गेल्या काही वर्षामध्ये दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवाचे स्वरूप पालटले आहे. हे सण साजरे करताना मोठया प्रमाणावर अर्थकारण होत असते. राजकीय पक्षांसाठी तर ही सुवर्णसंधी असते. गेल्या दोन-तीन वर्षापासून तर पक्षांनी या सणांचा ‘इव्हेंट’ केला आहे. त्याच्या बाजारीपणाविषयी काय वाटते, या मुद्दयावर ‘प्रहार’ने वाचकांकडून प्रतिक्रिया मागवल्या असता, ‘काही मंडळे गणेशोत्सवाकडे सण म्हणून न पाहता अर्थार्जनाच्या मागे असतात. यामुळे आर्थिकदृष्टया तगडया प्रायोजकांच्या जाहिराती या मंडळांच्या मंडपांत आढळतात. काही मंडळांचे गणपती नवसाला पावतात, असा समज असल्याने भाविकांच्या मोठया रांगा लागतात. कोही गणपतींच्या दर्शनासाठी ‘सेलिब्रेटीं’ची गर्दी असते, त्यांना पाहण्यासाठीच भाविक गर्दी करतात, बाजारीकरण थांबवा, भगवंत भक्तीचा भुकेला! पैसा फेको तमाशा देखो, सणांचे सेलिब्रेशन नको! विघ्नहर्त्यांचे ‘हे’ विघ्न! अशी मते व्यक्त केली.
महाराष्ट्र व विशेषत- मुंबई-पुण्यामध्ये जन्माष्टमी, गणेशचतुर्थी, नवरात्रोत्सव अशा सणांच्या कालावधीत आनंदाला उधाण आलेले असते. जन्माष्टमी व नंतर दहीहंडीची धामधूम सुरू झालेली असते. नऊ थर, १० थर कुठले पथक लावणार यावर सुरुवातीपासून बरीच चर्चा सुरू असते. त्याचप्रमाणे बक्षिसांचे प्रमाणही वाढत आहे. यात सामाजिक कार्यकर्ते तर असतातच; परंतु खासकरून आपली छबी जनतेसमोर ठळकपणे येण्यासाठी राजकीय नेत्यांचा अट्टहास सुरू झालेला असतो. यात लाखो रुपयांचा चुराडा, परंतु त्यापासून कोटयवधींचा फायदा ते करून घेत असतात. पोस्टर, बॅनरवर आपली छबी व त्यापासून मिळणारी प्रसिद्धीही गोविंदांच्या जिवावर कमावण्याचा धंदाच झालेला आहे. तयात नाच-गाणी आलीच. त्यात मोठ-मोठया नटयांनासुद्धा पाचारण केलेले असते. दहीहंडी फोडून झाल्यावर गोविंदाचे काय झाले? किती पडले, किती जणांचा मृत्यू झाला याबाबत त्यांना ना खेद ना खंत. आता गणेश उत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. मोठे मंडप टाकून व रोषणाईवर लाखो रुपये खर्च होत आहेत. तसेच दक्षिणा म्हणून कोटयवधी रुपयांची माया जमा होते. त्याची विल्हेवाट कशी लावली जाते. याबाबत जनतेस काहीच कळत नाही. देव भक्तीचा भुकेला आहे, त्यास अशी गल्लाभरू करमणूकप्रधान कार्यक्रमांची आवश्यकता वाटत नाही. मूर्ती लहान किंवा मोठी असली तरी जोपर्यंत आपले मन देवाने स्मरण भक्तीने करणार नाही, तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही. – लक्ष्मण टिकार, मालाड
सणांचे बाजारीकरण
आपल्या प्रत्येक सणाचे रूप पालटते आहे; कारण त्यात राजकीय हस्तक्षेप वाढत आहे आणि याचेच उदाहरण आपल्याला दहीहंडीत दिसले. आता लवकरच येणा-या गणेश उत्सवातदेखील दिसेल. प्रत्येक गणेश मंडपाबाहेर मोठ-मोठया पक्षांच्या, राजकीय नेत्यांचे गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देण्याचे फलक, बॅनर झळकतील. त्यात गणपतीपेक्षा त्यांचीच मोठी प्रतिमा दिसेल. या सर्वामुळे आपल्या सणाचे रूप खरेच पालटले आहे. आपले सण हे या मार्गातून पैसा कमावण्याचे माध्यम होऊ लागले आहेत. या सर्वात आपल्या सणाचे पावित्र्य कमी होऊ लागले आहे व त्याचे बाजारीकरण वाढत आहे. – मयुर ढोलम, जोगेश्वरी
पैसा फेको तमाशा देखो
काही उत्सव मंडळे उत्सवाचा गैरफायदा व वेगळे राजकारणासारखे वातावरण निर्मिती करत असल्यामुळे धार्मिक सणाचे स्वरूप बदलले आहे, हे खरे आहे. सध्याच्या महागाई- बेकारीमुळे जनतेची मानसिकता बदललेली आहे; पण धार्मिक सणांची श्रद्धा,भक्ती असल्यामुळे करणार काय? सण हे साजरे झाले पाहिजेत पण श्रीगणेश स्पर्धेमुळे उत्सवाला इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे मंडळांचे अर्थकारण बदलून गेले. एखाद्या गोष्टीचा एकदा का इव्हेंट झाला की, मग त्याचे सारे पैलूही बदलून जातात, मंडळांचेही तेच झाले. भव्य भपकेबाज उत्सव साजरा करण्यासाठी मोठया निधीची गरज भासू लागली, तो निधी बिल्डर, काही राजकीय नेते, आयोजक-प्रायोजक यांच्या मदतीतूनच उभा करणे सुरू झाले. मंडळांच्या अशा बदलत्या अर्थकारणाचा फटका मुख्य उत्सवाला बसतो आहे. पर्यावरण आणि प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आरोग्य खाते व प्रदूषण मंडळाने करायला पाहिजे, ती होत नाही. अर्थात प्रत्येकाला आपला धर्म प्रिय वाटतो. त्यामुळे शक्तिप्रदर्शन करून का असेना धर्माचा प्रचार केला जातो. अभ्यासू मनाने गणेशाची ज्ञानोपासना केली तरच श्रद्धेचे फळ मिळेल. – प्रवीण पाटील, लोअर परळ
बदला पण संस्कृती जपा..
आकाशातील सूर्य-चंद्र बदलले नाहीत. माणसं बदलत आहेत. काळ बदलतोय. तसे सणाचे स्वरूप बदलणारच आहे. सण इव्हेंट होणे म्हणजे नावीन्य नाही. धार्मिक सणांचे व्यावसायिकतेचे स्वरूप बाजारीकरणास भाग पाडत आहे. गोविंदा हा दहीहंडी फोडण्याचा अप्रतिम सण आहे. आजही उंच थरांच्या हंडया फोडणे एक दिव्य स्वप्न आहे. या वेळी तरुण जिवाची पर्वा करीत नाहीत, परंतु हा खेळ जीव धोक्यात टाकणारा आहे. राजकीय पक्षांचे नेते या उत्सवात पोळी भाजून घेतात. प्रत्येक विभागात ‘राजा’च्या नावे गणेशोत्सव साजरा होतो आणि नवसाला पावणा-या गणपतींचे फॅड वाढते आहे. ‘सेलिब्रिटी’ भक्तांच्या गर्दीने, डीजेच्या ढण्णढणाटाने नक्की आपण काय मिळवतो आहोत, ‘प्रदूषण’, ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणाचा -हास थांबवा. प्लॅस्टर ऑफ पॅरिस, उंच मूर्ती टाळा, आपले सण पर्यावरणप्रेमी करण्याचा कसून प्रयत्न करावा. शाडूच्या मूर्तीस प्राधान्य द्यावे. आपल्या आराध्य देवतास विसरू नका. आपली भक्ती महिमा टिकवावी व सणांचे बाजारीकरण थांबवावे असे वाटते. – नारायण पन्हाळेकर, अभ्युदय नगर-काळाचौकी
विघ्नहर्त्यांचे ‘हे’ विघ्न!
