सुधागड शिवाजी महाराजांच्या ताब्यात येण्याआधी याचं नाव भोरपगड होतं. शिवाजी महाराजांनी हा गड ताब्यात घेताच या गडाचं नाव ‘सुधागड’ ठेवलं. सुधागड म्हणजे एक तोलामोलाचा किल्ला. शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम रायगडाआधी याच गडावर राजधानी करण्याचं पक्कं केलं होतं. त्याकरता त्यांनी या गडासाठी काही रकमेची तरतूदपण केली होती. किल्ले रायगडचा महादरवाजा व सुधागडचा महादरवाजा यात खूपच साम्य आहे. या गडाला लाभलेली अभेद्य तटबंदी, गडमाथ्यावरचं विशाल पठार, पाण्याचे असंख्य टाक, तसेच भौगोलिकदृष्टय़ा असलेलं महत्त्व यामुळे या गडाला फार महत्त्व होतं.
नेहमीप्रमाणे बोरिवलीहून आम्ही पंधरा जणांनी खाजगी वाहनाने रात्री साडे दहा वाजता सुधागडला जाण्यासाठी प्रयाण केलं. प्रवासात कोणतीही अडचण न येता मध्यरात्री साडे तीन वाजता आम्ही नागोठणमाग्रे पाली गावात पोहोचलो. पाली गावात सर्वत्र शुकशुकाट होता. नोव्हेंबरचा महिना होता. वातावरणात गारठा होता. आसमंत ग्रुपने आमची झोपण्याची व्यवस्था भक्त निवासमध्ये केली होती. एक, दीड तास आम्ही विसावा घेतला. पहाटे पाच ते साडेपाचच्या सुमारास उठून ट्रेकसाठी तयार झालो. त्या गार वातावरणात गरमागरम वाफाळता चहा घेऊन आम्ही सुधागडाकडे निघालो. पालीपासून सुधागड बराच दूर आहे. पहाट होता होता आम्ही गडाखालच्या ठाकूरवाडी गावात पोहोचलो. सकाळचे सात वाजले होते. आसमंतात अजून संधिप्रकाशच होता. गावातील दोन वाटाडे घेऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली. गडावर जाणारी वाट गावातूनच जाते. गावाच्या पाठीच गडचढणीला सुरुवात होते. गडाचा पहिला टप्पा पार करताच आपल्याला भरभक्कम लोखंडी शिडी लागते. लोखंडी शिडीशिवाय गड चढणं जरा अवघडच आहे. इथे आम्ही डोंगराआडून हळूच वर येणाऱ्या सूर्याचं दर्शन घेतलं. इथून पुढे मात्र आपल्याला दाट जंगल लागतं. वातावरण छान असल्यामुळे थकवा अजिबात जाणवत नव्हता. दीड तासातच आम्ही गडाच्या बुलंद दरवाजात पोहोचलो. काळा कातळ तासून दगडातच भव्य बुरूज कोरून काढलेला आहे. दमछाक करणा-या त्या प्रशस्त पाय-या चढून आम्ही गडप्रवेश केला. आज इथलं प्रवेशद्वार पूर्णपणे ढासळून पडलं आहे. पण प्रवेशद्वार होतं याची साक्ष देत भव्य बुरूज ठामपणे आजही उभे आहेत. गडावर बुरूजाच्या उजव्या हाताला सुबक चोरदरवाजा, बुरूज व तटबंदी पाहायला मिळते. तिथून पुन्हा चढणीची वाट आहे. या वाटेवर आम्हाला सर्पराजाने दर्शन दिलं. रस्त्यातच महाशय सुस्तपणे सकाळचे कोवळे ऊन शेकत आडवे पडले होते. त्यांच्या अशा वागण्यामुळे काही काळ आम्ही खोळंबून राहिलो. शेवटी आमच्या एका सहका-याने त्याला काठीने उचलून बाजूला करून वाट मोकळी केली. वाट निर्धोक होतीच.
