भारतीय स्वातंत्रदिन म्हणजे स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानातून नव्या इच्छा, आकांक्षा आणि भारताच्या विकासभरारीचे पूर्ण झालेले स्वप्न. या विकासात भारतात मोठया संख्येने असलेल्या आणि उर्जेचा मुख्य स्त्रोत असलेल्या तरुणाईचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच भारत हा तरुणांचा देश म्हणूनच जगात ओळखला जातो. ही तरुणाई विकसनशील भारताबाबत काय विचार करते. देशाचा मान, सन्मान असलेला तिरंगा फडकवण्याचे कर्तव्य अनेक वर्षापासून जोपासणारे कर्मचारी, देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी कायम तत्पर असलेले पोलिस दल आणि देशाला स्वातंत्र्याचा सूर्योदय दाखवणारे स्वातंत्र्यसैनिक यांना आजच्या भारताबद्दल काय वाटते, हे ‘प्रहार’ने जाणून घेतले.
दरवर्षी १५ ऑगस्ट च्या स्वातंत्र्यदिनी अथवा २६ जानेवारीच्या प्रजासत्ताकदिनी ध्वज फडकावले जात असले तरी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या १२५ पाय-या चढत तिरंगा फडकावण्याची जबाबदारी अगदी नित्यनेमाने अरविंद शांताराम विचारे यांनी पूर्ण केली आहे. आजारी असो वा घरात कोणतेही मंगलकार्य असो. मुसळधार पाऊस असो की सोसाटयाचा वारा, दरदिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या दहा मिनिटे आधीच अरविंद विचारेंची पावले भारताचा ध्वज उंच उंचावण्यासाठी पाचव्या मजल्यावरील तिरंगाच्या ठिकाणी वळतात जातात. तिरंगा फडकावण्याचे प्रशिक्षण हे अरविंद विचारे यांनी आपल्या वडिलांकडून घेतले. महापालिका मुख्यालयात शांताराम विचारे हे १९७२ पासून तिरंगा फडकावण्यापासून ते उतरवण्यार्पयचे कर्तव्य पूर्ण करत होते. परंतु १९८७ ला शांताराम विचारे सेवानिवृत्त झाल्यानंतर महापालिकेच्याच सेवेत असल्यामुळे हे कर्तव्य आपल्या खांद्यावर आले, असे अरविंद विचारे सांगतात. तब्बल ४१ वर्षाची तिरंगा फडकावण्याची जबाबदारी संभाळणा-या विचारे कुटुंबीयातील अरविंद गेल्या २५ वर्षापासून हे कर्तव्य करत आहेत.
महापालिकेच्या मुख्यालयावरील तिरंगा फडकावण्याची जबाबदारी ही जयराम खंडमुळे आणि राजेंद्र भताणे यांच्यावरही आहे. परंतु हे जर सेवेत असले तरी किंवा सुट्टीवर असले तरी आपल्याला मात्र कायम सतर्क राहावे लागते. ब-याच वेळा या दोघांची सुट्टी असते किंवा अनेक वेळा ते येणार नसल्याचे कळवतात परंतु अशा वेळी मी आजारी आहे किंवा माझ्या घरी मंगलकार्य आहे, असे कारण मला पुढे करून चालत नाही. माझी पावले त्या दिशेने आपोआपच वळली जातात, असे विचारे सांगतात.
पंचांगातील सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेनुसार हे तिरंगा फडकावणे आणि उतरण्याचे काम पार पाडले जाते. राष्ट्रीय ध्वज संहितेनुसार ध्वज फडकवताना तो जमिनीला लागणार नाही याची विशेष काळजी घेत हातावरच त्याची सन्मानाने घडी घातली जाते. पावसात ब-याच वेळा ध्वज ओला झाल्यामुळे खांबाला चिकटतो. त्या वेळी तो उतरवण्यात थोडासा त्रास होत असतो. परंतु आता तर आम्हाला याची सवयच झाली आहे. वारा असल्यामुळे ब-याच वेळा सांभाळून ध्वज उतरवण्याचा प्रयत्न केला जातो, असे ते सांगतात. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनी ध्वज बदलले जातातच, पण अनेक वेळा ध्वज कुठे फाटला किंवा काही घडल्यास त्वरित बदलून जुन्या ध्वजाची राष्ट्रीय ध्वजसंहितेनुसार सन्मानानेच विल्हेवाट लावली जाते. मात्र ही विल्हेवाट कशी लावली जाते, हे राष्ट्रीय ध्वजसंहितेनुसार सांगण्यास बंदी असल्यामुळे त्याबाबतची गुप्तता ही आम्ही कस्टोडियन माणसे घेत असतो, असेही ते सांगतात.