आजही हिंदू संस्कृतीचा दर्जा सणांमुळे मोठा उच्च आहे. गणेशोत्सवात आजही उंच मूर्ती आकर्षण आहेत. लालबागचा राजा नवसाला पावतो, तर पुण्याचा दगडूशेठ हलवाईचा गणपतीही नवसाला पावतो हा एक भक्तिमार्गाचा देवाकडे मागण्याचा भक्तांचा हक्क आहे. देव भक्तीचा भुकेला आहे, हे विसरून चालेल. दरवर्षी गणपती बाप्पा येतोच. आपल्या सणांचे स्वरूप बदलले आहे. इथं धर्माला कुठे ग्लानी आली आहे. लोकमान्य टिळकांवर अभिप्रेत असणारी एकता, संघटना, राष्ट्रीय एकात्मता अजूनही टिकून आहे. निसर्गावर कुणीही मात करू नये. आपले सण पर्यावरण करणे गरजेचे आहे. प्रदूषण – ध्वनिप्रदूषण टाळण्याचे प्रयत्न प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने हाती घेतले पाहिजे. प्रत्येक विभागाचा हा ‘राजा’ बुद्धीची देवता आहे, याचे भान ठेवले पाहिजे. आपल्या घरच्या बाप्पांच्या सजावटीसाठी चांदीची, सोन्याची साधने व्यापारी वर्गाने उपलब्ध केली आहेत. हे एक सणाचे बाजारीकरण होत असल्याचे चिन्ह दिसत आहे. देवाच्या नावानं चांग भलं करू नये तर घरातील शांती वातावरणासाठी, चांगल्या बुद्धीची गरज आहे, असे वाटतेय. – निशा जाधव, अभ्युदयनगर- काळाचौकी
गणेशोत्सवाला व्यावसायिक रूप
लोकमान्य टिळकांनी भक्तिभावना, मनोरंजनासह लोकजागृती व समाजप्रबोधन करण्याच्या सद्हेतूने सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाने आता व्यावसायिकतेचे रूप प्राप्त केले आहे. सध्याचा गणेशोत्सव अनेक जणांच्या मिळकतीचे साधन झाला आहे. राजकारणी त्यातून लोकसेवा करण्याचा आभास निर्माण करून ‘मेवा’ मिळविण्याच्या प्रयत्नात असलेले दिसत आहेत. आगामी निवडणूक नजरेसमोर ठेवून नेतेमंडळी आपापली ‘नसलेली’ कार्यशक्ती जनतेसमोर दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. फक्त राजकीय स्वार्थासाठी आपली पोळी भाजून घेण्याच्या प्रयत्नात यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव धुमाकुळीच्या वातावरणात साजरा होऊन, सोज्वळ आणि पावित्र्य नष्ट होणार आहे. – नरेश नाकती, बोरिवली
सणांचे १०० टक्के बाजारीकरण
सद्य:परिस्थितीमध्ये सणांचे १०० टक्के बाजारीकरण होत असून मूळ उद्देश नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. समाजजागृती, समाजप्रबोधन या मूळ उद्देशालाच फाटे फुटत असून डीजेचा कोलाहल, पुढा-यांचा प्रचंड उत्साह व विकृती, विद्रुपतेचा कळस यांच्या अशोभनीय विळख्यामध्ये उत्सव असंवेदनांमध्ये गुरफटले आहेत, असे दृश्य सर्वत्र पाहण्यास मिळते. डीजेंचा कर्णकर्कश्श आवाज, ढणढणाट, राजकारण्यांची उचलेगिरी/ चमचेगिरी व धुंद, उन्मादक नाचणा-यांच्या मस्तीमध्ये हरवत चालेल्या या सणांमुळे सामान्य जनतेच्या कानांबरोबरच मनही मुकबधिर झाली आहेत. या सर्वाची शासनाने गंभीरपणे दखल घेऊन असे हिडीस प्रकार करणा-यांविरुद्ध कठोर कारवाई करावी. – रमण देशमुख, डोंबिवली
सणांचे सेलिब्रेशन नको!
सध्या धार्मिक सण सेलिब्रेशन पद्धतीने करण्याची फॅशन सुरू आहे. दहीहंडीचा नुकताच सण साजरा झाला. उंच हंडया, लाखांची बक्षिसे, डीजेच्या तालावरची सेलिब्रेटींचे नाच त्यात यंदा ४०० वर गोविंदा जखमी झाले. याला कोणता धार्मिक सण म्हणायचा? आता गणेशोत्सव येत आहे. गणेशोत्सवात उंच मूर्तीची स्पर्धा; कारण उंच मूर्तीची जाहिरात करून भाविकांना आकर्षण करण्याची प्रथा! तसेच नवसाला पावणा-या गणपतीचे फॅडही दिवसेंदिवस वाढत आहेत. हा एक प्रकारे अंधश्रद्धेचाच प्रकार आहे. याला सर्वच जबाबदार आहेत. त्यात एखाद्या गणेशोत्सव मंडळाला ‘सेलिबेटीच्या आगमनाने मंडळाचा भाव खाण्याचा प्रकारही वाढतो आहे. त्यात डीजेच्या आवाजाने उत्सवाचे भान ठेवत नाही. त्यामुळे विभागातील ज्येष्ठ लहान बालके व विद्यार्थी, आजारी माणसे यांचा आम्ही विचारच करत नाही. याला लोकमान्यांचा गणेशोत्सव म्हणायचा का? यासाठी यापुढे आवाजाचे प्रदूषण, पर्यावरणाचे भान व वेळेचं गणित मांडायला हवे, यासाठी उत्सव मंडळांसाठी नियमावली बनवणे फार महत्त्वाचे आहे. उत्सवासाठी इतरांना वेठीस न धरता उत्सव सर्वानुमते साजरा करण्यावर भर द्यावा. – सुभाष वाघवणकर, जोगेश्वरी, पूर्व
बाजारीकरण थांबवा
आपला देश हा सर्वधर्मसमभाव आहे. देशात विविध धर्माचे लोक एकत्र राहतात. सर्वाचे सण विविध आहेत. हे सर्व असूनही आपल्या देशात विविधतेत एकता दिसते. त्याचे श्रेय आपल्या देशातील थोर साधुसंतांना दिले जाते. संतांनी जे केले ते सर्वानी एकत्र येऊन नादंण्यासाठी केले होते. आज सण म्हणजे एक प्रकारे व्यापारच आहे. बाप्पाच्या नावाने भरमसाट देणगी मागितली जात आहे. नाही दिली तर दादागिरी करून घेतली जाते. कोठे नवसाचा, तर कोठे सेलिब्रेटिजचा, तर कोठे जास्त उंचीचा म्हणून बाप्पाच्या स्पर्धा लावल्या जात आहेत. ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’ वापरून पर्यावरणाचा -हास होत आहे. काही मंडळांना सण म्हणजे ध्वनिक्षेपक लावून ध्वनिप्रदूषण करणे, गोंगाट करणे असे वाटते. नवसाच्या बाप्पाचे फॅड दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यात महिलांना ५-१५ तास दर्शनासाठी ताटकळत उभे राहावे लागते, तिथे बसण्याची, पाहण्याची किंवा प्रसाधनाची व्यवस्था नसते. लहान मुले गर्दीत हरवतात, सर्वानी एकत्र येऊन टिळकांनी ज्यासाठी हा सण सार्वजनिक म्हणून साजरा करण्याची सुरुवात केली त्याकडे लक्ष द्यावे. मंडळांनी नागरिकांना जेवढया चांगल्या सुखसोयी मिळतील, पर्यावरणाचा -हास होणार नाही, याची काळजी घ्यावी.- विक्रम म्हात्रे, चेंबूर
