गांधी तत्त्वज्ञान आणि गांधी युग ते आजपर्यंतच्या या देशाच्या प्रवासात सर्वात मोठी पोकळी कोणती असेल तर आता या देशात सत्तेवर बरेच जण आहेत. पण सामाजिक नेतृत्व कोणाजवळही नाही. व्यक्ती चुकली, समूह, गट चुकला किंवा समाज चुकला तर ‘हे असे करू नका..’ किंवा ‘तुम्हाला मी हे करू देणार नाही..’ असे सांगणारा नेता कोण? आणि अशा नेत्याचे ऐकणारे कोण? पोकळी आहे ती अशा सामाजिक नेतृत्वाची. हा महात्मा गेल्या दोन पिढयांना निव्वळ महात्मा नव्हे तर, परमात्माही वाटला होता.
महात्म्याच्या जयंतीनिमित्ताने मुक्तचिंतन.
आज महात्म्याची जयंती. या देशात महात्म्याची आठवण आजच्या दिवशी आणि ३० जानेवारी याच दिवशी होते. महात्म्याचा बाकी विसर पडला हे खरेच आहे. जगाच्या पाठीवर असा महात्मा होणे नाही. ज्या काळात महात्मा स्वातंत्र्यासाठी लढाई लढत होता, त्यावेळी तो केवळ महात्मा नव्हता.
देशातील अनेक लोकांसाठी तो परमात्माही होता. ज्यांनी महात्म्याला पाहिले नव्हते, जे महात्म्याला कधी भेटले नव्हते, आजच्यासारख्या वाहिन्या नसल्यामुळे महात्म्याचे दर्शन अवघड होते. भेट नाही, बोलणे नाही, परिचय नाही, तरीही करोडो लोकांच्या आत्म्याची तार, परमात्म्याशी जुळलेली होती. सामान्य माणूस आणि परमात्मा यांच्यामध्ये हा महात्मा होता. त्यामुळेच तो परमात्मा झाला. कुठचे नंदूरबार..
सातपुडय़ाच्या डोंगरात बसलेले. तिथला शिरीषकुमार. त्याला महात्मा माहिती नाही आणि परमात्माही माहिती नाही. पाहिलेला नाही. पण भारलेल्या वातावरणाचा एक नकळत झालेला परिणाम असा होता की, ‘मला माझ्या देशासाठी काहीतरी केले पाहिजे’ या तीव्र भावनेने संपूर्ण देश भारावून गेलेला होता. ‘गांधी’ या शब्दांतील ताकदच जबरदस्त होती. महात्म्याच्या भोवती असलेले तेजस्वी तारे..
नेहरू, पटेल, सुभाष, मौलाना, गफार खान, सरोजीनी, .. जगाच्या पाठीवर एकाचवेळी एका देशात एकच नेता इतिहासात दिसतो. स्वातंत्र्य चळवळीत या देशात एकास-एक असे असंख्य नेते होते. त्यांचे सामर्थ्य, चारित्र्य, त्याग आणि समर्पण. या सगळयांची प्रेरणा महात्म्याची. म्हणूनच चिमुकला शिरीषकुमार स्वातंत्र्याच्या वेदीवर आपले बलिदान देतो. तो बाबू गेनू.. मुंबई बाबूला विसरली.
आज त्या त्यागाचे विस्मरण झाले. समर्पणाचे विस्मरण झाले. राष्ट्रीय चारित्र्याचेही विस्मरण झाले. महात्मा म्हणाला होता की, ‘परदेशी कपडयांची होळी करा’ आणि एका गरीब घरातील हा बाबू हातात तिरंगा झेंडा घेऊन सुसाट निघतो काय.. परदेशी कपडे वाहून नेणा-या लॉरीपुढे आडवा पडतो काय, शहीद होतो काय.. महात्म्याला बाबूने पाहिलेही नव्हते. पण कोणीतरी एक महात्मा-परमात्मा देशासाठी लढतो आहे, अशा जबरदस्त भारलेल्या वातावरणात त्यावेळची सगळी तरुणाई सामावलेली होती.
