पावसाळयात पचनशक्ती कमी झालेली असते. सृष्टीतही सूर्याच्या दर्शनाचा लपंडाव चाललेला असतो. त्यामुळे जेवण नीट पचत नाही. याच दिवसांत अधिक उपास-तापास केले जातात. अशा वेळी नेमका काय आहार घ्यावा किंवा काय काळजी घ्यावी. याची ही थोडक्यात माहिती.
पावसाला सुरुवात झाली असली तरीही निसर्गात कितीतरी बदल होणं सुरुच असतं. कधी मुसळधार पाऊस पडतो तर कधी कडक उन पडतं. उन पडलेलं पाहून आपण घराबाहेर पडावं तर अचानक कुठूनतरी काळे ढग जमा होतात आणि पाऊस बरसायला लागतो. या सर्व ऋतूबदलांचा मानवी शरीरावर काय बरे परिणाम होत असेल? परिणामी आजार वाढतात, दवाखान्यात गर्दी होते. वातावरणातला ओलावा व गारव्याने सर्दी पडसे, ताप, खोकला होतो. दूषित पाण्यामुळे पचनाचे त्रास होतात. उलटी-जुलाब होतात. डेंग्यू, मलेरिया, विषमज्वर, कावीळ अशा आजारांच्या साथी पसरण्याची शक्यता असते.
आयुर्वेदानुसार पावसाळयात अग्निमांद्य होते. शरीराची ताकद म्हणजे बल कमी झालेले असते. प्रतिकारशक्ती दुर्बल होते. जमिनीतील ओलावा आणि हवेतील आद्र्रता व गारवा यांनी वातादी दोषांचे संतुलन बिघडते. त्यासाठी वमन, विरेचन तसेच अतिशय उपयुक्त अशी बस्ती चिकित्सा करावी. जुने तांदूळ, गहू, जव ही धान्ये, मुगाचे कढण, मांसरस (सूप) यांचे सेवन करावे. हलका, ताजा, गरम व कफवात शामक आहार घ्यावा. पालेभाज्या, फळे, फळभाज्या स्वच्छ धुवून, शिजवूनच खाव्यात. तळलेले पदार्थ, विशेषत: कांदाभजी, बटाटेवडे खातांना घरीच बनवून आणि भूक शिल्लक ठेवूनच खावे. पाणी गाळून व उकळून प्यावे.
पावसाळयात पचनशक्ती मंदावते. त्यामुळे जेवण नीट पचत नाही. हाच विचार करून आपल्याकडे शास्त्रात श्रावण महिन्यात मांसाहार वज्र्य सांगितला असावा. तसेच धार्मिक कार्ये करण्यास हा महिना शुभ सांगितला आहे. म्हणूनच उपवास, व्रतवैकल्ये याच काळात अधिक केली जातात. शरीरशास्त्र व धर्मशास्त्र यांचा सुंदर मिलाफ आपल्याला भारतातच बघायला मिळतो. फक्त डॉक्टरांनी सांगितले आहे म्हणून पथ्य करणे कुठे आणि श्रावण आहे म्हणून उत्साहाने लंघन करणे कुठे? प्रसन्न चित्ताने सर्व उपासना व उपवास अनायासेच केले जातात व आरोग्याचा समतोल राखला जातो.
जन्माष्टमी, हरितालिक, ऋषीपंचमी, नागपंचमी, श्रावणी सोमवार, गुरुवार, शनिवार असे किती प्रकारचे उपवास व उपासना लागोपाठच येतात. सणांच्या व पूजेच्या निमित्ताने वेगवेगळया प्रकारची पाने, फुले जमा केली जातात. अनायासेच औषधांची माहिती होते.
मात्र उपवास करताना बंधन, कोष्ण जल पिणे अपेक्षित आहे. कडकडीत उपवास करून अॅसिडिटीला निमंत्रण देऊ नका. फलाहार करा, दूध प्या, वरीच्या तांदळाचे पदार्थ, राजगिरा खा. साबुदाणा मात्र पचायला जड आहे. शेंगदाणेदेखील पित्तकर आहेत याचा विसर पडू देऊ नका.
पथ्यकर आहार विहार व पंचकर्म चिकित्सा यांची शिदोरी घेऊन वर्षाऋतूचे उत्साहात स्वागत करा. साथीच्या आजारापासून आपले व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करा, ही शुभेच्छा!
फारस छान माहिती आहे. मला ही माहिती खुप आवडली . धन्यवाद…