राजकारणापलीकडची मैत्री जपण्यात या देशात महाराष्ट्रच क्रमांक एकवर आहे.. सुसंस्कृत आणि सभ्य राजकारण ही महाराष्ट्राची परंपरा आहे. यशवंतरावांनी या परंपरेला अधिक उदात्त केले आणि महाराष्ट्राच्या अनेक सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारणांच्या पलीकडची मैत्री जपली आणि म्हणून या रुक्ष राजकारणात कुठे तरी मनाला प्रसन्नता देणारी एक हिरंवळ जाणवते. या सुसंस्कृत राजकारणातच महाराष्ट्राचे मोठेपण जपलेले आहे. नारायण राणे यांनी ठाणे येथील कार्यक्रमात या राजकारणाच्या मैत्रीच्या पलीकडचे धागे उलगडून दाखवले आणि तो कार्यक्रम एकदम उंचावर गेला. नारायण राणे यांचे वेगळेपणही त्या सभागृहातील श्रोत्यांना जाणवले. त्यामुळेच प्राचार्य अशोक चिटणीस यांच्यासारख्या व्यक्तीचा फोन आला आणि त्यानंतरच्या चिंतनातूनच जे सुचले ते..
दै. ‘प्रहार’च्या ठाणे आवृत्तीच्या द्वितीय वर्धापन दिन समारंभात दोन ऑगस्ट रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये एका चांगल्या चर्चेत पार पडला. तीन ऑगस्टला सकाळी प्राचार्य अशोक चिटणीस यांचा फोन आला. ते माजी प्राचार्य आणि ठाण्यातले एक मोठे साहित्यिक. त्यांनी फोनवर सांगितले की, ‘ठाणे प्रहारच्या कार्यक्रमात तुमचे नारायण राणेसाहेब खूप चांगले बोलले हो. राजकारणाच्या पलीकडची मैत्री हा त्यांचा मुद्दा मला फार भावला..’
‘राजकारणाच्या पलीकडची मैत्री’ हा महाराष्ट्राचा एक विशेष गुण. जिथे राजकीय मतभेद होतात, वेगवेगळे पक्ष असतात. आरोप-प्रत्यारोप होतात. पण गेल्या पन्नास वर्षातल्या राजकारणात ‘विरोध आणि द्वेष’ यातल्या सीमारेषा महाराष्ट्रातल्या ब-याच नेत्यांनी ब-याच काटेकोरपणे जपलेल्या आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार यांच्या राजकीय संस्कृतीमध्ये आणि भाले, काठया, बरची या आयुधांसह राजकारण करणारे प्रांत वेगळे आहेत आणि महाराष्ट्र वेगळा आहे. महाराष्ट्राचे वैशिष्टय काय तर इथले राजकारण ब-याच प्रमाणात सुसंस्कृत आहे.
अलीकडच्या काळात त्याला काही प्रमाणात विद्वेषाचे आणि एकमेकांना नखाने ओरबडण्याचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत. ‘प्रहार’च्या ठाण्याच्या कार्यक्रमात राजकारणापलीकडच्या मैत्रीची चांगली चर्चा श्री. नारायण राणे यांनी केली. अशोक चिटणीसांचा फोन आल्यानंतर मी पन्नास वर्षे मागे गेलो आणि महाराष्ट्राचे हे सुसंस्कृत राजकारण जपणारे नेते डोळयांसमोर आले. त्यात पहिल्यांदा आठवले यशवंतराव..
महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि सभ्य राजकारणाची सुरुवात यशवंतरावांनीच केली. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सरकारविरुद्ध विरोधी पक्ष यांच्यात विस्तव जात नव्हता. त्यावेळचे मुख्यमंत्री मोरारजी यांना तर ‘नरराक्षस’ अशी दुषणे दिली गेली आणि राजकीय वातावरण कमालीचे विरोधाचे झाले. यशवंतराव मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी व्यक्तिगत मैत्रीबरोबरच सार्वजनिक जीवनातील दोन पक्षांमधली टोकाच्या विरोधाची दरी पहिल्यांदा मिटवली.
संयुक्त महाराष्ट्र समितीने फ्लोराफाऊंटन येथे हुतात्मा चौकाचे शेतकरी आणि कामगारांचे स्मारक उभे करून महाराष्ट्रासाठी झालेल्या हुतात्म्यांचे कायमचे स्मरण ठेवले. त्या हुतात्मा स्मारकाला यशवंतरावांनी व्यक्तिगत पाचशे रुपयांची देणगी देऊन पावतीच फाडली. त्या काळात पाचशे रुपये खूप मोठी देणगी होती. त्या एका पावतीने राजकारणात निर्माण झालेल्या द-या दूर करणा-या अनेक पावत्या फाडल्या गेल्या.
विरोधी पक्षनेते असलेल्या एस. एम. जोशींना तर यशवंतराव अतिशय सन्मानाने वागवत. तीच गोष्ट उद्धवराव पाटलांची. एस.एम. आणि उद्धवराव कायमचे काँग्रेसच्या विरुद्ध. पण या पक्षीय विरोधाच्या भिंती मैत्री जपण्यात दोन्ही बाजूने आडव्या आल्या नाहीत. एस.एम. जोशींच्या सत्काराचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण होते आणि उद्धवराव पाटलांचा औरंगाबादच्या जाहीर सत्काराचे अध्यक्षपदही यशवंतरावांनीच भूषवले होते.
