फ्लॉवर, कोबी, गवार आणि बटाटा.. रोज तेच ते आणि तेच ते खाऊन कंटाळलेल्यांसाठी फक्त पावसाळ्यातच येणा-या रानभाज्या ही खूशखबर असते. डोंगरकपारीत राहणारे आदिवासी रानावनात फिरून या भाज्या गोळा करतात आणि नजीकच्या शहरात जाऊन विकतात. या भाज्यांची लज्जत माहीत असलेल्या गृहिणी हमखास एकदा तरी या भाज्या करतातच.
१९व्या शतकात आहारात रानभाज्यांचे प्रमाण खूप होते. शेतात, जंगलात खुरपणी करायला गेल्यावर नैसर्गिकरीत्या उगवलेल्या या भाज्या शेजा-या-पाजा-यांना मोफतच मिळत. पण शहरीकरण व रोजंदारीचे वाढलेले भाव यामुळे या भाज्या ग्रामीण भागातही सध्या विकतच घ्याव्या लागतात. या भाज्यांचे अनेक औषधी उपयोग आहेत. उदा. तांदुळजा भाजीने पोटाचे आरोग्य सुधारते, कोकणात व खानदेशी रानभाज्यात खूप प्रकार आहेत. सध्याच्या पिढीला या रानभाज्यांत रस नाही. जंगल व शेतात नैसर्गिकरीत्या या रानभाज्यांचे उगवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. पावसाची चाहूल लागताच पावसाळी रानभाज्या मोठय़ा प्रमाणात मुंबई-ठाण्यात दिसू लागतात. एरवी वर्षभर मेथी, शेपू, पालक, चवळी, लाल माठ यांसारख्या अनेक पालेभाज्या रोजच्या जेवणाचा भाग असतात; परंतु खास पावसाळी रानभाज्या खाणे, हा एक वेगळाच अनुभव असतो.
टाकळा, शेवरं, कंटोली, भारंगी, फोडशी, कुळू यांसारख्या अनेक भाज्यांची दर्दी खवय्ये मंडळी वाट पाहत असतात. वसई, विरार, पनवेल, कर्जत, नेरळ, अलिबाग या भागांमधून मुंबईच्या बाजारात या भाज्या येतात. जंगलावर उपजीविका करणारे आदिवासी या पावसाळी भाज्या ओळखण्यात पारंगत असतात. शेवरं शोधण्यासाठी नजर लागते. जंगलात खूप आत गेल्यावर मोठय़ा झाडांच्या मुळाशी ही भाजी आढळते. शेवरं खाण्याचा एक विशिष्ट काळ असतो. पाऊस जास्त पडला तर ही भाजी न खाणेच श्रेयस्कर. शेवरं या भाजीला ‘व्हेज खिमा’ असेही म्हटले जाते. दुडीची फुले हा वेल शेतात व इतरत्र नैसर्गिकरीत्या उगवतो. या वेलाच्या फुलांची भाजी करतात. ही पोटाच्या विकारावर गुणकारी आहे. करटुली या भाजीचा वेल असून ती दुडीप्रमाणेच उगवते. यास काटय़ासारखीच फळे येतात. त्याची भाजी बनवतात. ही भाजी रुचकर असते व त्याचा काटेरी भागही शिजतो. तांदुळजा पावसाळ्यात सर्वत्र उगवतो व त्याचा भाजी म्हणून वापर होतो. ‘माठला’ ही एक पालेभाजी रानात उगवते व तांदुळजाप्रमाणेच तिचा वापर आहे. ‘कुर्डू’ याच्यात केनी कुर्डू व दुसरा वाटोळ्या पानाचा कुर्डू असे दोन प्रकार आहेत. श्रावणात वाचल्या जाणा-या कहाणीसंग्रहात या केनी कुर्डूचा उल्लेख सापडतो. घोळ (चिवई) ही भाजी आंबट असून, त्याची पाने जाड असून त्यात पाण्याचा अंश असतो. घोळचे पीठले प्रसिद्ध आहे. तरोटय़ाची पाने मेथीप्रमाणे असतात. भाजी किंचित कडू लागते, पण सांधेदुखीसाठी उत्तम आहे.
रानतोंडली – खानदेशातील जंगलात याचे वेल आढळतात. ही तोंडली नेहमीपेक्षा आकाराने मोठी असतात, चवीस किंचित कडू लागतात.