आम्ही गड चढून वर आलो. गडावर सर्वत्र पठार होतं. त्यावर गवताचं रान माजलं होतं. पण झाड म्हणून कुठे दिसेना. शेवटी वणीच्या (निरगुडी) झाडाखाली विसाव्यासाठी थांबलो. तिथेच सकाळची न्याहारी केली. सोबत आणलेले कांदा-पोहे सर्वानी पोटभर खाल्ले. सकाळचे दहा वाजून गेले होते. वातावरणातला गारवा केव्हाच गडप झाला होता. गडमाथ्यावर ऊन रणरणायला लागलं होतं. न्याहारी झाल्यावर आम्ही गड पाहायला निघालो. गडावर अनेक ठिकाणी उद्ध्वस्त, पडक्या वास्तूंचे पुष्कळ अवशेष पाहायला मिळतात. तसंच पाण्याची टाकं आणितळीही बरीच आहेत. गडाच्या ईशान्य दिशेला इंग्रजी ‘व्ही’ शब्दाच्या आकाराची दरी आहे. या दरीच्या टोकाशी खाली अप्रतिम, सुबक असा चोरदरवाजा आहे. तो चोरदरवाजा पाहून आम्ही थक्क झालो. काय तो अद्भुत दरवाजा आहे. प्रचंड बुरूजाच्या खाली छोटा चोर दरवाजा, सभोवती बुलंद तटबंदी आजही तग धरून उभी आहे. या ठिकाणी मात्र घनदाट जंगल आहे. इथून दिसणारी तेलबैलाची काळ्या कातळातील अद्भुत भिंत आणि सभोवतालचा निसर्ग याचं वर्णन काय वर्णावं? सर्व काही थक्क करणारं, डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य होतं ते! गड तसा प्रचंड आहे. गडावर दारूकोठाराचे पडके वाडे, घोडे पागा, चोरवाटा, चोर दरवाजे, विहीर, सदर, हत्तीमाळ, धान्य कोठार, भोलेवर मंदिर, सिद्धेश्वर मंदिर आणि भोर संस्थानाने बांधलेलं भोराई देवीचं मंदिर, हे सगळंच खूप आकर्षक आणि पाहण्याजोगं आहे. या मंदिराच्या सभोवती विरगळाचे दगड मांडून ठेवलेले आहेत. तसंच मंदिराच्या सभोवती इतरत्र अनेक आकर्षक सतिशिळांच्या समाधी पाहायला मिळतात. गडावर वास्तव्य करायचं असेल तर एकमेव चांगल्या अवस्थेत असणारं वसतिस्थान म्हणजे पंतसचिवांचा वाडा. याला ‘सरकार वाडा’ असंही म्हणतात. हा वाडा चौसोपी आहे. संपूर्णत: लाकडावर आधारित आहे. तसंच गडाच्या दक्षिण दिशेला टकमक टोक आहे. याला ‘इको पॉइंट’ असंही म्हणतात. या गडाचा आवाका प्रचंड आहे. दुपारच्या जेवणानंतर थोडा विराम करून गडाचा महादरवाजा पाहायला गेलो. गडाचा महादरवाजा पाहताच आम्हाला रायगडच्या महादरवाजाची आठवण झाली. जणू काही रायगडाच्याच महादरवाजाची हुबेहूब छोटी प्रतिमाच वाटावी इतकं दोन्ही दरवाजांमध्ये साम्य आहे. गड पाहायला दोन दिवस हवेत. पण आम्ही एका दिवसात गड जेवढा पाहता येईल तेवढा पाहून घेतला. भोराई देवीच्या मंदिरातच दुपारी तासभर विश्रांती घेऊन दुपारी चारच्या सुमारास आम्ही गड उतरायला सुरुवात केली. रमतगमत आरामात आम्ही संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान सुखरूपपणे गड उतरून खाली आलो आणि परतीच्या प्रवासाला लागलो. सुदैवाने या गडाला ऐतिहासिक पार्श्वभूमी बरीच आहे. पण आपण थोडक्यात या गडाचा इतिहास पाहूया.
सुधागड :- सरासरी उंची : २०३० फूट, (६१९ मीटर) पाली, जि. रायगड. गडावर येण्याचा मार्ग ठाकूरवाडी, पाच्छापूर शिडीचा मार्ग, दुसरा मार्ग धेंडसे गावाकडून जातो.
शिवाजी राजांच्या ताब्यात हा गड येण्याआधी याचं नाव भोरपगड होतं. शिवाजीराजांनी हा गड ताब्यात घेताच या गडाचं नाव ‘सुधागड’ ठेवलं. गडावर भोराईदेवीचं सर्वात पुरातन मंदिर आहे. या भोराई देवीची स्थापना साक्षात भृगुऋषींनी केलेली आहे. म्हणून तिला भृगुंबा, भोरांबा अशीही नावं आहेत. गडावर पंतसचिवांचा भव्य चौसोपी वाडा असून त्याला ‘सरकारवाडा’ असंही म्हणतात. सुधागडाची महती फार थोर आहे. शिवाजीमहाराजांनी गड ताब्यात येताच गडाच्या बांधकामासाठी त्यावेळचे ५००० होन खर्च करून गड बळकट करून घेतला होता. त्या काळी गडावर ७०० गडक-यांचा राबता होता. १६८० मध्ये नारो मुकुंद यांनी मोगलांकडून हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. १६८० मध्ये शिवाजीराजांच्या नंतर औरंगजेब स्वराज्यावर चालून आला. त्यावेळी या गडावर घनघोर लढाई झाली. नारो मुकुंदा यांचे सुपुत्र शंकराजी नारायण यांनी मोठा पराक्रम गाजवला. राजाराम महाराजांनी त्यांचा गौरव केला आणि १६९८ मध्ये भोर संस्थानाचे सचिवपद दिलं. पुढे १८१८ मध्ये इंग्रजांनी स्वराज्य खालसा केल्यावर त्यांनी भोर संस्थान निर्माण करून भोरकरांकडे त्यावेळेस रोहिडा, राजगड, तोरणा, मौनमावळ व कोकणातील एकमेव सुधागड ताब्यात दिला. हे सारे गड भोर संस्थानात असेपर्यंत उत्तम स्थितीत होते. पण भारत देश स्वतंत्र होताच संस्थानं विलीन केली गेली. आणि गड-दुर्गाच्या दुर्दशेला सुरुवात झाली. मित्रांनो, या गडाला अवश्य भेट द्या. आपल्या शिवाजीराजांचे गड पाहताना जो आनंद मिळतो तितकाच किंबहुना त्यापेक्षाही अधिक आनंद आपल्याला तिथे येईल यात शंकाच नाही.
मस्तच… पिंगळे काका लेख एकदम झकास…