महाराष्ट्रातले त्यावेळचे हे वातावरण व्यक्तिगत संबंधातल्या कटुता संपवून टाकत असे आणि याला आणखीन एक मोठे व्यासपीठ होते, ते म्हणजे राजकीय नेते, कार्यकर्त्यांच्या घरी होणा-या लग्नकार्यात सर्व पक्षीय नेत्यांच्या होणा-या भेटीगाठी. त्याच्याही पलीकडे जुनी आठवण सांगायची तर नागपुरात दादा धर्माधिकारी काँग्रेसच्या विचाराचे आणि डॉ. हेडगेवार संघाचे संस्थापक. दोघांचे राजकीय विचार विरुद्ध. पण डॉक्टर भेटले नाहीत तर दादांना चैन पडत नसे आणि दादा भेटले नाहीत तर डॉक्टरांना चैन पडत नसे. यशवंतरावांनी हाच वारसा जपला.
वसंतराव नाईक राज्याचे साडेअकरा वर्षे मुख्यमंत्री होते. सुसंस्कृतपणाचा ते अतिशय मोठा आदर्श होते. एकही चुकीचा शब्द त्यांनी कधी उच्चारला नाही. जांबुवंतराव धोटे त्यांचे कायमचे विरोधक. पण वसंतराव नाईक यांनी राजकारणाच्या पलीकडची मैत्री जपली. धोटे यांना सरकारने तुरुंगात ठेवले असताना त्यांच्या मातोश्रींना रुग्णालयात दाखल करावे लागले हे समजल्यावर नाईकसाहेबांनी धोटे यांना पेरोलवर सोडले. पुण्याच्या येरवडा तुरुंगातून मुंबईला आणण्याकरिता गाडी दिली.
विमानाचे तिकीट तयार ठेवले. नागपूर विमानतळावर गाडी होती. नागपूर विमानतळावरून धोटेसाहेब थेट मेयो रुग्णालयात पोहोचले. वसंतराव नाईक गेल्यानंतर धोटे यांच्या डोळयांत अश्रू होते. राजकारणाच्या पलीकडच्या मैत्रीचे ते अश्रू होते.
रामभाऊ म्हाळगी हे जनसंघाचे आमदार. अतिशय अभ्यासू, अतिशय सुसंस्कृत. कम्युनिस्ट पक्षावर कडाडून टीका करणारे. त्यांच्याच बाकाच्या मागे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कृष्णा देसाई बसत. १९६६ साली नागपूरच्या अधिवेशनात कृष्णा देसाई आपल्या लहान मुलाला घेऊन आले होते. विरोधी आमदारांच्या दालनात त्यावेळी भारतीय बैठक होती.
कृष्णा देसाई यांची लक्षवेधी सभागृहात होती. कृष्णा देसाईंना सभागृहात जायचे होते. समोरून म्हाळगी जात होते. कृष्णा देसाईंनी त्यांना हाक मारली. ‘ए रामभाऊ, सभागृहात माझी लक्षवेधी आहे. माझ्या मुलाला सांभाळ. मी लक्षवेधी करून येतो..’ कृष्णा देसाई सभागृहात गेले. जवळजवळ चाळीस मिनिटे रामभाऊ म्हाळगी त्या मुलाजवळ इतक्या तन्मयतेने खेळत बसले की कृष्णा देसाई सभागृहातून परत आल्यावर लांबून ते पाहत होते. त्यांचे डोळे पाणावले होते..
राजकारणापलीकडची मैत्री ही अशी निर्व्याज, निरपेक्ष असते. महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेत्यांनी त्या त्या वेळच्या सरकारला झोड झोड झोडपले आहे. पण सभागृह संपल्यावर गळयात गळा घालून कॅन्टीनमध्ये हे सत्ताधारी आणि विरोधी आमदार चहाला जाताना महाराष्ट्रात अनेकवेळा पाहता आले आहेत. वाद मुद्दयाचा. तो विषय संपला की भांडण संपले. अशी एक नाही शेकडो उदाहरणे देता येतात.
विलासराव देशमुखांची आठवण अशावेळी होणार नाही, असे कसे होईल. मुंडे भाजपामध्ये, विलासराव काँग्रेसमध्ये. सभागृहात एकमेकांवर तुटून पडणारे. पण दोघांची मैत्री राजकारणाच्याच पलीकडची नाही. तर ‘मैत्री’ या शब्दाच्याही पलीकडची. हीच गोष्ट विलासराव आणि नारायणराव राणे यांची. विलासराव मुख्यमंत्री असताना नारायण राणे विरोधी पक्षनेते.