भुई पालक – ही भाजी जमिनीला अगदी चिकटून येते. याची पाने पालकासारखी लांबोळी असून त्यास काठावर कंगोरे असतात. चव पालकासारखी पण किंचित कडसर असते.
रानशेपू – हा जंगलात आपोआप उगवतो. उग्र वासाचा असून याची भाजी प्रकृतीस उत्तम असते. तसेच नेहमी केळीच्या बागेत जमिनीस चिकटून उगवणारी भाजी चिवई होय. ही पालेभाजी थंड असून हिचा उन्हाळ्यात वापर करतात. उन्हाळ्यात वेगळ्या प्रकारच्या रानभाज्या असतात, त्या म्हणजे भोकराच्या किंवा गोंधण या झाडाला येणा-या कच्च्या बारीक भोकरांना चिघोर असेच म्हणतात. याची कोरडी भाजी बनवतात. रसभाजी बनवल्यास चिकट होते. तसेच अभेटा (आपटा) या झाडास येणाया फुलांच्या कळ्यांची (यासही चिघोर म्हणतात.) भाजी बनवतात. ही भाजी किंचित तुरट लागते. सौदंड (शमी) या झाडास चैत्र वैशाखात येणा-या शेंगांची भाजी उन्हाळ्यात खातात. रानभाज्या केवळ पावसाळ्यात नाही तर उन्हाळ्यातही येतात, हे निदर्शनास येते. जंगलात याखेरीज अनेक फळभाज्या येतात. जसे रानवांगी, रानदोडकी, रानभोपळे. गोल रानभोपळ्याचा तंबो-याकरता वापर होतो. रानटोमॅटो (कटमणी), रानभेंडी, रानघेवडा अशाही इतर भाज्या आहेत. या सर्वाचा खाण्याकरिता वापर करत नाहीत. कोकणात गौरीच्या वेळेला काही रानभाज्यांना मानाचे स्थान मिळत असते.
पांचगणीच्या जंगलात एक झुडुप आढळते, त्यास गोल पेरूसारखे फळ येते. या फळाची भाजी करतात व ती दुधी भोपळ्यासारखी लागते. यास स्थानिक भाषेत ‘चिचू’असे म्हणतात. याचीच झाडे हिमालयात व नेपाळातही आढळतात. त्यास ‘इस्कूस’ असे म्हणतात. कोकणात करंदा नावाचे एक कंदमूळ जंगलात मिळते. हे गडद चॉकलेटी रंगाचे असते. त्यास मुळे असतात. हे कंद उकळून त्याची भाजी करतात. कोकणात तळ्यामध्ये त्याच्या गाळात एक प्रकारचे कंद होतात. याचे पीठ करून ते उपवासाला खातात. हे पीठ साधारण शिंगाडय़ाच्या पिठाप्रमाणे लागते. याशिवाय शेवळे नावाचे एक मूळ मिळते. यात सोडियमचे प्रमाण खूप असल्याने ते खारट लागते. कोनफळ हा गुजराती उंदियोचा कंद म्हणून प्रसिद्ध आहे आणि जंगलात कोनफळाचेही कंद आढळतात. जंगलात भांबुर्डेची झुडपे आढळतात. याची पाने पुढीलप्रमाणे उपयोगात आणली जातात. मडक्यात वाल, वांगे, कांदे, बटाटे तसेच इतर काही भाज्या भरून मडक्याच्या तोंडावर भांबुर्डे याचा पाला घालतात. यानंतर हे मडके उलटे वाळलेल्या गवतावर ठेवतात. गवताचीच भट्टी पेटवून मडके चांगले भाजतात. उष्णतेनेही भाजी छान भाजून निघते व त्यास पानांचाही चांगला स्वाद येतो.
पावसाळ्यात निसर्ग ९ ते १० प्रकारच्या रानभाज्यांची देणगीच देत असल्याने, दररोज वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीची लज्जत चाखणे गरिबांना सहज शक्य होत आहे. रानमेव्याची चव चाखल्यानंतर पावसाळ्यात जून महिन्याच्या अखेरीस निसर्गत: दरवर्षी उगवणा-या रानभाज्या गरिबांना मोठा आधार ठरतात. कोकणच्या ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला या रानभाज्यांची माहिती व उपयुक्तता तसेच आयुर्वेदिक उपयोग माहीत असल्याने पावसाळी हंगामात प्रत्येकाच्या घरात भाकरीच्या तुकडय़ाबरोबर लज्जतदार रानभाजी असतेच.
