मित्रवर्य देवेंद्र फडणवीस यांना त्यांची जात का आठवली आहे? ३१ ऑक्टोबरला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची दोन वर्षे पूर्ण करतील. त्याची जाहिरातबाजी होईल, जाहिराती झळकतील, सत्कार समारंभ होतील, ढोल-ताशे वाजतील आणि ते स्वाभाविक आहे.
परंतु पुढचा तीन वर्षाचा मुख्यमंत्रीपदाचा काळ मी पूर्ण करीन, असे मुलाखतीत सांगताना देवेंद्र फडणवीस यांना आपली जात आठवण्याचे काही कारण नव्हते. त्यांच्या जातीमुळे त्यांना मुख्यमंत्री केले, असा त्यांचा काही तरी गैरसमज असावा. किंबहुना राज्यात त्यांना होणारा विरोध हा ते ब्राह्मण आहेत म्हणून होत आहे, असाही त्यांचा गैरसमज झाला असावा.
फडणवीस सांगत आहेत की, भाजपा जात-पात मानत नाही. त्याच्या पुढचे वाक्य त्यांनी सांगितलेले नाही. ते पुढचे वाक्य असे आहे की, ‘संघ हे सगळे मानतो. पण सध्या विषय मुख्यमंत्री आणि भाजपाचा आहे.’ मुख्यमंत्र्यांचा असा समज झाला आहे की, मराठा महामोर्चे किंवा ओबीसींचे मोर्चे मुख्यमंत्री ब्राह्मण आहेत, म्हणून त्यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जातीचा उल्लेख अनावश्यक केलेला आहे.
गेल्या दोन वर्षात त्यांच्या पक्षातील कोणीही किंवा विधानमंडळातील दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षांनी, सभागृहाच्या बाहेर असलेल्या विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांवर जेव्हा जेव्हा टीका केली तेव्हा, पुढेही करतील तेव्हा तेव्हा ते ब्राह्मण आहेत, हा विचार कोणाच्याही मनात नव्हता.
किंबहुना गेल्या दोन वर्षात तसे दुरान्वयानेही कोणत्याही राजकीय पक्षाने, राजकीय नेत्याने किंवा कार्यकत्यांनी फडणवीस यांच्या ब्राह्मण्यांचा चुकूनही उल्लेख केलेला नाही. शिवाय फडणवीस वेशाने, आहाराने ब्राह्मण आहेत किंवा त्यांनी ते ब्राह्मण्य जपले आहे, असेही नाही. त्यामुळे त्यांच्याकडे जात बघून आतापर्यंत कोणी टीका केली आहे, असा काहीसा विचित्र गैरसमज फडणवीस यांचा झालेला आहे.
मध्यंतरी त्यांनी असा सूर आळवला की, किती दिवस मुख्यमंत्रीपदावर राहिलो यापेक्षा किती काम केले याला महत्त्व आहे. ही टिपण्णी त्यांनी ज्या दिवशी केली त्या दिवसांपर्यंत मुख्यमंत्री पदावरून त्यांना बाजूला करण्याचा कोणताही विषय कुठेही चर्चेत आलेला नव्हता. कोणी तसे म्हटलेही नाही. त्यांच्या पक्षातूनच अंतर्गत जे काही सुरू झाले आहे त्याचा धसका घेऊन बहुधा ती टिपण्णी फडणवीस यांनी केली असावी.
आता ब्राह्मण्यत्वाची त्यांना आठवण झालेली आहे. या राज्यात कन्नमवार, वसंतराव नाईक, बॅरिस्टर अंतुले, मनोहर जोशी आणि आता फडणवीस अशा मुख्यमंत्र्यांना त्यांची जात कोणती वेगळी आहे म्हणून कोणीही विरोध केलेला नव्हता. या मुख्यमंत्र्यांचा मनातील आक्षेप मराठा समाजाच्या महामोर्चामुळे आहे. त्यांना जो धसका बसलेला आहे तो त्या मोर्चाचा आहे.
गुजरातमध्ये मोदींनी नेमलेल्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांना निवडणुका डोळय़ांसमोर ठेऊन बाजूला करावे लागले. महाराष्ट्रात ती वेळ येणारच नाही, असे नाही, येऊही शकते. पण त्याचे कारण फडणवीस ब्राह्मण आहेत, म्हणून मला बाजूला केले असे ‘रड’गाणे त्यांना गाता येणार नाही.
त्यांची जात बघून त्यांना जसे मुख्यमंत्री केले नाही त्याचप्रमाणे जातीमुळे त्यांना बाजूला करतील, ही भीती त्यांना का वाटावी? भाजपांतर्गतच काही धुसफूस चालली आहे का? त्याची कारणे काय आहेत? मराठा महामोर्चाचा धसका फडणवीस आणि भाजपा या दोघांनी घेतला आहे का? शिवसेनेलाही तो धसका बसलेला आहे का? महामोर्चामधील भगवे निशाण आमचेच आहे, असा आत्मसांत्वनाचा शोध शिवसेनेने लावलेला आहे.
