विक्रीकर निरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी अवघा महिना उरला आहे. यासाठी अभ्यासाची?साधना करावी लागते. हेच दिवस आहेत भरपूर अभ्यासाचे, अथक परिश्रमाचे. हे एकदा केलं की?मग यश आपलंच आहे. त्यामुळे अंतिम ध्येयाकडे लक्ष्य द्या आणि त्यादृष्टीने पावलं उचला..
मागच्या लेखात व्यवहारवादी विचार आवश्यक, असं आम्ही म्हटलं होतं. याचं कारण अगदी स्पष्ट आहे. कारण या विचारधारेचा मानवी जीवनाशीच प्रत्यक्ष संबंध आहे. आजची प्रगत अमेरिका व्यवहारवादी विचारांच्या अनुकरणामुळेच महासत्ता आहे. ३० सप्टेंबर २०१३ ला विक्रीकर निरीक्षक पदाची अवघ्या ८४ जागांची जाहिरात आली. अनेकांच्या काळजाचा नव्हे तर ज्यांचा अभ्यास कमी किंवा कमजोर आहे, त्यांच्याही काळजाचा ठोका चुकला. कारण किमानपक्षी ८०० जागा असतील अशी चर्चा होती. मग लगेच चर्वतिचर्वणास उधाण आलं. एमपीएससीने घोटाळा केला, आयुष्याचं वाटोळं केलं, तरुणांच्या करिअरशी खेळ खेळतोय, आमचे आता कसे होणार? आधीच राज्यसेवेत ग्रामीण भागातील मुलांना कठीण वाटेल असा अभ्यासक्रम आणि आता इथेही कमी जागा.. कुणीतरी काहीतरी केलं पाहिजे वगरे वगरे.. मग सशाच्या काळजाचा, हतबल झालेला विद्यार्थी.. चारी बाजूंनी आयोगावर टीका सुरू करतो.
वास्तविक महाराष्ट्र लोकसेवा आयोग कुणाचंही वाटोळं करत नाही. जे काही केलं त्यात कल्याणाचेच काम केलं आहे. अनेकांना नोक-या दिल्या. त्याशिवाय महाराष्ट्रात गावोगावी, शहरातून गल्लोगल्ली ‘एमपीएससी मार्गदर्शन’च्या पाटय़ा (बोर्ड) लावून मार्गदर्शन वर्ग चालवणा-या अनेकांना रोजगार उपलब्ध झाला. या सर्वच्या सर्व मार्गदर्शन वर्गाचे गणित आयोगावरच तर अवलंबून आहे आणि या मार्गदर्शन वर्गातून शिकवणा-या सेवानिवृत्त गुणीजनांना अनेकांना पैसा कमवण्याची संधीही चालून आली. ज्यांना स्वत:च्या सर्जनशीलतेने एक ओळ लिहिता येत नाही ती मंडळी ‘लेखक’ झाली. आयोगाची कोणतीही परीक्षा पास न होता काही मंडळी संचालक झाली. या सर्वाना आम्ही सकारात्मक घेतो. कारण शेवटी महाराष्ट्राचाच फायदा झाला.. आणि यांच्यामुळेच वर्तमानपत्रांना, विविध वाहिन्यांना जाहिरात देणारा नवा वर्गही मिळाला. म्हणजे अर्थात हे सारे आयोगामुळेच. त्यामुळे आम्ही आयोगाला कधीच दुषणे देणार नाही, ती कुणी देऊही नयेत. त्यांच्यात सुधारणा जरूर सुचवाव्यात. सांगण्याचा मुद्दा हाच आहे की, आयोग कुणाचेही वाईट करत नाही, हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण परीक्षार्थी विद्यार्थी जागा कमी म्हणून नाराज झाला आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या की, अशी कोणती खासगी नोकरी आहे की जिथे विशेष पात्रता निकष नाही, तरीपण पस्तीस हजार पगार आहे. म्हणजे सरकारी नियमाप्रमाणे वेतनश्रेणी ९०००-३४५०० अशी आहे. परीक्षार्थी याचा बारकाईने कधी विचार करतील की नाही. हीच वेतनश्रेणी १९९५ मध्ये ३००-९४०० अशी होती. जे परीक्षार्थी त्या वेळी या परीक्षा देऊन विक्रीकर निरीक्षक झाले, ते आज काय करताहेत? त्यापैकी कुणी विक्रीकर अधिकारी, कुणी सहायक विक्रीकर आयुक्त यापैकीच कुणी इतर क्षेत्रांतही लक्षणीय यश मिळवलं आहे. आज त्यांचे वेतन पन्नास हजारांपेक्षा नक्कीच कमी नाही. कोणतीही बँक कर्ज देताना कायमस्वरूपी सरकारी नोकरी हाच निकष योग्य मानून पगाराच्या ७२ पट कर्ज देण्याची व्यवस्था करते. त्या त्या खात्यांमधील लोकांची स्वत:ची बँक अथवा पतपेढी असतेच. शिवाय सहकारी अडीअडचणीस लाखोंनी मदत करतात. याशिवाय संघटित क्षेत्राचे मिळणारे फायदे ते वेगळेच असतात. याचा सर्व अंगाने विचार केल्यास अभ्यास केल्याने, मेहनत घेतल्याने आपल्याला अतिशय चांगले दिवस येतील, असा आशावाद जागवायला हवा.
मुंबईकरांचा आवडता सण ‘दुर्गादेवी उत्सव’ सुरू झाला आहे. संध्याकाळी नटूनथटून गुजराती पोशाखात खेळण्याची हौस दांडगी. खेळायला येत नसल्यास बघण्याची हौस तरी दांडगी असते. पण याला आवर घाला. भावी प्रशासकाला या ‘फालतू’ कामात वेळ दवडायला सवड नाही हे मनाला निक्षून सांगा. देवाच्या आराधनेने, भक्तीने तासन् तास पूजा करण्याने देव पावेल की नाही पावेल सांगता येणार नाही. पण या अभ्यासाच्या भक्तीने, आराधनेने तासन् तास लिखाणाने एमपीएससी नक्की पावेल यात जराही शंका नाही. व्यवहारवादी विचार करा तो या अर्थाने!
आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत बदलली असल्याने या बदलांना सामोरं जावं.
उदा. खालीलपैकी महाराष्ट्र शासनाचा कोणता निर्णय जुलै २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरविला आहे?
१) गुटखाबंदी २) एलबीटी अंमलबजावणी ३) वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा ४) यापैकी नाही.
याचं उत्तर यापैकी नाही असं आहे. नियमित वर्तमानपत्र वाचणा-या कोणत्याही विद्यार्थ्यांला या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. ‘ऐनवेळी बाजारातील भाऊगर्दीतील’ चालू घडामोडी पुस्तक वाचून या घडामोडी येत नाहीत. रोजची पेपर वाचायची सवय यासाठी आवश्यक आहे.
आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये स्पर्धा परीक्षाविषयक लेखांमध्ये केवळ माहितीची जंत्री गोळा करण्यापेक्षा धोरण काय ठरवावे अशा स्वरूपाच्या लेखांना प्राधान्य द्यावं. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांप्रमाणे ‘विद्यार्थीदशेत राजकारणात पडू नये.’ याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्यावा. आपण अभ्यासाचं क्षेत्र निवडलं आहे तर महापुरुषांच्या आदर्शवत विचारांप्रमाणे अभ्यासच करावा. मग यश आपलंच आहे.
Khup khup dhanyawad….!