अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांचे मठ अनेक ठिकाणी जागृतावस्थेत आहेत. भगवान परशुरामाच्या भूमीत जागृतावस्थेत आहेत.
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज यांचे मठ अनेक ठिकाणी जागृतावस्थेत आहेत. भगवान परशुरामाच्या भूमीत जागृतावस्थेत आहेत. भगवान परशुरामाच्या भूमीत व श्री भार्गवांच्या अगदी जवळ असलेल्या चिपळून क्षेत्रात, मरकडीच्या तीरावरील एका डुंग्यावर एक प्रशांत सुंदर स्वामी मठ उभा आहे.
थोर स्वामीभक्त वै. श्री. गोपाळबुवा केळकर तथा प्रीतिनंद स्वामीकुमार हे १८७४ साली श्री स्वामी सुतांच्या आदेशानुसार येथे आले. तत्पूर्वी एक वर्षभर अगोदर याठिकाणी श्री स्वामी समर्थाच्या पादुका पाठविलेल्या होत्या.
श्री. गोपाळबुवांनी अक्कलकोट येथे स्वामींची प्रत्यक्ष सेवा केल्यावर स्वामींनी त्यांना आपला दंडा व चांदीच्या पादुका देऊन अनुग्रह दिला व मुंबईस श्री स्वामी सुतांकडे पाठविले. मग श्री स्वामीसुतांनीच त्यांना चिपळूणच्या मरकडी मठावर स्वामींची सेवा करण्यास पाठविले.
‘मरकडी’ हे स्थान आज चिपळून गावात असले तरी शंभर वर्षापूर्वी ते गावाबाहेर होते. तेथे घनदाट झाडी होती. तेथे एका डुंग्यावर ब्रह्मचारीबुवांनी शके १७९५ च्या फाल्गुनात श्री स्वामीसुतांनी दिलेल्या स्वामी पादुका गवती छपराच्या घरात स्थापन केल्या होत्या. श्री. गोपाळबुवा या ठिकाणी शके १७९६च्या ज्येष्ठांत सहकुटुंब येऊन राहिले.
दर गुरुवारी गावात भिक्षा मागायची आणि मिळतील त्या तांदळाच्या कण्या करून त्यावर आठवडा तांदळाची पेज करून काढायचा असे खडतर व्रत आचरून येथे त्यांनी स्वामींचा अखंड-जप करून नामसाधना केली. श्री. गोपाळबुवांच्या तेजस्वी-तपस्वी जीवनाची जाणीव झाल्यावर या स्थानावर स्वामी दर्शनार्थ लोकांची ये-जा चालू झाली व त्यांना जसजशी प्रचिती येऊ लागली तसतसा स्वामीनामाचा प्रसार होऊ लागला नि मग जन-सहाय्यानेच आजच्या प्रशस्त स्वामी मठाची वास्तू उभी राहिली.
श्री. गोपाळबुवा स्वामींकडे वळले ती कथाही मोठी चमत्कारिक आहे. स्वामींची इच्छा झाली म्हणजे ते कुणालाही आपल्याकडे कसे खेचतात व शेवटी त्याला महद्वारावर कसे नेऊन ठेवतात हीसुद्धा एक अतक्र्य स्वामीलीलाच आहे! श्री. गोपाळबुवांचे पूर्ण नाव गोपाळ रामचंद्र केळकर. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कोर्ले हे त्यांचे मूळ गाव. घरच्या गरिबीमुळे इंग्रजी तिस-या इयत्तेपर्यंतच त्यांचे शिक्षण झाले.
रेल्वेत स्टेशनमास्तरची नोकरी धरून त्यांनी विवाह केला. ते नास्तिक होते. परंतु त्यांचे पूर्वसुकृत वेगळे होते. नागपूरला त्यांना जलोदराची व्याधी जडली. त्यामुळे त्यांचे पोट अतिशय दुखू लागले. नाना उपाय केले. सहा महिने औषध घेऊनही गुण येईना. शेवटी नोकरी सोडून ते कोकणात घरी आले. परंतु तेथेही बरे वाटेना म्हणून ते रामपूरला भावाकडे गेले. पण रोग हटायची चिन्हे दिसेनात. उलट सर्वागात वायू खेळून असह्य वेदना होऊ लागल्या.
झोप नाही, कमालीचा अशक्तपणा यामुळे त्यांना जीवन असह्य वाटू लागले. त्या जीवघेण्या दु:खातच न राहवून शेवटी त्यांनी नवस केला की, ‘जो कोणी या जगाचा ईश्वर असेल त्याने हा माझा वायू जर आठ दिवसाच्या आत कमी केला तर एका भगवंतावाचून पुन्हा कुणाची चाकरी करणार नाही.’ नि आश्चर्य म्हणजे त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद मिळून आठ दिवसांच्या आत त्यांना बरे वाटले.