प्रत्येक जण आपापले समाधान शोधत असतो. तसे शिवसेनेही महामोर्चातील भगवे निशाण त्यांचेच आहे, असा समज करून घेतला. त्या गोड समजामध्ये त्यांना तसेच राहू देणे चांगले आहे. भाजपावाल्यांना असे वाटते आहे की, हे मोर्चे काही भाजपाच्या विरोधात नाहीत. लोकांच्या मनातील असंतोष नेमका कशामुळे आहे, हे स्पष्ट होत नाही, हे एकप्रकारे बरेच आहे. त्यामुळे सगळय़ांनाच हे महामोर्चे आपापल्या पक्षाला अनुकूल वाटत आहेत.
मित्रवर्य फडणवीस यांना एक सांगितले पाहिजे की, कोणताही समाज जेव्हा लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरतो तेव्हा त्या समाजाच्या अंतर्मनातील रोष हा निश्चितपणे सरकारविरोधात असतो. आता त्याची कारणे शोधण्याचे काम सरकारचे आहे. फडणवीस यांना ज्या ज्या ठिकाणाहून विरोध होत आहे, त्याची कारणे त्यांनी शोधून काढली तर गेल्या दोन वर्षात त्यांच्या कारभारात ती कारणे दडलेली आहेत. अगदी त्यांच्या कारभाराचा पंचनामा करायचा म्हटले तर काही मुद्दे त्यांच्यासाठीच मांडणे गरजेचे आहे.
१) तुमच्या राजवटीत म्हणजे गेल्या दोन वर्षात विदर्भ-मराठवाडयात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत की नाही ते सांगा? त्यांच्या कुटुंबीयांना तुम्ही काय दिलासा दिलात?
२) तुमचे सरकार शेतकरीविरोधी आहे.. त्या शेतक-यांना तुम्ही निकालात काढलेली आहे.. सगळी अनुदाने बंद केलेली आहेत. त्याच्या मालाला भाव नाही.. तुम्ही निवडणुकीत जी आश्वासने दिली होतीत त्या तुमच्या विदर्भातील कापूस पिकवणा-या कास्तका-याला तुम्ही देशोधडीला लावून टाकलेत. एवढेच नव्हे तर तुम्ही आणि तुमचे सरकार शेतक-यांच्या विरुद्ध आहे. तुम्हाला फक्त शहरातील मतदारांची काळजी घ्यायची आहे. म्हणून ‘स्मार्ट सीटी’ची नाटके तुम्ही करत आहात.
३) तुम्ही परदेशात गेलात. ८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक भारतात होणार, असे तुम्ही सांगितलेत. शपथेवर सांगा किती गुंतवणूक आणलीत?
४) तुमच्या मंत्रिमंडळात किती भ्रष्ट मंत्री आहेत.. त्यांच्यावर गुन्हे आहेत. त्यांची तुम्ही तरफदारी करत आहात. तुमच्याच मंत्रिमंडळातील एक विकेट तुमच्या समोर पडली. ती तुम्हीच घेतलीत आणि तुमचे मंत्रिमंडळ स्वच्छ आहे असे तुम्ही सांगता.. त्यांना क्लीनचिट देता.. हे लोकांना पटत नाही. लोक त्याचा वचपा काढतील.
तुम्ही भ्रमात आहात. एकदा यश मिळाले म्हणजे हवेत राहू नका आणि एवढया मोठया मोदी लाटेनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी नेत्यांना पक्षात घेऊनच तुम्ही जेमतेम १२३ आमदारांपर्यंत पोहोचलात. तुम्हाला बहुमत मिळवता आलेले नाही. आता ती कलई निघून गेलेली आहे. तुमचे आणि सरकारचे घरी जायचे दिवस जवळ आलेले आहेत. त्याचा अनुभव तुम्हाला येईल. पण लोकशाहीच्या मार्गाने जाताना उगाच जातीचा आधार घेऊन कांगावा करू नका. ब्राह्मण म्हणून तुम्हाला कोणीही विरोध केलेला नाही.
तुमचे जान्हवे नीट जपून, स्नान-संध्या करून तुम्हाला चांगला कारभार करायला कोणी विरोध केला आहे का? बाळासाहेब खेर, मनोहर जोशी आणि तुम्ही यांना ब्राह्मण म्हणून महाराष्ट्रात विरोध कधीच झालेला नव्हता आणि नाही. उगाच नाकाने कांदे सोलू नका आणि जातीच्या आड लपू नका. तुम्ही जाल ते तुमच्या कर्माने जाल. एवढेच तुम्हाला स्पष्ट सांगणे आहे.
ata dya uttar.