देशाला स्वातंत्र्य मिळाले ते या महात्म्याच्या नेतृत्वाखाली. खेडय़ापाडयांत चरखा फिरला. गांधी टोपीला एक चारित्र्य आले. मी चुकीचा वागलो तर महात्म्याला आवडणार नाही, ही भावना सगळीकडे ओतप्रोत भरलेली होती. एक अगदी घरचा किस्सा सांगतो.. ‘माझे काका बाळकृष्ण गणेश भावे १९३२ च्या झेंडा सत्याग्रहात सामील होते. त्यांना शिक्षाही झाली होती. स्वातंत्र्यानंतर त्यांनी ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षकाची नोकरी स्वीकारली. पगार रुपये ३०. रोहे गावापासून सहा मैल चालत जायचे. चार वर्गावर शिकवायचे.
एकाच खोलीत चार कोप-यात चार वर्ग. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. १९५२ साली जिल्हा लोकल बोर्ड आणि स्कूल बोर्ड स्थापन झाले आणि रोह्याजवळील घोसाळे येथील काँग्रेसचे त्यावेळचे वजनदार नेते बाबूराव जोशी हवालदार हे स्कूल बोर्डाचे अध्यक्ष झाले. ते वडिलांच्या नात्यात होते. ते घरी आले आणि त्यांनी माझ्या काकांना सांगितले की, ‘उद्या पेणला मुलाखती आहेत’. व्हर्नाकल फायनल शिक्षकांना आम्ही ३० रुपयांचा पगार ६० रुपये करणार आहोत.
शिक्षण खात्याची अट अशी आहे की, ३५ वर्षाच्या आतील शिक्षकांना हा फायदा मिळेल. उद्याच्या मुलाखतीत तुला मी नाव विचारीन. नाव सांगितल्यानंतर मी प्रश्नच विचारीन. ‘तुमचे वय ३५ आहे ना.. तू होय म्हणायचे’.. माझे काका काही बोलले नाहीत. सकाळी पेणला गेले.. मुलाखत झाली. बाबूरावांनी प्रश्न विचारला, ‘तुमचे वय ३५ आहे ना’? माझे काका म्हणाले ‘नाही, ३८ आहे.’ त्यांच्या नावापुढे फुली पडली. काका पेणहून रोह्याला आले. सायंकाळी पाठीवर अध्यक्ष हवालदारही आले. त्यांनी जोरात खडसावले की, ‘अरे, तुझ्याकरिता मी हा खटाटोप केला आणि तू काय उत्तर दिलेस’..
काका पटकन म्हणाले, ‘मला खोटे बोलायला सांगत होतात.. ते डोक्यावर गांधी टोपी घालून..’ गोष्ट संपली. आयुष्यभर काका तीस रुपये पगारावर होते. हा प्रभाव त्या महात्म्याचा आहे. ‘खोटे बोललेले महात्म्याला आवडणार नाही,’ इतका जबरदस्त परिणाम केवळ महात्म्याच्या कृतीतून, उक्तीतून, विचारातून आणि प्रत्येक शब्दांतून व्यक्त होत होता. म्हणून तो महात्मा होता.
८ ऑगस्ट १९४२ ला रात्री ब्रिटिश पोलिसांनी सर्व नेत्यांना पकडले आणि पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये एका खोलीत कोंबून ठेवले. महात्म्याकरिता वेगळी निवासाची व्यवस्था होती. जेलरने सांगितले की, ‘आपली तिकडे व्यवस्था आहे.’ महात्म्यांनी म्हटले, ‘बाकी कैद्यांची व्यवस्था कुठे आहे?’ उत्तर देण्यात आले ‘इथेच आहे’. जेलर म्हणाला, ‘डास आहेत. तुमच्याकरिता मच्छरदाणी आहे.’
महात्म्याने विचारले, ‘कैदी किती आहेत’? सांगण्यात आले, ‘१४२’. महात्म्याने विचारले की, ‘मच्छरदाण्या किती आहेत?’ उत्तर आले ‘एकच आहे.’ महात्मा म्हणाला, ‘सर्वाना असतील तर मला द्या..’ या उत्तरामध्येच महात्म्याचे महात्मापण दडलेले आहे.
