गाईच्या दुधाला ५ रुपये अनुदान थेट शेतक-यांच्या खात्यात जमा झाले नाही तर १६ जुलैपासून मुंबईचा दूधपुरवठा तोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.
मुंबई- गाईच्या दुधाला ५ रुपये अनुदान थेट शेतक-यांच्या खात्यात जमा झाले नाही तर १६ जुलैपासून मुंबईचा दूधपुरवठा तोडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला आहे.
ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दूध धंदा तोटय़ात गेला आहे, असे असताना दुधाच्या बाबतीत सरकारने काहीही केले नाही. त्यामुळे १६ जुलै पासून मुंबईत दुधाचा एक थेंबही येऊ देणार अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेन घेतलीय. वेळ प्रसंगी दूध वारक-यांना वाटू पण मुंबईत दूध कोणत्याही परिस्थितीत येऊ देणार नाही. त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.
पुण्यात साखर आणि दूध प्रश्नी २९ जून रोजी मोर्चा काढून सरकारला इशारा दिला होता. मात्र सरकारने याकडे कानाडोळा केला. त्यामुळे दुधसंकलन आणि दूध विक्री बंद आंदोलनामुळे जी परिस्थिती उद्भवेल त्यास सरकार जबाबदार असेल पण यापुढे शेतक-यांची लूट होऊ देणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला.
दुध भुकटी, पावडर आणि लोणी जीसटीमधून वगळा
सध्या दुधउत्पादक ढासलेल्या दरामुळे आर्थिक संकटात सापडलाय. दुधाचा उत्पादन खर्च ३५ रुपये लिटरवर जाऊन पोहोचलाय. मात्र सध्या शेतक-यांना १५ रुपये दर मिळतो. याबाबत दुधसंघाच्या प्रतिनिधीसह प्रत्यक्ष भेटून सरकारला याबाबतची समस्या मांडली होती. यावर सरकारने दुधाच्या भुकटीसाठी ३ रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ५३ कोटी रुपये खर्चही करण्यात आला आहे. मात्र या ५३ कोटी रुपयांपैकी एक रुपयाही दूध उत्पादन करणा-यांना मिळाला नाही. सरकारने या प्रश्नाकडे गंभीरपणे लक्ष देण्याची गरज असताना जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच दूधविक्री करायची नाही असा निर्णय घेण्यात आला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. दूध प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी काहीही बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. दूध उत्पादकांसाठी चंद्रकांत पाटील यांनी काय केले आहे ते आगोदर सांगावे आणि नंतर बोलावे असेही राजू शेट्टी म्हणाले. गोवा आणि कर्नाटक जर दुधाला अनुदान देत असेल तर महाराष्ट्र सरकारला का शक्य होत नाही असे शेट्टी म्हणाले.
परराज्यातील दूधाला नो एण्ट्री
राज्यात सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर भागातील दूध बंद झाल्यानंतर गुजरात आणि कर्नाटक या राज्यातून मुंबईत दूध आणण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र गनिमीकावा करून कोणत्याच राज्यातून महाराष्ट्रात दुधाचा एकही थेंब येऊ दिला जाणार नाही. वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन वाट्टेल ते करण्याची आमची तयारी असल्याचेही खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. दुधसंकलनासाठी जबरदस्ती करणार असाल तर गाठ स्वाभिमानीशी आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
त्या पेक्षा दुध संघाचे दुध बंद का करत नाही ?