भारतीय ध्वज फडकवण्यापासून ते उतरवण्यापर्यंतची जबाबदारी मी गेल्या ३० वर्षापासून सांभाळतो आहे. म्हाडाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवेतून २०११ मध्ये सेवानिवृत्त झालो. आता कंत्राटी पद्धतीवर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम पाहतो. त्यामुळे आताही मी म्हाडाच्या सेवेतच आहे. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताकदिन, महाराष्ट्रदिन या राष्ट्रीय सणाच्या दिवशी न चुकता मी माझी जबाबदारी पार पाडतो. माझ्यासह काही सहकारी १० दिवस आधीपासून कामाला लागतात. ध्वजाच्या मानसन्मानासाठी मोठी काळजी घ्यावी लागते. ध्वज खराब झालेला, दोर निघालेला, कोणताही डाग, घडया पडलेला नसावा. या सर्वाची बारकाईने काळजी घ्यावी लागते. सूर्योदयानंतर ध्वज फडकवणे व सूर्यास्त होण्याआधी तो उतरवण्याचे काम आतापर्यंत न चुकता केले आहे. देशाबद्दल आत्मीयता आहे त्यामुळे अजिबात कंटाळा येत नाही. याहीपुढे ही जबाबदारी मी आनंदाने पूर्ण करेन. -पाश्वर गोसावी
गेली २५ वर्षे मध्य रेल्वेच्या मुख्यालयावर दररोज राष्ट्रध्वज फडकवण्याचे आणि उतरवण्याचे काम मी करत आहे. हे माझे भाग्य आहे. मोठया आनंदाने आणि अभिमानाने मी हे काम करत आहे. राष्ट्रध्वजाची काळजी घेणे आणि त्याच्या राजशिष्टाचाराचे पालन गेली पंचवीस वर्षे मी प्रामाणिकपणे करत आहे. रोज पहाटे सूर्योदयापूर्वी कार्यालयात उपस्थित राहावे लागते. सूर्योदयाच्या वेळेत ध्वज सन्मानाने फडकावला जातो. सूर्यास्तापूर्वी ध्वज उतवरला जातो. त्याची घडीही विशिष्ट पद्धतीने करावी लागते. त्यामुळे त्याचा योग्य मानसन्मान ठेवला जातो. -लक्ष्मण वाघेला
लहानपणी आमच्यावर देशप्रेमाचे संस्कार झाले होते, त्यामुळे देशासाठी कुठलाही त्याग करण्याची तयारी होती. मात्र, आज असे वाटते की स्वातंत्र्यचळवळीत भाग घेऊन आम्ही निराश झालो आहोत. ही सत्ता आम्ही इंग्रजांच्या हातातून काढून कुणाच्या हातात दिली, सामान्य माणसांचा या सत्तेत किती सहभाग आहे, हे तपासण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य आणि गरीब माणसांची किंमत कमी होऊ लागली आहे. गरिबीचा प्रश्न आहेच. शिवाय अन्य समस्यांनीही देशाला ग्रासले आहे. स्वातंत्र्यलढयासाठी आम्ही व आमच्या पिढीने अनेक त्याग केले मात्र, त्याचा परिणाम पाहिला की निराश होतो.– विश्वनाथ लोभ, स्वातंत्र्यसैनिक
मी मागील २७ वर्षापासून बेस्टच्या मुख्यालयामध्ये झेंडा फडकवण्याचे काम करतो. हे काम फार मोठे आहे ते मला करायला मिळाले हे माझे भाग्य आहे. एक मे, सहा ते १३ एप्रिल या राष्ट्रीय सप्ताहात, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीदिनी बेस्ट कार्यालयात झेंडा फडकवला जातो. – गौतन दिगंबर ननावरे
आमच्या काळातील भारत आणि आताचा भारत देश यात खूपच फरक झाला आहे. पूर्वीच्या काळात व्यावसायिक दृष्टिकोन इतका वाढला नव्हता. मात्र, आजचा भारत हा व्यावसायिकतेकडे वळू लागला आहे. राजकारणातही ही व्यावसायिकता शिरली आहे. त्यामुळे मानवी मूल्ये, जीवनाचे तत्त्वज्ञान व देशाविषयी असलेली कृतज्ञता यात एक प्रकारची निर्जीवता येऊ लागली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही स्थिती ठीक होती. मात्र, काळाच्या ओघात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. अलीकडच्या काळात कुणाला कुणाविषयी सोयरसूतक नाही. भारताने जी प्रगती केली आहे ती भौतिक आहे. मात्र, याहीपेक्षा वेगाने व मुळापासून प्रगती करता आली असती. – एकनाथ बत्तासे, स्वातंत्र्यसैनिक
ध्वजसेवेतून देशसेवेचे समाधान
मंत्रालयावरील ध्वज फडकवणे व उतरवण्याचे काम करणारे सहा कर्मचारी आहेत. सूर्योदयापूर्वी या कर्मचा-यांना मंत्रालयात हजर व्हावे लागते. सकाळी साडेसात ते सायंकाळच्या वेळेआधी ध्वज मानाने उतरवावा लागतो. शिवाय ध्वजाची योग्य निगा राखण्याचे कामही या कर्मचा-यांना करावे लागते. वारा, पाऊस यामुळे दिवसांत कधी कधी सात ते आठ वेळेस ध्वज बदलावे लागतात. या ध्वजाची निगा राखण्याचे काम हे महत्त्वाचे असल्याने त्याला प्राधान्य दिले जाते. परंतु या कामामध्ये मोठे समाधान मिळते. असे मत मंत्रालयातील ध्वजाची निगा राखण्याचे काम करणारे कर्मचारी व्यक्त करतात. सुरेंद्र जाधव, गणेश मुंज, दीपक अडसूळ, ज्ञानेश्वर बारगडे, सूर्यकांत कसबे आणि मुकादम या पदावर काम करणारे राजेंद्र कानडे हे या टीममध्ये आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशी मंत्रालयात रात्री थांबावे लागते मात्र, या ठिकाणी कुठलीही सुविधा दिली जात नसल्याची खंतही हे कर्मचारी व्यक्त करतात.
Tumhi Lok Kharach Bhagyawan Aahat,
Bhartacha Tiranga Phadkavne Mhanje Bhagyacha kaam Aahe.
Tumha Sarvana Va Prahachya Teamla aani Vachak Vargala Bhartiy Sawatantra dinachya Hardik Subhechya !!!!!!!!!!!!!!!!!!
Jai Hind,Jai Bharat