राष्ट्रपती पदकासह तंटामुक्तपुरस्काराचा मानकरी तरुणांची शैक्षणिक क्षेत्रात गरुडझेप घाटमार्गामुळे विकासाला मिळाली चालना राजकीय व सामाजिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणा-या व्यक्तिमत्त्वांमुळे एखाद्या भागाला वेगळी ओळख प्राप्त झालेली असते. त्याचबरोबर एखाद्या भौगोलिक क्षेत्रामुळे, निसर्गरम्य ठिकाणामुळे देखील काही ठिकाणे प्रसिद्धीला येतात. मात्र, जे ठिकाण दुर्गम मानले जात होते, जिथे विकासाची गंगा कधीच येणार नाही असे मानले जात होते, त्या करुळ गावाचा स्थानिकांच्या कल्पकतेमुळे कायापालट झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील या गावाची ओळख निसर्गरम्य करुळ घाट आणि त्याला पर्यटकांकडून मिळत असलेली पसंती यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचली आहे.
करुळ गावाजवळ असलेल्या करुळ घाटाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोकण व घाटमाथा यांना जोडणारा हा घाट आहे. करुळ घाटाच्या कामाचा प्रारंभ १९५८ मध्ये करण्यात आला. तत्कालीन बांधकाम मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या घाटरस्त्यासाठी करु ळ गावचे सुपुत्र व माजी आमदार दिवंगत ए. पी. सावंत यांचे प्रमुख योगदान होते. कोणतीही यंत्रे किंवा इतर साधनसामग्रीचा वापर न करता स्थानिक मजुरांनी स्वत:च्या कल्पकतेच्या आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर घाटरस्त्याचे काम केले. घाटमार्ग फोडण्यात गावातील काही मजुरांचे योगदान फार मोठे आहे. सन १९६५ च्या दरम्यान या घाटमार्गे वाहतूक चालू झाली.
नागरिकांची पायपीट कमी झाली
वाहतुकीची साधनेच कमी असल्याने १९८० पर्यंत गावातील नागरिकांना पायी चालत जाऊन गगनबावडा गाठावा लागत होता. सर्व बाजारहाट करण्यासाठी आणि इतर आवश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी करुळच्या ग्रामस्थांना बावडयाला जावे लागत होते. हळूहळू घाटमार्गाची कामे होऊन यामार्गे वाहतूक वाढत गेली आणि ग्रामस्थांची पायपीट कमी झाली. पर्यटकांना हा घाट अधिकाधिक आकर्षित करू लागला आहे. या घाटातून आजूबाजूला दिसणारा निसर्गरम्य परिसर यांमुळे पर्यटकांचा ओघ या भागाकडे वळू लागला आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे स्थानिकांच्या विकासाला चालना मिळाली आहे.
उत्साही ग्रामस्थांमुळे जलद विकास
वैभववाडी तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत करुळमध्ये विकास प्रक्रिया जलद गतीने झाली आहे. गावातील रस्त्यांचा विकास, वीजपुरवठा आणि पाणीपुरवठयाच्या योजना अतिशय चांगल्या पद्धतीने राबवण्यात आल्या. विजयदुर्ग-कोल्हापूर हा प्रमुख मार्ग गावातून जात असल्याने ग्रामस्थांना सर्वच दृष्टीने त्याचा मोठया प्रमाणावर फायदा झाला. ग्रामस्थांचा उत्साह आणि त्यामुळे विविध प्रकल्पांमध्ये वाढलेला लोकसहभाग यासाठी कारणीभूत होता.