महात्मा या शब्दाचा अर्थ आत्म्याशी जोडलेला आहे. गांधी ही व्यक्ती नव्हती ते एक तत्त्वज्ञान होते. ती एक जीवन प्रणाली होती. त्या तत्त्वज्ञानातून या देशामध्ये एक अहिंसेचं तत्त्वज्ञान निर्माण झाले होते. हिंसेमध्ये शक्ती नाही. अहिंसेमध्ये शक्ती आहे. बडबडण्यात सामर्थ्य नाही. मौनामध्ये सामर्थ्य आहे. हे सगळे ‘गांधी तत्त्वज्ञान’ आहे. कमीत कमी गरजांमध्ये कसे जगावे हे गांधी तत्त्वज्ञानाने शिकवले.
स्वावलंबन, स्वच्छता, सत्य आणि अहिंसा ही गांधी युगाची देन आहे. या देशामध्ये हा महात्मा असा होता की, सत्तेपासून दूर राहून समाजाचा नेता होऊ शकतो. हे त्यांनी त्यांच्या आचरणातून दाखवून दिले. त्यांच्याकडे पाहून, त्यांचे तत्त्वज्ञान अभ्यासून, या देशातील अनेकांनी आपली तशी जीवनपद्धती बनवली. समाजाचे नेतृत्वही त्याच भावनेने केले. आचार्य?विनोबा हे त्याचे जिवंत उदाहरण. कुठे पवनारचा आश्रम आणि कुठे भिंड-मुरेना जिल्ह्यातील डाकू.
‘विनोबा कोण’ त्यांना माहितीही नाही आणि ‘डाकू कोण’ हे विनोबांना माहीत नाही. पण एका कृष व्यक्तीच्या पायावर आपली हत्यारे ठेवायला भिंड-मुरेनातून डाकू येतात. हे सामाजिक नेतृत्व आहे. सामाजिक क्षेत्रात सानेगुरुजींनी हा चमत्कार केला, बाबा आमटे यांनी हा चमत्कार केला. सत्ता हातात नसताना समाजाचे नेतृत्व करायचे ही गोष्ट या देशात महात्माजींकडून अनेक लोक शिकले.
सत्तेवरची माणसे समाजाचे नेते असतातच, असे गृहीत धरता येत नाही. समाजाचे नेते कधी कधी सत्तेत असू शकतील. पण सत्तेवर असणारा माणूस समाजाचा नेता असेलच, असे कधीच मानता येत नाही .
गांधी तत्त्वज्ञान आणि गांधी युग ते आजपर्यंतच्या या देशाच्या प्रवासात सर्वात मोठी पोकळी कोणती असेल तर आता या देशात सत्तेवर बरेच जण आहेत. पण सामाजिक नेतृत्व कोणाजवळही नाही. व्यक्ती चुकली, समूह चुकला किंवा समाज चुकला तर ‘हे असे करू नका..’ किंवा ‘तुम्हाला मी हे करू देणार नाही..’ असे सांगण्याचा अधिकार असलेले सामाजिक नेतृत्व आज समाजात शिल्लक नाही.
गांधीजींनंतर या देशामध्ये हळूहळू सगळय़ात मोठा दुष्काळ कशाचा असेल तर तो सामाजिक नेतृत्वाचा दुष्काळ आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधीजी म्हणाले असते की, ‘मी पंतप्रधान होणार..’ तर त्यांना कोणी अडवले असते? पण स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी स्वातंत्र्याचा जल्लोष न करता, हा महात्मा जातीय दंगलीतील जखमींच्या उपचारासाठी नौखालीत फिरत होता. सामाजिक नेतृत्वाचे ते उंचच उंच उदाहरण आहे.
