लग्न ठरणं, लग्न पार पडणं आणि लग्नानंतरचं नवं-कोरं आयुष्य हे एकाच गोष्टीचे तीन वेगवेगळे पदर आहेत. तिन्हीतली पात्र तीच फक्त परिस्थिती वेगवेगळी. या गोष्टीत कुटुंब, प्रेम, भावना, नाती असं सगळं काही अनुभवता येतं आणि तेही प्रत्यक्षात..! मी अगदी हल्लीच लग्नाच्या मांडवाखालून गेले असल्यामुळे थोडंफार निरीक्षण आणि बरचसं आत्मपरीक्षण केल्यानंतर माझ्या मनाच्या तिजोरीत साठलेले लग्न आणि त्याच्याशी संबंधित अनेक मजेदार किस्से आणि अनुभव तुमच्याशी या सदरात शेअर करणार आहे.
‘हाती मेंदी, डोळा पाणी;
उरी हुंदका, मनात गाणी’
मनाची अशीच काहीशी अवस्था मी अगदी काही दिवसांपूर्वीच अनुभवली. लग्नाला आत्ताच एक महिना पूर्ण झाला आहे, त्यामुळे अजूनही मी नववधू म्हणूनच सगळीकडे मिरवतेय. खरंतर, परीकथेतील ‘त्या’ राजकुमाराचं चित्र मनात पूर्ण होण्याआधीच माझं लग्न ठरलं. ऑगस्ट महिन्याच्या सहा तारखेला आम्ही पहिल्यांदा भेटलो. त्या दिवसाला सहा महिने पूर्ण झाले. या सहा महिन्यांमध्ये माझं, खरंतर आम्हा सगळ्यांचंच आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. सहा महिन्यांपूर्वी एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी असलेले आम्ही दोघं, आमच्याही नकळत एकमेकांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा घटक बनलो. मला वाटतं हीच नियोजित (अरेंज्ड) लग्नांची गम्मत आहे.
आधी एक औपचारिक भेट, मग मेसेजेस, मग तासन्तास फोनवर मारलेल्या गप्पा, दर विकेंडला भेटण्याची ओढ, कधी जेवणाचा प्लान तर कधी सिनेमाचा, कधी नुसतंच समुद्रकिनारी बसून केलेलं स्वप्नरंजन.. खरं तर लग्न ठरल्यापासून ते होईपर्यंतचा काळ या सगळ्यात खूप पटकन निघून जातो. पण दोघांचं नातं फुलण्यासाठी हाच काळ सगळ्यात महत्त्वाचा आणि अत्यावश्यक असतो. त्यामुळे साखरपुडा आणि लग्न यात किमान चार महिन्यांचं अंतर असावं असं मला तरी वाटतं.
लग्नाच्या या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते ती ‘मुलगा पाहणं’ या पारंपरिक तरी अत्यंत मनोरंजक कार्यक्रमाने. मला नेहमी असा प्रश्न पडायचा की लग्नासारखा, संपूर्ण आयुष्याचा प्रश्न असलेला निर्णय असा अध्र्या तासाच्या भेटीत कसा घ्यायचा? पण माझ्या वेळी ती अध्र्या तासाची भेट आम्ही दोघंही बडबडे असल्यामुळे दोन तासांची झाली आणि आमचा निर्णय घरी पोहोचेपर्यंत जवळजवळ पक्का झाला होता. खरंतर आमच्या घरच्यांनी पारंपरिक कांदेपोह्यांच्या कार्यक्रमाला बगल देत आधी आम्ही दोघांनीच भेटावं असं ठरवलं. त्यामुळेच आम्हाला एकमेकांशी अधिक मोकळेपणाने बोलता आलं, स्वभावांचा अंदाज आला, विचार कळले आणि आमची पहिल्याच भेटीत चक्क मैत्री झाली. त्यामुळे माझा मुलगा बघण्याचा आणि त्याचा मुलगी बघण्याचा, इतरांना सहसा बोअिरग वाटणारा, कार्यक्रम आमच्यासाठी इंटरेस्टिंग झाला होता.