विकासासाठी जास्त पाण्याचा आग्रह
जलस्वराज्य प्रकल्प हा कोणत्याही गावाची पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी वरदान ठरतो. करुळमध्येही हा प्रकल्प ग्रामस्थांच्या पुढाकारातून राबवून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. पण केवळ तेवढया पाण्यावर समाधान न मानता गावक-यांनी आणखी पाण्यासाठी आग्रह धरला. गावचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी गावात मुबलक पाणी असणे गरजेचे आहे, असे गावातील प्रत्येक कष्टक-याचे म्हणणे होते. त्यासाठी कोणतेही कष्ट किंवा त्याग करण्याची प्रत्येकाची तयारी होती. कोल्हापूर जिल्हयातील नरवेली धरणाचे पाणी कालव्याने करुळ सहयाद्रीत सोडावे, अशी मागणी मध्यंतरी जोर धरू लागली होती. परंतु, लोकप्रतिनिधींनी शेतक-यांची प्रमुख मागणी शासन दरबारी मांडून गावात दोन धरणे मंजूर करून घेतली. ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिका-यांनी यात चांगला पुढाकार घेतला.
धरणाबाबत सकारात्मक दृष्टिकोन
धरण म्हटले की शेतक-यांचा विरोध हे समीकरण जवळपास सर्वत्र दिसते. तालुक्यातील काही व्यक्तींनी धरण होऊच शकत नाही अशी चर्चा सुरू केली होती. परंतु, शेतक-यांनी व ग्रामस्थांनी धरणासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. बुडीत क्षेत्रातील लाभार्थ्यांना अद्याप कोणताही मोबदला मिळाला नसला तरी गावात पाणी येऊ दे हीच त्यांची भूमिका गावासाठी प्रेरणादायी आहे.
पर्यटन क्षेत्रांचा विकास
श्री देव रामेश्वर व केदारलिंग मंदिराचा परिसर पर्यटन निधी खर्चून सुशोभित करण्यात आला आहे. गावातील इतर देवस्थानांबरोबर किल्ले गगनगड गावच्या उत्तुंग शिखरावर आहे. या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे या ठिकाणी विविध प्रकारचे स्थानिक खाद्यपदार्थ, रानमेवा आणि इतर वस्तूंच्या विक्रीच्या माध्यमातून स्थानिकांच्या उत्पन्नात वाढ होऊ लागली आहे. राष्ट्रपती पदक पुरस्कारासहित गावातील तरुणांनी डॉक्टर, वकील व तहसीलदारपदापर्यंत मजल मारली आहे. शिक्षक तसेच इतर शासकीय कर्मचा-यांमध्ये गावाची संख्या मोठी आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामे झाली आहेत.
तरुण पिढीसमोर गावाचा आदर्श
१३ व्या वित्त आणि पर्यावरणनिधीतून गावात अनेक छोटी- मोठी कामे होत आहेत. गावातील पाणंद व पायवाटा रहदारीसाठी निर्धोक होऊ लागल्या आहेत. शांततेचा संदेश देणारा तंटामुक्त पुरस्कार गावाने पटकावून तरुण पिढीला चांगला आदर्श घालून दिला आहे. पुरस्कारातून मिळालेली तीन लाख रुपयांची रक्कम नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करण्यावर ग्रामपंचायत व तंटामुक्ती समितीने लक्ष केंद्रित केले आहे. समतोल विकास साधताना वाडीवर अन्याय होणार नाही, याची पुरेपूर काळजी गेली कित्येक वर्ष घेण्यात आली आहे. गावातील मंडळे धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहेत. जिल्हा बँक व सहकारी संस्थेचा शेतकरी व सुशिक्षित बरोजगारांना चांगला फायदा होत आहे. गावात माध्यमिक, प्राथमिक व अंगणवाडी शाळा, तसेच सर्व शासकीय कार्यालये आहेत. महिला बचत गटांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत. वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या करुळ धनगरवाडी रस्त्याला शासनाकडून रितसर मंजुरी मिळाली आहे. अशा प्रकारे स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर आणि प्रकल्पांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवणा-या या गावाने सर्वच क्षेत्रांत आदर्श निर्माण केला आहे.
sundar. vastvwadi lekh..