मध्यवर्ती शाळेच्या नावाने कोणतीही संघटना स्थापन करताना संबंधित शाळेच्या सर्वच आजी-माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करून समाविष्ट करणे अपेक्षित असते.
भुईबावडा- मध्यवर्ती शाळेच्या नावाने कोणतीही संघटना स्थापन करताना संबंधित शाळेच्या सर्वच आजी-माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करून समाविष्ट करणे अपेक्षित असते; परंतु प्रसिद्धी आणि मोठेपणाच्या हव्यासापोटी काहींनी एकत्र येऊन शाळेच्या नावाने संघटना स्थापन करणे केव्हाही समर्थनीय नाही, असा थेट आक्षेप घेत भुईबावडा येथील कथित ‘कर्तव्य फाऊंडेशन’ संघटनेवर आदर्श विद्यामंदिरच्याच विद्यार्थ्यांनी दोषारोप केला आहे.
संघटना स्थापन करताना कोणालाही विचारात घेण्यात आलेले नाही किंवा आजही शेकडो माजी विद्यार्थ्यांंचे म्हणणे ऐकून न घेता स्वयंघोषित पदाधिकारी या संघटनेच्या नावाखाली शाळेचा व पयार्याने समस्त आजी-माजी विद्यार्थ्यांंचा अवमान करत असल्याचे या विद्यार्थ्यांंचे म्हणणे आहे.
आदर्श विद्यामंदिर, भुईबावडा या शाळेत भुईबावडयासह रिंगेवाडी, ऐनारी, तिरवडे आदी गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. आतापर्यंत या शाळेने घडवलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्च पदांवर अभिमानास्पद कामगिरी बजावत आहेत. मात्र शेकडो विद्यार्थ्यांना पुसटशी कल्पनाही न देता त्यांना डावलून स्वप्रसिद्धीसाठी परिचित असलेल्या काहींनी ‘कर्तव्य फाऊंडेशन’ नावाची संघटना गुपचूप स्थापन केली.
प्रामुख्याने कोणतीही संघटना स्थापन करताना संबंधितांची जाहीर सभा घेणे व त्यातून निवडणुकीद्वारे पदाधिका-यांची नेमणूक करण्याची प्रचलित पद्धत आहे; परंतु तिला तिलांजली देत या स्वयंघोषित संस्थापकांनी स्वत:च आपापसात पदे वाटून घेतली. काही माजी विद्यार्थ्यांंनी त्यांच्या या कृत्याला विरोध दर्शवला असता, त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले गेले.
सोशल मीडियाद्वारे संघटनेचा अर्धसत्य व भंपक प्रचार करून आपली पोळी भाजण्याचा प्रकार सुरू आहे; परंतु जर तुम्ही समाजहितकारक काम करत आहात, तर अन्य विद्यार्थी तुमच्यासोबत का नाहीत, असा प्रश्न काही जाणकार विचारतात तेव्हा या पदाधिका-यांकडे उत्तर नसते.
दरम्यान, संघटनेच्या स्थापनेपूर्वी सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांंची जाहीर सभा का घेण्यात आली नाही? संघटनेचे कार्य समाजहित जपणारे आहे, तर तिची स्थापना अशी गुप्तपणे का करण्यात आली? सध्याच्या पदाधिका-यांची निवड जनमताने का करण्यात आली नाही?
संघटनेच्या नावापुढे पंचक्रोशी लिहिले आहे, मग मूळ समितीवर अन्य गावांतील विद्यार्थी का नाहीत? काही विद्यार्थ्यांंना त्यांची मते मांडायची आहेत, त्यासाठी जाहीर सभा लावण्यास पदाधिका-यांना भीती का वाटते? असे प्रश्न आदर्श विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी विचारले आहेत.
मा. संपादक
दैनिक प्रहार, मुंबई आवृत्ती
आपल्या वृत्तपत्रातून दिनांक ११ एप्रिल, २०१६. पान क्रमांक – ५ वरील बातमी “भुईबावड्यातील माजी विद्यार्थी संघटना वादाच्या भोवऱ्यात” ही बातमी कर्तव्य फाऊंडेशनची बदनामी करणारी असून आपल्या पत्रकाराने [भुईबावडा प्रतिनिधी ?] सुडबुद्धीतून दिली आहे असे दिसून येते.