आजच्या समाजव्यवस्थेत सुबत्ता येत आहे.. आर्थिकदृष्टय़ा संपन्नता येत आहे. महासत्तेकडे आपण चाललो आहोत, असे वातावरणही तयार करण्यात येत आहे. पण सत्ता, संपत्ती किंवा महासत्ता याच्या पलीकडे एक सामाजिक नेतृत्वाचा धाक आणि दरारा असायला पाहिजे. तो आज कुठेच दिसत नाही. अडचण तिथेच आहे. ज्या समाजात सामाजिक नेतृत्व नाही त्या समाजात कधीही अराजक निर्माण होऊ शकते. आज अदृश्य स्वरूपात या देशात एक अहिंसक-अराजक चालूच आहे.
कायदा मानायचा नाही, पोलिसांना जुमानायचे नाही, त्या यंत्रणेवर हात टाकेपर्यंत मजल जायची.. पैशाच्या जोरावर समाजात जेव्हा मुजोरी निर्माण होते तेव्हा तो समाज शांततेकडून दंगल खोरीकडे आणि सुसंस्कृत जीवनाकडून धटिंगण प्रवृत्तीकडे हळूहळू सरकत असतो. त्याचे परिणाम एका दिवसात दिसत नाहीत. पण आजच्या समाजव्यवस्थेत वाढलेले बलात्कार, वाढलेले अत्याचार, वाढलेला हिंसाचार, वाढलेला भ्रष्टाचार ही सगळी लक्षणे सामाजिक नेतृत्वाच्या अभावातून निर्माण झालेली आहेत.
गांधींना या देशाने पाहिले. त्यांच्यामुळेच स्वातंत्र्य मिळाले आणि जगात हा एकमेव देश असा आहे की, जो दोन शब्दांनी स्वतंत्र झाला. – छोडो भारत-चले जाव-क्विट इंडिया-जय हिंद- चलो दिल्ली.. सगळेच दोन शब्द आहेत. या दोन शब्दांच्या सामर्थ्यांमागे एक महात्मा आहे. त्या महात्म्याच्या जीवनशैलीतून सामान्य माणसाची हिम्मत वाढलेली आहे. पण अलीकडच्या काळात ही वाढलेली हिम्मत सुसंस्कृत पणाची दिसत नाही.
ब्रिटिशांविरुद्ध लढताना जी हिम्मत होती ती ‘मी सत्यच बोलेन आणि कोणी हिंसक असेल तरी मी दगड उचलणार नाही’ याला एक सामर्थ्य लागते. आज त्या सर्व विषयांपासून हा देश झपाटय़ाने दूर जात आहे. संपत्ती मोठी की चारित्र्य मोठे? सत्ता मोठी की सुसंस्कृत समाज मोठा? या प्रश्नाची चर्चा होईल तेव्हा समोर येते ती गांधी जीवनशैली.. आज ‘गांधीगिरी’ शब्दाची टिंगल होते आहे. गांधींचीही टिंगल होते. गोडसे यांनी गांधींना मारले आणि व्यक्तीची हत्या केली. पण विचारांची हत्या होत नाही.
आजही गांधी विचार, गांधी तत्त्वज्ञान, गांधी जीवनशैली या समाजाला ख-या अर्थाने समर्थ आणि संपन्न करू शकेल. महात्म्याजवळ ते सामर्थ्य होते. त्यामुळे सामान्य माणसाला त्या काळात हा महात्मा परमात्माच वाटत होता. आत्म्याचा परमात्म्याशी संबंध जोडणे त्यातूनच महात्मा निर्माण होतो.
महात्म्याने ते तत्त्वज्ञान या देशाला दिले. पण दु:खाची गोष्ट अशी आहे की, हा देश गांधींना विसरतो की काय? आणि त्यांच्या तत्त्वज्ञानाला श्रद्धांजली अर्पण करतो की काय? अशा विचित्र स्थितीत आपण येऊन पोहोचलो आहोत. जगात गांधींचा जयजयकार होतो आहे. परदेशात गांधी तत्त्वज्ञान आदर्श तत्त्वज्ञान वाटते. परदेशातून मुंबईत आलेले पर्यटक मणी भवन येथे गेल्याशिवाय राहात नाहीत. आज महाराष्ट्रातील आणि मुंबईतील किती लोकांना मणी भवन माहिती आहे?