उत्सवाचे बाजारीकरण नको
सारे जग आमच्या भारतीय संस्कतीकडे या सणांमुळेच आमच्याकडे वेगळया दृष्टीने पाहते आणि ज्या आदर्शचा वसा आमच्या पूर्वजांनी चालू ठेवला तो वसा आम्ही बिघडवू पाहत आहोत, सणांचे इव्हेंट कसे पाहत आहोत, हे मात्र आता कुठेतरी थांबवून त्याच्यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आम्हा सा-यांवर येऊन ठेपली आहे. दहीहंहीचा सण जो पूर्वी गल्ली-बोळात, चाळीचाळीमध्ये ज्या उत्साहाने साजरा व्हायचा ते आता दृष्य दिसत नाही. उत्साह आहे; परंतु तो त्याला आता स्पर्धेचे आणि बक्षिसांचे गालबोट लागल्यामुळे हा उत्साह बक्षिसासाठीच आहे की काय असेच आता दृश्य दिसत आहे आणि त्याचा परिणाम थरावरून पडून जखमी होण्याची प्रमाण वर्षानुवर्षे वाढत चालले आहे. स्पर्धा जरूर असावी परंतु ती निकोप असावी, ती जीवघेणी नसावी. या सणानिमित्त ध्वनिप्रदूषण हाही एक चिंतेचा विषय बनला आहे. याला जबाबदार म्हणजे मंडळा-मंडळातील स्पर्धा यानंतर येणारा आमच्या आदिमाया शक्तीचा जागर म्हणून आम्ही ज्याकडे पाहतो तो नवरात्र. स्त्री-शक्ती जिला देवीचे रूप दिले आहे, तिची पूजा करण्याचे हे नऊ दिवस मात्र आम्हीच तरुण-तरुणी रात्री मस्त, धमाल करण्याची संधी म्हणून या सणाकडे पाहतात आणि नको त्या गोष्टी घडतात. या सर्वाचा विचार केला तर सर्वानीच याविषयी विचार करण्याची वेळ आहे. अन्यथा येणारा आगामी काळ फारच कठीण आहे. – प्रमोद कडू, पनवेल
इव्हेंट नको, सण हवा
लोकांनी आपल्याकडेच यायला हवे. त्यातूनच गणेश मंडळांमध्ये स्पर्धा सुरू झाल्याचे चित्र समोर येते. या स्पर्धेमुळे सार्वजनिक गणेशोत्सवाचा मूळ हेतू हरवत चालल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. गणपतीच्या आगमनावर आणि विसर्जनावर कोटयवधी रुपयांचा चुराडा केला जातो. कर्णकर्कश्श आवाजात गणपतीचे आगमन आणि विसर्जन होते. खरेच याची गरज आहे का? बरीचशी मंडळे फटाक्यांची आतषबाजी करतात, यावरही लाखो रुपये खर्च होतात. आजच्या महागाईच्या जमान्यात एवढा खर्च करणे योग्य आहे का? असा प्रश्न प्रत्येक मंडळाने स्वत:ला विचारायला हवा. सार्वजनिक मंडळांनी वायफळ खर्च बंद करून तो होणारा खर्च लोकांच्या सेवेसाठी करायला हवा. गणेश मंडळांनी दरवर्षी कमीत कमी एका खेडयाला दत्तक घेऊन सगळया सोयी-सुविधा देऊन सुसज्ज करावे. त्यामुळे तेथील लोकांचे भले होईल. प्रत्येक काम सरकारचे आहे, असे म्हणून आपली जबाबदारी कुणीही दुस-यावर ढकलू नये. गणेशोत्सव ‘इव्हेंट’ न ठरता तो सर्वसमावेशक सण ठरावा, हीच इच्छा! – दादासाहेब येंधे, काळाचौकी
बाजारीकरण कसले, ही तर खंडणी वसुली
संणांचे पावित्र्य राहिलेले नाही. त्यांचे इव्हेंट करून त्यामार्गे वसुली करायची हाच एक कलमी उद्योग. गणेशोत्सवात सकाळ/संध्याकाळच्या आरत्या बेंबीच्या देठापासून ओरडून म्हणणे यात कसले पावित्र्य? लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला तो जनता एकत्र जमून स्वातंत्र्याचा/ शिक्षणाचा संदेश जनतेमध्ये जाण्यासाठी. आज स्त्रियांवर अत्याचार, बलात्कार, छेडछाड हे प्रकार एवढे वाढलेत त्याबाबत जनतेत कोणता संदेश देण्याचा प्रयत्न होतो का? एकदम २५ जणांच्या जमावाने वर्गणी वसुलीसाठी जाऊन दबावतंत्राचा वापर करायचा. श्रीगणेशाच्या मूर्तीला वेगळे आकार देऊन मूर्ती विकृत केलीय. त्यांच्या उंचीने समुद्रात दुस-या दिवशी काय विटंबना होते याचे भान कुणालाही नाही. मूर्तीची उंची जास्त तेवढी कार्यकर्त्यांची बौद्धिक उंची कमी हेच आढळते. नवसाला पावणारे गणेश गल्लोगल्ली झाल्याने न पावणारा गणेश हा गरीब बिचारा असे म्हणायची पाळी आलीय. डीजेच्या ढणढणाटाने हृदयरोगी वाढतात याचे भान कुणास आहे? नियमावली पाळली तर त्याचे पावित्र्य राहते, पण ‘नियमावली फक्त कागदावरी असावी’ हेच आमचे ब्रीदवाक्य असल्याने नवीन नियमावलींची खोगीरभरती कशाला? –सुधीर देशपांडे, विलेपार्ले
सांस्कृतिक परंपरेचा लोप
पूर्वीच्या काळातील गणेशोत्सव सांस्कृतिकदृष्टया श्रीमंत होते आणि आज गणेशोत्सव आर्थिकदृष्टया श्रीमंत झाला आहे; परंतु त्यातील सांस्कृतिक वातावरण वेगाने घसरत आहे. दिवसभर मोठया आवाजात डिजे लावून आणि एक महापूजा घातल्याने सांस्कृतिक कार्यक्रम झाला, अशी मानसिकता निर्माण होत आहे. पूर्वी उत्सवात व्याख्यानमाला, परिसंवाद, बौद्धिक स्पर्धा, नाटकांची मेजवानी असायची. सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गणेशोत्सवाचे स्टेज हे एक महत्त्वाचे व्यासपीठ मानले जायचे. अशा व्यासपीठामुळे अनेक कलाकार घडवले जायचे. आज उत्सवाचे स्वरूप ठरवण्याचे स्वांतत्र्य असले तरी उत्सवामागचा मूळ हेतू बाजूला सारून गणपतीची आरती करायला ‘सेलिब्रिटी’ला बोलाविण्यासाठी चर्चा केली जाते; परंतु एखाद्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च, रुग्णांना आर्थिक मदत देण्यासाठी वादविवाद निर्माण केले जातात. पूर्वी गणेशोत्सवाच्या दर्शनी भागावर लो. टिळकांचा फोटो असायचा, आता मंत्री, आयोजक, शुभेच्छुक यांची मांदियाळी दिसते. गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांची लांबच लांब रांग दिसणे हे उत्सव कार्यकर्त्यांना अभिमानाचे वाटते. रोषणाई, सजावटीसाठी लाखो रुपयांची उधळण केली जात आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून दिवस-रात्र भक्तांना हातात नारळ – हार घेऊन तिष्ठत ठेवले जात आहे. हे कशासाठी? आज काही मंडळांचे अंदाजपत्रक कोटयवधी रुपयांचे आहे. पैशाचा ओघ वाहताना उत्सवाचा खर्च करून उरलेल्या पैशातून अनाथ-निराधार मुलांसाठी, वृद्धांसाठी, दुर्धर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांसाठी रक्तदान वा वैद्यकीय शिबिरे आयोजित केली, घरगुती गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती केली, तरच सांस्कृतिक परंपरा जपली जाईल. – शिवदास शिरोडकर, लालबाग, मुंबई