कर्तव्य फाऊंडेशनही संघटना नसून एक चळवळ आहे. त्याच उत्तम उदाहरण सध्या भुईबावडा गावात सुरु असलेल फाऊंडेशनच काम आणि कौतुक. होळीचा मांड असुद्या किंवा भुईबावडा बाजारपेठ गेल्या १० दिवसात सर्वत्र एकच नाव होत “कर्तव्य फाऊंडेशन”
मुंबईकर माजी विद्यार्थ्यांची एकजुटता हा सर्वत्र चर्चेचा विषय होता. दिनांक ५ एप्रिल, २०१६ रोजी कर्तव्य फाऊंडेशन, शाळा व्यवस्थापन, भुईबावडा ग्रामस्थ अशी सभा झाली. सभेला उत्स्पुर्त प्रतिसाद लाभला. सर्वांनी एकजुटीने काम करायचं या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले. गावच्या ग्रामस्थांचा लाभलेला प्रतिसाद आणि शाळेने दिलेला सपोर्ट खूप महत्वाचा ठरला. भुईबावडा गावातील सर्वच स्तरातील मान्यवर या सभेला उपस्तीत होते. कर्तव्य फाऊंडेशनचा जन्म का आणि कशासाठी झाला ? याच विश्लेषण या सभेत करण्यात आल आणि सर्वांनी याच कौतुक केल. तशी बातमी दिनांक ६ एप्रिल २०१६ च्या प्रहार सिंधुदुर्ग मधून प्रकाशित झालीय आपण पाहु शकता.
याआधी डिसेंबर मध्ये दादर येथे “माजी विद्यार्थी मेळावा” आयोजित केला होता. भुईबावडा पंचक्रोशीतील बरेच माजी विद्यार्थी या मेळाव्याला उपस्थित राहिले. बऱ्याच मुलांनी संघटनेची पुढील कामे आणि बांधणी कशी असेल यावर प्रश्न विचारले व त्या दिशेने संघटनेची बांधणी करण्यात आली. त्यावेळी कोणीही विरोधक या सभेत आला नाही. एकंदरीत कर्तव्य फाऊंडेशन उभ राहण्यास या सभेच खूप महत्व आहे. कारण याच दादरच्या सभेत तिन्ही गावातून मिळून आजच्या कार्यकारी मंडळातले मोहरे संघटनेला लाभले. [उदा. नीलिमाताई सरफरे (तिरवडे विभाग), नितीन मोरे, महेश पाटणे, सुनील दळी, स्वप्नील साईल (एनारी विभाग) सुखदेव पवार (एनारी विभाग), गणेश गोसावी (तिरवडे विभाग), दिव्येश गुरव (तिरवडे विभाग), भरत मोरे (तिरवडे विभाग) ज्यांच्या अभ्यासावर व मेहनतीवर कर्तव्य फाऊंडेशन आज काम करत आहे.
त्यानंतर दिनांक ५ मार्च २०१६ “शिरोडकर सभागृह, परेल येथे संपूर्ण पंचक्रोशीतील म्हणजे भुईबावडा, तिरवडे, एनारी येथील ग्रामस्थांची, सेवाभावी संस्थांची, मंडळांची, माजी विद्यार्थ्यांची सभा कर्तव्य फाऊंडेशनने आयोजित केली होती. या सभेला तिन्ही गावातील मंडळी उपस्थित होती. सर्वाच्या मताने सहकार्याने पुढील वाटचाल करण्याचे या सभेत ठरले. सर्व उपस्थितांनी कर्तव्य फाऊंडेशनच्या या चळवळीच कौतुक केलं. या सभेत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. विविध स्तरावर चर्चा करण्यात आली. तेंव्हाही विरोधक कोठे होते ? की त्यांना सभेचे आमंत्रण मिळाले नाही ? सभेचे आमंत्रण तिन्ही गावातील प्रत्येक मंडळाला आम्ही दिले होते. या सभेत एक महत्वाचा निर्णय झाला की, आपण सर्वांनी एप्रिल महिन्यांत गावी जावून गावच्या ग्रामस्थांची एक बैठक घेवू अस या सभेत सर्वांमते ठरले व आपण दिनांक ५ एप्रिल २०१६ रोजी एक यशस्वी बैठक घेतली.
