शिवसेनेत जे टगे आपले घोडे रेटण्यासाठी राष्ट्रप्रेमाचा बुरखा पांघरून जो आव आणत आहेत त्यामुळे त्यांचे बुरखे टराटरा फाटलेले आहेत.
शिवसेनेची घसरण सुरू झाली आहे. शिवसेनेने मुंबई बंदची हाक द्यावी आणि मुंबई बंद व्हावी, शिवसेनेने सीमा प्रश्नावर आंदोलन जाहीर करावे आणि त्याला जोरदार प्रतिसाद मिळावा, बाळासाहेबांनी घोषणा करावी आणि जनतेने बाळासाहेबांचा शब्द उचलून धरावा.. ती बाळासाहेबांची शिवसेना आज खरोखर राहिलेली नाही.
‘शिव’ शब्दातले पावित्र्य संपलेले आहे आणि शिवसेनेत जे टगे आपले घोडे रेटण्यासाठी राष्ट्रप्रेमाचा बुरखा पांघरून जो आव आणत आहेत त्यामुळे त्यांचे बुरखे टराटरा फाटलेले आहेत. कोण संजय राऊत? त्यांनी धमकावावे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी शेपूट घालावी, ते दिवस आता राहिलेले नाहीत. बाळासाहेबांची शिवसेना आता शिल्लक नाही. त्यामुळे ‘एखादा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही’, ‘कार्यक्रम उधळून लावू’.. ‘शिवसेना स्टाईलने दणका देऊ,’ अशी वल्गना करणारे सेनावाले सुधींद्र कुलकर्णी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळय़ात तोंडघशी पडलेले आहेत.
‘हिंसक आंदोलन’ म्हणवून कुलकर्णी यांच्यावर केमिकल मिश्रित काळा रंग ओतणारे यांचेच चेहरे काळे ठिक्कर पडले आहेत आणि कुलकर्णी यांनी काळय़ा चेह-याने पण धडक्या मनाने शिवसेनेच्या धमक्यांना भीक न घालता पुस्तकाचे प्रकाशन थाटात केले. मुळामध्ये धटिंगण प्रवृत्तीला विषय समजून घेण्याची गरज वाटत नाही. ‘सच्चाई’ आणि ‘रोख ठोक’वाल्यांना सच्चाईही माहीत नाही आणि रोख-ठोक हे काय, हेही माहीत नाही.
केवळ पाकिस्तानच्या माजी परराराष्ट्रमंत्र्यांनी पुस्तक लिहिले आहे. त्यामुळे तो कार्यक्रम होऊ द्यायचा नाही, अशी धमकी शिवसेनेने दिली आणि पुस्तकाच्या लेखकाला ‘पाकडय़ा’ ठरवले. जो जो मुस्लीम तो तो पाकडय़ा, अशी शिवसेनेची व्याख्या आहे. त्यामुळे राष्ट्रप्रेमाचा मक्ता शिवसेनेने घेतला आहे, अशा थाटात हे ‘रोखठोक’वाले वावरतात; परंतु आपण पंडित आहोत, अशी शेखी मिरवणा-यांनी ज्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे, ते पुस्तक वाचण्याची तरी तसदी घेतली होती काय? उद्धव ठाकरे यांचे सोडून द्या. त्यांचा आणि वाचनाचा काहीही संबंध नाही; परंतु संपादक म्हणवणा-यांनी किमान पुस्तक वाचावे, अशी अपेक्षा आहे. तसे न करता राष्ट्रप्रेमाचा ठेका आपल्याला मिळाला आहे, राष्ट्रभक्त फक्त आपणच आहोत, बाकी सगळे राष्ट्रद्रोही आहेत, अशी हवा करून ना निवडणुकीचा सामना जिंकता येत ना सार्वजनिक जीवनातील लढाई जिंकता येत. उलट जो कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही, उधळून लावू, अशी धमकी दिली होती तो कार्यक्रम झाला आणि आता हे उत्तर काय देत आहेत, ‘पाकिस्तानशी लढणे गुन्हा असेल तर तो गुन्हा आम्ही केलाय..’ इथे लढाईचा काही संबंध नाही.
लढाई झाली तेव्हा या देशातील सर्व जाती-धर्माच्या लोकांनी पाकिस्तानला धूळ चारलेली आहे. संजय राऊतांना इतिहास माहीत नाही. कारण १९६५ साली ते पाळण्यात असतील. पाकिस्तानचे युद्ध जिंकताना सर्व जाती-धर्माच्या सैनिकांनी जी कुर्बानी दिली आणि शत्रूला शरण आणले तो इतिहास राऊत यांना माहिती असणे शक्य नाही.
