शिक्षणापासून वंचित राहणा-या घटकांना शिक्षण देऊन सक्षम करण्यासाठी आश्रम शाळांची संकल्पना पुढे आली. महाराष्ट्रात अनेक आश्रम शाळा उभ्या राहिल्या. त्यात हजारो विद्यार्थी शिक्षणही घेत आहेत. अनेकांनी अशा शाळांमध्ये शिक्षण घेऊन आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेला आहे. मात्र अलीकडे आश्रम शाळा म्हणजे चरण्याचे कुरण किंवा विद्यार्थ्यांच्या छळछावण्या अशा प्रकारचे चित्र निर्माण झाले आहे. एकही विधिमंडळाचे अधिवेशन असे जात नसेल की ज्या अधिवेशनात आश्रम शाळांमधील कारभाराबाबत चर्चा झाली नसेल. असे जरी असले तरी काही आश्रम शाळा मात्र आपल्या मनातील आश्रम शाळांबद्दलचा गैरसमज दूर करणा-याही आहेत.
खरं तर आश्रम शाळा या भटक्या, विमुक्त, मागास, आदिवासी पालकांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अत्यंत चांगली संधी आहे. मात्र असे काही गैरप्रकार समोर येतात आणि त्यातून शिक्षणाचा एक चांगला पर्याय बदनाम होऊन जातो. अर्थात त्याला काही आश्रम शाळाचालकही तितकेच जबाबदार आहेत. आश्रम शाळा ही मुलांना शिक्षण देण्यासाठी नाही, तर केवळ सरकारी मलिदा लाटण्यासाठी आपल्यासाठी निर्माण केलेली सोय, असा काहींचा गैरसमज होतो आणि त्यातूनच सर्व व्यवस्थेला बदनाम करणा-या घटना घडत आहेत. असे असले तरी अनेक संस्थाचालक एक ध्येय डोळयासमोर ठेऊन या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करताना दिसतात.
गेल्याच आठवडयात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील ‘संजीवनी’ आश्रम शाळेत जाण्याचा योग आला. महाराष्ट्र भटक्या व विमुक्त जाती संघ (रजि.) मुंबई या संस्थेच्या वतीने ही शाळा चालविली जाते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ती या आश्रम शाळेत माझे व्याख्यान आयोजित केले होते. आश्रम शाळा कशी असावी याचे उत्तम उदाहरण ही आश्रम शाळा पाहताना आला.
आश्रम शाळा म्हणजे फडक्या भिंती, मोडक्या खिडक्या, गळके छप्पर, गलिच्छ शौचालये अशी एक प्रतिमा मनात निर्माण झालेली. मात्र मुंबई-नाशिक महामार्गावरून तळेगाव फाटयाजवळच आश्रम शाळेत जाताच मनातील चित्र पार बदलून गेले. अत्यंत सुनियोजित पद्धतीने आराखडा तयार करून आश्रम शाळेचे बांधकाम करण्यात आलेले आहे. शाळेच्या भिंतींवर महापुरुषांची वाक्ये लिहिलेली आहेत.
शाळेचे मैदान आणि वऱ्हांडे अत्यंत स्वच्छ आणि टापटीप राहतील अशी काळजी घेण्यात आली आहे. शक्य त्या ठिकाणी शोभेची झाडे लावून शाळेच्या सौंदर्यात भर घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. खरे तर या शाळेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र गोस्वामी हे मुंबईत राहतात. मुंबईसारख्या मायानगरीत राहून अशी शाळा सुरू करण्याची त्यांना कल्पना कशी सुचली किंवा गरजच का वाटली, असा प्रश्न निर्माण झाला. तो गोस्वामी यांना विचारला तेव्हा ते म्हणाले, ‘आम्ही मुंबईत चुनाभट्टी भागात राहतो. तिथेही आमची शाळा आहे. त्या शाळेत शहरी मुले येतात.
चांगले गुण मिळवितात. त्यांचे कौतुक होते. परंतु चुनाभट्टी परिसराला लागून असणारा कसाईवाडा, चुनाभट्टीचा परिसर, अॅण्टॉप हिल भाग या परिसरात अनेक भटक्यांची कुटुंबे जिथे जागा मिळेल तिथे पाल टाकून राहिलेली दिसायची. त्यांची मुले एक तर रस्त्यावर किंवा रेल्वेत भीक मागत असायची किंवा काहीतरी वस्तू विकताना दिसायची. हीच मुले वयात आली की, ती वेगळया मार्गाला वळण्याचीही भीती असते. हे पाहून मी खूप अस्वस्थ व्हायचो.
मग या लोकांच्या काही म्होरक्यांशी चर्चा केली. या मुलांना शिक्षण मिळाले तर त्यांचे जीवनमान सुधारू शकेल, असा विश्वास त्यांच्यात निर्माण केला. मग मुंबई शहरात भटक्या-विमुक्तांच्या जिथे जिथे वस्त्या आहेत, तिथे जाऊन त्यांच्यात जनजागृती केली आणि ‘महाराष्ट्र भटक्या व मुक्ती जाती संघ’ या संस्थेची स्थापना करून आम्ही शाळा सुरू केली.