आयोजकांनी स्वत:ला शिस्त लावणे गरजेचे
लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य काळात लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने गणेश उत्सव सुरू केला; परंतु १०० वर्षानंतरची परिस्थिती झपाटयाने बदलली, आधुनिकता आली आणि लोकांच्या आनंद लुटण्याच्या पद्धतीत बदल झाला. ढोल-ताशे यांचा जमाना गेला म्हणता येत नाही; परंतु ढणाढणा आवाज केल्याशिवाय गणपती असो किंवा नवरात्र उत्सव साजरा केल्यासारखे वाटत नाही, तरी कोर्टाने वेळेचे बंधन ठरवून दिल्यामुळे प्रदूषण रोखण्यास मदत झाली आहे. सर्वच उत्सव धार्मिक असल्यामुळे सणांची नियमावली पर्यावरणाशी सुसंगत बनविणे खुपच कठीण आहे. याचाच परिपाक म्हणून ठाण्यात इंदुलकरांनी कर्कश आवाजावर तक्रारी केल्या पण पोलिस ठाण्यात त्यांना मारहाण झाली अशा घटना नक्कीच निंदनीय आहेत. तथापि भावी निवडणुकांवर डोळा ठेवून राजकारणी, बिल्डर प्रसिद्धीसाठी अशा उत्सवांचा वापर करतात. तसेच अर्थकारण असते हेपण लपून राहिले नाही. लोकांची गर्दी खेचण्यासाठी नवसाचा गणपती मनोकामना पूर्ण करतो हे सांगणे काही नवीन नाही. त्यामुळे आयोजकांनीच स्वत:ला शिस्त लावून कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक बदलासाठी करण्याचा शिरस्ता ठेवल्यास बरेच काही साध्य करता येईल. सणांचे स्वरूप आधुनिक होणे काहीच गैर नाही. लोकांना विश्वासात घेऊन नियमावली बनविणे याबाबत जागृती करणे महत्त्वाचे असून कुठल्याही धार्मिक भावनांना हात न लावता बदल शक्य आहेत. सणांचे बाजारीकरण नसून, बदलत्या परिस्थितीनुसार त्यांचे स्वरूप बदलते. तसेच सण हे सण म्हणूनच राहणार आहेत.- हरिष बडेकर
हा तर सणांचा धंदा
श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ महिना मानतात, या महिन्यात विविध उत्साही सण येतात. अतिशय महत्त्वाचा असलेला श्रावण महिना म्हणजे निसर्गाने दिलेले उत्साही जीवन. प्रत्येकाला आपलासा वाटणारा हा श्रावण ख-या अर्थाने सर्वाचा सखा आहे. बालक असो वयोवृद्ध, युवा असो वा मध्यवयीन प्रत्येकासाठी श्रावण महिना त्याचा आनंदमय असतो. गोपाळकाला किंवा गणेशोत्सवात प्रत्येक विभागातील ‘राजा’च्या निमित्ताने राजकीय नेते आणि ‘सेलिब्रिटी’ शक्ती प्रदर्शन दाखवतात. हा सण कसा करायचा याचे ध्येय त्यांच्याकडे नसते. आपल्या धार्मिक सणाचाही ‘बिझनेस’ करणे हे योग्य नाही. देवधर्म आणि संस्कृती सोडून राजकारणाच्या माळा जपण्यासारखे व सणांचा धंदा करण्यासारखे आहे. ते अयोग्य आहे.- संतोष जाधव, जोगेश्वरी, (पूर्व)
समाजजागृती व्यापक हवी
दहीहंडी, गणेशोत्सव हे महाराष्ट्राची जगातील ओळख असलेले सण. प्रसिद्धी माध्यमांसमोर सेलिब्रिटिजना चमकवून स्वत:च्या प्रसिद्धीसाठी सर्वपक्षीय राजकारण्यांकडून दुरुपयोग होत आहे. सात्विकता जपलेल्या गणेशाबद्दलचे ‘दर्शनमात्रे मनकामना पुरवी’ हे रामदास स्वामींचे वचन प्रसिद्ध असताना मोठमोठया देणग्या देऊन उत्सवात प्रसिद्धीची खोटी हौस भागवून आयकर खात्याच्या डोळयांत धूळफेक केली जाते. लोकमान्यांच्या उदात्त हेतुनुसार गणेशोत्सवच नव्हे तर सार्वजनिक सण समाजजागृतीचे उत्तम साधन ठरू शकतात. उत्सव साजरा करताना होणारा पर्यावरणाचा -हास रोखण्यासाठी शक्य त्या सर्व उपायांची यादी करून तिची अंमलबजावणी कशी करता येईल याचा सर्व मंडळांनी एकत्रितपणे विचार करायला हवा. महिलांची असुरक्षितता वाढती व्यसनाधिनता इ. समस्यांविरुद्ध लढण्यासाठी व्यापक सामाजिक कार्यक्रम बनवून तो प्रत्येक मंडळामार्फत राबवला गेल्यासच सार्वजनिक उत्सवांचा खरा उद्देश साध्य होईल. – डॉ. कृष्णकांत नाबर, माहीम
सण, संस्कृती, ‘सेलिब्रेटी’च्या विळख्यात!
सामाजिक एकता, सर्वधर्म-समभाव, आनंद या गोष्टींना प्राधान्य ठेवून सार्वजनिक उत्सवांची परंपरा टिळकांनी सुरू केली, पण त्या उत्सवाला ‘मॉल’आणि मालचे स्वरूप प्राप्त झाले आहे. काही निवडक पण ‘मालदारांच्या’ हातात ही सूत्रं आली आहेत. बिल्डर, अवैध धंदेवाले व्होट बँकेवर डोळा ठेवून आपली स्वार्थाची पोळी भाजत आहेत. वर्गणी मागताना खंडणी वसूल होत आहे. दहा दिवस जुगार खेळ चालतो आहे. डीजेच्या नावाखाली लुंगी डान्स, चिकनी चमेली असे बिभत्स नृत्य चालते. नवरात्रीत देवीची आराधना करताना कोणीच दिसत नाही. मुलींची छेड, अत्याचार, फॅशनेबल कपडे, घालून जो गरबा खेळला जातो तो अशोभनीय आहे. आपली परंपरा, संस्कृती, सकारात्मक विचार याला कोठेतरी छेद जात आहे. ज्या उत्सवात शैक्षणिक, सामाजिक जागृतीचे प्रबोधन होईल, असे एकही काम होताना दिसत नाही. लाखो रुपये जमवून जर अशा गल्लाभरू कार्यक्रमांवर खर्च होत असतील तर काय उपयोग! – हरिभाऊ खैरनार, उल्हासनगर
‘ई मेल’द्वारा आलेले पत्र..
