दिग्दर्शकाचं व कोळी बांधवाचं काम जवळजवळ सारखंच असतं. कोळी बांधव एक एक धागा जोडून विणून त्यातून आपल्याला हवं त्या आकाराचं जाळं तयार करतात. नंतर ते समुद्रात फेकतात तेव्हा ते एखाद्या पॅराशूटप्रमाणे उघडतं व खाली बसतं. त्यात मासे आले की, एक टोक धरून तो जाळं ओढायला सुरुवात करतो. कुशल चित्रपट दिग्दर्शक असंच काहीसं करत असतो.
तो आपल्या प्रेक्षकांचा विचार करून प्रसंग, पात्रांच्या माध्यमातून एक जाळं विणतो व तेच या करमणूकविश्वाच्या समुद्रात फेकतो तेव्हा आपल्यासारखे प्रेक्षक त्यात अगदी आपसूक अडकले जातात. राजीव पाटीलकडे प्रेक्षकांवर असं गारुड करण्याची शक्ती होती. ‘वंशवेल’ हा चित्रपट केवळ पाटीलने केला म्हणून तो इतका साचेबद्ध झाला, इतर कुणी केला असता तर तो केवळ एक प्रचारकी थाटाचा सर्वसाधारण चित्रपट झाला असता.
पश्चिम महाराष्ट्रातल्या एका लहानशा शहरात दादासाहेब देशमुख (किशोर कदम) यांचं मोठं प्रस्थ आहे. या शहरात त्यांचं एक हॉस्पिटलही आहे. दादासाहेबांना दोन मुलं. मोठा नीलेश देशमुख (सुशांत शेलार) व धाकटा अनिल देशमुख (शंतनू गांगणे). बंगला, नोकरचाकर असा सारा जामानिमा आहे. दादासाहेबांचा आपल्या या कुटुंबावर वचक आहे. नीलेशची पत्नी प्रियंका (मनीषा केळकर) ही गरोदर आहे. दादासाहेबांना ही गोष्ट कळल्याबरोबर ते गर्भजल चाचणी करायला सांगतात. या चाचणीत तिच्या ओटीपोटात वाढणारं अपत्य मुलगी असल्याचं असं समजतं.
या घरातल्या दादासाहेबांच्या नियमाप्रमाणे पहिला मुलगाच हवा असतो. आपण इतकं मोठं साम्राज्य उभं केलं, ते सांभाळायला आपल्या घराण्याला वारस हवा म्हणून तिला गर्भपात करायला सांगण्यात येतं. प्रियंकाला आपल्या मुलीला जन्म द्यायचा असतो. दरम्यान, धाकटा भाऊ अनिल याचं लग्न होतं. त्याला (नम्रता गायकवाड) ही गायनाकॉलोजिस्ट बायको मिळते. ती त्यांच्या घरच्या हॉस्पिटलमध्ये यायला लागते. आपल्या या हॉस्पिटलमध्ये लिंगनिदान केलं जातं, असं तिला वाटल्याने ती त्याचा शोध घेऊ लागते.
चित्रपट या वळणावर आल्यावर सुरू होतं एक जबरदस्त नाटय़. या नाटय़ाचा एक भाग बनून जात असताना आपल्याला आपण या कथानकात कधी गुंतून जातो ते कळतही येत नाही. राजीवने आपल्या सगळय़ाच प्रश्नांची इतकी काटेकोरपणे उत्तरं दिली आहेत की, शेवटी आपण एक आशादायी चित्रपट पाहून बाहेर पडतो.
अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये दिग्दर्शक व विचारी दिग्दर्शक यातला फरक कळून येतो. आपल्याला सामाजिक संदेश तर द्यायचा आहे मात्र तरीही चित्रपट प्रचारकी वाटता कामा नये. आपल्याला दिलेल्या चौकटीत काम करायचं आहे, तरीही आपल्याला चौकटीतलं काम करायचं नाही. आपल्याकडे कलाकारांची जबरदस्त फौज नाही तरी आहेत त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्याकडून प्रत्येक प्रसंग अगदी वाजवून घ्यायचे आहेत. समाजातल्या चुकीच्या गोष्टींचं आपण समर्थन करतोय, असंही वाटता कामा नये. अशा अनेक आघाडय़ा राजीवने या चित्रपटातून लीलया सांभाळलेल्या आहेत. त्याच्याविषयी अधिक लिहिता आलं असतं, मात्र त्या ओघात रहस्यभेद होण्याची शक्यता आहे.
या प्रकारच्या चित्रपटांसाठी जी निर्मितिमूल्यं लागतात ती ‘वंशवेल’मधून अगदी सहज दिसून येतात. या चित्रपटातली वातावरणनिर्मितीही जबरदस्त आहे. मोठाली शेतं, भव्य रुग्णालय, दादासाहेबांचा बंगला, त्यांच्या गाडय़ा या सा-यांमधून ती दिसून येतात.
कोणताही चित्रपट त्यातल्या अभिनयाच्या जोरावर उठून दिसतो. राजीवचे कलाकार हे त्याचं नेहमीचं वैशिष्टय़ आहे. अगदी ‘सावरखेड’पासून ते ‘७२मैल’पर्यंत. दिग्दर्शकाची ताकद किशोर कदम व अंकुश चौधरी या दोघांनी अगदी चोख दाखवून दिली आहे. किशोर कदम यांचा दादासाहेब हा त्याचा संपूर्ण आब दाखवणारा आहे. त्यातही चेह-यावरच्या काही खास मुद्रा दादासाहेबाची संपूर्ण जडणघडण स्पष्ट करतात. त्यांची देहबोली, त्यांचा वावर सगळ्याच जागा त्यांनी चोख दाखवल्यात.
अंकुश चौधरीची या चित्रपटात पूर्ण लांबीची भूमिका नसली तरी तो अतिथी कलाकार आहे. मात्र एखाद्या पाहुण्यानं घरी यावं व लगेच त्या घराचा ताबा घ्यावा असं त्याचं काम या चित्रपटात आहे. त्याच्या वाटय़ाला आलेले सगळेच प्रसंग त्याने अशा काही शैलीत केले आहेत की कौतुक करावं लागतं. इतर कलाकारांचाही अभिनय चांगला झाला आहे. आपल्याला मिळालेल्या सर्व प्रसंगांना साजेसा असा अभिनय त्यांनी केला आहे. सुशांत शेलारनं या चित्रपटात एक मोठी डॉक्टरची भूमिका केली आहे. ती त्याने मोठय़ा जबाबदारीने केली आहे. मनीषा केळकर आणि नम्रता गायकवाड यांनी लक्षात राहण्याइतपत अभिनय केला आहे. आई साकारणा-या विद्या करंदीकर यांची भूमिकाही मनाला भिडणारी आहे. एकाच वेळेस आपलं अस्तित्व असणं व नसणं त्यांनी चांगल्या प्रकारे दाखवलं आहे. किशोर कदमच्या दादासाहेबांविषयी काय बोलावं? ही भूमिका त्याने अगदी लीलया साकारली आहे. त्यातही त्याच्या काही क्लोज शॉट्सच्या वेळचा त्याचा मुद्राअभिनयही जबरदस्त आहे. राजीवचंचं दिग्दर्शन असल्याने प्रत्येक लहान-मोठय़ा गोष्टींचा अगदी साकल्याने विचार करण्यात आला आहे. त्यात कुठेही काहीही नाव ठेवायला नाही. हा चित्रपट त्याच्या या दिग्दर्शनासाठी अवश्य पाहायला हवा.
thnx