आदिवासींना आपल्या हक्काच्या जमिनी मिळाव्यात यासाठी धुळे-नंदूरबार परिसरात १९७२ साली देशात पहिला लढा उभा राहिला. या लढय़ाचे प्रमुख नेतृत्व नजूबाई गावित यांनी केले होते. हा लढा रस्त्यापासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या दरवाजापर्यंत नेण्याचे मोठे योगदान त्यांचेच आहे. आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी उभ्या केलेल्या संघर्षातून त्यांची नकळतपणे नेणीव घडली आणि त्यातूनच ‘आघोर’, ‘तृष्णा’, ‘भिवा फरारी’ या कलाकृतींची निर्मिती होत गेली. याच नेणिवेच्या आविष्कातून घडलेला नजूबाईंचा ‘नवसा भिलणीचा एल्गार!’ हा पहिला कथासंग्रह लवकरच प्रकाशित होत आहे.
धुळे जिल्ह्यातल्या भूमिहीन आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या आणि जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण झालेल्या नजूबाई गावित यांचा ‘नवसा भिलणीचा एल्गार!’ हा कथासंग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. एकूण सात कथांचा समावेश असलेल्या या कथासंग्रहातील ‘जवानीमा किसबीण’, ‘धडमपणा डाकीण’,‘मी ह्येर ना, नदी सय’,‘बांबूची मोळी’ या तीन कथा ‘सत्यशोधक मार्क्सवादी’च्या जून, मार्च आणि सप्टेंबर-ऑक्टोबरच्या १९९२च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या आहेत. १९९२च्या काळात गिरीश कर्नाड, विजय तेंडुलकर, शरणकुमार लिंबाळे आदी अनेकांनी नजूबाईंची ‘बांबूची मोळी’ ही कथा वाचून त्यांना पत्र लिहून कथा आवडल्याच्या प्रतिक्रिया कळविल्या होत्या, नाटककार विजय तेंडुलकर याच कथेवर चित्रपट तयार करण्याच्या तयारीत होते. अशी ही कथा वाचकांना ‘नवसा भिलणीचा एल्गार!’ या कथासंग्रहाच्या माध्यमातून पुन्हा वाचकाला उपलब्ध झाली आहे. नजूबाईंनी सुरुवातीला १९९५ साली ‘आदोर’ ही आत्मनिवेदनपर कादंबरी लिहिली होती. त्यानंतर चार वर्षानी ‘तृष्णा’आली आणि तीन वर्षापूर्वी ‘भिवा फरारी’! नजूबाईंनी मोजक्याच कथा लिहिल्या आहेत. त्या सर्व कथाचं संकलन असलेला ‘नवसा भिलणीचा एल्गार!’ त्यांचा पहिलाच कथासंग्रह! नजूबाईंची खरी ओळख देशातील पहिल्या स्वतंत्र आदिवासी लेखिका अशी आहे. नजूबाईंनी जेमतेम चौथीपर्यंत शिक्षण घेतलेलं असलं तरी त्यांची प्रतिभाशक्ती आणि साहित्यातील जीवनवादी दृष्टिकोन लक्षात घेता त्यांची प्रत्येक साहित्यकृती मराठी साहित्याला आयाम देणारी ठरत आहे. त्याचे हे लिखाण लेखिका बनण्याच्या ओढीतून घडलेले नसून ते स्वभावत: त्यांच्या संघर्षशील आयुष्यातून घडत गेले आहे. यामुळेच या संघर्षानेच ज्ञान प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची त्यांची नेणीव घडली. आदिवासींचे आयुष्य एखाद्या चलत्चित्राप्रमाणे त्यांनी रेखाटले आहे. स्वत:च्या नकळत ‘परिणत’ साहित्यिका बनलेल्या नजूबाईंनी उभी केलेली पात्रे हे साहू बोलीतून बोलताना दिसतात. त्यामुळे बिगर आदिवासी समाजालाही त्यांचे लेखन सहज भावते. ओघवती व साधी शैली ही त्याच्या संपूर्ण लिखाणाची वैशिष्टय़े म्हणता येतील. साध्या सरळ जीवनशैलीची त्यांच्यावर छाप असल्यामुळे त्यांच्या कथासंग्रहातील प्रत्येक पात्र हे आपल्या आजूबाजूच्या साहू समाजाचे आणि त्यापलीकडे आदिवासीच्या जीवनात असलेल्या तीव्र संघर्षाचे भयाण वास्तव मांडताना दिसतात.
मुळातच ज्ञानप्रक्रियेमध्ये नजूबाईंसारख्या आदिवासी स्त्रीने येणे हा एक चमत्कार म्हणायला हवा. अद्याप खुद्द साहू समाजातील शोषित घटकसुद्धा या ज्ञानप्रक्रियेपासून कितीतरी दूर आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दशकात दलित, ग्रामीण साहित्य प्रस्थापित व्यवस्थेच्या वळचणीला गेल्यामुळे त्यात नावीन्य उरलेले नाही. यामुळे ते मरणासन्न अवस्थेत गेल्याचे दिसते. या कारणामुळे नजूबाईंचा ‘नवसा भिलणीचा एल्गार!’ हा कथासंग्रह दलित साहित्याला नवं जीवनदान देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, असे वाटते. या कथासंग्रहातील प्रत्येक कथा ही आदिवासी समाजातील आणि देशातील हजारो वर्षाच्या पुरुषसत्तेचा बुरखा फाडणा-या आहेत. केवळ व्यवस्थेच्या विरोधात शिव्या घालणारे लिखाण त्यांनी केले नाही. त्यांच्या कथेतील प्रत्येक पात्र हे या देशातील व्यवस्थेचा एक भाग असते. ती व्यवस्था आदिवासी कुटुंबातच आहे, असे नाही तर त्याचा प्रत्यय सर्वच समाजात कमी-अधिक फरकाने दिसून येतो. यामुळे या कथासंग्रहातील प्रत्येक कथा ही या देशातील व्यवस्थेला एक नवे आव्हान निर्माण करणारी आहे.