गांधी हा सामाजिक समतेचा हुंकार होता. आज एकीकडे जाती घट्ट होत आहेत, दुसरीकडे समाज धटिंगण होत आहे. महासत्तेकडे वाटचाल करताना तिसरीकडे मन:शांती हरवत चाललेली आहे. त्या सगळयांचा मेळ बसवणारे तत्त्वज्ञान ‘गांधी तत्त्वज्ञान’ आहे. त्या महात्म्याच्या जयंतीदिनी आज १४७ वर्षानंतरही तो महात्मा आणि त्याचा विचार या देशाला तारणारा विचार आहे..!
*अविस्मरणीय गांधीजयंती सप्ताह*
आठवणींमध्ये रमण्याचा छंद सगळ्यांनाच असतो. *”गुजरा हुआ जमाना‘* आपल्याला नेहमीच वर्तमानापेक्षा अधिक रमणीय भासतो, कारण त्यात आठवणींचे गहिरे रंग भरलेले असतात. सुख-दुःखाचे प्रसंग, जुनी माणसं आठवताना आपलं मन भरून येतं.पण अप्रूप वाटावं त्या उत्सवाचं अर्थात हुतात्मा बाबू गेनू यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या घोडपदेव विभागातील श्रीकापरेश्वर मंदिराच्या प्रांगणात होत असलेल्या महात्मा गांधी जयंती सप्ताहाचं. मराठी मातीत वाढलेल्या, रुजलेल्या माणसासाठी *”महात्मा गांधी जयंती सप्ताह’* म्हणजे निव्वळ शब्दात व्यक्त न करता येणारा जिव्हाळ्याचा विषय. *‘वसुधैव कुटुंबकम‘* हे मानणारी आपली भारतीय संस्कृती. अशाच काही व्रतस्थानी,मराठमोळी माणसं या भागात राहतात. त्यातल्याच काही उत्साही आणि रसिक लोकांनी एकत्र येऊन सुरु केलेला हा सप्ताह म्हणजे ‘आकाशी झेप घेरे पाखरा ….!’ समस्ताना प्रेरणा देणारा गांधी सप्ताह. बापुजींना मानणारे आणि न मानणारे दोन ही घटक होते. मलाही महात्मा गांधीविषयी आणि त्यांच्या आडमुठ्या हट्टापायी भारताला जे सोसावे लागत आहे त्या विषयी घृणा आहे. पण मला त्यात आत्मीयता नाही म्हणून इतरांची मते वेगळी असतात. असे काही अहिंसेच्या मार्गावरचे पुजारी या विभागात राहत होते. त्यांच्या योगदानामुळे हा सप्ताह मुंबई शहरात नावारूपाला आला. एक दिवशीय औपचारिकता म्हणून गांधी जयंती साजरी करणारे शासनासहित विविध सामाजिक संस्था किंवा पक्ष आदिंनी गांधी सप्ताह कधी केला नाही. असो माझा विभाग या मध्ये आघाडीवर होता. याचा मला अभिमान आहे.
मला आठवतय लहान असताना सप्ताहात एक दर्जेदार नाटकातील एक संवाद आठवतोय ‘”गेले ते सुखाचे दिवस, आता ते परत कधीही येणार नाहीत‘. एक खिन्न आर्तता त्याच्या त्या सुस्कारा टाकून काढलेल्या उद्गाराचे प्रतीत आज मला कळतंय. खरोखर गेले ते गांधी सप्ताहाचे दिवस. किती सामर्थ्य ! किती चैतन्य ! तो सप्ताह म्हणजे बालमनावर सुसंस्कार करणारा उत्सव….! हुंदडण्याबरोबर ज्ञानार्जन देणारा उत्सव…! याच उत्सवात गीतगायन,नाटक, वकृत्व स्पर्धा होत होत्या. विविध नाट्यमंडळे नाटक सादर करीत असत. दर्जेदार सादरीकरण …. त्या लाकडी फळ्यांच्या धडधडणाऱ्या रंगमंचावर धमाल यायची. पाहतच रहायचं.