अतिउत्साहामुळे सणांचे विद्रुपीकरण
दिवसेंदिवस हिंदू धर्मातील सर्वच सणांना शासन, राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, जहिरातदार, अतिउत्साह भक्त यांच्यामुळे व्यावसायिकतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दहीकाला, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात समाज प्रबोधनाचे कार्यक्रम न ठेवता कर्णकर्कश आवाजातील ध्वनिवर्धक, डीजे-बेंजोच्या तालावर मद्यधुंद रोंबासोंबा नाच, प्रायोजकातर्फे बॅनर्स, होल्डिंग्जमधून मिळणा-या काळ्या पैशातील ऐश्वर्याचे प्रदर्शन, फटाक्यांची आतषबाजी ही आजच्या धार्मिक सणांची वैशिष्टय़े झाली आहेत. अतिशयोक्तीमुळे आमचे सण उपद्रवकारक होऊ लागलेत. यामुळे कोटयवधी रुपयांची उलाढाल होत असते म्हणून पावित्र्य जपणं सोडून इव्हेंट करणे हानिकारक आहे. उत्सवाचे बाजारीकरण, मंडळांमधील चुरस, मागणी तसा पुरवठा करणारे मूर्तिकार, भक्तांपेक्षा मंडळांच्या वाढलेल्या अपेक्षा, गणेशमूर्ती पाहण्यासाठी तासन्तास चालणा-या लांबच लांब रांगा, दानपेटीतील वाढलेले उत्पन्न, विविध मार्गानी जमा होणारा पैसा ही उंच मूर्ती बनविण्यामागील कारणे आहेत. राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते सर्रास नियमांचे उल्लंघन करतात आणि पोलिस त्यांना विनम्रपणे सहकार्य करतात, त्यामुळे सण साजरे करताना त्यांचे होणारे बाजारीकरण थांबवले पाहिजे. – कमलाकर गुर्जर, कळवा
सणांवर बाजारीपणाचे विघ्न
लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. त्यानंतर सामूहिक गणेशोत्सव सुरू झाला. गणेशोत्सव साजरा करणा-या असंख्य संस्था मुंबई, पुण्यात आणि महाराष्ट्रात स्थापन झाल्या आणि हा सण जल्लोषात, उत्साहात, धार्मिक रूढीनुसार साजरा करण्याची प्रथा निर्माण झाली. ब-याच वर्षापासून हा सण परंपरेनुसार साजरा होत आहे. त्याचे पावित्र्य, मांगल्य याला जरासेही गालबोट न लागण्याची काळजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते घेतात. मात्र गेल्या आठ-दहा वर्षापासून हा सण ‘इव्हेंट’ झाला आहे. राजकीय पक्ष आणि नेते या सणाचा फायदा आपल्या हितासाठी करून घेत आहेत, मोठे अर्थकारण या दहा दिवसांत होते, असा सूर भाविकांकडून व्यक्त होत आहे. दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सण ‘इव्हेंट’ झाले आहेत का, यावर ‘प्रहार’ने वाचकांची मते मागवली असता, ब-याच जणांनी हे सण ‘इव्हेंट’ झाले आहेत, हे मत मांडले आहे. बदलत्या अर्थकारणाचा फटका मुख्य उत्सवाला बसतो आहे, सण पर्यावरणप्रेमी करण्याचा कसून प्रयत्न करावा, सणांचे ‘इव्हेंट’ थांबवण्यासाठी गांभीर्याने विचार करा, अशा प्रतिक्रिया वाचकांनी व्यक्त केल्या.
भान हरपलेला समाज
सार्वजनिक सण-उत्सवांतून लोकशिक्षण, पर्यावरण, प्रेम व जनजागृती व्हायला हवी, परंतु आज अशी परिस्थिती आहे की सणांचे राजकीयीकरण आणि कॉर्पोरेटायझेशनही झाले आहे. राजकारण्यांच्या अवैध हस्तक्षेपामुळे सणांच्या निमित्ताने जी जनजागृती, लोकशिक्षण, आरोग्य, प्रबोधन करायचे त्यात अडथळे येऊन कित्येकदा वादच निर्माण होतात. आपले सर्वच सण-उत्सवांचे पावित्र्य, उत्साह बडय़ा बडय़ा प्रायोजकत्वामुळे ते सर्वसामान्यांचे न राहता ‘कॉर्पोरेट इव्हेंट’ होऊन राहिले आहेत. लोकभावनांच्या तकलादू लेबलखाली बाप्पाची मूर्ती २०-२५ फूट अशी भव्यदिव्य करून अर्थकारणाचा गुणाकार दानपेटय़ा भरण्याचा हेतू स्पष्ट दिसतोच, त्यामुळे गणेशोत्सवाला बाजारीकरणाचा वास येतो. खरेतर बाप्पाची कीर्ती, महिमा एवढा महान आहे की या मातीच्या मूर्तीला अफाट उंचीची आवश्यकताच नाही, पण ते समजण्याची यांची कुवत, लायकी नाही असं म्हटलं तर अति नसावं. फक्त ‘पैसा’ हेच टार्गेट डोळ्यासमोर ठेवून लाखोंच्या देणग्या उकळण्याच्या उद्देशाने भोळ्या गणेशभक्तांना आमचाच बाप्पा नवसाला पावणारा, असं लेबल लावून मार्केटिंग करताना शेवटी देवांनाही विकायला कमी करणार नाहीत. पोस्टरबाजीने गणेशोत्सव पुरता काळवंडला आहे. त्यामुळेच पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. याला आपणच जबाबदार आहोत हे लक्षात घ्यावं. थोडक्यात सण-उत्सवांच्या वादात समाजाचा समतोल बिघडत चालला आहे, त्यामुळे तो भान हरपलेला समाज वाटतो. – दिलीप अक्षेकर, माहीम
सर्वच सण आता ‘इव्हेंट’ बनलेत
दहीहंडीपासून ते दसरा – दिवाळीपर्यंत सर्वच सण आता खरोखर ‘इव्हेंट’ बनले आहेत. एकीकडे प्रचंड वेगाने वाढणारी महागाई आणि डाळी, फळ-भाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. पण आता कांदा, पेट्रोल, डिझेल यांचीही वाटचाल शतकाकडे धाव घेऊ लागली आहे. सोन्या-चांदीचे भाव तर डोळय़ासमोर अंधारी आणणारे आहेत, पण मग अशी शंका मनाला चाटून जाते की, हा एवढा प्रचंड पैसा येतो कुठुन? दुकानातील गर्दी पाहून तर या देशात खरोखरच किमतीचा भडका उडाला आहे का? असाही प्रश्न पडतो. या धार्मिक सणांना खरोखरच व्यावसायिकतेचा दर्जा मिळाला आहे. आता पैसा ही प्रवृत्तीच झाली आहे. आज लोकमान्य टिळक असते तर त्यांना प्रश्न पडला असता की, मी काय करायला गेलो आणि झाले काय? त्यांच्या मनात पश्चात्तापाची भावना असती. अनेक वेळा ‘इकोफेंड्रली’च्या गप्पा करतो पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पर्यावरणाची ‘ऐशी की तैशी’ झालेली आपण पाहतोच. ‘पैसा फेको तमाशा देखो’ प्रवृत्ती वाढत आहे का? आता बाप्पांनीच लोकांना सांगावे की, अनावश्यक खर्च टाळा, पैसा वाचवा. हा काळ अंध:कारमय आहे. आपण आता अराजकाकडे जातोय का? म्हणून म्हणावंसं वाटतं, बाप्पा सांभाळा सर्वाना! – प्रभाकर देशपांडे, गोवंडी (पूर्व)
