केंद्र सरकारने मंगळवारी २०११ साली झालेल्या जनगणनेतील धर्मनिहाय लोकसंख्येची आकडेवारी जाहीर केली. यात भारतात मुस्लिमांची लोकसंख्या वाढली असून इतर सर्व धर्मियांची लोकसंख्या मात्र कमी झाल्याचे समोर आले आहे.
नवी दिल्ली- केंद्र सरकारने मंगळवारी २०११ साली झालेल्या जनगणनेतील धर्मनिहाय लोकसंख्येची आकडेवारी जाहीर केली. यात भारतात मुस्लिमांची लोकसंख्या वाढली असून इतर सर्व धर्मियांची लोकसंख्या मात्र कमी झाल्याचे समोर आले आहे. शिवाय लोकसंख्येतील सर्वात मोठा घटक असलेल्या हिंदूंची लोकसंख्या पहिल्यांदाच एकूण लोकसंख्येच्या ८० टक्क्यांपेक्षा खाली आली आहे.
२०११ साली झालेल्या या जनगणनेत भारताची एकूण लोकसंख्या १२१.०९ कोटी इतकी होती. यापैकी हिंदूंची लोकसंख्या ९६.६३ कोटी इतकी असून त्यात २००१ च्या जनगणनेच्या तुलनेत एकूण लोकसंख्येच्या टक्केवारीत ०.७ टक्क्यांनी घट झाली आहे. तर मुस्लिमांची लोकसंख्या १७.२२ कोटी असून त्यात २००१च्या तुलनेत एकूण टक्केवारीत ०.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शिवाय ख्रिश्चन धर्मियांची लोकसंख्या २.७८ कोटी, शीख धर्मियांची २.०८ कोटी, बौद्ध धर्मियांची ८४ लाख, पर्शियन धर्मियांची ७९ लाख तर जैन धर्मियांची लोकसंख्या ४५ लाख इतकी आहे. याव्यतिरिक्त कुठल्याही धर्माचे नसलेल्या नागरिकांची संख्या २९ लाख इतकी आहे.
२००१ ते २०११ या दशकात देशाच्या एकूण लोकसंख्येत १७.७ टक्क्यांनी वाढ झाली असून हिंदूंची एकूण लोकसंख्या १६.८ टक्क्यांनी, मुस्लिमांची एकूण लोकसंख्या २४.६ टक्क्यांनी, ख्रिश्चनांची १५.५ टक्क्यांनी तर शिखांची ८.४ टक्के,बौद्ध धर्मियांची ६.१ टक्के व जैनांची लोकसंख्या ५.४ टक्क्यांनी वाढली आहे. या धर्मनिहाय लोकसंख्येची एकूण १२१.०९ कोटींच्या लोकसंख्येतील टक्केवारीही यावेळी जाहीर करण्यात आली आहे. यात भारतात एकूण लोकसंख्येच्या ७९.०८ टक्के हिंदू धर्मीय नागरिक आहेत. तर १४.०२ टक्के मुस्लीम धर्मीय, २.३ टक्के ख्रिश्चन, १.७ टक्के शीख, ०.०७ टक्के बौद्ध, ०.७ टक्के पर्शियन, ०.४ टक्के जैन व ०.२ टक्के कुठल्याही धर्माचे नसलेले लोक आहेत.
मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या या २०११च्या जनगणनेच्या धर्मनिहाय आकडेवारीत जिल्हा, तालुका आणि शहर पातळीपर्यंत लोकसंख्येची स्त्री-पुरुष वर्गीकरणासहित आकडेवारीसुद्धा सरकारने जाहीर केली आहे. याआधी २०११ साली धर्मनिहाय लोकसंख्येची आकडेवारी जाहीर केल्याने वादाची स्थिती उत्पन्न झाल्याने सरकारने २०११ सालच्या जनगणनेची एकूण लोकसंख्या जाहीर करताना धर्मनिहाय आकडेवारी जाहीर केली नव्हती.
१९९१पर्यंत जम्मू-काश्मीरचा जनगणनेत समावेश नसल्याने २००१ साली तेथील जनगणना केल्यावर एकूण लोकसंख्येपैकी मुस्लिमांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर झालेले वाद शमल्यानंतर आता अचानक केंद्रातील मोदी सरकारने ही आकडेवारी जाहीर केली असून आगामी बिहार विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने ही आकडेवारी जाहीर केली असल्याचा आरोप होत आहे.
लोकसंख्या वाढते पण का ? जर प्रत्येकाने आपल्या होणाराय पिढीचा विचार केला तरच कुठेतरी कंट्रोल होईल. म्हणजेच जर आपली मुल चागली शिकली तर स्वताच पोट भरू शकतील आपल्या देशाचा विकास होईल .नुसती लोकसंख्या वाढवून फायदा नाही .तर त्याचे काय तोटे आहेत ते समजले पाहिजे. बहुतांश जी चागली सुशिक्षित माणसे आहे त्यांची कुटुंब छोटीच आहेत.धर्मावर जाण्यापेक्षा जोपर्यंत शिक्षणाचे फायदे सर्वाना कळत नाही तोपर्यंत हे असच चालणार .