पावसाळ्यात उगवणा-या सर्व रानभाज्यांचे गुणधर्म सारखेच असून प्रत्येक भाजीत लोह, तंतुमय पदार्थ व इतर खनिजे विपुल प्रमाणात आढळतात. त्यामुळे या रानभाज्या पोटांच्या विकारावर व आरोग्याला उपयुक्त समजल्या जातात. प्रत्येक रानभाजीमध्ये असणा-या लोहामुळे शरीरात रक्तवृद्धी चांगल्या प्रकारे होते. रानभाज्यांमधील प्रत्येक भाजी विशिष्ट पद्धतीने केली, तर त्याची चव अक्षरश: अविट असते. कोवळ्या कुडाच्या शेंगा मोडून पाण्यात निथळत घालतात, नंतर पाणी काढून टाकून पीठ घालून परतून त्यांची भाजी करतात. पोटाच्या आरोग्याला ती उपयुक्त समजली जाते. कोचिंद्याच्या कोवळ्या पाती चिरून त्याची भाजी करतात. कांद्यांना अंकुर फुटल्यानंतर कोवळ्या अंकुरांचीही भाजी केली जाते. कृमी व जंतांवर ही भाजी हमखास गुणकारी आहे.
या हंगामात टाकळ्याची भाजी खाऊन कोकणवासीय कंटाळतात, एवढय़ा विपुल प्रमाणात सर्वत्र टाकळा रुजून येतो. लोहयुक्त टाकळ्यात कडधान्ये घालून सुरेख भाजी केली जाते. टाकळ्याप्रमाणेच कवला या रानभाजीला पिवळी फुले येतात. या भाजीची चवही अविट आहे. भारंगीला करवतीच्या धारेप्रमाणे पाने येतात. हिच्या पानांची व फुलांचीही भाजी केली जाते. फोडशी या रानभाजीच्या पाती हिरव्या व बारीक असतात. कुरडू ही माठाप्रमाणे दिसणारी पालेभाजी काहीशी कडवट आहे. याची फुले टिकाऊ असतात, तर बियांची चटणी केली जाते. लघवीच्या विकारांवर ही उपयुक्त असते. रानअळू हे पावसाच्या सुरुवातीलाच विपुल प्रमाणात उगवून येते. सुरुवातीला कोवळे असतानाच आठला घालून याची भाजी करतात.
बिरंबोळा भाजीला चवळीप्रमाणे शेंगा येतात, गोमेटू भाजीला तोंडलीप्रमाणे लांबट हिरवी फळे येतात. याची भाजी करतात किंवा आमटीत घालतात. गोमेटूची फळे निखा-यात भाजून त्याचा गर पायाला चिखलामुळे होणा-या जखमांवर लावल्यास या जखमा ब-या होत असल्याने कोकणातील शेतकरी वर्ग गोमेटूचा मोठय़ा प्रमाणावर वापर करतो. ही भाजी रुचकर लागते व यास पोपटी असे म्हणतात. कोकणात जंगलात एक प्रकारची वनस्पती होते. या वनस्पतीस हाडसांधी असे नाव आहे. हाडाला मुका मार लागल्यास या वनस्पतीचा लेप त्यावर देतात. कोकण व घाटावर कणगर नावाचा एक वेल जंगलात आढळतो. यास गोल फळे येतात. याची भाजी केली जाते. या कणगरला गोवा पोटॅटो असे लोक म्हणतात. ऋषिपंचमीला बैलाच्या श्रमाचे वर्ज्य असते. त्यामुळे नैसर्गिकरीत्या उगवलेल्या या रानभाज्या त्या दिवशीच्या उपवासाच्या फराळात खातात. रानभाज्यांची नावे सांगणारी व त्यांचे गुण-दोष सांगणारी माणसेही आता अस्तित्वात नाहीत. वनस्पतीशास्त्राच्या व ग्रामीण संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा हा निसर्गठेवाही हळूहळू काळाच्या पडद्याआड जात आहे, हीच खंत आहे.
छान माहिती.