हार्बर मार्गावर आजही जुन्या लोकल चालवल्या जात असल्याने रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी रेल्वे बोर्डाकडे नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई – हार्बर मार्गावर आजही जुन्या लोकल चालवल्या जात असल्याने रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी रेल्वे बोर्डाकडे नाराजी व्यक्त केली आहे. बन्सल यांनी आपल्या मुंबई दौ-याच्या वेळी हार्बर मार्गावरील लोकलमधून प्रवास केला होता. त्यावेळी ही बाब त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तातडीने रेल्वे बोर्डाच्या अधिका-यांकडे चौकशी करत यासंदर्भात ठोस निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत. सध्या हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ३० वर्षाच्या जुन्या ४२ लोकल चालवल्या जात आहेत.
रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल १६ आणि १७ एप्रिल रोजी मुंबई दौऱ्यावर आले होते. १६ तारखेला लोकमान्य टिळक टर्मिन्स (एलटीटी) येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी कुर्ला स्थानकातून हार्बर मार्गावरील लोकलने प्रवास केला. त्यावेळी जुन्या लोकल आजही या मार्गावर चालवल्या जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शिवाय प्रवाशांबरोबर साधलेल्या संवादातूनही ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यात जुन्या लोकलमधील बंद असलेले पंखे, पंख्यांची हवा न लागणे, शिवाय नव्या लोकलच्या तुलनेत या लोकलमधील जागा अगदीच तोकडी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी तातडीने याबाबत रेल्वे बोर्डाच्या अधिका-यांकडे विचारणा केली. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर नवीन लोकल चालवल्या जात असताना हार्बर रेल्वेबाबत दुजाभाव का, असा प्रश्न त्यांनी अधिका-यांना केला. त्यामुळे याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, अशा सूचना त्यांनी रेल्वे बोर्डच्या अधिका-यांना केली.
दरम्यान, रेल्वे मंत्र्यांच्या या सूचनेमुळे का होईना हार्बर मार्गावर लवकरच नवीन लोकल चालवल्या जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हार्बरवर चालवल्या जाणा-या गाड्या कोणत्याही प्रकारे ‘अनफिट’ नाहीत, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विद्याधर मालेगावकर यांनी स्पष्ट केले आहे. एसी-डिसी गाडय़ांच्या कमतरतेमुळे नव्या गाडय़ा या मार्गावर चालवता येऊ शकत नाहीत, मात्र हार्बर मार्गावर एसी-डिसी रुपांतरण झाल्यानंतर नव्या गाडय़ा चालवण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले.
रेल्वेमंत्र्यांचे आभार
रेल्वेमंत्र्यांनी हार्बर मार्गावरील या समस्येकडे लक्ष दिल्याने पनवेल येथील जनहित रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष एस. एस. दिगोडकर यांनी त्यांचे आभार मागले आहेत. मात्र, सिडकोने नव्या गाडय़ांसाठी रेल्वेला १०० कोटी देऊ केले होते, त्याचे काय झाले. नव्या गाडय़ा आल्या मग त्या हार्बर मार्गावर का चालवल्या गेल्या नाहीत, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत. मात्र, आता लवकरात लवकर बारा डब्यांच्या नव्या गाडय़ा हार्बरवर सुरू व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
मध्य आणि पश्चिम मार्गावर बारा आणि पंधरा डब्यांच्या गाड्या धावतात आणि हार्बर (सीएसटी -पनवेल) मार्गावर अजुन नऊ डब्यांच्या गाड्या धावतात.
बारा डब्यांच्या गाड्यांची तर गरज आहे पण त्या पेक्षाही महत्वाचे कि सध्याच्या गाड्यांची संख्या वाढवणे फार गरजेचे बनले आहे.
संध्याकाळच्या वेळेस कुर्ला येथून पनवेल साठी गाड्या सोडाव्यात.