एरवी कांदेपोह्यांच्या कार्यक्रमात त्या बिचा-या मुला-मुलीला सोडून इतर गावगप्पाच अधिक होतात. इतक्यात कुणाला तरी कार्यक्रमाचा मूळ उद्देश आठवतो आणि मग ‘तुम्ही हवं तर प्रश्न विचारा एकमेकांना’ अशी मुभा दिली जाते पण एवढय़ा लोकांसमोर प्रश्न तरी काय विचारणार आणि उत्तरं तरी काय देणार! म्हणून मग काही न बोलता-विचारताच, केवळ दिसण्यावर आणि घरातल्या इतर व्यक्तींकडे पाहूनच एकमेकांना होकार किंवा नकार कळवण्याची वेळ येते आणि मग लग्नाचा जुगार खेळला जातो. म्हणजे जर जोडीदार चांगला निघाला तर डाव आपला नाहीतर सगळीच गणितं चुकतात आणि लग्नाच्या नावावर केवळ तडजोड म्हणून एका छप्पराखाली दोन व्यक्ती वर्षानुवर्ष एकत्र राहतात.
बरं, योग्य जोडीदाराची निवड करताना काही ठरावीक ठोकताळे, नियम वगरे नसतातच. बुद्धी अनेक गोष्टी पडताळत असते; पत्रिका, नोकरी, घर, घरातली माणसं, मित्र, व्यसनं असं बरंच काही, पण मन एक कौल देत असतं आणि ज्यांना तो कौल नीट ऐकता आला त्यांची निवड सहसा चुकत नाही.
एकदा लग्न ठरल्यावर मात्र अनेक गोष्टींचा मनात कल्लोळ सुरू होतो. प्रत्येक गोष्ट करत असताना लग्नानंतर आपल्याला आधी आपण करत असलेल्या गोष्टी करायला मिळतील का, असे विचार मनात येत राहतात. मैत्रिणींसोबत फिरताना, शॉिपग करताना, सिनेमा बघताना, ऑफिसला जाताना, अगदी मोठय़ा आवाजात हसतानाही. त्यात लग्न ठरल्यानंतर आजूबाजूच्या लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेलेला असतो. एकीकडे आपल्यासाठी सगळे खूप आनंदी असल्याचं सांगून शुभेच्छा देत असतात आणि दुसरीकडे आधीच गोंधळून गेलेल्या मुलीला आणखी अस्वस्थ करण्याचा चंग बांधल्यासारखे वागतात. आपण कुठल्याही गोष्टीचा आनंद घेत असलो की, ‘करून घे मजा, आता लग्न व्हायचंय ना’ किंवा लग्न ठरल्यानंतर येणा-या प्रत्येक सणाला ‘हा तुझा शेवटचा सण’ असं काहीतरी विचित्र बोलत राहतात. माझं लग्न आहे की मी तुरुंगात शिक्षा भोगायला चालले आहे हेच मला अशा लोकांच्या बोलण्यावरून लक्षात येत नव्हतं.
त्यात आपल्याकडे ‘सासू’ या नात्याला उगीचच एक काळी, खलनायकी छटा देण्याची पद्धत आहे. लग्न ठरल्यापासूनच माझ्या ‘अनुभवी’ मैत्रिणी, बहिणी, शेजार-पाजारच्या, ऑफिसमधल्या बायका अशा समस्त स्त्री-जातीच्या प्रतिनिधींनी स्वत:चे अनुभव माझ्याशी शेअर करण्याच्या नावावर खरंतर मला घाबरवण्याचाच खूप प्रयत्न आरंभला होता. जेवणापासून, कपडय़ांपर्यंत आणि टिकलीपासून अगदी रोजच्या प्रवासाच्या सवयीपर्यंत ‘कळेल. कळेलच’ अशी एकच प्रतिक्रिया नियमित ऐकायला मिळत होती. काहीवेळा मी ‘माझा नवरा असा नाहीये, माझी सासू अशी नाहीये’ असं सांगण्याचा प्रयत्न केला पण संसाराचे ‘अनुभवी’ बोल बोलत असलेल्या माझ्या प्रिय सख्या त्यावरही ‘सहा महिने थांब फक्त, त्यानंतर हेच बोलतेस का बघूच’ असं मलाच आव्हान देऊ लागल्या. मग या लग्न-संसाराच्या खेळात अजून लिंबू-टिंबू असलेली मी, त्यांच्याशी हुज्जत घालणं सोडून हे सल्ले एन्जॉय करायला सुरुवात केली.
या दरम्यान मला खूप विचित्र प्रश्नही पडू लागले होते. म्हणजे मुलगी फक्त लग्नाच्या दिवशी ‘नवरी’ आणि दुस-या दिवशीपासून ‘बायको’ बनते पण मुलगा मात्र आयुष्यभर नवराच राहतो, असं का? आणि गम्मत म्हणजे यावरही मला ‘कळेलच.. कळेलच’ असंच उत्तर मिळत होतं.