अभ्यासपूर्ण भाषणाने ते सरकारवर तुटून पडत. एकदा सभागृहात मतदान घेण्याचा विषय आला. काँग्रेसच्या बाकावर माणसे कमी. सोनिया गांधींनी विलासरावांना बोलावले तर ते दिल्लीला निघाले होते. सरकारपुढे पेच होता. विमानतळावरून विलासरावांनी नारायणराव राणे यांना सांगितले की, मतदान घेणारच आहात का? मी परत येऊ का? आज थोडी अडचण आहे.. तेवढयाच मोकळया मनाने नारायण राणे यांनी विलासरावांना सांगितले की, मी विषय मांडतो. पण मतदान मागत नाही. आपण शांतपणे दिल्लीला जा.. नारायण राणे यांनी मतदान मागितले नाही. सरकारचा त्यादिवशी पराभव होणार होता. तरी मतदान मागितले नाही. दिलेला शब्द पाळणे ही गोष्टही राजकारणातील मैत्रीपलीकडची आहे.
शरद पवार यांच्या संबंध टिकवण्याच्या भूमिकेला तर तोड नाही. सर्व पक्षांत त्यांचे मित्र झाले आणि अधिकारवाणीने महाराष्ट्रात ते आज कोणत्याही नेत्याला दोन गोष्टी सुनावू शकतात, ते त्याच मैत्रीतून. कोणालाही मदत करायला हे नेते तत्पर असतात. तिथे जात, पात, पक्ष हे कोणी कधी बघत नाही.
आणि बाळासाहेब ठाकरे. असा मोकळया मनाचा आणि मनाच्या दिलदारीचा नेता होणे नाही. नारायण राणे यांनी काही मतभेदाने सेना सोडली. अस्वस्थ मनाने सोडली. बाळासाहेबांबद्दल त्यांच्या मनात कायमचा आदर आजही आहे. लोकांना वाटले बाळासाहेब आणि राणे यांचे संबंध संपले. पण बाळासाहेबांचा एक दिवस अचानक फोन आला. ‘नारायण तू कसा आहेस?’ क्षणभर गदगद होऊन गेलेल्या नारायण राणे यांनी ‘साहेब, तुम्ही कसे आहात? बरे वाटले फोन केल्यामुळे’ असे सांगताना नारायण राणे यांच्या डोळयांतही पाणी आले.
जग जिंकणारा सिंकदरही इथून जाताना जिंकलेले जग इथेच टाकून गेला. राजकारण असो, समाजकारण असो किंवा व्यक्तिगत जीवन असो. त्यातले भेदाभेद हे कधीही टिकावू असता कामा नयेत. मागच्या पिढयांचे भांडण तर पुढच्या पिढयांनी कधीच चालवता कामा नये. राजकारणाच्या पलीकडची मैत्री जपायची. त्याचा अर्थ एवढाच आहे, मतभेद आणि मनभेद यातला फरक समजावून घेतला पाहिजे.
सत्ताधारी आणि विरोधी बाकावरचे दोन्ही नेते सुसंस्कृत आणि सभ्य राजकारण करणारे होते, तो यशवंतराव आणि एस.एम.यांचा काळ होता. एस.एम. जोशी हे मुंबई राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. समितीच्या धोरणाप्रमाणे समितीमधील सर्व पक्षांना एकेक वर्ष विरोधी पक्षनेते पद दिले गेले होते. एस.एम. यांचे विरोधी पक्षनेते पद संपल्यावर उद्धवराव पाटील विरोधी पक्षनेते झाले. वर्ष संपल्यावर एस.एम. जोशी यशवंतराव चव्हाण यांना सह्याद्री बंगल्यावर भेटायला गेले. ‘वर्षभर दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानायला आलो आहे. मी आता विरोधी पक्षनेता नाही,’ असे एस. एम. म्हणाल्यावर यशवंतराव चव्हाण म्हणाले, ‘माझ्याकरिता तुम्ही कायमचे विरोधी पक्षनेते आहात. स्वातंत्र चळवळीत आपण एका तुरुंगात बॅरेकमध्ये होतो हे मी कसे विसरू?’
जांबुवंतराव धोटे यांच्या मातोश्री आजारी झाल्या असताना वसंतराव नाईक यांनी त्यांना पेरोलवर सोडले. नंतर त्या ब-या होऊन घरी परतल्या. १९८० साली त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. म्हणून जाबुवंतरावांनी त्यांना नागपूरच्या मेयो रुग्णालयात दाखल केले. त्या बरेच दिवस आजारी होत्या.
जांबुवंतराव त्यांची शुश्रूषा करीत होते. त्याचवेळी वसंतराव नाईक हे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन पावल्याची दु:खद बातमी आली. जांबुवंतराव मेयो रुग्णालयातच बसलेले होते. त्यांच्या डोळयांतून अश्रू वाहत होते. त्यांचे कार्यकर्ते भेटायला आले तेव्हा जांबुवंतरावांच्या डोळयांतील अश्रू बघून त्यांना वाटले की, मातोश्रींचे काही कमी जास्त झाले की काय.. जांबुवंतराव म्हणाले, ’’नाही. आई ठीक आहे. पण मागच्या वेळी मेयो रुग्णालयात आईला दाखल करणारे वसंतराव आज नाहीत.’’
लेख atishay chhan aahe aavadla ,! dhanyvad!