ग फॅटफ्लशिंगची प्रक्रिया जलद होते. स्नायूंची काही दुखणी कमी होतात. रेडिओ फ्रिक्वेन्सी या ट्रीटमेंटमुळे सैल पडलेली त्वचा ताठ आणि अधिक घट्ट होते. त्वचा घट्ट झाल्यामुळे स्ट्रेच मार्क्सचाही प्रश्न सुटतो. सुरकुत्या, डाग, व्रणही कमी होतात. मिझोथेरपीमुळे त्वचेला नितळपणा येतो. कारण या ट्रीटमेंटमुळे रक्ताभिसरण सुधारतं.
=या नवीन उपचारपद्धतीत शरीरातून चरबी नष्ट होते म्हणजे काय होतं? ती आतल्या आत जिरते का?
या नव्या उपचारपद्धतीत चरबी शरीरात जिरत नाही. कारण या उपचारपद्धतीमध्ये अल्ट्रासोनिक लिपोलासिसमुळे चरबीच्या पेशी नष्ट झाल्यावर त्यातील चरबी द्रवरूपात त्वचेखालील उतींच्या अधेमधे असणा-या मोकळ्या जागेत पसरते. आणि तिथून ती नैसर्गिकपणे लिम्फनलिकांमधून वाहत यकृतापर्यंत पोहोचते. तिथे ती ऊर्जेमध्ये रूपांतरीत करता येईल अशा स्वरूपात साठवली जाते. नंतर एण्डर्मोलॉजीच्या मदतीने बाहेर टाकली जाते.
=इस्टंट फूड, लाइफस्टाइल हे अनाठायी येणा-या जाडेपणाचं प्रमुख कारण आहे?
हो. कारण आज बदलत्या जीवनशैलीमुळे व्यायाम नीट होत नाही. खाण्या-पिण्याच्या वेळा अनियमित असतात. या सर्वाचा परिणाम म्हणजे शरीरातील चरबी वाढणं. भूक लागेल तेव्हा अरबट-चरबट न खाता पौष्टिक आणि हेल्दी खाल्लं पाहिजे.
मला डॉक्टर मंजिरी पाटणकर चा लेख आवडला मला त्यांच्या कडे स्थूलपणा वर ईलाज घ्यावयाची इच्छा आहे त्यांचा संपर्क नंबर व पत्ता देण्यात याया धन्यवाद
हेमंतकुमार दिक्षित
नाशिक