दृष्टिकोन बदला
आपल्या सणांना व्यावसायिकेचे स्वरूप येत आहे, हे सत्य आहे. त्याचे कारण आपण हे सण, सर्वसामान्य आणि सर्वधर्मीय तेथे यावेत, अशा प्रकारे मोठय़ा मेहनतीने सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक कार्यकर्ता आपले तन- मन-धन अर्पूण ते करीत असतो. म्हणूनच दहीहंडी, गणपती, दांडिया (नवरात्री) हे सण लोकाभिमुख ठरलेले आहेत. जगात इतर अनेक सण आहेत, परंतु याच सणांना सर्व जण एवढे महत्त्व देऊन त्या ठिकाणी जमतात. लोकमान्य टिळक यात असते तर तेही हे सण भव्य प्रमाणात सादर करणा-या मंडळातील कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले असते. एखादे रेल्वे स्थानक गर्दीने फुलून जात असते, त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी फेरीवाले जमत असतील, तर तो दोष रेल्वे स्थानकाचा असू शकत नाही. त्याचप्रमाणे फक्त व्यापारीकरण या दृष्टिकोनातून या सणाकडे पाहू नये. उलट या सणांच्या भव्य सादरीकरणाने काही काळासाठी एवढय़ा प्रचंड संख्येने लोक जमतात. यात लोकमान्यांच्या कल्पनाशक्तीचे महत्त्व वाढते, परंतु पर्यावरणहानी हा जो मुद्दा आहे, त्यावर विचार करणे फार महत्त्वाचे वाटते. सणांच्या सादरीकरणाबरोबर पर्यावरणाची हानी होत असेल तर ते टिळकांनाही रुचले नसते. त्यामुळे पर्यावरणाव्यतिरिक्त या सणांवर कोणतेही बंधन अथवा नियम नकोत. – सत्यवान सावंत, नेरूळ (नवी मुंबई)
हिंदूंचे सण उत्पन्नाचे साधन
‘हिंदूंचा प्रत्येक सण आनंदाचा, उत्साहवर्धक आहे. नागपंचमी, गोपाळकाला, गणपती, नवरात्री, दिवाळी, शिमगा (होळी) या मुख्य सणांबरोबर अन्य सणही तितकेच महत्त्वाचे व आनंदाचे आहेत. या सर्व सणांना साहित्य उपलब्ध होते. वर्षभर सणांची रेलचेल सुरू असते. दहीहंडीच्या एका दिवसाच्या उत्सवावर रुपये १०० कोटीपेक्षा अधिक खर्च होतात, म्हणजेच उलाढाल होते. गणेशोत्सव १० दिवस, नवरात्री ९ दिवस, दिवाळी चार दिवस, होळी, रंगपंचमी या सणांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रावणात ‘उपवास’ केले जातात. गणपती, नवरात्रात मुलांपासून थोरांपर्यंत सर्व जण आनंदात बेहोष होतात. आपल्या सणांचे पावित्र्य राखणे आपले कर्तव्य आहे. आपल्या सणांचे बाजारीकरण होऊ देऊ नका. मोठय़ा उत्साहाने उत्सव साजरे करताना आपले मराठीपण हरवू देऊ नका. भजन, कीर्तन, पोवाडे, लावण्या असे शाहिरी कार्यक्रम ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिरीला प्राधान्य दिले. पोवाडे, लावण्या लोकांमध्ये ‘चेतना’ निर्माण करतात. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सव ‘सार्वजनिक’ केला, त्याला कारण होते. उत्सवाच्या निमित्ताने संघटित होण्याचे ब्रिटिशांना भारतातून पळवून लावण्यासाठी ‘उत्सव’ चळवळ म्हणून उभे केले. केशवजी नाईक चाळीतला पहिला ‘सार्वजनिक उत्सव’ आहे. या उत्सवातून शिकण्यासारखे खूप आहे. आपण त्याचे मूल्याकंन केले तर बाजारीकरण न होता आदर्श उत्सव असे स्वरूप राहील, असा विश्वास वाटतो. – महादेव गोळवणकर, घाटकोपर (पूर्व)
संस्कृती लोप पावतेय
महाराष्ट्राचा महान सण असणारा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलाय आणि त्यासाठी सर्व ठिकाणी जय्यत तयारीदेखील सुरू आहे. लोकमान्य टिळकांनी जो उद्देश समोर ठेवून गणेशोत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला तो या लगबगीत आता लोप पावत चालला आहे. राजकीय पक्षांनी तर या उत्सवाला आपल्या प्रचाराचं आणि प्रसाराचं जणू काही माध्यमच बनवलंय आणि त्यामुळे धार्मिक सणांना आता व्यावसायिकतेचं स्वरूप प्राप्त होऊ लागलंय. आत्ताच स्वरूप पाहता गणेशोत्सवाचं खरं महत्त्व बाजूला ठेवून आता विविध मंडळे गणरायाच्या उंच मूर्ती, देखावे, यावर नाहक खर्च करून या उत्सवाला स्पर्धेचं रूप देऊ पाहतायत आणि त्यामुळेच हा पारंपरिक सण इव्हेंट होऊ पाहतोय, पण या स्पर्धेपोटी ऱ्हास होतोय तो पर्यावरणाचा आणि याकडे मात्र सगळ्यांचं दुर्लक्ष होतंय. त्यामुळे जर खरंच महाराष्ट्राचा हा महान सण प्रत्येक गणेशभक्ताला साजरा करायचा असेल तर आणि तोदेखील पर्यावरणाचा योग्य समतोल राखून तर तशी नियमावली प्रत्येकाने आखली पाहिजे. तसेच नवसाला पावणा-या गणपतीचे फॅड, सेलिब्रिटींचा वावर, या सगळ्या गोष्टींना अधिक महत्त्व न देता लोकमान्यांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव साजरा केला पाहिजे, जेणेकरून सणांचं बाजारीकरण होणं थांबेल आणि जर असं केलं तरच या सणांचं महत्त्व चिरकाल टिकेल. अन्यथा भारतीय संस्कृतीचा ठेवा असणा-या या सणांचं इव्हेंटमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही. – चेतना झांजे, अंबरनाथ
