धावपळीमुळे आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होतं. अवेळी खाणं, उशीर झाल्यामुळे घाईत आणि न चावता खाणं, ऑफिसला अथवा शाळेत जायला उशीर होत असल्यास बरेचदा उभं राहूनच पोटात अन्न ढकललं जातं. पण…
धावपळीमुळे आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष होतं. अवेळी खाणं, उशीर झाल्यामुळे घाईत आणि न चावता खाणं, ऑफिसला अथवा शाळेत जायला उशीर होत असल्यास बरेचदा उभं राहूनच पोटात अन्न ढकललं जातं. पण यामुळे अन्न नीट पचत नाही व पचनासंबंधी आजार उद्भवतात. तसंच हल्ली प्रत्येकला भुरळ पडली आहे ती फास्ट फुडची. चमचमीत, स्वस्त दरात आणि कमी वेळेत मिळणारे फास्ट फुड सर्वाच्याच पसंतीस उतरत आहेत.
मात्र या पदार्थात शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असणारे घटक किंवा जीवनसत्त्वं कितपत मिळतात, तसंच ते बनवताना स्वच्छतेचं पालन किती होतं, हा विचार करणंदेखील आवश्यक आहे. अशा खाण्यामुळे आरोग्याचं नुकसान होतंय ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. केवळ फास्ट फूड खाण्याला दोष देण्यात काय अर्थ आहे, कारण आपण निरोगी राहणं हे आपल्या रोजच्या आहारावर आणि ते सेवन करण्याच्या पद्धतीवरही अवलंबून आहे. म्हणूनच जेवताना काही गोष्टींचं पालन करणं आवश्यक आहे.
अन्न चावून खावं
ज्यांना वजन कमी करायचं आहे, अशा व्यक्तींनी किमान ३० ते ३५ वेळा अन्न चावून खावं. अन्न चावून खाल्ल्याने दात मजबूत होतात, भूक वाढते, अन्न पचतं आणि त्यामुळे पोटाचे विकार कमी होतात.
भूक लागल्यावरच खावं
स्वादिष्ट आणि आवडीचा पदार्थ समोर आल्यावर काही जण भूक नसतानाही पोटभर खातात. एखाद्या पदार्थाची चांगली चव लागली तर तो पदार्थ पुन्हा पुन्हा जाऊन खाणारी मंडळी आहेत. आधी खाल्लेलं अन्न न पचल्यामुळे शरीरातील अनावश्यक चरबीला पोषण मिळतं आणि वजन वाढण्याच्या शक्यता वाढतात. भूक नसतानाही खाल्ल्याने पचन होत नाही याशिवाय पोटामध्ये बिघाडही होतो.
वेळेत आणि वेळेवर खावे
खाण्यामध्ये किमान सहा तासांचं अंतर असावं. रात्रीचं जेवण लवकर घ्यावं. कारण रात्री आपल्या शरीराची हालचाल कमी होते त्यामुळे अन्न पचत नाही. दररोज तीन वेळा योग्य वेळेत जेवल्याने एकाग्रताही वाढते.
हात धुऊन जेवावे
जेवणाच्या आधी साबणाने हात स्वच्छ धुवावेत. हात न धुतल्याने हाताला चिकटलेले किटाणूसुद्धा खाताना आपल्या शरीरात जातात.
बसून जेवावे
जेवताना बसून खावं. चालत किंवा उभं राहून खाल्ल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. बसून जेवल्याने आपण समाधानाने आणि शांतपणे जेवतो. जाड होणं, अॅसिडिटी होणे आणि पोटांचे विकार होण्याची शक्यता असते.
जेवताना पाणी पिऊ नये
जेवताना पाणी प्यायल्याने पचनक्रिया बिघडते. म्हणूनच जेवणाच्या एक तास आधी किंवा नंतर पाणी प्यावं.
व्यायाम आणि जेवण
व्यायाम केल्यानंतर लगेच जेवायला बसू नये. व्यायाम केल्यानंतर किमान एक तासाचं अंतर असावं.
Excellent Guidance
Thnaks Nice Post