त्यामुळे उगाच लढाईच्या वल्गना करू नका, पुस्तकात काय लिहिले आहे ते बोला.. आपण फार मोठे राष्ट्रभक्त आहोत, अशा थाटात तुम्ही वावरायला जाता; पण स्वत:च्या ताकदीवर महाराष्ट्राची सत्ता तुम्हाला मिळू शकत नाही आणि मराठीचा ठेका तुम्हीच घेतलाय, हिंदुत्वाचा ठेका तुमचाच आहे, या आविर्भावात वावरता. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे मंत्री अनंत गिते यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांना लाज वाटली नाही. जर पाकिस्तानला शत्रू राष्ट्र ठरवायचे असेल तर केंद्रात तुमची सत्ता आहे, तसे जाहीर करून टाका आणि आयात-निर्यात बंद करा, देवाण-घेवाण बंद करा, राजकीय संबंध तोडा; मग कोणीही येथे यायचा प्रश्न निर्माण होणार नाही. तसे न करता निव्वळ स्वत:ची घसरती राजकीय पत सावरण्यासाठी नसलेले प्रश्न उपस्थित करून लोक तुम्हाला पाठिंबा देणार नाहीत, हे आता समजून घ्या.
तुम्ही ज्याला पाकडय़ा म्हणता त्यांच्यासमोर मंत्रिपदाची शपथ घेतलेली चालते आणि पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पुस्तक काय लिहिले आहे, हे न वाचताच हे कोणी संजय राऊत नावाचे पत्रकार भुई धोपटायला निघाले आहेत. जॅकेट घातल्यामुळे पुढारी होता येते, असा त्यांचा समज आहे. त्या थाटात प्रतिक्रिया देताना मूळ पुस्तक वाचून, या विषयावर कोणी बोलत आहे का? काय आहे त्या पुस्तकात..
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मूलभूत मतभेद अनेक विषयांवर आहेत. पाकव्याप्त काश्मीर प्रश्नावरही मतभेद आहेत. पाकव्याप्त काश्मीर भारताचा आहे, ही आपली ठाम भूमिका आहे; पण या दोन देशांतील मतभेद कमी करण्याचा प्रयत्न भारताचा किंवा पाकिस्तानचा कोणताही नागरिक करत असेल तर त्याचे स्वागत केले पाहिजे. ८०० पानांच्या या पुस्तकांमध्ये स्वागतार्ह बाब अशी आहे की, जे अनेक समज आणि गैरसमज करून देण्यात आलेले आहेत, तो या पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे. गोळीने प्रश्न सुटत नाहीत, ते बोलीनेच सुटतात.
चर्चेनेच प्रत्येक प्रश्नावर मार्ग काढावा लागतो. त्यासाठी एक वातावरण तयार करावे लागते. त्यासाठी बुद्धिवंतांनी पुढाकार घ्यावा लागतो. पाकिस्तानच्या माजी परराष्ट्रमंत्र्यांनी हीच भूमिका या पुस्तकात प्रकर्षाने मांडलेली आहे. जगातील कुठलाही संघर्ष किंवा युद्धही नंतर वाटाघाटी होऊन म्हणजे चर्चेनेच समाप्त झालेले आहे. तेव्हा चर्चा टाळली तर सर्वच विषय अधांतरी राहतील. हे समजून न घेता शिवसेनेच्या पायाखालची जमीन खचल्यामुळे आणि येणा-या निवडणुकीत आपण शूरवीर असल्याचा आव आणण्याकरिता शिवसेनेने हा ‘डांबर प्रयोग’ केला; पण हा ‘डांबर प्रयोग’ शिवसेनेच्या अंगाशी आलेला आहे.
सुधींद्र कुलकर्णी यांचा चेहरा पुन्हा होता तसाच झाला. उलट तो उजळून निघाला आणि चेह-यावर डांबर न फासताही शिवसेना नेत्यांचे चेहरे मात्र काळे ठिक्कर पडले आहेत. तिकडे कल्याण-डोंबिवलीत भाजपाशी काडीमोड घेऊन शिवसेना आता स्वबळावर लढत आहे. महाराष्ट्र विधानसभेतही तो प्रयोग झाला आणि तो अंगलट आला. धमक्या देऊन लोक मते देत नाहीत. शेवटी लोकशाही मार्गानेच प्रत्येक राजकीय पक्षाला आपली भूमिका मांडावी लागेल. मुद्यानेच प्रश्न सुटतो, गुद्याने सुटत नाही. येणा-या निवडणुकीत शिवसेनेची आणखी घसरण होईल आणि त्याला कारण हे ‘सच्चाई’वाले ठरतील. कारण चुकीचे सल्ले देणारेही संस्थेला डुबवत असतात. अशांचाच गराडा सध्या जास्त आहे.
कमालीचा परखड आणि सडेतोड लेख! शिवसेनेला आत्मपरॆक्षण करण्याची जरुरी आहे.