सणांमध्ये समाजप्रबोधन व्हावे
अमेरिकेतील फियान वादळात दोन-तीन हजार माणसे दगावली. अमेरिकन लोकांनी नाताळ अत्यंत साधेपणाने साजरा करून सणात जमलेली रक्कम फियानग्रस्तांना पाठवली. भारतीयांनी मात्र उत्तरांचलमध्ये झालेल्या नैसर्गिक प्रकोपात हजारो माणसे दगावल्याची घटना ताजी असताना माणुसकी विसरून थाटामाटात गोविंदा साजरा केला. आता निर्लज्जपणे गणेशोत्सवात कर्णकर्कश्श लाउडस्पीकर्स तसेच इमारती हादरवणारे डीजे लावून दहा दिवस हा सण ‘साजरा’ करतील. आजारी व्यक्ती, अभ्यास करणारी मुले, रात्रपाळी करून घरी परतलेले चाकरमानी यांचा जरासाही विचार करणार नाहीत आणि विसर्जनाच्या दिवशी दारू पिऊन धिंगाणा घालतील. अस्तित्वात नसलेल्या काल्पनिक गणपतीसाठी जनतेकडून जबरदस्तीने खंडण्या गोळ्या करून ‘दिमाखाने’ गणेशोत्सव साजरे करतील. ‘समाजप्रबोधन व्हावे’ यासाठीच टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केले होते. शिर्डी, सिद्धिविनायक, अक्कलकोट- शेगाव देवस्थान, लालबागचा राजा, गणेशगल्लीचा बादशहा येथे जमणारा कोटय़वधी रुपयांचा पैसा शाळा, महाविद्यालये, इस्पितळे, अनाथाश्रम यांच्यासाठी वापरला पाहिजे. आपल्या संतांनीच म्हटलेले आहे की ‘जे कां रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा,’ याची सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिका-यांनी जाण ठेवावी आणि ती प्रत्यक्षात उतरवली पाहिजे. – वसंत लांबडे, मुलुंड
सणांच्या ‘इव्हेंट’कडे लोकांनी पाठ फिरवावी
लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. बरीच वर्षे पारंपरिक पद्धतीने, गुण्यागोविंदाने साज-या होणा-या सणात गेल्या आठ-दहा वर्षापासून पैशाचे पाट वाहू लागले आहेत. मोजकीच गणेशोत्सव मंडळे सोडली तर ब-याच मंडळांकडून या सणाचे पावित्र्य पाळलेच जात नाही. रात्री उशिरा मंडळांचे कार्यकर्ते जुगार खेळतात किंवा मद्यप्राशन करून शिव्या देत असतात. त्यांना रोखण्यासाठी ना पोलिस असतात ना संबंधित मंडळांचे पदाधिकारी. अशा मंडळांकडे कोणताही विधायक कार्यक्रम किंवा उपक्रम असेल असा विचार करणेही मुर्खपणाचे ठरेल. गणेशोत्सव संपला की ही मंडळे आपला गल्ला किती भरला आहे, हे पाहण्यास उत्सुक असतात. दहीहंडी, नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सवांचे गेल्या काही वर्षात राजकीयीकरण झाले आहे. एखादा नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी वा राजकीय नेता या मंडळांचे पदाधिकारी असल्याने त्यांचे लक्ष अर्थकारणाकडे असते. दहीहंडीच्या सणात तर हे अधोरेखित झाले आहे. लोकांनीच या सणांच्या ‘इव्हेंट’कडे पाठ फिरवली तर आयोजकांचा उत्साह ओसरेल आणि सण सणांसारखे साजरे होतील. – मनीषा बाचल, ऐरोली (नवी मुंबई)
ई मेल…
चंगळवादाचा चष्मा काढा
हिंदूंचे धार्मिक उत्सव म्हणजे केवळ चंगळवादाचे निमित्त झाले आहेत. या मंगल दिवसांचे औचित्य साधून सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक आदी महत्त्वपूर्ण विषयांवर समाजाला दिशादर्शन करता आले असते. पण आज ते होताना दिसत नाही. भरकटलेल्या जहाजाप्रमाणे हिंदूंनी आपल्या धर्माची स्थिती करून ठेवली आहे. हे चक्र केव्हापर्यंत चालणार? नेत्यांना चमकेशगिरी करायची असल्याने चातक पक्षाप्रमाणे ते या उत्सवांची वाट पाहत असतात. गणेशाची उंच मूर्ती, रोषणाई, मिरवणूक आदी गोष्टींवरून नको ती स्पर्धा आणि मग वर्षानुवर्षे त्याबाबतचा राग धुमसत ठेवणेही योग्य नाही. परिणामी मंडळांत गट-तट तयार होणे व त्याचे उट्टे काढण्यासाठी अविचारीपणे चुकीच्या थराला जाणे, असे पाहायला मिळते, हे फार दुर्दैवी आहे. लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र मंडपात ठेवायचे आणि जागरणाच्या नावाखाली त्यांच्यासमोर पत्ते खेळायचे. नवरात्रीचा दांडिया म्हणजे बहुतांश प्रेमी युगुलांचा दांडिया, असेच समीकरण आता तयार झाले आहे. संपूर्ण समाजाने उत्सव धार्मिकपणे साजरे केले तर त्याची फलश्रुती नक्कीच सर्वोत्तम असेल. हिंदूंनी आता तरी शहाणे होऊन चंगळवादाचा चष्मा काढून ठेवावा. – जयेश राणे, भांडुप
समाजविघातक बाजारीकरण
गेली सुमारे ४०- ५० वर्षे सणांचे चढत्या श्रेणीचे बाजारीकरण होत असून आता तर त्याचे प्रमाण महाप्रचंड होत चालले आहे. हे बाजारीकरण अधिकाधिक विद्रूप अन समाजविघातक असे स्वरूप धारण करत असून त्यात कायदेही बिनदिक्कत अन् बेमुर्वतखोरपणे पायदळी तुडवले जात आहेत. यात सर्वपक्षीय नेते अन् कायदे बनवणारे महाभागही असणे अत्यंत गंभीर आहे. विविध सण आणि समारंभही रस्ते अडवून वाहतुकीची कोंडी करून साजरे केले जातात, त्यासाठी वीज चोरली जाते, पाण्याचा बेसुमार गैरवापर होतो, आपापसांतील स्पर्धातून हाणामा-या होतात, डोकी फुटतात, प्रचंड ध्वनी अन् वायुप्रदूषण होते, पैशाची उधळपट्टी होते. पोलिस तसेच विविध सरकारी अन् स्थानिक संस्थांवरील निर्थक ताण वाढतो. गुंडगिरी तसेच मुली व स्त्रियांच्या छेडछाडीस उत्तेजन मिळते. त्यांना महत्त्व देऊन आपल्याच पायावर धोंडा पडून घ्यायचा की त्यांना खडय़ासारखे बाजूला सारायचे हे लोकांनीच ठरविले पाहिजे. – श्री. वि. आगाशे, ठाणे (प.)
