महाराष्ट्रामध्ये भाजपच्याच नेतृत्वाखाली सरकार बनेल असे स्पष्ट करत, भविष्यात भाजप शिवसेनेची साथ सोडून ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत असेल असे स्पष्ट संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले.
मुंबई- महाराष्ट्रामध्ये भाजपच्याच नेतृत्वाखाली सरकार बनेल असे स्पष्ट करत, भविष्यात भाजप शिवसेनेची साथ सोडून ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत असेल असे स्पष्ट संकेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिले. दिल्लीत सुरू असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शहा यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली त्या वेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री हा भाजपचाच झाला पाहिजे त्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा, असा आदेश देऊन त्यांनी शिवसेनेला इशाराच दिला.
राज्यात शिवसेनाच मोठा भाऊ असे सांगत मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेने दावा केला होता. शिवाय शिवसेनेने परस्पर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आहे. मात्र शिवसेनेच्या या भूमिकेलाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी खो दिला आहे. महाराष्ट्रात गेली १५ वर्षे काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तांतर होऊन राज्यात भाजपच्याच नेतृत्वाखाली सरकार बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी, वेळ आल्यास स्वबळावर लढण्याची तयारी ठेवण्याचे संकेतही त्यांनी आपल्या भाषणातून दिले.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच ही भूमिका घेतल्याने शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यापूर्वी राज्यातील भाजप नेते स्वबळाची भाषा करत होते. मात्र त्यांच्याकडे लक्ष देणार नसल्याचे शिवसेना नेतृत्वाने स्पष्ट केले होते. शिवाय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष काय बोलतील त्यालाच आपण महत्व देणार असल्याचे वक्तव्य ही शिवसेनेने केले होते. त्यात आता खुद्द अमित शहांनीच भाजपच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार बनेल असे वक्तव्य करून शिवसेना नेतृत्वाला योग्य तो इशारा दिला आहे. तसेच जागा वाटपामध्ये शिवसेनेच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचेही शहा यांनी सुचवले आहे.
शहांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील भाजप नेत्यांना निश्चितच बळ मिळणार आहे. त्याचा फायदा अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी होणार आहे. तसे न झाल्यास भाजपला स्वबळावर लढण्याचा पर्याय मोकळा असेल हेच शहा यांनी आपल्या वक्तव्यातून सूचित केले आहे.
शिवसेनेने या गद्दार भ जा प ला एकट्यानेच निवडणूक लढू द्यावी .हे परप्रांतीय मराठी माणसामध्ये फुट पडत आहे .महाराष्ट्रात कोन्ग्रेस चा पराभव करण्याची भ जा प ची लायकी नाही .महाराष्ट्रात कॉंग्रेसचा पराभव फक्त आणि फक्त कोन्ग्रेस चकरू शकते. महाराष्ट्रात भ जा प सोडून सर्व पक्षांनी युती करावी आणि महाराष्ट्र भा ज प मुक्त करावा.