स्त्री ही स्वभावत:च समतावादी असते. ती समतेच्या विद्रोहाने पेटून उठली तर पुरुषी व्यवस्था उलथून टाकू शकते. यामुळेच तिला विद्रोहाच्या पातळीवर येऊ न देता आत्यंतिक दमनावस्थेत सोडणे हे पुरुषी व्यवस्थेचे परमकर्तव्य असते. भारतीय जात-जमात, वर्ग समाजव्यवस्थेमध्ये स्त्री ही तीनस्तरीय दमनाची शिकार असली, तरी आधुनिक काळामुळे तिला लाभलेले निमस्वातंत्र्य तिला समग्र समतेच्या संघर्षाकडे घेऊन जाऊ शकते. त्यामुळे पुरुषी व्यवस्था नष्ट होऊ शकते. अधिकार वंचित होऊ शकते. या पुरुषी असुरक्षित भावनेतूनच तिला डायण, डाकीण ठरवून या संघर्षापासून दूर ठेवले जाते. तिला स्वातंत्र्यापासून, अधिकारापासून कायम वंचित ठेवले जाते. याच सर्व व्यवस्थेच्या विरोधात तिचा संघर्ष, बलिदान सुरू आहे. सीता, ताटका, शबरी, शूर्पणखा यांनी निर्ऋतीच्यास्वातंत्र्य, समता व मित्रता या मूल्यत्रयीच्या आधारे वैराज्याची जी परंपरा जतन केलेली आहे व त्या मूल्यातून नवसमाजवादाची निर्मिती होणार आहे. हा स्त्रीच्या सामूहिक नेणिवेचे अपत्य हाच नजूबाईंच्या कथासंग्रहाचा मूळ गाभा आहे. नजूबाईंच्या प्रत्येक कथेत स्त्रियांचा व्यवस्थेच्या विरोधातील संघर्ष असला तरी कुतर-खांब या कथेत गोमा, झिमा आणि गो-या या तिघांची कथानके आदिवासींच्या जीवनातील इतर अनेक अंग उलगडून दाखवताना दिसतात.
नजूबाईंच्या प्रत्येक कथेमधून जातिव्यवस्थेचे विदारक व मरणोन्मुख चित्र पाहावयास मिळते. यामुळेच ‘नवसा भिलणीचा एल्गार!’ या कथेतील पुरुषसत्तेचे बळी ठरलेली नवसा म्हणते, ‘आसरा मावल्यांनो! पुरुषसत्तेचा नाश होऊन पुढच्या काळात बायांचं राज येओ!’ तर दुसरीकडे नव-याच्या विरोधात बंड करून आपले आयुष्य नव्याने सुरू करताना ‘मी मर्दासारखी आहे, परक्या कुत्र्याची सेवा करण्यापेक्षा आईबाची सेवा मोठी’ असे सांगून व्यवस्थेला हादरे देणारीही ठरते. आसरांनी केलेल्या नवसातून जन्मलेली सामाजिक सर्वहारांची प्रतिनिधी म्हणून नवसा भिलीण जातिव्यवस्थेच्या विरुद्ध एल्गार करते. या कथासंग्रहातील जवानीमा किसबीण, धयडपणमा डाकीण या कथेत याच व्यवस्थेने डाकीण ठरवलेली तानकुबाईची कथा ही मनाला प्रचंड वेदना देऊन जाते. तानकुबाईचा दोष केवळ मूल होत नाही इतकाच असतो. व्यवस्थेने वांझ ठरवलेली तानकुबाई आपल्या नव-याला नुसती अडचणीची ठरत नाही तर तिला विकण्यापर्यंत नव-याची कशी मजल जाते याचे हृदयद्रावक चित्र लेखिकेने उभे केले आहे. भुताळ्या या कथेतील वर्णन वाचताना अंगावर काटा येतो. मंगळ्या भगताकडून चालवलेल्या अमानुष प्रथेबद्दल चीड निर्माण होते. एकूणच नजूबाईंच्या या कथासंग्रहात देशातील सर्व कष्टकरी, शोषित, महिलांचा व स्त्रीसत्तेचा आणि नवसमाजवादाची उभारणी करण्याचे सामर्थ्य देतो. गेल्या दोन दशकांनंतर मराठी साहित्याला समृद्ध करणारा हा कथासंग्रह म्हणून आणि येत्या काळात मराठी कथेला एक नवे आयाम देणारा कथासंग्रह ठरू शकेल.
नवसा भिलणीचा एल्गार
सुगावा प्रकाशन
पानं : ९६ किंमत : ७० रुपये
very nice artical!!!!