आता नवस पुरा करायला हवा म्हणून ईश्वरीय विभुतीचा शोध घेता-घेता त्यांना अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराज असल्याचे समजले. मग तेथे जाण्याचे त्यांनी ठरविले. एका मित्राकडे जात आहे, असे भावाला सांगून ते मधल्या टप्प्यापर्यंत पोहोचले. पण आता खिशात तर पैसे नाहीत, पुढे कसे जायचे म्हणून ते धर्मशाळेत थांबले. तेथे मध्यरात्री एक श्रीमंत बाई उतरल्या होत्या. त्यांनी बुवांना पैसे देऊ केले, पण बुवांनी अक्कलकोटला जाण्याएवढेच तिकिटाचे पैसे त्यांच्याकडून घेऊन ते स्वामींकडे गेले. खास बागेत वडाच्या झाडाखाली विसावलेल्या श्री स्वामी समर्थाना दंडवत घालून त्यांनी बरोबर आणलेल्या खारका त्यांना दिल्या.
स्वामींची ती तेजोपुंज अजानुबाहू भव्य मूर्ती पाहून त्यांचे भान हरपले व क्षुधा-तृष्णादी वासनांच्या उपशम होतोय असा भास झाला. तेथे भिक्षेवर निर्वाह करून त्रिकाळ स्वामीदर्शन घेण्याचे व्रत त्यांनी चार महिने केल्यावर एकदा स्वामी त्यांच्या स्वप्नात आले आणि बुवांच्या पोटावरून हात फिरवून म्हणाले, ‘तुझा रोग आम्ही नाहीसा करतो’ स्वप्नानंतर जागे होऊन बुवा लघुशंकेला गेले तो पोट सैल होऊन पोटातील व्याधी पूर्णपणे नाहीशी झाल्याचे त्यांना जाणवले.
बुवांना मग एकेक चमत्कार व अनुभव स्वामींच्या बरोबर राहिल्याने येऊ लागले. तेव्हा त्यांना स्वामींच्या अनुग्रहाची ओढ लागली. पुढे एकदा स्वामी हचनाळ या गावी सेवेक-यांसह राहिले असता, बुवा पहाटेच उठले. स्नानापूर्वी तंबाखू ओढावा म्हणून बुवांनी श्री स्वामींच्या शय्येजवळच्या समईवर सुंभाची गुंडी धरली. अर्धी गुंडू पेटते तोच स्वामी उठून बसले. भयाने बुवांना कापरे भरले व गुंडी खाली पडली. स्वामी बुवांकडे एकटक पाहात होते. बुवांनी अवधान राखून तेवढयात स्वामींचे पाय धरले व ‘दीनावर अनुग्रह करावा’ अशी विनवणी केली.
स्वामींनी आपल्या कृपाबलाने त्यांच्यावर अनुग्रह केला. चालत्या-बोलत्या स्वामीरूपी परब्रह्माचा बुवांनी मग फार जवळून अनुभव घेतला, त्यांच्या सान्निध्यात असताना हरघडी घडणारे नाना चमत्कार-लीला प्रत्यक्ष पाहिल्या.
गोपाळबुवांची पत्नी पतीचा शोध घेत-घेत अक्कलकोटला आल्यावर स्वामींनी त्यांची भेट घडवली व चिपळूणच्या मरकडी मठावरील पादुकांची सेवा करण्यास त्यांना पाठविले. बुवांना जाताना त्यांनी २ नारळ व एक खारीक दिली. चिपळूणला आल्यावर मग त्यांना दोन पुत्र व एक कन्या झाली. स्वामी कृपाबलाने चिपळूणच्या मठात दर्शनार्थ येणा-यांची व्याधी दूर होऊन, त्यांचे मनोरथ पूर्ण होऊ लागल्याने, या जागृत मठाची आपोआपच प्रसिद्धी झाली.
स्वामींच्या सान्निध्यात श्री. गोपाळबुवांनी पाहिलेल्या-ऐकलेल्या सर्व दिव्य लीलांचे गद्यांत ग्रंथन करून, मग त्यांनी ‘श्री स्वामी समर्थ बखर’ मोडीत लिहिली. त्यांनी स्वामींचे भावमधुर ‘करुणास्तोत्र’ गायिले आणि साधकांच्या मार्गदर्शनार्थ ‘साधनविवेक सारामृत’ हे ओवीबद्ध लघु प्रकरण लिहिले. ‘श्री स्वामी समर्थ’ या बखरीवजा पुस्तकात स्वामींचे २६४ अनुभव प्रसिद्ध झाले असून, ते वाचताना आजही प्रत्यक्ष घटना समोर घडताहेत इतका जिवंत अनुभव मिळतो.
केवळ हे अनुभव दररोज नित्यनियमाने, श्रद्धेने वाचणा-यांचीही अनेक कामे स्वामीकृपेने झाली आहेत. स्वामींचे अंत:साक्षित्व, त्रिकाळज्ञत्व, अघटित घटनापटुत्व बखरींतील विविध अनुभवांवरून सहज जाणवते. कोणाच्याही मनातले सूक्ष्मातिसूक्ष्म भावतरंग त्यांच्या अंत:साक्षित्वाला तत्काळ जाणवत असतं. कोणाचेही भूत, भविष्य, वर्तमान त्यांना वाचता येत होते.
