शिवसेनेचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत, असा हल्लाबोल करत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे वस्त्रहरण केले.
रत्नागिरी- शिवसेना ही थापा मारणारी सेना आहे. शिवसेनेचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. कोकणात येणा-या प्रत्येक प्रकल्पाला यांचा विरोध असतो तो रत्नागिरी, सिंधुदुर्गातील लोकांसाठी नव्हे तर कामांसाठी. काम मिळाले नाही की कंपनी बंद करायची. जैतापूर प्रकल्पालाही विरोध येथील जनतेच्या भल्यासाठी नसून, राज्यातील २९ औष्णिक प्रकल्पांचे उखळ पांढरे व्हावे यासाठी सारा खटाटोप सुरू आहे, असा हल्लाबोल करत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी येथे शिवसेनेचे वस्त्रहरण केले.
शिवसेना-भाजप जातीयवादी पक्ष आहेत. जाती-जाती, धर्मा-धर्मात तेढ निर्माण करायची आणि त्याचा राजकीय फायदा उठवण्याचे काम केले जात आहे. या जातीयवादी शक्ती वेळीच ठेचण्याची गरज आहे. आतापर्यंत अल्पसंख्याक समाज ठामपणे काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे. कोकणातील सर्वसामान्य जनतेचे आयुष्यमान उंचावण्यासाठी, त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारचे यापुढील काळात प्रयत्न राहणार असून, याकरिता मच्छीमार, अल्पसंख्याक समाजाने काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहनही त्यांनी केले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार डॉ. निलेश राणे यांच्या प्रचारासाठी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाटय़गृहात आयोजित अल्पसंख्याक समाजाच्या मेळाव्यात ते पुढे म्हणाले की, शिवसेनेत आता कर्तृत्ववान माणसेच राहिलेली नाहीत. भुजबळ, भास्कर जाधव, गणेश नाईक, नारायण राणे सगळे बाहेर पडले. आता राहिला तो विनायक राऊत यांच्यासारखा गाळ.
उद्धव ठाकरे यांनी येथे येऊन कोणते विषय मांडले? त्यांना मच्छीमारांचे प्रश्न माहीत आहेत? गाळ कसा काढावा ते माहीत आहे? दुष्काळासाठी कशी मदत करावी माहीत आहे? प्रक्रिया युनिट कसे असावेत यावर चर्चा केली का? याबाबत उद्धव ठाकरे यांच्याकडून अपेक्षा करणे चुकीचे आहे. अशा प्रकारची विचारसरणी, अभ्यास त्यांच्याकडे नाही. ३९ वर्षे आपण शिवसेनेत होतो. त्यामुळे आपल्याला माहिती आहे. उद्धव ठाकरेंना मच्छीमार, बागायतदारांचे प्रश्न माहीत नाहीत. ते विकासावर काय बोलणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जसा जूनमध्ये पाऊस आल्यावर बेडूक बाहेर येतात, तशी निवडणूक आली की हे बिळातून बाहेर येतात. हे महाशय कोणावर बोलले? उदय सामंत यांच्यावर. सामंत यांच्यासारखा चांगला सहकारी मंत्रिमंडळात आहे. त्यांच्यावर टीका करण्यासारखे काय आहे. नेहमी काम करत असतात. चांगला अभ्यास आहे. ड्रेझर म्हणजे काय, याची माहिती सामंत यांना आहे. उद्धव ठाकरे यांना ड्रेझर म्हणजे काय, हे तरी माहीत आहे का? एक-दोन मासे माहिती असतील. फयान आले त्या वेळी शिवसेनेतील कोण नेता आला? कोकणावर संकट आले की शिवसेना-भाजपमधील कोणीही येत नाही, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. कोकणातील सण, संस्कृती तरी यांना माहीत आहे का, असा टोलाही राणे यांनी या वेळी हाणला. साखरी नाटे येथे राणे यांनी एकटे येऊन दाखवावे, असे काही जण बोलतात. साखरी नाटेत काय, महाराष्ट्रात कुठेही एकटे येण्याची माझी तयारी आहे. वेळ आणि दिवस सांगा, असे राणे यांनी ठणकावून सांगितले. मात्र हे विषय लोकसभा निवडणुकीचे होऊ शकतात का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सर्व जाती-धर्माच्या लोकांना सांभाळून घेणारा, त्यांची प्रगती साधणारा आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करणारा माणूस पंतप्रधानपदाचा उमेदवार हवा. नरेंद्र मोदींसारखा जो प्रतिज्ञापत्र खोटे देतो तो देशाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कसा होऊ शकतो? जातीजातीमध्ये दंगली घडवून त्याचा राजकीय फायदा घ्यायचा, सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा मिळवण्याचे काम मोदी यांनी केले आहे. गुजरातचा विकास हा बकवास असून, या राज्यातील गुंतवणुकीचे प्रमाण महाराष्ट्रातील गुंतवणुकीपेक्षा कमी आहे. गुजरात राज्याची प्रगती झाली असे थापा मारण्याचे काम मोदी करतात आणि मोदी थापा मारतात हे त्यांच्याच पक्षातील उमा भारती सांगतात. नरेंद्र मोदी हे विकास पुरूष नसून ते विनाशपुरुष आहेत, अशी परखड टीका राणे यांनी या वेळी केली.
केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी अन्नधान्य उत्पादनात देशाला स्वावलंबी बनवण्याचे काम केले. देशाची गरज भागवून जगातील अठरा देशांना धान्य पुरविण्याचे काम केले जात आहे. अडीच लाख कोटीची निर्यात होत आहे. गेल्या दहा वर्षात केंद्र सरकार आणि गेल्या १५ वर्षात राज्य सरकारने केलेला विकास मांडण्याचे काम आम्ही करत आहोत. विरोधक येथे येऊन फक्त आघाडीवर टीका करतात. या विरोधकांनी लोकांसाठी काय केले? कोणत्या विकासाच्या योजना आणल्या? जनतेचे कोणते हित साधले, असे सवाल त्यांनी उपस्थित केले. केंद्र सरकारने अन्न सुरक्षा विधेयक आणले. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी हे घडवून आणले. देशातील जनतेला स्वस्त धान्य देण्यासाठी सव्वा लाख कोटी खर्च करणार आहोत. राजीव गांधी जीवनदायी योजना राबविण्याचे काम आघाडी सरकारने केले. केवळ अन्न न देता माणसाचे प्राण वाचविण्याचे काम या योजनेतून करण्याचे काम काँग्रेस आघाडी सरकारने केले. हे शिवसेना करू शकत नाही. कल्याणकारी राष्ट्र घडवायचे काम काँग्रेस आघाडीलाच करायचे आहे. त्यासाठी पाठबळ द्या, असे आवाहन त्यांनी केले.
सावंतवाडीत आज धडाडणार राणे यांची तोफ
गेल्या काही दिवसांतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री नारायण राणे यांची तोफ मंगळवारी दुपारी सावंतवाडीत धडाडणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील प्रचार मंगळवारी संपुष्टात येत आहे. या मतदारसंघातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खासदार डॉ. निलेश राणे यांच्या प्रचारासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी मतदारसंघात सभा घेतल्या आहेत. मंगळवारी समारोपाची प्रचारसभा सावंतवाडीत दुपारी २ वाजता राणे, राज्यमंत्री उदय सामंत, आ. किरण पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.
Rane Modinvar tika kartat .Mag modinchya sabhela Gardi ka hote?