मुंबई शहरातील चुनाभट्टीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ज्या सुविधा देण्यात येतात त्या सर्व सुविधा येथील विद्यार्थ्यांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यांना कॉम्प्युटरचे शिक्षण दिले जाते. खेळण्यासाठी विस्तृत मैदान आहे. इतकेच नव्हे तर मनोरंजनासाठी दूरचित्रवाणी संच, मुलांचे वसतिगृह आणि मुलींचे वसतिगृह यांच्यामध्ये स्वतंत्रपणे बसविण्यात आलेला आहे. त्याशिवाय एक हॉल असून या हॉलमध्ये दर आठवडयाला आम्ही एखादा सामाजिक संदेश देणारा चित्रपट मुलांना दाखवित असतो.
महिन्यातून दोन वेळा आम्ही विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेत असतो’, असे गोस्वामी यांनी सांगितले.
आश्रम शाळेतील मुले आपल्या आई-वडिलांना सोडून आलेले असतात. प्रत्येकाच्या सवयी, स्वभाव वेगवेगळे असतात. त्यामुळे त्यांना खूप सांभाळून घ्यावे लागते. विशेषत: मुलींची खूपच काळजी घ्यावी लागते. म्हणून त्यांच्यासाठी आम्ही स्वतंत्र वसतिगृह ठेवले असून मुलींच्या वसतिगृहात महिला अधीक्षकांची नेमणूक केलेली आहे. बाहेर सुरक्षा रक्षक असतात. या मुलींना अचानक काही समस्या निर्माण झाली तर बेल वाजविण्याची सोय त्यांच्या राहत्या ठिकाणी करण्यात आली आहे. दर पंधरा दिवसाला त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याच्या नोंदी येथे ठेवलेल्या असतात.
इथल्या शिक्षकांनाही आम्ही कायम सांगत असतो की, इतर शाळेतील नोकरी वेगळी आहे आणि इथली नोकरी वेगळी आहे. इथे केवळ पगार मिळतो म्हणून शिकवू नका, तर विद्यार्थी घडविण्यासाठी आपण शिक्षक झालो आहोत, असे भान ठेवा. अशी सामाजिक जाणीव असणा-या शिक्षकांनाच येथे ठेवण्यात आले आहे, अशी माहितीही गोस्वामी यांनी दिली. आम्ही इतक्या निष्ठेने शाळा चालवित असतानाही सरकारी यंत्रणा मात्र आमच्याकडे इतरांप्रमाणेच पाहते.
आमच्या शाळेच्या इमारतीला अगोदर सरकारकडून भाडे मिळत होते. परंतु मध्यंतरी सरकारने एक निर्णय घोषित केला. ज्या आश्रम शाळेच्या इमारती आराखडा मंजूर केलेल्या नसतील त्यांना भाडे मिळणार नाही. कदाचित काही संस्थाचालक योग्य प्रकारे इमारती बांधत नाहीत, त्यांची देखभाल नीट ठेवत नसतील त्यासाठी हा निर्णय योग्य आहे. मात्र आम्ही संपूर्ण आराखडा मंजूर करून घेऊन इमारतीचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना दिला. त्यांनीही इमारतीला भाडे मिळावे, असा प्रस्ताव दिलेला असताना त्याची अंमलबजावणी होत नाही, अशी खंत गोस्वामी यांनी व्यक्त केली.
संजीवनी आश्रम शाळेतील सर्व माहिती घेतली. प्रत्येक कक्षाला भेट दिली. संगणक कक्ष, मुलांसाठी मनोरंजनासाठी निर्माण केलेला हॉल, तिथे चित्रपट दाखविण्यासाठी बसविलेला प्रोजेक्टर पाहिले. ही सर्व व्यवस्था दानशूर लोकांनी केलेल्या सहकार्यातून उभी राहिलेली आहे. चांगले करायला पुढे निघालात तर अनेक हात तुमच्या मदतीला येतात, हे संजीवनी आश्रम शाळेतील व्यवस्था पाहून म्हणावेसे वाटते.
संजीवनी आश्रम शाळेच्या भेटीनंतर माझ्या मनात निर्माण झालेली आश्रम शाळांबद्दलची आढी दूर झाली. सर्वच आश्रम शाळाचालकांनी जर चांगली काळजी घेतली, शिक्षण देण्याच्या तळमळीतून शाळा चालविल्या तर आश्रम शाळांना बदनाम करणा-या ज्या घटना कानावर येतात, त्यांना आळा बसू शकेल.
सर मला आदिवासी साठी आश्रम शाळा खोलाची आहे कारण आमच्या गावापासानु शाळा खुप लाब आहे आणि आदिवासी मुले व मुली आज पण
त्याना शिक्षण मिलत नाही त्यासाठी मि आश्रम शाळा खोलाची आहै