व्यापा-यांकडून होणा-या साठेबाजीमुळे देशांतर्गत कापसाच्या किंमती वाढत असल्याच्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही.
मुंबई – व्यापा-यांकडून होणा-या साठेबाजीमुळे देशांतर्गत कापसाच्या किंमती वाढत असल्याच्या म्हणण्यात काहीही तथ्य नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला चांगला भाव मिळत आहे. यामुळेच देशांतर्गत कापसाच्या किमती वाढल्या असल्याचे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारातील कमी होणारा किमतीतील फरक हा शेतक-यांच्या दृष्टीने हिताचा असल्याचा दावा करतानाच भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) संतुलित विक्री धोरण आखण्याची गरज संघटनेने व्यक्त केली आहे.
‘सीसीआय’ने देशांतर्गत सूतगिरण्यांना आपल्याकडील साठा खुला करावा यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी वस्त्रोद्योगाकडून केली आहे. यासाठी काही बड्या व्यापा-यांकडून साठेबाजी केली जात असल्याने देशातील कापसाच्या किंमती भडकल्याचा आरोपही या उद्योगाने केला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या किंमती २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यातुलनेत ऑक्टोबरपासून आतापर्यंत देशांतर्गत कापसाचा भाव १० ते १२ टक्क्यांनी वाढला आहे. सहा महिन्यांचा कालावधी विचारात घेता ही वाढ सर्वसामान्य असल्याचे या संघटनेने आपल्या पत्रकात म्हटले आहे.याचा सूतगिरण्यांच्या नफ्यावर परिणाम होत असला तरी तो दखल घ्यावा एवढा नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला असणारी मागणी व मिळणारा भाव यांचे प्रतिबिंब देशांतर्गत कापसाच्या किमतींवर पडत असून सुताच्या किमतीही वाढत असल्याकडे पत्रकात लक्ष वेधण्यात आले आहे.
काही विशिष्ट घटकांकडून कापूस साठेबाजीकडे बोट दाखवले जात असले तरी सूतगिरण्यांकडूनही साठेबाजी करण्यात येत आहे. यामुळे चुकीचा प्रचार टाळावा, असे आवाहन संघटनेने केले आहे. त्याच वेळी कापूस महामंडळ केवळ खासगी वस्त्रोद्योगाचे हित पाहून धोरण आखू शकत नाही. त्याला आपल्या महसुलाचीही गरज पूर्ण करावी लागत असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. ज्या व्यापा-यांकडून अधिक भाव मिळेल त्यांना कापूस विकण्याचे धोरण महामंडळाचे असायला हवे. यासाठी सीसीआयने तटस्थ विक्री धोरण आखणे आवश्यक असल्याचे ‘सीएआय’चे अध्यक्ष धीरेन शेठ यांनी म्हटले आहे.
kapsala bhav milaylach pahije. niryatila manjuri milavi.