सण नव्हेत, ‘सेलिब्रेशन इव्हेंट्स’
‘आपली संस्कृती, आपल्या परंपरेनुसार वर्षभरात येणारे आपले ‘मराठी सण’ आपण सामाजिक बांधिलकी व राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातून साजरे करत असतो. समाजात लोकांमध्ये असणारी कटुता व भेदभाव यांचा समूळ नाश होण्यासाठी लोकमान्य टिळकांसारख्या प्रगल्भ विचारवंतांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांमध्ये एकोप्याची, सकारात्मक विचारांची बीजे रुजावी यांसाठी बहुमोलाचे योगदान दिले. आपल्या सणांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी ‘सण-उत्सव’ उत्साहाने साजरे करत असतो, परंतु अलीकडच्या काळात आपल्या सणांना, ‘सेलिब्रेशन इव्हेंट’ नावाच्या आधुनिकतेने घेरले आहे. काळानुसार पावले उचलत असताना आपल्या सण व परंपरांचा लोप होत चालला आहे. आपल्या सणांना आधुनिकतेने ग्रासले आहे, हिंदू पंचांगानुसार श्रावण मासारंभातील धार्मिक सणांबरोबर, सुरुवातीला दहीहंडीची ‘सेलिब्रेशन इव्हेंट’ गाजवल्यावर त्यानंतर येणारा गणेशोत्सव व पुढे नवरात्रोत्सवातही या आधुनिक ‘इव्हेंट’ची चलती राहते. – ओमकार विलणकर, प्रभादेवी
सणांचे अवडंबर
आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणामागे एक विशिष्ट असे कारण आहे, परंतु आजकाल सर्वच पातळीवर सणांचे अवडंबर माजले आहे. यावर्षीच्या दहीहंडी उत्सवाने तर अवघ्या मुंबईला लाज आणली. दहीहंडीच्या नावाखाली थरांच्या जीवघेण्या स्पर्धा, कर्णकर्कश्य, डीजे, रेन डान्स ही असली थेरेच पाहायला मिळाली. त्यात कुठेही उत्सवाचा लवलेशही नव्हता. दहीहंडीप्रमाणेच गणेशोत्सवातही हीच बजबजपुरी पाहावयास मिळते. नवसाच्या गणपतीचे मंडप तर आजकाल नाक्यानाक्यांवर दिसतात. दहीहंडी काय किंवा गणेशोत्सव काय, आजकाल उत्सवाचे हे वाढते फॅड सर्वत्र रोगासारखे पसरले आहे, परंतु काही निवडक गणेशोत्सव मंडळे मात्र दरवर्षी सामाजिक मुद्दय़ांवर भाष्य करणारे देखावे उभारून त्यांचे समाजाप्रति असलेले कर्तव्य अधोरेखित करतात. काही गणेश मंडळांनी तर त्यांच्या मंडपात आक्षेपार्ह कपडय़ांनाच मनाई करून सणांचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्यांचे हे प्रयत्न कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत. यामुळे सणासुदीच्या काळातील ही वाढती अराजकता पाहून आपण पुरोगामी महाराष्ट्रातच राहतो का, हा प्रश्न पडतो. – उदय वाघवणकर, जोगेश्वरी (पूर्व)
वाचकांचे व्यासपीठ
महागाईच्या पार्श्वभूमीवर उत्सवकाळात वाहनांना टोलमाफी द्यावी का?
महागाईच्या वणव्यातही गणेशोत्सवासारखे सण साजरे होतच असतात. सणासुदीच्या दिवसांत गावी जाण्यासाठी तसेच प्रवासासाठी रेल्वे, खाजगी बसेसच्या तिकिटांचे दर गगनाला भिडले असल्याने छोटया खाजगी गाडयांचा वापरही वाढला आहे. यंदा कोकणात गणेशोत्सवासाठी टोलमाफीचे संकेत काही नेत्यांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी न झाल्याने पोलिसांनी सुचवलेल्या कोल्हापूरमार्गे कोकणात जाणा-यांना किमान हजार रुपयांचा टोलभुर्दंड सोसावा लागतोय. अशावेळी तात्काळ टोलमाफीचे आदेश दिले जावेत का? तसेच, भविष्यातही सणासुदीच्या दिवसांत टोलमाफी केला जावी का? याबाबत वाचकांनी .. याबाबत वाचकांनी आपली मते शुक्रवापर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत. शब्दमर्यादा: १०० ते १५० शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा. आपली मते तुम्ही vyasapith@gmail.com या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता.
प्रहार,
वन इंडियाबुल्स सेंटर, नववा मजला,
ज्युपिटर मिल्स कंपाउंड,
लोअर परळ,
मुंबई – ४०००१३,
फॅक्स : ०२२-४०९६९९००,०२२- ६१२३९९६६
‘वाचकांचे व्यासपीठ’ऑनलाइन पत्र लिहा
vyasapith@gmail.com वर तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही मत नोंदवू शकता. त्यासाठी लॉग इन करा www.prahaar.in किंवा www.facebook.com/prahaar.in शब्दमर्यादा १०० ते १५० पर्यंत.
देव भावाचा भुकेला
दिवसेंदिवस हिंदू धर्मातील सर्वच सणांना शासन, राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, जाहिरातदार, अतिउत्साही भक्त यांच्यामुळे व्यावसायिकतेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दहीकाला, गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात समाज प्रबोधनपर कार्यक्रम न ठेवता कर्णकर्कश आवाजातील ध्वनीवर्धक, डीजे-बेंजोच्या तालावर मद्यधुंद रोंबासोंबा नाच, प्रायोजकातर्फे बॅनर्स, होल्डींग्जमधून मिळणा-या काळ्या पैशातील ऐश्वर्याचे प्रदर्शन, फटाक्यांची आतषबाजी ही आजच्या धार्मिक सणांची वैशिष्ट्ये झाली आहेत. अतिशयोक्तीमुळे आमचे सण उपद्रवकारक होऊ लागलेत. यामुळे कोट्यवधी रूपयांची उलाढाल होत असते म्हणून पावित्र्य जपणे सोडून इव्हेंट करणे हानीकारक आहे. उत्सवाचे बाजारीकरण, मंडळांमधील चुरस, मागणी तसा पुरवठा करणारे मूर्तीकार, भक्तांपेक्षा मंडळांच्या वाढलेल्या अपेक्षा, गणेशमूर्ती पाहण्यासाठी तासनतास चालणा-या लांबच लांब रांगा, दानपेटीतील वाढलेले उत्पन्न, विविध मार्गांनी जमा होणारा पैसा ही उंच मूर्ती बनविण्यामागील कारणे आहेत. सर्वच मंडळे ‘आमचा गणपती नवसाला पावतो’ अशी पध्दतशीरपणे योजना व जाहिरात करून भक्तांच्या मनात संभ्रम निर्माण करीत असतात. देव भावाचा भुकेला असून तो निरपेक्ष आहे. ईश्वर चराचरांत सामावलेला आहे. आपणच परमेश्वराकडे साकडं घालून ते पावण्यासाठी व्रतवैकल्ये, विविध वस्तूंच्या स्वरूपात ऋणातून मुक्त होण्यासाठी केविलवाणी धडपड करीत असतो. याचाच गैरफायदा घेतला जातो. भक्तांनी अंधश्रध्दांवर विश्वास न ठेवता भावनिक आवाहनास प्रतिसाद देऊ नये. सेलीब्रिटींमुळे भाविकांच्या वेळेचा अपव्यय होतो. गर्दीने सामाजिक अस्वास्थ्य वाढते. उत्सवांचे बदलते स्वरूप पाहता आपण नैतिक मानवी मूल्यांचा –हास अनुभवत आहोत. लोकमान्यांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने समाज प्रबोधनातून जागृती निर्माण करून देशाला स्वातंत्र्य मिळवून उद्याचा आदर्श भारत घडवायचा होता. त्यांना समाजातील अनिष्ट चालीरिती बंद करून विज्ञानाधिष्ठित हिंदुस्थान पाहायचा होता. आजचे बदलते धार्मिक स्वरूप पाहून त्यांना पश्चात्तापच झाला असता. सण साजरे करताना उत्सवाचे पावित्र्य राखण्याबरोबर समाजात कायदा, सुव्यवस्था राहण्यासाठी शासनाने केलेली नियमांची तरतूद पुरेशी आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे ज्यांनी त्याचे कटाक्षाने पालन केले पाहिजे ते राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते सर्रास नियमांचे उल्लंघन करतात आणि पोलीस त्यांना विनम्रपणे सहकार्य करतात. त्यामुळे सण साजरे करताना त्यांचे होणारे बाजारीकरण थांबवले पाहिजे.