सर्वांनी दिलेलं पाठबळ व कौतुकाच्या थापेवर, आशीर्वादावर कर्तव्य फाऊंडेशनने पुढील जून महिन्यात शाळेत २ वर्ग डिजिटल करण्याच जाहीर केलं. सर्वांनी याला पाठिंबा देवून. मदतीचा हातही पुढे केला. भुईबावडा गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांना या वेळी घरोघरी जावून भेट देण्यात आली. सर्वांची मते जाणून घेण्यात आली, शिक्षक आणि ग्रामस्थ यांचा संवाद घडवून आणण्यात आला. शाळेच्या अडचणी व उणीवा आपण एकत्र मिळून दूर करू अस प्रत्येकाने आम्हास छातीवर हात ठेवून सांगितलं. जे गेल्या अनेक वर्षात घडलं नाही अस काम कर्तव्य फाऊंडेशनने गेल्या काही महिन्यांत करून दाखवलं. [तशी बातमी दिनांक ६ एप्रिल २०१६ च्या प्रहार सिंधुदुर्ग मधून प्रकाशित झालीय ]
विरोधकांचे पुन्हा एकदा आभार आपण धरलेला मार्ग यापुढे कधीही सोडू नका. असाच विरोध कायम राहिला तर आमचा आत्मविश्वास असाच वाढत राहील. काहीही मनात प्रश्न असतील तर ते जाहीरपणे मांडा. संस्थेच्या वतीने गेल्या ३ महिन्यांत ज्या सभा आयोजित केल्या होत्या त्यात तुम्ही येवून आपल्या प्रश्नांचे समाधान करून घेणे गरजेचे होते. तेंव्हा आपण कुठे होतात? की आपणास आम्ही आमंत्रण दिले नाही?
असो,
सर्वाना जाहीर अवाहन, कुणालाही कसलीही शंका असल्यास आपण संघटनेच्या अध्यक्षांना विचारू शकता. आपल्या प्रश्नांचे समाधान करण्यात येईल. कर्तव्य फाऊंडेशन सोबत संपूर्ण गाव एकजुट होवून काम करण्यास तयार असताना असे पोकळ विरोध करून आपण काय साध्य करणार आहात. जर कोणी चांगले काम करत असेल तर त्याच्या पाठीशी उभे रहा. किंवा त्यात स्वता सामील व्हा…!! आपले स्वागत असेल. ही संघटना सर्वांसाठी खुली असून याचे अधिकृत सभासद होणे गरजेचे आहे अजुन भुईबावडा पंचक्रोशीतून १५० ते २०० विद्यार्थ्यांनी आपली सभासद नोंदणी केली असून यात, गावातील अनेक मान्यवरांचा, प्रतिष्ठीत ग्रामस्थांचा समावेश आहे. कर्तव्य फाऊंडेशनची ध्येय व उधिष्ठ ठरलेली असून ती आपल्या सर्वांपर्यंत आम्ही पोहचवली आहेत. काहीही शंका असल्यास जरूर संपर्क करा. – ९९३०६३६४७७
[ टीप : भुईबावडा येथील आदर्श विद्यामंदिर भुईबावडा, माजी विद्यार्थी संघटना “कर्तव्य फाऊंडेशन”ची जाहीर सभा ]
वेळ व ठिकाण :- रविवार दिनांक २४ एप्रिल २०१६ रोजी सकाळी १०:०० वाजता
आर्य समाज हॉल, ना. म. जोशी मार्ग, वेस्टर्न रेल्वे वर्क शॉप समोर, लोअर परेल, मुंबई – ४०००१३
————————————————————–
धन्यवाद
गणेश तुकाराम पावले
(उपसचिव – कर्तव्य फाऊंडेशन)