भारतीय बेकरीच्या बाजूला राहणाऱ्या एक हांडे नावाच्या मुलीने मधुर आवाजात गायलेले ‘दो आँखे बारह हाथ’ मधील ‘ए मालिक तेरे बंदे हम’ गीतांनी समस्ताना रडविले होते. ‘गवताला जेव्हा भाले फुटतात’ या ऐतिहासिक नाटकात यशवंत तळेकर नावाच्या कलावंताने व्यासपीठावर यवनांशी लढाई करणाऱ्या प्रसंगात अशी गोल उडी जागच्या जागी मारली ते पाहून टाळ्यांचा कडकडाट कितीतरी वेळ चालला होता. या प्रसंगाचे वर्णन करायचं म्हणजे त्या कलाकाराला रसिक प्रेक्षकातून ५ रुपयाचं बक्षीस दिले. त्यावेळेचे ५ रुपये कमी नाहीत.तेव्हा मिल कामगारांना महिना ६० रुपये पगार होता. दुर्लक्षित ऐतिहासिक आणि काव्यमय असे वेगळे विषय अतिशय कल्पकतेने हाताळणारी नाट्यमंडळे आणि त्यांचा नाटक दर्जा, उत्कृष्ट अभिनय व्यावसायिक नाटकांना देखील मागे टाकत असे.वकृत्व स्पर्धेत अरुण पवार नावाच्या विद्यार्थ्याने इंग्लिश मध्ये भाषण करून नवा पायंडा पाडला होता. विशेष म्हणजे घराघरातून माणसं या स्पर्धकांना प्रोत्साहन द्यायला यायची. बक्षीसही देऊ करीत होती.
या सप्ताहात सात दिवस दारूबंदी असायची. सतत काहींना काही कारणास्तव होणाऱ्या राडेबाजीला मज्जाव म्हणजे गांधी सप्ताह. जेथे दारूचे धंदेच बंद तेथे मारामारी होत नसे. भांडण तंटे नव्हते. तरीही काही जन घराघरात भूश्याच्या गोणीतून दारू आणून विकायचा प्रयत्न करीत पण पोलीस ठाणे अशा मंडळींची वरात काढीत होते. नशाबंदी मंडळाचे दर्जेदार कौटुंबिक, राष्ट्राभिमान जागृत करणारे चित्रपट पाहायला मिळत होते. यामुळे बाल्यावस्थेतील दैनंदिन वर्तनात परिवर्तन घडून येत होतं. मुलांना त्यावेळेस शाळा एके शाळा… कोचिंग क्लास नाहीत आणि घरी शिकवणी नाही कारण घरातलेच शिकलेले नव्हते त्यामुळे ते अभ्यास काही घेत नसत. मग आपल्याला मस्त उंडारण्याशिवाय दुसरं काम काय…! त्या उंडारण्यात मजा होती. विविध प्रकारचे खेळ खेळायला मिळत. अशा वेळी बालकांचे विविध कलागुण गांधी सप्ताहात पहायला मिळत. आपल्यातला कलावंत, बुद्धिवंत विभागात दिसू लागला.
ते अहिंसेचे मार्गावरचे पुजारी पिकल्या पानाप्रमाणे गळून पडू लागले आणि या उत्सवाची शान हळूहळू लोप पावत गेली. आज गांधी सप्ताह होत नाही. पण धाकु प्रभुजी वाडी सार्वजनिक मंडळाने महात्मा गांधी जयंती अव्याहतपणे सुरु ठेवली आहे. खरं तर या गांधी सप्ताह बंद होण्यामागे राजकारण आहे . कुटनीती रचली गेली.पण त्या फंदात मला पडायचे नाही.
त्या मान्यवरांचे कष्टाचे,योगदानाचे, कौशल्याचे, आंनद देणारे क्षण अविस्मरणीयच म्हणजे अंधार फार झाला असतना पणती जपून ठेवतो त्याप्रमाणे माझ्याच नव्हे तर आजही क्रित्येकांच्या हृदयात तेवत आहेत.
*अशोक भेके*