प्रापंचिकांची दु:खे निवारण करून त्यांची कामनापूर्ती ते करीतच; पण एखाद्या मुमुक्षूला परमबोधाचा प्रखर स्फुलिंगही देतं. व्याधीनिरसन, मृतसंजीवन, परपापप्रकटीकरण, वस्तूपरिवर्तन, दूरश्रवण, दुष्टदंडन इ. किती तरी अचिंत्य शक्तीचा आविष्कार त्यांच्या या लीलांतून प्रत्ययास येतो. एखाद्या व्याधीच्या परिहारार्थ समोर दिसणारी कुठलीही वस्तू औषध म्हणून ते देत व केवळ त्यांच्या दैवी सामर्थ्यांच्या संस्पर्शामुळे व्याधी निरसन होई, इतके अचाट सामर्थ्य स्वामींकडे होते.
श्री स्वामींच्या लीलाचिंतनात निरंतर रंगून गेलेले गोपाळबुवा आपल्या वाटयास आलेले स्वामीकार्य अत्यंत भक्तिपूर्वक-श्रद्धेने पार पाडून कृतार्थ मनाने फाल्गुन शुद्ध शके १८४१ या दिवशी समाधिस्त झाले. त्यांच्या पवित्र अस्थींवर मठाच्या आवारातच त्यांची लहानशी समाधी बांधलेली आहे.
गोपाळबुवांच्या मागे त्यांचे सुपुत्र श्री दत्तबुवा व श्री हरिबुवा यांनी यथाक्रम-यथाशक्ती त्यांची परंपरा चालविली आणि त्यानंतर श्री दत्तबुवांचे पुत्र श्री कृष्णबुवा यांनी आपले दोन बंधू श्री. गोविंदराव व श्री. नारायणराव यांच्या मदतीने ही स्वामी सेवा अखंड चालवून आजच्या स्वामी मठाची भव्य वास्तू उभारली. सध्या श्री. नारायणराव मठाची परंपरा सांभाळीत असून, पिढीजात नम्रता, सेवाभावी वृत्ती, बोलण्यातील अदब यामुळे अनेक स्वामीभक्तांना त्यांनी स्वामी सेवेत आणले आहे.
पहाटे स्वामींची भूपाळी-काकड आरती, षोडशोपचार पूजा, सायंकाळी धुपारती, रात्री पंचपदी (भजन) दोनदा नैवेद्य ही स्वामी सेवा दररोज चालू आहे. श्री स्वामी जयंतीचा उत्सव (चैत्र शुद्ध द्वितीया) येथे दरवर्षी मोठया प्रमाणात साजरा होतो. त्यावेळी सात दिवस अखंड वीणावादन, भजन, प्रवचन चालते. दर स्वामी जयंतीस जन्माचे कीर्तन विद्यमान मठचालक करतात.
त्यानंतर दिंडी सर्व गावांतून वाजत-गाजत नेण्यात येते. रात्री पुन्हा दिंडी असते. दुस-या दिवशी सर्व भक्त मंडळींना प्रसाद-भोजन देऊन उत्सवाची सांगता होते. तसेच श्री स्वामी सुतांची पुण्यतिथी, श्री. गोपाळबुवांची पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा, गुरुद्वादशी या दिवशीही नामोत्सव साजरे केले जातात. श्री स्वामी जन्मोत्सव प्रसंगी या मठातील श्रीपादुकांवरील चांदीचे छत्र काही वेळेपर्यंत गदागदा हालते असा अनुभव अनेकांनी घेतल्याचे सांगतात.
स्वामींनी गोपाळबुवांना एक झोळी दिली होती व ‘तू दर गुरुवारी भिक्षा माग, म्हणजे तुला काही कमी पडणार नाही.’ असे सांगितले होते. ही भिक्षेची प्रथा आजतागायत सातत्याने चालू ठेवली असून, आजही दर गुरुवारी किमान ५ घरी भिक्षा मागण्यात येते.
स्वामी मठातील सेवाकार्याचे व्रत आज श्री. नारायणराव पुढे चालवित असून, येथे श्रद्धेने येणा-या स्वामीभक्तांना आधार देण्याचे, त्यांना नवा उत्साह-भरारी देण्याचे काम ते करीत आहेत. मठात येणा-यास स्वामी नाम-मंत्राचा प्रसाद देऊन, आपला सर्व भार स्वामींवर टाकण्याचा सल्ला ते देतात. स्वामीभक्तांना अपार आनंद देणारा चिपळूणचा हा प्रसन्न स्वामी मठ म्हणजे दत्तावतारी. श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रत्यक्ष अस्तित्व स्थान आहे. स्वामींच्या अखंड जागृतीचे हे जागृत स्वामी स्थान असून, त्याची अनुभूती श्रद्धावंतांनी प्रत्यक्षच घ्यावयास हवी!
।। श्री स्वामी समर्थ।।
MALA SWAMINCHE ANUBHAV KHUP AVADTAT.