असो, कुठलेही पूर्वग्रह मनात न ठेवता नवीन घरात जायचं असं माझं आधीच ठरलं होतं. मी संसार वैगरे याबद्दल बोलण्यासाठी अजून तशी नवीनच आहे पण माती मऊ असतानाच तिला योग्य आकार दिला तर उत्तम कलाकृती घडते. त्यामुळे नव्या घरातले सुरुवातीचे हे शिकण्याचे आणि समजून घेण्याचे दिवस, थोडक्यात माझ्या ‘ट्रेनिंग पिरीयड’ची मी सध्या तरी खूप मजा घेतेय.
एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आपण मुली जसं आपलं घर, कुटुंब सोडून नवीन घरी राहायला जात असतो तसंच ते घरही एका नवीन माणसाला घरात, कुटुंबात सामावून घेण्याचा प्रयत्न करत असतं. आपल्या आणि त्या कुटुंबाच्या अनेक वर्षाच्या सवयी, दैनंदिन आयुष्य या सगळ्यावरच त्याचा परिणाम होत असतो. घरी एखादा पाहुणा आला तरी त्याच्यासाठी काही दिवस जागा करताना आपल्या नाकी नऊ येतात आणि इथे तर कायमसाठी एका व्यक्तीला आपल्या घरात आणि त्याहीपेक्षा आपल्या कुटुंबात सामावून घेणं हे तेवढं सोपं नक्कीच नाही. दोन्ही बाजूंनी थोडा प्रयत्न करणं हा त्यावरचा एकमेव उपाय आहे.
माझे सासू-सासरे आणि नवरा गेली अनेक वर्ष घरात तिघंच राहत होते पण आता मी आल्यानंतर त्यांनी मला असं काही आपलंसं करून घेतलं आहे की पाच दिवस माहेरपणाला गेल्यानंतरही माझं तिथे लक्ष लागत नव्हतं आणि त्यांनाही इथे माझ्याशिवाय करमत नव्हतं. शेवटी मी माहेरचा मुक्काम एक दिवस आधीच गुंडाळून परत माझ्या नवीन घरी आले. मला केवळ महिन्याभरातच हे घर माझं वाटू लागलंय याचं श्रेय खरं तर त्या घरातल्या माणसांचंच आहे. जसं माहेरी होतं अगदी तसंच मी या घरातल्या प्रत्येकाशी मोकळेपणाने बोलू शकते, अगदी सास-यांशीदेखील माझ्या बाबांसोबत बोलायचे तशा गप्पा मारू शकते. मला माझ्या घराची आठवण येऊ नये म्हणून माझा नवरा माझा मित्र झाला, सासू-सासरे आई-बाबा झाले आणि नणंदा मैत्रिणी झाल्या. माझ्या सवयी त्यांनी आत्मसात केल्या. आणि त्यामुळेच या घरात रुळायला मला एक आठवडाही लागला नाही.
अर्थात, या बाबतीत प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. पण माझ्या निरीक्षणाप्रमाणे अनेकदा ‘सासर’ याविषयीच्या चुकीच्या समजुतींमुळे आणि नव्या नवरीच्या पूर्वग्रहदूषित मनामुळेच अनेक वाद निर्माण होतात. ते थोडय़ाफार प्रमाणात असणारच पण अनेकदा ते टाळता येण्यासारखे असतात. सासर म्हणजे सासुरवास ही चुकीची समजूत आपल्या समाजातून हळूहळू नामशेष व्हायला हवी. लग्न ठरलेल्या मुलीला सासरची आणि तिथल्या माणसांची भीती दाखवण्यापेक्षा आपल्या चांगल्या अनुभवांतून तिचा आत्मविश्वास वाढवायला हवा. तरच ती साफ मानाने आणि सकारात्मक दृष्टिकोन सोबत घेऊन नव्या घरात प्रवेश करू शकते. लग्न दोन माणसांचं नाही तर दोन कुटुंबांचं असतं आणि असावं. दोन्ही पक्षातल्या लोकांनी एकमेकांच्या अडचणी समजून सगळं निभावून नेलं की सोहळाही छान होतो आणि मनंही दुखावली जात नाहीत. कारण लग्नात आहेराच्या साडय़ा किंवा रुखवताचं सामान महत्त्वाचं नसून एका नव्या नात्याची होणारी सुरुवात आणि त्यानिमित्तानं जोडली जाणारी दोन घरं आणि त्यातली माणसं सगळ्यात जास्त महत्त्वाची असतात.
फार छान.. वैयक्तिक अनुभवावर लिहायला मिळणं ही भाग्याचीच गोष्ट..